जालना, दि. 16 (जिमाका) :-
अंमली पदार्थ शरीरास अत्यंत घातक आहेत. विशेषत: तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या
व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस
प्रशासनाने जिल्हयात अंमली पदार्थांच्या विरोधात धडकपणे कार्यवाई करावी. आपल्या
परिसरात जर अंमली पदार्थांची विक्री, वाहतुक अथवा साठवणूक होत असल्याचे निदर्शनास
येताच नागरिकांनी त्याबाबतची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनला तात्काळ उपलब्ध करुन
द्यावी. ग्रामीण भागात सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी गावात अंमली
पदार्थ वापराबाबत किंवा शेतात गांजा या पिकाची लागवड केल्याचे आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला
माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.
अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक
आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, या प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, अन्न व
औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त वर्षा महाजन, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग
नवलकर, केंद्रीय उत्पादन विभाग, आरोग्य विभाग, टपाल विभाग व शिक्षण विभागाचे
अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
डॉ. राठोड म्हणाले की, अंमली
पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच त्याच्या सेवनाने होणाऱ्या
दुष्परिणामांची माहिती देण्यासाठी शिक्षण विभागाने शाळा व महाविद्यालयस्तरावर
जनजागृतीपर कार्यक्रम घ्यावेत आणि या कार्यक्रमात अंमली पदार्थासारख्या नशेच्या
आहारी जाणार नाही याबाबतची शपथ विद्यार्थ्यांना प्राधान्याने द्यावी. पोलीस विभागाने गांजा
लागवडी विरोधात अलीकडे मोठया प्रमाणात कारवाई केली, ही बाब कौतुकस्पद असून
जिल्ह्यात अंमली पदार्थ प्रकरण उघडकीस आल्यास वेळोवेळी कठोर कारवाई करुन अंमली
पदार्थांची वाहतूक, विक्री तसेच साठवणूक करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी.
कुरिअर
सेवा, खाजगी ट्रॅव्हल्स यांच्यामार्फत अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक होण्याची शक्यता असल्याने त्यांची अचानक तपासणी करावी. औषध
विक्रेत्यांनी गुंगीकारक
औषधांची डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात विक्री करु नये. तसेच अन्न व औषध
प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मेडीकल स्टोअरवरील गुंगीकारक औषधांचा साठा
वेळोवेळी तपासून तो अधिकृतरित्या नियमाप्रमाणे खरेदी केला आहे का, याची काटेकोर
तपासणी करावी. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी
अंमली
पदार्थाच्या दुष्परिणामांबाबत मोठया प्रमाणात जनजागृती करण्याचे निर्देशही
जिल्हाधिकारी यांनी दिले.
***
No comments:
Post a Comment