जालना दि.16 (जिमाका) :- राष्ट्रीय
डेंग्यु डे निमीत्ताने आज गांधी चमन ते जिल्हा हिवताप कार्यालयपर्यaत जनजागृती रॅली काढण्यात आली.
तसेच कार्यालय परिसरात डेंग्यु व किटकजन्य आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत
प्रदर्शन भरविण्यात आले. याशिवाय
जिल्हयात सर्व वैद्यकिय संस्थेत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले.
डेंगी ताप विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंगीचा प्रसार हा एडिस
इजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात
होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी
घालतात. त्यानंतर अंड्याचे रुपांतर डासात होते. कोणतेही साठविलेले पाणी हे आठ
दिवसांपेक्षा जास्त ठेवू नाही. याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून डासाची
उत्पत्ती कमी करुन नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेला जनतेचे सहकार्य आवश्यक
आहे.
सध्या उन्हाळा सुरु नागरिकांकडून पाणी
साठविण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते. त्याअनुषंगाने साठविलेल्या पाण्यात
एडिस इजिप्टाय डास अंडी घालतात. त्यातून डासोत्पत्ती होते. डेंगी ताप आजारात
रुग्णास दोन ते सात दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोके, सांधे, स्नायु दु:खीचा
त्रास होतो. रुग्णास उलट्या होतात. डोळ्याच्या आतील बाजू दुखणे, अंगावर पुरळ येणे,
नाक-तोंड यातून रक्त स्त्राव होतो. अशक्तपणा, भुक मंदावते, तोंडाला कोरड पडते ही
लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांनी वेळेत जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी
व उपचार करुन घेणे आवश्यक आहे.
जालना जिल्ह्यात मागील
पाच वर्षांची डेंग्युची परिस्थिती पुढीलप्रमाणे आढळते. (घेतलेले तपासलेले रक्तजल
नमुने) कंसाबाहेर डेंग्यु दुषित रुग्ण, नंतरच्या (कंसात मृत्यू रुग्ण) असा तपशील
देण्यात आला आहे. सन
2018 - (424) 110 (02-मृत्यु), सन
2019 - (154) 56 (निरंक), सन
2020 - (56) 15 (निरंक), सन-2021- 161 -(57) (निरंक), सन- 2022 - 232 -(20) (निरंक) तर 15 मे 2023
अखेर- (69) 05 (निरंक).
भविष्यात डेंगीताप या आजाराचा उद्रेक होवू नाही. यासाठी काय
काळजी घ्यावी याबाबत पुढील साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपायांची नागरिकांनी
अंमलबजावणी करावी. आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व
साठे आठवडयातून एकदा रिकामे करावीत. या साठयातील आतील बाजू व तळ घासुन पुसुन कोरडा
करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत. आंगणात व
परिसरातील खड्डे बुजवावेत, त्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. ग्रामीण
भागात ज्यांच्या शेतामध्ये शेततळे आहेत त्यांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य
केंद्राशी संपर्क करुन गप्पी मासे सोडावीत. झोपतांना पूर्ण अंगभर कपडे घालावीत.
पांघरन घेवून झोपावे. सायंकाळी 6 ते 8 यावेळेत दारे खिडक्या बंद कराव्यात.
खिडक्यांना जाळया बसवाव्यात. झोपतांना चांगल्या मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या
घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास घर संपूर्ण फवारुण घ्यावे. फवारलेले घर
किमान दोन ते अडीच महिने सारवून रंगरंगोटी करु नये. घराच्या छतावरील फुटके डब्बे,
टाकाऊ टायर्स, कप, मडकी इत्यादींची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या पाईपला
वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवडयाला नाल्यामध्ये रॉकेल
किंवा टाकाऊ ऑईल टाकावे. डेंगी तापाची लक्षणे आढळल्यास तपासणी व उपचार सर्व
प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध
करुन दिली आहे.
नागरिकांनी दक्षता घेतल्यास डासाची
उत्पत्ती थांबविण्यास मोठी मदत होईल व डास चावणार नाहीत. योग्य काळजी, वेळीच
केलेला उपचार प्रत्येकाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवतो. त्यासाठी किटकजन्य
आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावून आरोग्य यंत्रणेला सहकार्य
करावे, असे आवाहन जालना
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एस.डी.गावंडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment