Monday 18 September 2023

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून जिल्ह्यातील 2851 लाभार्थ्यांना 26.75 कोटीचा परतावा

 


 

 

जालना, दि. 18 (जिमाका) :- जिल्ह्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कार्यालय सुरु झाल्यापासून जालना जिल्हा कार्यालयाच्यावतीने मराठा समाजातील 2 हजार 851 लाभार्थ्यांना आजपर्यंत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत परतावा देण्यास सुरुवात झाली असून त्यासाठी जवळपास 26.75 कोटी परतावा म्हणून दिलेले आहेत. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विविध बँकांनी  मराठा समाजातील 3 हजार 342 लाभार्थ्यांना जवळपास 214 कोटीचे कर्ज मंजूर करुन त्यांच्यातील उद्योजकाला चालना देण्याचा एक चांगला प्रयत्न केलेला असून हे सर्व लाभार्थी त्यांच्या उद्योग व्यवसायात चांगली प्रगती करुन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत. तसेच त्यांच्या उद्योग व्यवसायामुळे इतर अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिलेला आहे. हे या योजनेचे यश आहे. तरी जालना जिल्ह्यातील मराठा समाजातील जास्तीत जास्त युवकांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेवून उद्योजक बनण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही महामंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.

वैयक्तिक कर्ज व्याज परताव योजना (आर-1)- या योजनेची मर्यादा रुपये 10 लाखाहून 15 लाख पर्यंत वाढविण्यात आलेली असून महामंडळामार्फत रुपये 4.5 लाखाच्या व्याज मर्यादेत परतावा करण्यात येईल. सदर व्याज परतावा कालावधी जास्तीत जास्त दरसाल दर शेकडा 12 टक्के इतका असेल. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी मात्र बँकेमार्फत घेतलेले कर्ज असावे व ते फक्त व्यावसायिक तथा उद्योगाच्या दृष्टीने मंजूर झालेले असावे.(टीप-मात्र दि.20 मे 2022 पूर्वीच्या एलओआय धारकांना नियमानूसार रुपये 10 लाखाच्या मर्यादेतील व्याज परतावा करण्यात येणार असून त्याकरीता रुपये 3 लाखाची मर्यादा असेल)

जालना जिल्ह्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय सुरु झाल्यापासून ते आजपर्यंत 15 हजार 272 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यातील 9 हजार 43 अर्जदारांना पात्रता प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे तर 3 हजार 342 लाभार्थ्यांना बँकांनी कर्ज मंजूर केलेले आहे. महामंडळाच्या व्याज परताव्यासाठी मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 2 हजार 977 असून या लाभार्थ्यांना जिल्ह्यातील विविध बँकांनी 214 कोटी 03 लाख 77 हजार 539 रुपयाचे कर्ज मंजूर करुन लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केलेले आहे. उपरोक्त पैकी महामंडळाकडून व्याज परतावा 2 हजार 851 लाभार्थ्यांना सुरु झालेला असून आजपर्यंत व्याज परताव्यासाठी  महामंडळाने 26 कोटी 75 लाख 91 हजार 26 रुपये लाभार्थ्यांना देण्यात आलेले आहेत.

महामंडळाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जालना जिल्हा कार्यालयाने जिल्ह्यातील मराठा समाजातील युवकांना महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळवून देवून जास्तीत जास्त उद्योजक तयार करण्यासाठी चांगले प्रयत्न सुरु केले आहेत. व ते जास्तीत जास्त  मराठा समाजातील लोकांपर्यंत पाहोचून महामंडळ अंतर्गत सुरु असलेल्या योजनांची माहिती देवून त्यांना या दृष्टीने लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment