Monday 19 June 2023

विधवा, परितक्त्या आणि दुर्धर आजाराने ग्रस्त महिलांची अंत्योदय योजनेत समावेशाची कार्यवाही तातडीने पुर्ण करा - राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे

जालना, दि.19 (जिमाका) :- शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी संबंधित विभागाने मनापासून कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. कुठलाही घटक शासनाच्या अन्न धान्याच्या लाभापासून दूर राहता कामा नये. जालना जिल्ह्यातील शिधापत्रिका मिळण्यासाठी पात्र परंतू शासकीय अन्न धान्यापासून वंचित असलेल्या विधवा, परितक्त्या आणि दुर्धर आजाराने ग्रस्त महिलांची प्राधान्याने अंत्योदय योजनेमध्ये समावेशाची कार्यवाही तातडीने पुर्ण करावी, असे निर्देश राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात नियतन उचल व वाटप, शालेय पोषण आहार आणि महिला व बालविकास योजनेअंतर्गत कच्चे धान्य वाटपाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, तहसीलदार श्री. महेंद्रकर, शिक्षणाधिकारी मंगला धुपे, महिला व बालविकास जिल्हा कार्यक्रम अधिकारी कोमल कोरे यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष श्री. ढवळे म्हणाले की, शिधापत्रिकाधारक पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणारे धान्य योग्य वजनाप्रमाणे मिळणे आवश्यक आहे. संबंधित लाभार्थ्यांना शिधा मिळत नसल्यास जिल्हा तक्रार निवारण अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करता येवू शकत असल्याचा फलक जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानासह तहसील, आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील दर्शनी भागात लावावेत. अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी त्यांनी शिक्षण विभागाअंतर्गत शालेय पोषण आहार घेणारे विद्यार्थी यांना देण्यात येणारा आहार, उचल व वाटप विद्यार्थ्यांची संख्या जाणून घेत स्वच्छ व हवेशीर स्वयंपाक गृहात सदरचा आहार बनवित असतांना स्वच्छतेची अत्यंत काळजी घ्यावी यासाह विविध सुचना केल्या तसेच अंगणवाड्यामार्फत स्तनदा माता व गरोदर मातांसह 0 ते 3 वर्ष आणि 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना देण्यात येणारा पोषण आहाराची माहिती जाणून घेत खरा लाभार्थी पोषणातून सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत. गरोदर व प्रसुती झालेल्या महिला गरजवंत लाभार्थ्यांची माहिती शासकीय रुग्णालयातून जमा करुन गृहभेटी देत त्यांना लाभ मिळत असल्याची वेळोवेळी खात्री करावी तसेच लाभापासून वंचित असल्याचे दिसून येताच तात्काळ अंगवाडी सेविकांना याची माहिती देत लाभ मिळवून द्यावा. बेघर लाभार्थी, झोपडपट्टीत व पुलाच्या खाली राहणारे आदी घटक लाभापासून वंचित राहता कामा नये, अशा सुचनाही जिल्हा कार्यक्रम अधिकारी कोमल कोरे यांना यावेळी दिल्या. -*-*-*-*-

No comments:

Post a Comment