Wednesday 4 November 2020

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे निवडणुकीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये -- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे निर्देश

 




            जालना दि.4 (जिमाका):-  औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहेनिवडणुकीच्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेची काटोकोरपणे अंमलबजावणी व्हावी. तसेच निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एकाही अधिकाऱ्याने पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.

            औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सर्व विभाग प्रमुख व नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री‍ बिनवडे बोलत होते.

            यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी (निवडणुक) रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम निवडणुक आयोगाने जाहीर केला असुन या निवडणुकीसाठी फ्लाईंग स्क्वाड, व्हिडीओ सर्व्हीलेन्स, एमसीएमसी यासह ईतर पथकांची स्थापना करण्याबरोबरच विविध नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या कामासाठी मायक्रो आब्जर्व्हर, झोनल अधिकारी यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशिनचा वापर न करता मतदान हे बॅलेटपेपरवर घेण्यात येणार असल्याचे सांगत  निवडणुकीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांनी त्यांना सोपविण्यात आलेली कामे जबाबदारीने पार पाडावीत.  निवडणुकीसाठी आवश्यक असलेले साहित्य हे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पुरविण्यात येणार असुन अधिकच्या साहित्याची निकड भासल्यास   स्थानिकरित्या उपलब्ध करुन घेण्यात यावे.  निवडणुकीच्या अनुषंगाने दैनंदिन अहवाल निवडणुक आयोग तसेच विभागीय आयुक्त कार्यालयास पाठविण्यात येणार असल्याने प्रत्येक नोडल अधिकाऱ्यांनी दैनंदिन अहवाल प्रशासनास वेळेत सादर होतील, याची दक्षता घ्यावी.  तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुक आयोग तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन होईल,याचीही दक्षता  घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

            05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूकीसाठी जालना जिल्ह्यात एकुण 74 मतदान केंद्रे असुन जालना तालुक्यात 19, बदनापुर-7, भोकरदन-12, जाफ्राबाद-6, परतुर-07, मंठा-5, अंबड-10 तर घनसावंगी तालुक्यात 8 मतदान केंद्रे राहणार आहेत.  आतापर्यंत एकुण 29 हजार 67 मतदारांनी नोंदणी केली असल्याची माहिती देत कोरोनाच्या अनुषंगाने मतदान केंद्रावर आरोग्याच्यादृष्टीने मुबलक प्रमाणात मास्क, सॅनिटायजर, हात धुण्यासाठी साबण, पाणी आदी उपलब्ध राहण्याबरोबरच या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होईल, यादृष्टीकोनातुन आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.  

            यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणुक) रवींद्र परळीकर यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुक आयोगाकडून देण्यात आलेल्या सुचनांची माहिती उपस्थित सर्व विभाग प्रमुख तसेच नोडल अधिकाऱ्यांना दिली. 

 

*******

No comments:

Post a Comment