Saturday 16 December 2017

एक्स्पो 2017 प्रदर्शनाच्या माध्यमातुन नवीन उद्योजक घडण्यास मदत होणार -- राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर

जालना, दि. 15 -  जालना शहरात भरविण्यात आलेल्या जालना एक्स्पो 2017 प्रदर्शनाच्या माध्यमातुन उद्योग व्यवसाय वाढीसाठी नवनवीन कल्पना समोर येऊन नवीन उद्योजक घडण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार असल्याचा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी व्यक्त केला.
          रोटरी क्लबच्यावतीने कलश सिडसच्या प्रांगणात 15 ते 17 डिसेंबर या कालावधीत जालना एक्स्पो 2017 चे आयोजन करण्यात आले आहे.  या प्रदर्शनाचे उदघाटन प्रसाद कोकिळ यांच्या हस्ते करण्यात आले.  त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना राज्यमंत्री श्री खोतकर बोलत होते.
          यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकटेश चन्ना हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन राजेंद्र बारवाले, नगराध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल, माजी आमदार कैलास गोरंट्याल, अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, रोटरीचे अध्यक्ष अकलंक मिश्रीकोटकर, एक्स्पोचे प्रोजेक्ट चेअरमन सुनिल रायठठ्ठा, दीपक बगडीया, शरद लाहोटी, एक्स्पोचे सचिव हेमंत ठक्कर आदींची उपस्थिती होती.
          राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, रोटरीच्या क्लबच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एक्स्पोच्या माध्यमातुन उद्योगांना आकार प्राप्त होऊन अनेक उद्योजक घडले आहेत.  एक्स्पोमध्ये संपुर्ण राज्यभरातुन अनेकविध तंत्रज्ञानावर आधारित विविध उद्योगांची मांडणी होऊन उद्योग हे जगाच्या पातळीवर गेले आहेत  हे एक्स्पोचे मोठे यश आहे. उद्योग हा वेगळया प्रकारची उर्मी मनात तयार करतो असे सांगत एकाच छताखाली विविध तंत्रज्ञान येऊन चर्चेच्या माध्यमातुन अनेक नवीन उद्योजक तयार होण्यास एक्स्पो हे अत्यंत उपयुक्त व यशस्वी ठरत असुन जालना जिल्ह्यात एक्स्पोचे आयोजन केल्याबद्दल आभार व्यक्त करत एक्स्पोच्या माध्यमातुन प्राप्त होणरा निधी गरजु रुग्णांवर प्लास्टीक शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहे. ही बाब अतिशय वाखाणण्याजोगी असुन रोटरीच्यावतीने अनेकविध समाजहिताचे उपक्रम राबविले जातात ही अतिशय स्तुत्य बाब असुन शेतकरी बांधवासाठीही रोटरीने कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करुन जालना शहरात अशा प्रकारच्या प्रदर्शनच्या सेंटरची उभारणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या जागसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला केल्या.
          उदघाटनपर भाषणात प्रसाद कोकिळ म्हणाले की, जालना हे मराठवाड्याचं भुषण आहे.  सीडस् व स्टीलच शहर म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या एक्स्पोच्या माध्यमातुन उद्योग विश्वातील नवनवीन संकल्पना समोर येण्यास मदत होणार असुन हे केवळ प्रदर्शन नसुन यशस्वी उद्योजकांनी केलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाची एकाच छताखाली उपलब्धी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
          अध्यक्षीय समारोपात व्यंकटेश चन्ना म्हणाले की,  रोटरीच्या माध्यमातुन संपुर्ण जगभर समाजहितासाठी कार्य करण्यात येते.  जगभरात 34 क्लबच्या माध्यमातुन तर महाराष्ट्र राज्यात 11 जिल्ह्यात 104 क्लबच्या माध्यमातुन 4 हजार 300 रोटरीयन काम करत आहेत.  जालन्यामध्ये 4 क्लबच्या माध्यमातुन यशस्वीरित्या काम करण्यात येत असुन एक्स्पो 2017 च्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
          यावेळी सुनिल रायठठ्ठा, राजेंद्र बारवाले, नगराध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल, माजी आमदार कैलास गोरंट्याल आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
          कार्यक्रमाचे संचलन डॉ. रमेश अग्रवाल यांनी केले तर आभार दीपक बगडीया यांनी मानले.  कार्यक्रमास रोटरीचे सर्व पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, उद्योजक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

*******

Sunday 19 November 2017

जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जालना जिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठी अधिकाधिक लोकसहभाग आवश्यक पालकमंत्री बबनराव लोणीकर

जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जालना जिल्हा
 टंचाईमुक्त करण्यासाठी अधिकाधिक लोकसहभाग आवश्यक
                                                 पालकमंत्री बबनराव लोणीकर
       जालना,दि.19 – शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत व मुबलक पाणी पुरवठयासाठी जिल्हयात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून विकेंद्रीत पाणीसाठे निर्मितीवर भर देण्यात येत आहे. शासन, स्वयंसेवी संस्थेच्या  माध्यमातून जलयुक्त शिवार अभिनाची कामे प्रभापीपणे करण्यात येत आहेत. संपूर्ण जिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठी अधिकाधिक लोकसहभागाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            आष्टी येथे ग्रामपंचायत अंतर्गत बांधण्यात आलेल्या व्यापारी गाळयांचे लोकार्पण, सोयाबीन खरेदी केंद्राचे उदघाटन तसेच महाजन ट्रस्टच्यावतीने अकोली ता. परतूर येथे करण्यात येणाऱ्या कामांचे उदघाटन पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
            व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, महाजन ट्रस्टच्या श्रीमती नुतन देसाई, मदनलाल सिंगी, रामेश्वर तनपुरे, सुदाम प्रधान, प्रदीप ढवळे, रामप्रसाद थोरात, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, गेल्या दोन वर्षात जिल्हयात जलयुक्त शिवार अभियान अत्यंत प्रभापीपणे राबविण्यात आले आहे. जिल्हयातील नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरण तसेच 600 बंधाऱ्यांच्या निर्मितीबरोबर जलसंधारणाची अनेक कामे करण्यात आली आहेत. महाजन ट्रस्टच्या वतीने घनसावंगी तालुक्यातील 47 गावात, अंबड तालुक्यातील 80 गावात जलसंधारणाची कामे करण्यात आली असून आष्टीसह परिसरातील गावांमध्ये आता या ट्रस्टच्या माध्यमातून कामे करण्यात येणार आहेत.
            शासकीय येाजना यशस्वी करण्यासाठी लोकसहभागही तेवढाच महत्वाचा असून संपूर्ण जिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने जलयुक्त शिवार अभियानात सहभाग नोंदविण्याचे आवाहन करत जलयुक्त शिवार अभियानाची कामे करण्यासाठी शासनामार्फत मशिनला डिझेलचा पुरवठा करण्यात येईल. असेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
श्री. लोणीकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव शासनाने जाहीर केलेला असताना शेतमालाला कमी भावाने काही व्यापारी खरेदी करत असून त्याबाबत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी. शेतकऱ्यांनी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करुन आपला माल कृषी उत्पन बाजार समितीमध्ये आणावा. ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांचे हित जोपासले जाणार असून व्यापाऱ्यांपेक्षा शेतकऱ्यांचा अधिक फायदा व्हावा व पारदर्शीपणे शेतकऱ्यांना अधिकाधिक मोबदला मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ऑनलाईन नोंदणीमुळे तात्काळ मोजमाप होऊन लवकरात लवकर मोबदला देण्यात येणार आहे. मागे झालेल्या तूर घोटाळ्याची आठवण देत व्यापाऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
            परतूर तालुक्यातील आष्टीसह 16 गावांच्या विकासासाठी राष्ट्रीय रुरबन येाजनेतून उपलब्ध 185 कोटी रुपयांच्या माध्यमातून गावांच्या सर्वांगिण विकासाबरोबरच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीपुरक व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. शेतीपिकातून विविध उत्पादने तयार करुन त्यावर प्रक्रिया करणारे छोटेछोटे उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. टोमॅटो, केळी, बटाटे, सोयाबीन या पिकांचे या भागात मोठया प्रमाणावर उत्पादन होते या पिकापासून तयार केलेल्या मालाला बाजारपेठेत मोठया प्रमाणात मागणी असून गावातील शेतकऱ्यांचे बचतगट तसेच महिलांच्या बचतगटांना एकत्रित करुन परतूर तालुक्यात 100 प्रकल्प उभारण्याचा मानस असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय रुरबन हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून देशात या माध्यमातून 100 तर राज्यात सहा क्लस्टर करण्यात येत असून यामध्ये आष्टीसह 16 गावांचा समावेश करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            परतूर तालुक्याच्या सर्वांगिण विकास करण्यात येत असल्याचे सांगत ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून 124 व्यापारी गाळे उभारण्यात आले आहेत. या व्यापारी गाळयामुळे एकाच ठिकाणी बाजारपेठ विकसित व्हावी व व्यापाऱ्यांना हक्काची जागा मिळावी या हेतूने या गाळयाची उभारणी करण्यात आली आहे. या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या उत्पन्नात भर पडून सर्वसामान्य नागरिकांसाठी एकाच छताखाली बाजारपेठ मिळणार आहे. येणाऱ्या काळात या ठिकाणी आणखीन 124 व्यापारी गाळयांची निर्मिती करण्यात येणार असून तालुक्याच्या विकासासाठी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
            जिल्हयातील रस्ते विकासावर भर देण्यात येत असून शेगाव ते पंढरपूर हा 2 हजार कोटी रुपये खर्चून पक्का व मजबूत असा सिमेंट रस्ता तयार करण्यात येत आहे. मतदारसंघातून जवळपास 95  कि.मि. हा रस्ता जात असून या रस्त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल कमी वेळेत बाजारपेठ घेवून जाण्यास मदत होण्याबरोबरच या रस्त्यामुळे अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. त्याचबरोबर दरवर्षी पंढरपूर ला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाचाही प्रश्न यामुळे सुटणार आहे. जिल्हयात रस्ते विकासासाठी साडेपाच हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून अनेक भागात रस्त्यांची कामेही सुरु झाली आहेत. जालना-अंबड-वडीगोद्री या 300 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आला असून या रस्त्यांच्या कामासाठी लवकरच सुरुवात करण्यात येईल. येणाऱ्या काळात जिल्हयातील एकही रस्ता पक्या व डांबरी रस्त्याशिवाय वंचित राहणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली.
            राज्यावर मोठया प्रमाणात कर्ज असतांनासुध्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना देशातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. या कर्जमाफीचा फायदा राज्यातील सर्व पात्र व गरजू शेतकऱ्यांना होणार आहे. शासन शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत असून येणाऱ्या काळातही शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
            यावेळी महाजन ट्रस्टच्या श्रीमती नुतन देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, सुरेश केसापूरकर आदींचीही समयोचित भाषणे झाली.
            या कार्यक्रमाला सुदाम प्रधान, रामप्रसाद थोरात, बंकटराव सोळंके, अशोक बरकुले, डिगांबर मुजमुले, अर्जुन राठोड, शिवाजी पाईकराव, रंगनाथ येवले, विष्णू शहाणे, गणपत सातपूते, माणीकराव वाघमारे, सिध्देध्वर सोळंके, जिजाबाई जाधव, तुकाराम सोळंके, बाबाराव थोरात, संपत टकले, माऊली सोळंके, सरपंच अमोल जोशी, शे.अहमद, मुजीब भाई, इस्माईल पठाण, सुभाणी जमीनदार, आदित्य पांचाळ, रामदास सोळंके, व्यापारी महासंघाचे राजेंद्र बाहेकर, नारायण पळसे, तहसीलदार फुफाटे, गटविकास अधिकारी राजेंद्र तांगडे, कृषी अधिकारी कांबळे, ए.आर.देवरे, कैलास मुजमुले, आत्मासाहेब ढवळे, रमेश आढाव, ग्रामसेवक डी.बी. काळे यांनी संचलन केले. सिध्देश्वर केकाण यांच्यासह            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, यांच्यासह नागरिक महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
****-***







       

Wednesday 18 October 2017

शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी व वीजेचा पुरवठा करुन उत्पादन वाढीवर भर देणार -पालकमंत्री बबनराव लोणीकर



शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी व वीजेचा पुरवठा करुन उत्पादन वाढीवर भर देणार
n  पालकमंत्री बबनराव लोणीकर
कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन शुभारंभ
जालना, दि. 18 :- जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी व शाश्वत वीज देऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीवर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधतांना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
यावेळी आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, माजी आमदार अरविंद चव्हाण, माजी आमदार विलासबापू खरात, भास्कर दानवे, सिद्धीविनायक मुळे, देविदास देशमुख, सुभाष राठोड, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी  पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, राज्यावर 3 लाख 86 हजार कोटी रुपयांचे कर्ज असतानासुद्धा राज्य शासनाने देशातील सर्वात मोठी कर्जमाफी केली आहे.  विविध योजनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीवर भर देण्यात येत असुन जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामे करण्यात आली आहेत.  यांत्रिकी विभागाकडे असलेल्या मशिनरी जालना जिल्ह्यात आणुन समानतेने जलयुक्तची कामे करण्यात आली आहेत.  राज्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन 11 हजार नद्यांचे खोलीकरण करण्यात आले असुन शेतीव्यवसायामध्ये यापूर्वी गुंतवणुक होत नव्हती.  परंतू राज्य शासनाने ही गुंतवणुक 26 हजार कोटी रुपयांपर्यंत केली असुन शेतीला जोडंधदे म्हणुन कुक्कुटपालन, शेळी पालन, दुग्ध व्यवसाय या  माध्यमातुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीवर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील जनतेसह शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला योग्य दाबाने वीजेचा पुरवठा व्हावा यासाठी जिल्ह्यात विजेचे जाळे निर्माण करण्यात येत असुन जिल्ह्यात 33 के.व्ही. चे 49 केंद्रे मंजुर असुन त्यापैकी 19 उपकेंद्राच्या निविदा होऊन कामे सुरु होत आहेत तर 220 के.व्ही. जालना व परतूर येथे पुर्ण क्षमेतेने केंद्र कार्यरत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दलित समाजाच्या विकासासाठी असलेल्या निधीचा वापर या कर्जमाफीसाठी करण्यात येणार असल्याच्या अफवा समाजामध्ये पसरवल्या जात असुन दलित समाजाच्या विकासासाठी असलेल्या निधीतून एकही पैसा यासाठी वापरला जाणार नसल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या लक्ष्मण परिहार, भगवान जाधव, श्रीमती कावेराबाई फकीरबा परिहार, श्रीमती रुखमीनी प्रल्हाद सोसे, विजयमाला सोसे, लिलावती दादाराव मोरे, महानंदा उत्तमराव घुगरगे, शांताबाई किसन बहेर, पठाण लालाभाई रहिम, रंजित लक्ष्मण शेलुटे, दत्तू पेढणे, सोनानी जनाजी हिवाळे, मिराबाई बालासिंग चाँदा, आसराबाई शेषराव जाधव, सुभद्राबाई गेणू खरात, कौसल्याबाई भाऊसाहेब ढगे, विश्वनाथ कोचट, इंदीराबाई उमाजी गवारे, सुमनबाई आसाराम बोनगे, तुळशिराम साने, सुखदेव दाभाडे, लिलाबाई भगवान ठोंबरे, पार्वताबाई खंडू सहाने, जाफरबेग अहमदबेग मिर्झा, लताबाई अशोक गाढे या   शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक एन.व्ही.आघाव यांनी केले.  कार्यक्रमास व्ही.पी.रोडगे, डॉ. ए.बी. काशिकर, संजय देवरे, बी.टी. भोजने, पी.एच. बेरा, श्रीमती प्रेरणा शिवदास, श्रीमती ए.एम शहा, शरद तनपुरे, प्रशांत गावंडे, महेश जयरंगे, प्रदीप मघाडे, पी.आर.मोताळे, एस.जी.जडे, सुहास साळवे, गोपी चन्नू, कृष्णा कानडे, श्री. बावस्कर  यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***-***




Monday 16 October 2017

गटशेतीमुळे शेतकऱ्यांच्या जिवनात परिवर्तन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



गटशेतीमुळे शेतकऱ्यांच्या जिवनात परिवर्तन
-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘ड्राय पोर्ट’मुळे होणार निर्यातीत वाढ
18 तारखेपासून कापूस खरेदी
-          
       जालना,दि.16  गटशेतीमुळे शेती क्षेत्र मोठया प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे विविध प्रकारचे पिक घेता येते. तंत्रज्ञानासह  यांत्रिकीचा वापर करता येत असल्याने उत्पादनात आणि पर्यायाने उत्पनात वाढ होते परिणामी गटशेती शेतकऱ्यांच्या जिवनात परिर्वन घडवून आणत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
          देळेगव्हाण येथे ॲग्रो इंडिया गटशेती संघ पुरस्कृत इंडिको फॉर्मर प्रोडयुसर कंपनी आयोजित 146 व्या द्वादश मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी जालना जिल्हयाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सर्वश्री आमदार संतोष दानवे, नारायण कुचे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे उप विभागीय अभियंता ल.सि.(जलसंधारण) उपविभाग भोकरदनचे आर.के.जाधव, कार्यकारी अभियंता ल.सि.(जलसंधारण) जालना विभागाचे एस.डी.डोणगांवकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे आदी उपस्थित होते. 
          पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, शेतीची उत्पादकता कमी होत आहे कारण शेतीचे लहान-लहान तुकडे होत गेल्याने शेतीमधील गुंतवणूक कमी झाली, यांत्रिकीचा वापर करणे अवघड झाले परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला यावर गटशेती सारखा पर्याय नसल्याचे सांगूण मुख्यमंत्री म्हणाले की, देळेगव्हाण येथील गटशेती पाहुन मनस्वी आंनद झाला. शासनाने तयार केलेल्या गटशेतीच्या मॉडलमध्ये देळेगव्हाणच योगदान महत्वपूर्ण आहे. गटशेती धोरणाअंतर्गत 200 कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून शेतकऱ्यांच्या जीवनात परिर्वत आणणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
          जलयुक्त शिवार योजनेविषयी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की या योजनेअंतर्गत राज्यात अनेक कामे झाले असून 11 हजार गावांना लागणारे पिण्याचे टँकर कायमस्वरुपी बंद झाले. ज्या ठिकाणी केवळ खरीपाचे पीक घेतल्या जात होते त्या ठिकाणी शेतकरी आता रब्बी चेही पिक घेत असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, समृध्दी महामार्गामुळे शेतकऱ्यांचा माल जे.एन.पी.टी. बंदरापर्यत  कमी वेळेत पोहचता येणार आहे. या महामार्गामध्ये कोल्डचेईन उभारण्यात येणार असल्यामुळे नाशवंत फळांसाठी याचा फायदा होणार आहे. जालना जिल्हयात होणाऱ्या ‘ड्राय पोर्ट’मुळे निर्यातीत वाढ होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
          कर्जमाफी विषयी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याच्या शासन निर्णयाची अमलबजावणी सुरु आहे. 18  ऑक्टोबर, 2017 पासून कर्जमाफीचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या कर्जमाफीचा फायदा राज्यातील गरजू शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच 18 तारखेपासून कापूस खरेदी सुरु करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी भावात व्यापाऱ्यांना कापूस विक्री करु नये. शासनाच्या केंद्रावर हमीभापेक्षा निश्चितच जास्त भाव शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
          या प्रसंगी पालकमंत्री बबनराव लोणीकर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे यांनी आपले विचार मांडले.
          या कार्यक्रमापुर्वी राज्य शासनाच्या नदी पुनरोज्जीवन योजनेअंतर्गत जाफ्राबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथील जीवनरेखा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे जलपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. तसेच मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते राजूर ते चिखली या राष्ट्रीय महामार्गाचे भुमीपूजन, गटशेती शिवार पाहणी तसेच जलपूजनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पार पडला. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
***-***




जालना शहराचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



जालना शहराचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी
शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
           जालना, दि. 16 – गेल्या तीन वर्षात जालना जिल्ह्यासह शहराचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले असुन येणाऱ्या काळात जालना जिल्ह्याचा अधिक चांगल्या पद्धतीने विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
          शहरातील वृंदावन हॉल येथे सिमेंट रस्त्याचे लोकार्पण व विकास परिषद टप्पा-2 कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.
          यावेळी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश टोपे, माजी आमदार संतोष सांबरे, कैलास गोरंट्याल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, रसायन तंत्रज्ञान विभागाचे कुलगुरु पद्मश्री जे.डी. यादव, भास्कर आंबेकर, माजी आमदार अरविंद चव्हाण, उद्योगपती सुनिल रायठठ्ठा, महेश शिवणकर, मनोज पांगरकर, किशोर अग्रवाल, राजु बारवाले, सुनिल आर्दड, रामेश्वर पाटील भांदरगे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, आदींची उपस्थिती होती.
          मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, जालना जिल्ह्यासह शहराचा रस्तेविकास, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भुयारी गटार योजना यासारख्या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जिल्ह्यात रस्तेविकासासाठी जवळपास साडेपाच हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असुन या माध्यमातुन जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे मजबुत करण्यात येत आहे.  शहरात उड्डाणपुल तसेच जालना शहरासाठी आवश्यक असलेल्या बाह्यवळण रस्त्याचा प्रश्नही तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
          आयसीटी सारखी इन्स्टीट्युट जालना शहरामध्ये होत आहे.  या संस्थेच्या माध्यमातुन देण्यात येणारे शिक्षण हे रोजगाराभिमुख असुन शेतीपुरक उद्योग, केमिकल टेक्नॉलॉजी, पर्यावरण, अपारंपरिक ऊर्जास्त्रोत यासाठी संशोधन व मनुष्यबळ निर्मितीचे काम हे या संस्थेच्या माध्यमातुन होणार आहे.  या संस्थेतुन शिक्षण घेतलेला विद्यार्थी बेरोजगार राहणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
          औरंगाबाद येथे असलेल्या डीएमआयसीचा सर्वांत जास्त फायदा औरंगाबाद व जालना शहराला होणार आहे.  डिसेंबर, 2018 पर्यंत शेंद्रा-बिडकीन येथे इंडस्ट्रीयल स्मार्ट सिटीचा पहिला फेज पूर्ण करण्यात येणार आहे.  या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर उभारणी झाल्यास अनेक उद्योगधंदे  या ठिकाणी येणार आहेत.  जालना जिल्हा ही औद्योगिकनगरी असुन याला चांगली कनेक्टीव्हीटी देण्याबरोबरच चांगल्या दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
          जालना शहरापासुन जवळच असलेल्या दरेगाव परिसरात ड्रायपोर्टची उभारणी करण्यात येत आहे.  या ड्रायपोर्टमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह उद्योजकांनी उत्पादित केलेल्या मालाला आंतराष्ट्रीय बाजारपेठेत चांगला भाव मिळण्याबरोबरच बेरोजगारांच्या हाताला मोठ्या प्रमाणात काम मिळणार आहे. तसेच 40 हजार लोकांना रोजगार देण्याची क्षमता असलेल्या सीडस पार्कचीही उभारणी जालना जिल्ह्यात होत आहे.  येणाऱ्या काळात जिल्ह्याचा अधिक गतीने विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
          शेतकऱ्यांना कर्जापासुन माफी देण्याचा शासनाने निर्णय घेऊन येत्या 18 तारखेपासुन कर्जमाफीचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या कर्जमाफीचा फायदा राज्यातील गरजु शेतकऱ्यांना होणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
          राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, गतीमान शासन व गतीमान विकास या माध्यमातुन जालना जिल्ह्यातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचा विकास मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.  जालना जिल्ह्याच्या विकासासाठी मांडलेल्या सर्व मागण्या मुख्यमंत्री मान्य करतील असा विश्वास असल्याचे सांगत जालना येथे सिडकोचा प्रकल्प व्हावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
          खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, जालना हे व्यापारी शहर आहे.  व्यापारीकरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा गेल्या दोन वर्षात प्रयत्न करण्यात आला.  ड्रायपोर्ट प्रकल्, सीडस पार्क, रसायन तंत्रज्ञान विद्यालय यासारखे अनेकविध जिल्ह्यासाठी मंजुर करण्यात आले असुन या माध्यमामुन रोजगार वाढीबरोबरच बेरोजगारांच्या हाताला मोठ्या प्रमाणात काम मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
          रसायन तंत्रज्ञान विभागाचे कुलगुरु जे.डी यादव म्हणाले की, रसायन तंत्रज्ञान महाविद्यालयाची उभारणी 200 एकर जागेवर जालना येथे करण्यात येत असुन या मुंबई येथे असलेल्या या महाविद्यालयाने 500 पेक्षा अधिक उद्योगपती निर्माण केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगुन महाविद्यालय स्थापनेबाबत एलसीडी द्वारे माहिती दिली.
          प्रांरभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात येऊन वृंदावन हॉल येथे दीपप्रज्वलनाने विकास परिषद कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास प्रतिष्ठित नागरिक, उद्योगपती, पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******