Wednesday 3 June 2020

राज्य आपत्ती व्यवस्थापनाचा मुसळधार पावसाचा ईशारा जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जालना दि. 3 -  आयएमडी व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मुंबई यांनी ४ जुनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा दिला असुन जालना जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
पावसामध्ये नागरिकांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.
मच्छिमार व अन्य व्यक्तींनी पाण्यामध्ये जाऊ नये, कोणीही आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित रहावे. घराबाहेर पडू नये, घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तर  तात्काळ स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षितस्थळी आवश्यक साधनसामग्रीसह स्थलांतरीत व्हावे, घराच्या अवतीभवती वादळामुळे कोणत्या वस्तु, वीजेचे खांब किंवा तारा, झाडे आदी पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तुंपासुन दूर रहावे व विद्युत विभागास माहिती कळवावीपशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना सुरक्षित स्थळी हलवावेतसेच शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील काढलेला माल तसेच अवजारे, यंत्रे आदी सुरक्षित स्थळी ठेवावे, केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदील), बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तु उजेड व खाद्यपदार्थ बनविण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात, हवामान खात्याकडून मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडीओ बाळगावा, सोबत आवश्यक अन्नधान्य, पिण्याचे पाणी व औषधे बाळगावीत, आपला जीवन आपल्या मिळकतीपेक्षा महत्वाचा असल्यामुळे प्रथम जिवीतास प्राधान्य द्यावे.
        पिण्याचे पाणी शुद्धीकरण करुन वापरावे. उदा. पाणी उकळुन प्यावे, पाण्यात मेडीक्लोर मिसळावे, आपल्या बोटीचे नुकसान होऊ  नये म्हणून त्यांना सुरक्षितपणे बांधुन ठेवण्याबाबत उपाययोजना कराव्यात, अतिवृष्टी, चक्रीवादळ याचा एकत्रित फटका टाळण्यासाठी नदीकिनारी राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी, ग्रामकृती दलाच्या सुचनेनुसार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात,  सद्यस्थितीत जिल्ह्यात होम क्वारंटाईन असलेले नागरिक व चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सुरक्षितस्थळी पाठवताना एकमेकांत मिसळणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, गावपातळीवर शोध व बचाव पथकाची स्थापना करण्यासाठी मदत करावी, वीज अटकाव यंत्रणा सुस्थितीत असल्याबाबत खात्री करावी, सर्व तहसिलदार, मुख्याधिकारी, नगर परिषद/नगरपंचायत यांनी शासनामार्फत पुरविण्यात आलेले शोध व बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी. तसेच मदत आवश्यक असल्यास ग्रामपंचायत, तहसिल कार्यालय किंवा जिल्हा नियंत्रण कक्षास संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.
*******

No comments:

Post a Comment