जालना, दि. 10 (जिमाका) :- महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदू
हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवार, दि. ११ डिसेंबरला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे लोकार्पण होणार आहे. जालना
जिल्ह्याच्या जालना व बदनापूर तालुक्यांतील 25 गावांतून 42.57 किलोमीटरचा हा
समृध्दी महामार्ग जात आहे. या महामार्गामुळे जालना जिल्हयाच्या विकासाला गती
मिळणार आहे.
नागपूर ते मुंबईपर्यंत असणाऱ्या
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701
कि.मी. इतकी आहे. सध्या नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर अंतराच्या पहिल्या
टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या टप्प्याचे उदघाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 11
डिसेंबर 2022 रोजी नागपूर येथे होणार आहे.
या महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांची कनेक्टिव्ही
वाढणार असून यातून मराठवाडयासह विदर्भाचा प्रामुख्याने विकास होण्यास मदत होणार
आहे.
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जालना जिल्हयाच्या जालना व बदनापूर तालुक्यांतून
जातो. जिल्ह्यातील या महामार्गाचे अंतर सुमारे 42.57 कि. मी. इतके आहे. टोल प्लाझा
/ इंटरचेंज एक असून निधोना, ता. जालना येथे हा टोल प्लाझा / इंटरचेंज आहे.
आंबेडकरवाडी व नागेवाडी येथे प्रस्तावित इंटरचेंजेस आहेत.
जालना व बदनापूर तालुक्यांतील सुमारे 25 गावांतून समृध्दी महामार्ग जातो.
जालना तालुक्यातील 15 गावे आणि बदनापूर तालुक्यातील 10 गावांचा यात समावेश होतो.
नाव्हा, वरुड, कडवंची, नंदापूर, थार, अहंकार देऊळगाव, दहेवाडी, पानशेंद्रा,
श्रीकृष्णनगर, जामवाडी, गुंडेवाडी, जालना, तांदुळवाडी, आंबेडकरवाडी, निधोना,
कडगाव, नजीकपांगरी, केळीगव्हाण, भराडखेडा, निकळक, अकोला, गोकुळवाडी, सोमठाणा,
दुधनवाडी आणि गेवराईबाजार अशी या गावांची नावे आहेत.
जालना जिल्हयातून जाणाऱ्या समृध्दी
महामार्गासाठी 560.89 हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली आहे. त्यामध्ये शासकीय
जमीन 94.69 हे. आर, थेट खरेदीने संपादीत जमीन 349.55 हे. आर व भूसंपादनाव्दारे
संपादीत जमीन 116.65 हे. आर चा समावेश होतो.
रस्त्याची रुंदी 120 मीटर आहे. 3+3 मार्गीका आहे. तर 150 किमी/तास वाहन वेग
मर्यादा आहे. मौजे कडवंची या ठिकाणी पेट्रॉल पंप कार्यान्वीत आहे. जालना जिल्हयातून जाणाऱ्या समृध्दी
महामार्गामुळे वेळेच्या बचतीसोबतच मुंबई व नागपूर ही शहरे अधिक जवळ येणार आहेत,
पर्यायाने उद्योगधंदे वाढतील. शेतक-यांनाही दळणवळणास मदत होणार आहे.
-*-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment