Tuesday 20 June 2023

शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परतफेड व पीक कर्जाचे नुतनीकरण 30 जूनपूर्वी करावे

जालना, दि.20 (जिमाका) :- सर्व शेतकऱ्यांना जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, ग्रामीण, व्यापारी व जि.म.स बँकेमार्फत दि. 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत खरीप पीक कर्ज वाटप करण्यात येत आहे. शासनाने पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत रुपये 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर कर्जमाफीचा लाभ दिलेला आहे. तसेच कर्जाची नियमित परतफेड केल्यास सदर खाते एनपीएमध्ये न जाता खातेदाराचा सिबील रेकॉर्ड चांगले राहते, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर जमा होणाऱ्या रक्कमा काढण्यावर बँकेकडून निर्बंध लावले जात नाहीत. या सर्व सवलतींचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील पीक कर्जाची परतफेड नियमितपणे तसेच पीक कर्जाचे नुतनीकरण 30 जून 2023 पूर्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे. जिल्हाधिकारी जालना यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्‍था, जालना, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, जालना यांचे उपस्थितीत दिनांक 16 जुन 2023 रोजी खरीप पीक कर्ज वाटप आढावा बैठक आयोजित केली होती. बैठकीत आढावा घेतला असता दिनांक 1 एप्रिल 2023 ते 15 जुन 2023 या कालावधीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. जालनाने खरीप पीक कर्जवाटपाचा लक्षांक 150 कोटीपैकी 40 हजार 509 सभासदांना 101 कोटी (67.35%) इतके खरीप पीक कर्जवाटप केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने खरीप पीक कर्जवाटपाचा लक्षांक 210 कोटीपैकी 12675 सभासदांना 116 कोटी (55.24%) इतके तसेच राष्ट्रीयीकृत/व्यापारी बँकांनी खरीप पीक कर्जवाटपाचा लक्षांक 888 कोटीपैकी 16796 सभासदांना 153 कोटी (17.28%) इतके खरीप पीक कर्जवाटप केले आहे. जिल्हयाचा खरीप पीक कर्जवाटपाचा लक्षांक 1248 कोटी असून त्यापैकी 69980 शेतकऱ्यांना 370 कोटी (29.69%) खरीप पीक कर्जवाटप केले आहे. जिल्ह्यातील विविध बँकांच्या वतीने दरवर्षी पीक कर्जाचे वितरण केले जाते. या अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड मुदतीत म्हणजेच कर्ज घेतल्यापासून 365 दिवस किंवा 30 जूनपूर्वी करावी लागते, या मुदतीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन वर्षासाठी पुन्हा कर्ज दिले जाते. मुदतीत कर्जाची परतफेड न केल्यास कर्जखाते थकीत होते. अशा थकीत खातेदारांना बँका पीक कर्ज देत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतात. कर्जखात्याचे नुतनीकरण करुन घेतल्यास नवीन पीक कर्जाच्या दरानुसार वाढीव कर्ज घेण्यास शेतकरी पात्र होतात. कर्जाचे नुतनीकरण केलेल्या शेतकऱ्यांना बँकांच्या इतर कर्जयोजनांचादेखील लाभ घेता येतो. त्यात कृषि वाहन योजना, शेतकी तारण योजना, फळबाग, फुलबाग, हरितगृह, शेडनेट योजना, शेळीपालन, पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, कृषि यांत्रीकीकरण, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येतो. तसेच पीक कर्जाची नियमित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत रुपये 3.00 लाखापर्यंतच्या कर्जावरील व्याजात 3 % सवलत व केंद्र शासनाकडून व्याजात 3% सवलत व्याज परतावा सवलत मिळते त्यामुळे शून्य टक्के व्याज दराने पीक कर्ज उपलब्‍ध होते, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

No comments:

Post a Comment