जालना दि. 26 (जिमाका) :- दि. 31 ऑगस्ट
2022 पासुन गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेश उत्सवानिमित्त विविध मंडळातर्फे
भंडारा प्रसाद, अन्नदान इत्यादी कार्यक्रम ठेवण्यात येतात, त्याअनुषंगाने सर्व सार्वजनिक
धार्मिक उत्सव मंडळे, त्यांचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन व वितरण करणारे अन्न व्यावसायिक यांनी अन्न सुरक्षा
व मानके अधिनियमानुसार तरतुदींचे पालन करणे बंधनकारक राहील, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन
विभागाने केले आहे.
प्रसाद वितरण
करणाऱ्या मंडळांनी अन्न सुरक्षा कायद्यानुसार
www.foscos.gov.in या वेबसाईटवर नोंदणी प्रमाणपत्रासाठी
ऑनलाईन अर्ज करुन प्रति वर्ष रुपये 100 /- शुल्क भरावे व नोंदणी प्रमाणपत्र घेण्यात
यावे, प्रसाद करताना उत्पादनाची जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी, प्रसादासाठी लागणारा
कच्चा माल अन्नपदार्थ परवाना धारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावा,
तसेच प्रसाद बनविणाऱ्या केटरर्सची माहिती अद्यावत करुन ठेवावी, प्रसादासाठी लागणारी
भांडी स्वच्छ, आरोग्यदायी व झाकण असलेली असावी, आवश्यक तेवढ्याच प्रसादाचे उत्पादन
करावे, उरलेल्या शिळे अन्नपदार्थांची योग्य रीतीने विल्हेवाट लावावी, प्रसाद उत्पादन
व वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठल्याही संसर्गजन्य रोगापासुन मुक्त असावा, लोकांच्या
आरोग्याच्या दृष्टीने वरील मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. जालना जिल्ह्यातील सर्व
सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी वरील सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन सहायक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन,
कार्यालयाने यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment