Monday 31 July 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बीएसएनएलला प्राप्त होणार गतवैभव - मुख्य महाप्रबंधक शर्मा यांची माहिती

 


जालना दि.31 (जिमाका) :- भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या दूरदृष्टीपणामुळे लवकरच 4जी आणि 5जी सुरू करणार, त्यासाठी लागणारी जमीन देशातील सर्व राज्यसरकार जमीन मोफत उपलब्ध करवून देणार असून लवकरच संपूर्ण देशात 4जी आणि 5जी सेवा सुरू होईल. त्यामुळे बीएसएनएलला पूर्वीचे गतवैभव प्राप्त होणार असा विश्वास महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे मुख्य महाप्रबंधक रोहित शर्मा यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.

श्री. शर्मा जालना जिल्ह्यातील बीएसएनएलच्या सेवांचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाप्रबंधक प्रशांत सिंह, औरंगाबाद परिमंडळाचे महाप्रबंधक संजयकुमार केशेरवानी, जालन्याचे सहाय्यक महाप्रबंधक किशोर वाढवे, उपमंडल अभियंता गौतम वावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना श्री शर्मा म्हणाले की, मार्केट कंट्रोल करण्यासाठी आणि प्राईस वार थांबवण्यासाठी बीएसएनएलची सेवा सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे, देशात सर्वात स्वस्त आणि किफायतशीर सेवा फक्त बीएसएनएल देऊ शकेल असा विश्वास केंद्र सरकारला असून भारतात बीएसएनएलच्या 4G व 5G सेवेला गतवर्षी जुलै महिन्यात मंजुरी मिळाली होती. त्यानुसार बीएसएनएलच्या 4G व G5 सेवेसाठी देशभरात २० हजार टावर्स उभारले जात आहेत. ज्या गावात 4G सेवेचे सिग्नल मिळत नाही अशा ३४ हजार गावातही 4G सेवा उपलब्ध होणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे बीएसएनएलच्या 4G व 5G सेवेचे तंत्रज्ञान हे भारतातच विकसित करण्यात आले असून हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा जगातील पाचवा देश ठरला आहे. हे तंत्रज्ञान सी. डाट व तेजसने विकसित केले आहे. याच्या प्राथमिक चाचण्या देखील झाल्या आहेत.

महाराष्ट्र राज्यात 4G व 5G सेवा कार्यान्वित होण्यासाठी २ हजार ८०० गावात नवीन टावर्स उभारले जाणार असून त्यासाठी सरकारी जमीनीचे अधिग्रहण करण्यात आले असल्याचे श्री शर्मा यांनी सांगितले. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी आणि केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या दूरदृष्टीपणामुळे बीएसएनएल ही सेवा लवकरच सुरू करणार आहे. त्यामुळे बीएसएनएलला पूर्वीचे गतवैभव प्राप्त होणार असा विश्वास व्यक्त करून श्री शर्मा म्हणाले की, बदलत्या तंत्रज्ञानामुळे बीएसएनएल आता कमी मनुष्यबळाचा वापर करीत आहे. त्यामुळे दूरसंचार विभागाच्या इमारती रिकाम्या झाल्या आहेत. जालना येथील टेलीफोन भवनातील खालचा मजला रिकामा झाला असून तो आता किरायाने देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महाप्रबंधक संजय केशरवानी यांनी औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील बीएसएनएलच्या 4G व 5G सेवेसाठी नवीन टावर्स उभारले जाणार असल्याचे सांगून वर्तमान सेवा अधिक चांगल्या प्रकारे कशी देता येईल, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. यावेळी जालना येथील बीएसएनएलचे गजानन जाधव, उज्वल पाटील, बीएसएनएल अधिकारी उपस्थित होते. असे सहाय्यक सामान्य व्यवस्थापक, भारत संचार निगम लिमिटेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment