Monday 19 July 2021

लसीकरणाबाबत ग्रामीण भागात व्यापक स्वरुपात जनजागृती करा -पालकमंत्री राजेश टोपे

 




       जालना, दि. 19 (जिमाका):- कोव्हीड19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्यांबरोबरच लसीकरणही तेवढेच महत्वाचे आहे.  जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये लसीकरणासाठी नागरिक पुढे येताना दिसुन येत नाहीत.  जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी अधिक प्रमाणात वाढावी यासाठी लसीकरणाबाबत होर्डिंग, समाजमाध्यमे, हँडबील, केबलनेटवर्क यासारख्या माध्यमांचा वापर करुन व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

       जालना जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.     

            यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद मनुज जिंदाल, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्ये, जिल्हा शल्यचित्किसक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, कल्याणराव सपाटे, डॉ. संजय जगताप, नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नार्वेकर, अन्न औषध विभागाच्या श्रीमती अंजली मिटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

        पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी होणार नाही याची दक्षता घेऊन लोरिस्क हायरिस्क सहवासितांचा शोध घेऊन त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात याव्यात.  जालना जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर हा आजघडीला जरी कमी असला तरी हा दर भविष्यात वाढु नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. जिल्ह्यात स्वॅब तपासणीसाठी अद्यावत स्वतंत्र अशी लॅबची उभारणी करण्यात आली असुन या लॅबचा कार्यक्षमतेने उपयोग करण्यात येऊन दरदिवशी 2 हजारापेक्षा अधिक चाचण्या या लॅबच्या माध्यमातुन झाल्याच पाहिजेत यादृष्टीकोनातुन आवश्यक ते नियोजन करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

              राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध कडक केले आहेत.  विनामास्क कोणीही फिरणार नाही, यादृष्टीने काळजी घेत शासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घेण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केल्या.  

100 खाटांच्या मॉड्युलर हॉस्पिटलच्या कामाची

पालकमंत्री राजेश टोपे यांनी केली पहाणी

             जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीपुर्वी राज्याचे सार्वजनिक आरोग्य कुटूंब कल्याणमंत्री तथा यांनी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या 100 खाटांच्या मॉड्युलर हॉस्पिटलच्या कामास प्रत्यक्ष भेट देऊन करण्यात येत असलेल्या कामांची पहाणी करत  दिवस रात्रपाळीमध्ये काम करुन हे काम येत्या पाच दिवसांमध्ये पुर्ण करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

            यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद मनुज जिंदाल, जिल्हा शल्यचित्किसक डॉ. अर्चना भोसले, डॉ. संजय जगताप आदींची उपस्थिती होती.

*******

 

No comments:

Post a Comment