Thursday 16 November 2023

महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू

 


जालना, दि. 16 (जिमाका) :- सध्या मराठा आरक्षण आंदोलन अनुषंगाने जालना जिल्ह्यात विविध आंदोलनात्मक कार्यक्रम सुरु आहेत. जालना जिल्ह्यात अंबड येथे ओबीसी समाजातर्फे दि. 17 नोव्हेंबर 2023 रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. कार्तिकी एकादशी असल्याने दि. 23 नोव्हेंबर रोजी महादेव मंदीर व विठ्ठल रुखमाई मंदीरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. संकष्ट चतुर्थी दि. 30 नोव्हेंबर रोजी असल्याने भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. तसेच सध्या मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाज तिव्र स्वरुपाचे आंदोलन करीत आहे. तसेच ओबीसी समाज व धनगर समाज हे ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देवू नये म्हणून विविध प्रकारचे  आंदोलने करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आला आहे.

 सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द विविध कारणावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहे. तसेच शेतक-यांचे विविध मागण्यासाठी विविध संघटनाकडुन आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निर्दशने, रास्ता रोको, इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अर्थी प्र. अपर जिल्हादंडाधिकारी मनिषा दांडगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये अधिकाराचा वापर करुन याद्वारे खालील निर्देश दिले आहे, शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास परिसरात  शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी, भाले, चाकू व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही.  दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही.  व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण देणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही.  व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप, विडंबनापर नकला करणार नाही आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजक माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा पत्रे किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही. असे आदेश दिले आहेत. हे आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजीचे सकाळी 7 वाजेपासून ते दि. 30 नोव्हेंबर रोजीचे 24 वाजेपर्यंत अंमलात राहतील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

 

 

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment