Monday 26 July 2021

जिल्ह्यातील प्रत्येक गरजु व पात्र शेतकऱ्याला पीककर्ज मिळालेच पाहिजे पीककर्ज न देणाऱ्या बँकांना शासनामार्फत कुठल्याही प्रकारचे सहकार्य केले जाणार नाही बँकेत येणाऱ्या प्रत्येकला सौजन्याची वागणुक द्या बँकांमधील एजंटगिरी खपवुन घेतली जाणार नाही -- पालकमंत्री राजेश टोपे

 



            जालना, दि. 26 – जालना जिल्हा हा कृषिप्रधान जिल्हा असुन जिल्ह्याची अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबुन असते.  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकाच्या लागवडीसाठी पीककर्जाची आवश्यकता असते. परंतु जिल्ह्यातील बँकांच्या उदासिनतेमुळे शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज मिळत नाही. जिल्ह्यातील बँकांनी त्यांना देण्यात आलेल्या पीककर्जाचे उद्दिष्ट 100 टक्के पुर्ण करत  प्रत्येक गरजु पात्र शेतकऱ्याला पीककर्ज मिळालेच पाहिजे. ज्या बँका पीककर्जाचे उद्दिष्ट पुर्ण करणार नाहीत, अशा बँकांमधील सर्व शासकीय ठेव काढुन घेण्याबरोबरच या बँकांना शासनामार्फत कुठल्याही प्रकारचे सहकार्य करण्यात येणार नसल्याची भूमिका राज्याचे सार्वजनिक आरोग्य कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी घेतली.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पीककर्ज वाटपाबाबत आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बँक अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.

            यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रेषित मोघे, स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे आनंद बागुल, बँक ऑफ इंडियाचे विजय के. सोनकुसारे, आय.सी. आय. सी. आय.चे पवन अवधुत, इको बँकेचे जगमोहन कंसारा, ॲक्सिस बँकचे श्री. आनंद, इंडसइंड बँकेचे निलेश सिंधीकर, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे नितीन वाघ, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एस.एस. येवतीकर, बँक ऑफ बडोदाचे गौरव माहेश्वरी, कोटक महिंद्रा बँकेचे श्रीकृष्ण दाभाडकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जालनाचे आशुर्तोष देशमुख, युनियन बँक ऑफ इंडियाचे योगेशे गि-हे, एच.डी.एफ.सी. चे उल्हास नारखेडे, आय.डी.बी.आय. बँकेचे विनोद जवादे, इंडियन ओवरसीज बँकचे चंद्रकांत निनावे, एच.डी.एफ.सी. बँकेचे तान्हाजी साठे, इंडियन ओवरसीज बँकचे अविनाश गायकवाड, पंजाब नॅशनल बँकेचे ज्ञानेश्वर इंगळे, इंडियन बँकेचे राजीव रंजन कुमार आणि इंडियन बँकेचे अतुल दारुडे आदींची उपस्थिती होती.

            पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले,  चालु वर्षाच्या खरीप हंगामात जुलै महिना संपत आलेला असताना राष्ट्रीयकृत, व्यापारी, ग्रामीण बँकांचे कर्जवाटपाचे प्रमाण अत्यल्प आहे.  या सर्व बँकांनी शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन कुठलेही कारण देता कर्जवाटपाचा वेग वाढवावा.  ज्या बँका त्यांना दिलेले पीककर्जाचे उद्दिष्ट पुर्ण करणार नाहीत, अशा बँकांना प्रशासनामार्फत नोटीस बजावण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना करत शासनाच्या अनेकविध योजनांचा निधी लाभार्थ्यांपर्यंत बँकेच्या माध्यमातुन पोहोचविण्यात येतो. कोट्यावधी रुपयांचे व्यवहार या बँकामार्फत करण्यात येत असल्याने  बँकांना याचा मोठा लाभ होतो. शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करणाऱ्या बँकांना नोटीस बजाऊन अशा बँकामार्फत शासनाच्या एक रुपयाचाही व्यवहार का करण्यात येऊ नये याबाबतचे पत्र प्रत्येक बँकांना देण्याची चर्चा मंत्रीमंडळाच्या बैठकीत करण्यात आली असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले. 

       जालना जिल्ह्याला खरीपाच्या पीककर्जाचे 1179 कोटी 52 लक्ष रुपयांचे उद्दिष्ट जिल्ह्यातील बँकांना देण्यात आले असुन आतापर्यंत बँकांनी 84 हजार शेतकऱ्यांना 389  कोटी 58 लक्ष म्हणजेच उद्दिष्टाच्या केवळ 38 टक्केच पीककर्ज वाटप केले आहे.  1179 कोटी 52 लक्ष रुपयांपैकी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच युनियन बँक या एकुण पाच बँकांना जवळपास 900 कोटी रुपयांचे पीककर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले असुन उद्दिष्टाच्या तुलनेमध्ये या बँकांनी अत्यंत कमी पीककर्जाचे वाटप केले असल्याने नाराजी व्यक्त करत बँकांनी अधिक जलदगतीने पीककर्ज वाटप करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या.

            जिल्ह्यातील बँकांमध्ये शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक आपले काम घेऊन सातत्याने येत असतो. बँकेत आलेल्या शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना चांगल्या पद्धतीची वागणुक देण्यात येत नसल्याबरोबरच किरकोळ कागदपत्रांसाठी सातत्याने बँकेत चकरा मारायला लावणे,  कामे एजंटामार्फत करावी लागत असल्याच्या अनेक  तक्रारी येत आहेत.  बँकेत येणाऱ्या प्रत्येकाला सौजन्याची वागणुक मिळण्याबरोबरच बँकातील कामांसाठी एजंटगिरी खपवुन घेतली जाणार नसल्याची सक्त ताकीदही पालकमंत्री श्री टोपे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली.

*******

राज्यातील पहिल्या मेडीकॅब रुग्णालयाचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते उदघाटन संपन्न जालना जिल्हा आरोग्य सुविधांच्यादृष्टीने स्वयंपुर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न - पालकमंत्री राजेश टोपे

 






       जालना, दि. 26 (जिमाका):- जालना जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या दर्जेदारपणे मिळाव्यात. तसेच  रेफर हॉस्पीटल म्हणुन जालन्याला लागलेला डाग पुसुन काढण्याबरोबरच जालना जिल्हा आरोग्य सुविधांच्यादृष्टीने स्वयंपुर्ण होण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्नशिल असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

            जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या 100 खाटांच्या मेडीकॅब रुग्णालयाचे उदघाटन तसेच नेत्र विभागात करण्यात आलेल्या नुतणीकरणाचे उदघाटन पालकमंत्री श्री टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

            व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे,आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. प्रताप घोडके, डॉ. पद्मजा सराफ, डॉ. संजय जगताप, कार्यकारी अभियंता श्री चांडक आदींची उपस्थिती होती.

            पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, मास्टरकार्ड या कंपनीच्या अर्थसहाय्याने अमेरीका इंडीया फाऊंडेशन यांच्या सहकार्यातुन अत्यंत सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त अशा 100 खाटांच्या मेडीकॅब हॉस्पीटलची उभारणी अवघ्या एका महिन्यात करण्यात आली आहेमास्टरकार्ड कंपनीमार्फत संपुर्ण देशामध्ये अशाच पद्धतीच्या दोन हजार खाटांच्या रुग्णालयांची उभारणी करण्यात येणार असुन महाराष्ट्र राज्यामध्ये बारामती, अमरावती जालना या तीन ठिकाणी प्रत्येकी 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहेअशा पद्धतीचे राज्यातील पहिल्या रुग्णालयाच्या शुभारंभ जालनामध्ये होत असल्याचा आनंद होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            जालना जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा अधिक दर्जेदार चांगल्या पद्धतीच्या मिळण्यासाठी आरोग्यसेवेचे बळकटीकरण करण्यावर भर देण्यात येत आहेजालना येथे कोव्हीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात बेडची निर्मिती करण्याबरोबरच तालुकास्तरावरही मोठ्या प्रमाणात बेडस उपलब्ध करुन देण्यात आलेरुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासु नये यादृष्टीने लिक्वीड ऑक्सिजन प्लँट, पीएसए प्लँटची उभारणी करण्यात येऊन ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये जालना जिल्हा स्वयंपुर्ण असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

            अंबड, घनसावंगी येथील रुग्णालयामध्ये तसेच जिल्हा महिला रुग्णालयामध्ये  उपलब्ध असलेल्या बेडव्यतिरिक्त अधिकच्या बेडची निर्मिती करण्यात येत असुन मंठा, भोकरदन  येथे  या ठिकाणी आरोग्य सुविधा बळकट करण्यावर भर देण्यात येत आहेआजघडीला जिल्हा रुग्णालयामध्ये सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या असुन सीटीस्कॅन, सी.आर सिस्टीम, एम.आर.आय, सोनोग्राफी, डायलीसीस, केमोथेरेपी सुविधा, आरटीपीसीआर लॅब, प्लाझ्मा थेरेपी,पॅथो लॅब अद्यावतीकरण संदर्भ सेवा रुग्णवाहिका, सर्जिकल आयसीयु यासारख्या यंत्रणा उपलब्ध करुन देण्याबरोबरच रुग्णालयात असलेली मनुष्यबळाची कमतरता भासु नये यासाठी रिक्त असलेल्या जागा प्राधान्याने भरण्यासाठीही प्रयत्न केले जात असल्याचे सांगत कोरोनाच्या संभाव्य तीसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जालना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

            आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले, जालना जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा चांगल्या पद्धतीने मिळाव्यात यासाठी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातुन अनेकविध प्रकल्प जालना जिल्ह्यात सुरु करण्यात आल्याबद्दल पालकमंत्री महोदयांचे आभार व्यक्त करत जालना जिल्ह्यात मेडीकल कॉलेजच्या उभारणीसाठीही आवश्यक ते प्रयत्न होण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी मेडीकॅब रुग्णालय  उभारणी तसेच आरोग्य सुविधांबाबत सविस्तरपणे माहिती दिली.

मेडीकॅब रुग्णालय

  कोवीड रुग्णालयाचे विस्तारीकरण करणे तसेच आरोग्याच्या पायाभुत सुविधा मजबूत करण्यासाठी याची उभारणी केली आहे. या रुग्णालयाचे आयुष्यमान साधारणत: 25 वर्षे असल्याने कोरोना संसर्ग संपूर्णत: आटोक्यात आल्यानंतरसुध्दा या रुग्णालयाचा विलगीकरण कक्ष किंवा कर्करोग कक्ष किंवा भविष्यात शासनाच्या इतर आरोग्य सेवा करीता उपयोग करण्याचा मानस आहे.

   जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात साधारणत: 30 हजार चौरस फुट जागेवर हा प्रकल्प उभारण्यात आला असून 21 हजार चौरस फुट ओटा तयार करण्यात आला आहे. यामध्ये ओटा बांधतानाच पाणी, वीज व ड्रेनेज लाईन्स टाकण्यात आल्या आहेत.

     मेडीकॅब हॉस्पीटल रचना व क्षमता या हॉस्पीटलमध्ये तपासणी व निरीक्षण कक्ष, डॉक्टर कक्ष, अलगीकरण कक्ष हे चार विभाग असुन अत्याधुनिक विलगीकरण खाटा -92, अत्याधुनिक अतिदक्षता खाटा-8 अशा एकुण 100 खाटा असुन सेंट्रल ऑक्सीजन सुविधा, आय.सी.यु. मध्ये एन.आय.व्ही. सुविधा, विलगीकरणे कक्षामध्ये ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर, मल्टीपॅरा मॉनिटर, ऑक्सीजन मेनिफोल्ड व ड्युरा सिलेंडर्स, जनरेटर संच, दोन पाण्याच्या टाक्या, याशिवाय आवश्यक असलेल्या इतर सुविधाही या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.  

 

 

            यावेळी पदाधिकारी, अधिकारी तसेच नागरिकांची उपस्थिती होती