जालना दि. 16
(जिमाका) :-
शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी, शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा तसेच शेतमाल
उद्योग प्रक्रियेला चालना मिळावी, शेतकरी व वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ यांच्यामध्ये
थेट संवाद व्हावा म्हणून राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून
नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात दि. 1 त 5 जानेवारी 2023 या कालावधीत औरंगाबाद
जिल्ह्यातील सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी
बदलत्या काळानूसार शेतीमध्ये उच्च तंत्र व नवनवीन तंत्रज्ञान, संधी, व्यवस्थापन
जाणून घेण्यासाठी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा
अधिक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे
आणि
आत्माचे प्रकल्प संचालक शीतल चव्हाण यांनी केले आहे.
कृषी प्रदर्शनामध्ये 600 पेक्षा जास्त
स्टॉल्स, सर्व कृषी विद्यापीठांची दालने, विविध संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान
केंद्र प्रक्रिया उद्योगांचे विशेष सादरीकरण, परिसंवाद या निमित्ताने होणार आहे.
सदरील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये दहा लाख पेक्षा
जास्त शेतकरी भेट देतील, अशी अपेक्षा कृषी विभागाच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे.
स्वातंत्र्याच्या
महोत्सवानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे 'राज्यस्तरीय सिल्लोड कृषी
महोत्सव- 2023' दि.1
ते 5 जानेवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात एकूण 600 दालन
असून त्यापैकी 360 दालने शासकीय योजना प्रकल्पासाठी असून उर्वरित खाजगी
संस्थाकरीता आहेत. या महोत्सवात सायंकाळी विविध प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या
महोत्सवात कृषी संलग्न विभागांचाही सक्रीय सहभाग असणार आहे. याकरिता राज्यातील
चारही कृषी विद्यापीठे, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, रेशीम उद्योग,
महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ, महाबीज, साखर, भूजल सर्वेक्षण,
सहकार, महिला बाल कल्याण विकास, महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य
ग्रामीण जीवनोन्नती अभियान, आदिवासी विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना,
यशदा, सारथी, बार्टी या
विभागाकडून कृषी
व संलग्न विभागाच्या शेतकरी सहली, शेतकरी प्रशिक्षणे आदींच्या माध्यामातून
शेतकऱ्यांना प्रदर्शनाचा आणि चर्चासत्राचा
लाभ घेता येणार आहे.
राज्यातील
चारही कृषी विद्यापीठांना दोन स्वतंत्र दालन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये
8 हजार स्के.फु.चे एक बंदिस्त दालन असून एक मोकळे दालन आहे. या दालनात कृषी
विद्यापीठांच्या सर्व विभागांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके,
विविध मॉडेल्स, वाण, सिंचन, कृषी व अन्न प्रक्रिया, लागवड पध्दती, जैविक
तंत्रज्ञान, पीक संरक्षण, पशुसंवर्धन आदी बाबतचे तंत्रज्ञान, कृषी विद्यापीठाच्या समन्वयाने विविध
पिके जसे की, आंबा, संत्रा, मोसंबी, भेंडी, टोमॅटो, सोयाबीन, कापूस मका आदी
पिकांच्या लागवड तंत्रज्ञानापासून ते विपणनापर्यंत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात
आले आहे. कृषी विभागाअंर्तगत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, स्मार्ट, पंजाबराव
देशमुख जैविक मिशन, माहिती विभाग, शेतकरी मासिक, पीएमएफएमई, कृषी यांत्रिकीकरण,
ड्रोन तंत्रज्ञान, आदर्श पाणलोट क्षेत्र मॉडेल, पोक्रामार्फत वातावरण अनुकूल
तंत्रज्ञान अवलंबलेले आदर्शगाव, सिंचन पद्धती, पोकरा आदींना स्वतंत्र दालने उपलब्ध
करून देण्यात येणार आहेत. विविध विषयांवरील चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तज्ञ येणार
आहेत अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली
आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment