Thursday 13 July 2023

जिल्हाधिकारी कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित शासकीय कामकाजात आली सुलभता व गतीमानता – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड दस्तावेज व माहिती सुरक्षित ठेवण्यास मदत नागरिकांच्या कामांचा त्वरेने निपटारा कागदाचा वापर झाला कमी

 

जालना दि.14 (जिमाका) :- शासकीय कामाकाजात संगणकाचा अधिकाधिक वापर करुन शासकीय कामकाज गतीमान होण्यासाठी जालना  जिल्हाधिकारी कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे कामाकाजात सुसूत्रता आली  असून निर्णय प्रक्रिया गतीमान व सुलभ झाली आहे.  ई-ऑफिसच्या माध्यमातून आजपर्यंत दोन हजार पेक्षा जास्त टपाल पत्रांवर जलदगतीने  कार्यवाही करण्यात आली आहे.

दरम्यान, ई-ऑफिस प्रणालीमुळे कामकाजात सुलभता, गतीमानता आली आहे. तसेच पारदर्शतेसोबतच  दस्तावेज व माहिती सुरक्षित ठेवण्यास मदत झाली आहे. याशिवाय या प्रणालीमुळे वेळेत कामे होत असल्याने सर्वसामान्यांच्या कामांचा त्वरेने निपटारा होत आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सांगितले.

शासकीय कामात गतीमानता आणण्यासाठी राज्य शासनाने मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने जालना जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 1 एप्रिल 2023 पासून ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होणारे टपाल मध्यवर्ती नोंदणी कक्षात (सीआरयु) जमा झाल्यानंतर ते टपाल ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून संबंधित विभागाकडे पाठविले जाते. प्राप्त होणारे सर्व टपालाचे स्कॅनिंग करुन त्यांच्या नोंदी या  प्रणालीमध्ये घेतल्या जातात. यामुळे दस्तावेज सुरक्षित ठेवण्यास मदत होत आहे. शिवाय कागद विरहीत (पेपरलेस) कामकाज होत असल्याने कागदाचा वापर कमी झाला आहे. मध्यवर्ती नोंदणी कक्षात प्राप्त झालेले टपाल व मेल यांचा साप्ताहिक गोषवारा ठेवण्यासाठी रजिस्टर ठेवण्यात आले आहे. संबंधित विभागाकडे पाठविण्यात आलेल्या टपालावरही ई-ऑफिसच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येते. या प्रणालीमुळे आलेल्या टपालावर जलद गतीने कार्यवाही होत असल्याने नागरिकांची कामे वेळेत होत आहे. आजपर्यंत 2 हजारपेक्षा प्राप्त टपालांवर कार्यवाही करण्यात आली आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment