Monday 18 March 2024

लोकसभा निवडणूक-2024 आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीची कार्यवाही वेळेत व तंतोतंत पार पाडावी - जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ · बैठकीस अनुपस्थित नोडल अधिकाऱ्यांना नोटीसा जारी

 







जालना, दि. 17 (जिमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होताच निवडणूक विषयक आदर्शआचार संहिता लागू झालेली आहे. पुढे 6 जुन 2024 पर्यंत आदर्श आचारसंहिता लागू असणार आहे. तरी संबंधित यंत्रणेने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीची कार्यवाही वेळेत व तंतोतंत पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी पुर्वतयारीबाबत जिल्हाअधिकारी कार्यालयातील महसूल भवनात बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले, शासकीय मालकीची कार्यालये, शासकीय वास्तु व त्यांच्या भिंतीवरील जाहिराती, भित्तीपत्रके, पोस्टर्स, बॅनर्स, कटआऊट, होर्डिंग्ज, झेंडे इत्यादी निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाल्यापासून 24 तासाच्या आत काढून घेणे किंवा झाकून घेणे बंधनकारक राहील.  तर सार्वजनिक जागेवरील सर्व अनाधिकृत राजकीय जाहिराती, भित्तीपत्रके, पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे, होर्डिग्ज, कटआऊट इत्यादी निवडणूक जाहिर झाल्यापासून 48 तासांच्या आत काढून घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक जागा किंवा मिळकतीमध्ये बसस्थानक, बसथांबा, रेल्वे पुल, शासकीय बस व वाहन, विद्युत व टेलिफोन खांब, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व इमारती यांचा समावेश होईल. तसेच खाजगी मिळकती किंवा जागेवरील सर्व अनाधिकृत राजकीय स्वरुपाच्या जाहिराती, भित्तीपत्रके, होर्डिंग्ज इत्यादी निवडणूक जाहीर झाल्यापासून 72 तासांच्या आत काढून घेणे बंधनकारक आहे. याबाबत संबंधित यंत्रणेने तातडीने कार्यवाही करावी असेही त्यांनी सांगितले. मालमत्ता विद्रुपण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा-1995 मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. शासकीय वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी, शासकीय निधीतून जाहिरातीसाठी, शासकीय संकेतस्थळावरील राजकीय व्यक्तींचे छायाचित्र तसेच नावे वगळण्याची तसेच बांधकाम व विकासासंदर्भातील माहिती कळविण्यासाठीची कारवाई तत्परतेने पार पाडण्याची सुचनाही त्यांनी यावेळी केली.

सर्व यंत्रणेतील अधिकाऱ्यांची सजग रहावे तसेच निवडणूकीतील कामांची सर्व माहिती ठेवावी. जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांना मुख्यालय सोडू नये असे निर्देश यापुर्वीच दिलेले आहेत. लोकसभा निवडणूकीच्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार नाही, असे स्पष्ट सांगत आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी पुर्व तयारीबाबत बैठकीस अनुपस्थित असणाऱ्या नोडल अधिकारी यांना तात्काळ नोटीस बजावण्यात यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी यावेळी दिले. यावेळी आदर्श आचारसंहिता व तिची अंमलबजावणी, शासकीय विश्रामगृह वापराबाबतची माहिती, जिल्ह्यातील विकासकामे, शासकीय अधिकाऱ्यांची खाजगी कार्यक्रमांना उपस्थिती यामध्ये असणारी आदर्श आचारसंहितेशी निगडीत बाबींची  माहिती प्रास्ताविकात उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली. या बैठकीस  सहाय्यक निवडणूक अधिकारी व गटविकास अधिकारी यांची दुरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थिती होती. तर जिल्हास्तरीय यंत्रणेतील सर्व नोडल अधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने सभागृहात उपस्थित होते.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment