Friday 12 August 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दि. 13 ते 15 ऑगस्ट हे तीन दिवस आपल्या घरावर फडकवा तिरंगा ध्वज

 



जालना दि, 12 (जिमाका) :- देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अर्थात घरो घरी तिरंगा हा उपक्रम संपूर्ण देशभरामध्ये दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या दरम्यान राबविण्यात येणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण ठेवून आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान या निमित्ताने जपला जाणार आहे. जालना जिल्ह्यातील जनतेने या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या घरावर दि. 13 ते 15 ऑगस्ट हे तीन दिवस तिरंगा ध्वज फडकवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

            तिरंगा फडकवत असताना ध्वजसंहितेचे प्रत्येक नागरिकाने काटोकोर पालन करावे. दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर राष्ट्रीय ध्वज सन्मानपूर्वक फडकविला जाईल याची दक्षता घ्यावी. राष्ट्रीय ध्वज हाताने कातलेला, हाताने बनविलेला किंवा मशीनव्दारे तयार केलेल्या सुत/ पॉलिस्टर/लोकर/सिल्क व खादी कापडापासून तयार केलेला असावा. राष्ट्रीय ध्वजाचा आकार आयताकृती असेल व झेंड्याची लांबी व रुंदी 3:2 या प्रमाणात राहील. शासनाच्या सुचनेनुसार राष्ट्रीय ध्वज दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 हे तीन दिवस घरोघरी फडकवितांना दररोज सायंकाळी खाली उतरविण्याची आवश्यकता नाही. परंतु कार्यालयांना यासंबंधी ध्वज संहिता पाळावी लागेल. राष्ट्रीय ध्वज फडकवितांना केशरी रंग आकाशाकडे वर असावा तर हिरवा रंग जमिनीच्या दिशेने खाली असावा. राष्ट्रीय ध्वज चढवितांना लवकर चढवावा व उतरविताना सावकाश उतरावावा. राष्ट्रीय ध्वजाच्या दोन्ही बाजूस समान पांढऱ्या पट्टीच्या पूर्णतः मध्यभागी २४ आ-यांचे नेव्ही ब्ल्यू रंगाचे अशोक चक्र दिसेल, असा ध्वज असावा.

            राष्ट्रीय ध्वजावर कोणतेही प्रकारचे अक्षर लिहू नये व ध्वजाचा "केशरी रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल अशाप्रकारे जाणीवपूर्वक ध्वज लावता येणार नाही. राष्ट्रीय ध्वज जाणूनबुजून जमिनीवर अथवा पाण्यात पडणार नाही याबाबत दक्षता / काळजी घ्यावी. राष्ट्रीय ध्वजाचा वापर इमारत, टेबल अथवा कोणतीही वस्तू झाकण्यासाठी करता येणार नाही. राष्ट्रीय ध्वजाचा वापर व्यवसायासाठी करता येणार नाही. खराब झालेला, फाटलेला, मळलेला व चुरगळलेला ध्वज फडकविता येणार नाही. राष्ट्रीय ध्वजाचा वापर कोणत्याही सजावटीसाठी करू नये. तिरंगाच्या ध्वज स्तंभावर अन्य कोणताही ध्वज किंवा ध्वजासोबत एकाच काठीवर फडकविता येणार नाही. तसेच राष्ट्रीय ध्वजाच्या उंचीवर अथवा समान उंचीवर अन्य कोणताही ध्वज फडकविता येणार नाही. राष्ट्रीय ध्वजाचा वापर हातपुसणे, वाहन पुसणे, हातरुमाल, उशी व पोशाख म्हणून करता येणार नाही. राष्ट्रीय ध्वजाच्यावर किंवा समान स्तरावर कोणताही पताका, बोधचिन्ह,फुलांचा हार व इतर ध्वज एकाच काठीवर लावता येणार नाही. राष्ट्रीय ध्वज फाटेल अशा पद्धतीने लावू अथवा बांधू नये. राष्ट्रीय ध्वज फडकवितांना काठीच्या वरील बाजूस टोकावर फडकविणे, मध्यभागी किंवा खाली फडकवू नये. राष्ट्रीय ध्वजापेक्षा उंच किंवा राष्ट्रध्वजाच्या वर किंवा त्याच्या बरोबरीने अन्य कोणताही ध्वज किंवा पताका लावू नये. राष्ट्रीय ध्वजाचा अवमान होणार नाही, यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. जिल्हयातील सर्व जनतेने घरो घरी तिरंगा या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन डॉ. राठोड यांनी शेवटी केले आहे..

-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment