Friday 5 August 2022

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

 


   जालना, दि. 5 (जिमाका) :- कृषि विभाग महाराष्ट्र शासन व जागतिक बँक सहाय्यीत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करणे, शेतकऱ्यांना शेती पुरक व्यवसाय करण्यास सहाय्य करणे या उद्देशाने जिल्ह्यातील 282 गावांमध्ये सन 2018-19 पासून प्रकल्पांची अंमलबजावणी सुरु आहे. प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड, वृक्ष लागवड या घटकाची सन 2022-23 मधील लागवडीसाठी  अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर 2022 अखेरपर्यंत राहील. तद्नंतर प्रकल्पांतर्गत या घटकाखाली अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

            सप्टेंबर 2022 अखेर पर्यंत एकुण प्राप्त अर्जांवर निकषानुसार पुर्वसंमती मिळाल्यानंतर पात्र अर्जदारांनी प्रत्यक्ष लागवड नोव्हेंबर 2022 अखेरपर्यंत पुर्ण करणे आवश्यक आहे व या विषयी संबंधीत शेतकऱ्याने हमीपत्र लिहुन देणे गरजेचे आहे.

        प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड व वृक्ष लागवड या घटकांचा लाभ घेण्याकरीता प्रकल्प गावातील इच्‍छुक असलेले शेतकरी बांधवांनी प्रकल्पाने उपलब्ध करुन दिलेल्या संकेतस्थळावर httpj://dbt.mahapocra.gov.in नोंदणी करावी. नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रांमध्ये संबंधीत शेतकऱ्यांचे आधारकार्ड, 7/12 उतारा व 8 अ, मोबाईल क्रमांक, अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र सादर करावे.

            एकदा नोंदणी केल्यानंतर प्रकल्पातील समाविष्ठ फळबाग लागवड, बांबू लागवड व वृक्ष लागवड बाबीकरीता स्वतंत्र अर्ज करावा. अधिक माहितीसाठी प्रकल्प गावातील संबंधीत कृषि सहाय्यक किंवा समुह सहाय्यक यांच्याशी संपर्क साधाण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी.एस. रणदिवे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment