Thursday 28 May 2020

रोजगाराची आवश्यकता असणाऱ्या व्यक्तींनी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवकांशी संपर्क साधावा - मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा


जालना दि. 28 (जिमाका)-  सद्यस्थितीत ऊस साखर कारखाने बंद झाल्यामुळे  व कोवीड -19 या साथरोगाच्या पार्श्वभुमीवर इतर राज्य, जिल्ह्यातुन जालना जिल्ह्यातील मुळ गावी अनेक मजुरांचे स्थलांतर झालेले आहे.  त्यामुळे ज्यांना रोजगारांची आवश्यकता आहे त्यांनी तात्काळ आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक यांच्याशी संपर्क साधावा. याकामी काही अडचण असल्यास आपल्या पंचायत समिती, नरेगा कक्ष अथवा जिल्हा परिषद नरेगा कक्ष यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
            जालना जिल्ह्यातील मुळगावी परतलेल्या कामगारांना, मजुरांना त्यांचे गावातच रोजगार उपलब्ध करुन देणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचातीचे सरपंच, ग्रामसेवक यांनी आपल्या रोजगार सेवकांमार्फत सर्वेक्षण करुन घ्यावे. कामाची मागणी असणा-या प्रत्येक मजुराचे नमुना नंबर 1 भरुन घेऊन कुटुंबनिहाय जॉबकार्ड तयार करुन घ्यावेत व त्यांचे मागणीनुसार गावाच्या हद्दीतच काम उपलब्ध करुन घ्यावे.
            मनरेगा अंतर्गत यापुर्वी दिलेल्या सर्व सुचना व वेळोवेळी निघालेले शासन निर्णय व मार्गदर्शक सुचना यांचे पालन करुन सर्व मजुरांना काम पुरविण्यात यावे व वेळेवर मजुरी मिळण्याचे दृष्टीने सर्व प्रक्रिया विहित मुदतीत पार पाडावी, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्गमित केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.  
                                                                             -*-*-*-*-*-*-




No comments:

Post a Comment