जालना - प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या माध्यमातुन
गत वर्षात 2 कोटी 25 लाख लोकांना गॅसच्या जोडण्या देण्यात आल्या असुन येणाऱ्या काळात
देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत गॅस पोहोचेल.
देशातील एकही व्यक्ती गॅस कनेक्शनपासुन वंचित राहणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय
पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी दिली.
शहरातील
कलश सीडस् येथील सभागृहात प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांना गॅसकिट वाटपाचा
कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री
श्री प्रधान बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री
बबनराव लोणीकर, खासदार रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, घनश्याम
गोयल, सुरेश अग्रवाल, अभय करवा, किशोर अग्रवाल, माजी आमदार अरविंद चव्हाण, माजी आमदार
विलासबापू खरात, रामेश्वर भांदरगे आदींची उपस्थिती होती.
केंद्रीय मंत्री श्री प्रधान म्हणाले चुलीवर
स्वयंपाक केल्याने होणाऱ्या धुरामुळे देशातील 5 लाख महिलांचा दरवर्षी मृत्यू होतो. याचा परिणाम लहान मुले तसेच वयोवृद्धांवरही मोठ्या
प्रमाणावर होत असल्याने या यातनेतुन सर्वसामान्यांना मुक्ती देण्यासाठी प्रधानमंत्री
उज्वला योजनेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक
व्यक्तीला गॅस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
1955 ते 2014 या कालावधीमध्ये देशातील 14 कोटी घरामध्ये गॅस देण्यात आला होता. परंतू नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेले
शासन गत तीन वर्षात 7 कोटी घरापर्यंत गॅस पोहोचविण्यात यशस्वी झाले आहे. देशातील गोरगरीब कुटूंबाकडे गॅस घेण्यासाठी पैसे
नाहीत अशा सर्व कुटूंबांना येत्या काळात गॅस देण्यात येणार असल्याचेही केंद्रीय मंत्री
श्री प्रधान यांनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद
देत GIVE IT UP या योजनेमध्ये देशातील एक कोटी
जनतेने सहभाग नोंदवत गॅसमध्ये मिळणारी सबसिडी सोडली आहे. या सबसिडीच्या माध्यमातुन देशातील गोरगरीब जनतेला
गॅस कनेक्शन उपलब्ध करुन देण्यात येत असल्याने अधिकाधिक नागरिकांनी गॅसची सबसिडी सोडण्याचे
आवाहन करत जालना जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत गॅस पोहोचविण्यात येईल असे आश्वासनही
त्यांनी यावेळी दिले.
यावेळी पंतप्रधान उज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांना
केंद्रीय मंत्री श्री प्रधान यांच्या हस्ते गॅसकिटचे वाटप करण्यात आले. तसेच GIVE
IT UP अंतर्गत गॅस सबसिडी सोडणाऱ्या धीरज छाबडा,
श्री मिश्रीकोटकर, शेख हारुन शेख गफ्फुर, डॉ. राजेश सेठीया,विजयकुमार राठी,डॉ. उमेश
मंत्री,श्री जनार्धन,नंदकुमार कुंचगे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वाक्षरीचे
आभारपत्र केंद्रीय मंत्री श्री प्रधान यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी खासदार रावसाहेब दानवे यांनी सर्व
उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, उद्योजक,
प्रतिष्ठित नागरिक तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.