जालना, दि. 3 (जिमाका):-
शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी "जत्रा शासकीय योजनांची -सर्व
सामान्यांच्या विकासाची” या
अभियानाला सर्व विभागप्रमुखांनी गती देऊन जालना जिल्हयातील पात्र लाभार्थ्यांना
लाभ द्यावा. हे अभियान 15 जून 2023 पर्यंत राबविण्याचे शासनाने ठरविले आहे. या अभियानातंर्गत विविध योजनांच्या
माध्यमातून सुमारे एक लाख लोकांना लाभ देण्यासाठी काटेकोर नियोजन करावे. याच
महिन्यात तालुकानिहाय शिबीरं आयोजित करुन लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा, अशा
सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केल्या.
"जत्रा
शासकीय योजनांची -सर्व सामान्यांच्या विकासाची”
या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज आढावा बैठक
घेण्यात आली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर
जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी
केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता सानप यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
डॉ. विजय राठोड म्हणाले की, दि. 15 जूनपर्यंत चालणारे "जत्रा शासकीय योजनांची
-सर्व सामान्यांच्या विकासाची”
शासनाचे हे महत्त्वाकांक्षी अभियान असून अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व
विभागप्रमुखांनी जबाबदारीने व दक्षतेने उत्तम नियोजन करावे. उद्दिष्टानुसार योजनानिहाय
लाभार्थ्यांची निवड करुन त्याची अद्यावत माहिती जिल्हा प्रशासनाकडे विहीत नमुन्यात
तातडीने सादर करावी. या
मे महिन्यात लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी तालुकानिहाय लोकप्रतिनिधींच्या
उपस्थितीत शिबीरांचे आयोजन करावे. अभियानाच्या प्रचारप्रसिध्दीवरही भर देण्यात
यावा. योजनानिहाय लाभार्थ्यांना दिलेला लाभ याबाबतची अद्यावत माहितीदेखील नियमितपणे विहीत नमुन्यात भरुन
प्रशासनाकडे सादर करावी. या अभियानाचा आढावा नियमितपणे घेतला जाईल. त्यामुळे विभागप्रमुखांनी जबाबदारीने व
दक्षतेने काम करुन "जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामान्यांच्या विकासाची” हे अभियान यशस्वी करावे.
मुख्य
कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी यावेळी जिल्हा परिषद अंतर्गत
विभागप्रमुखांकडून अभियानाबाबत सविस्तर आढावा घेतला. अभियान यशस्वी करण्यासाठी दिलेल्या उद्दिष्टानुसार वेळेत
कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी केली.
"जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामान्यांच्या विकासाची” या
अभियानात नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध
दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध
योजनांचे लाभ देतील. जिल्हाधिकारी हे अभियानाचे जिल्हा प्रमुख आहेत व इतर सर्व
विभाग हे त्यांच्या समन्वयाने काम करतील. या उपक्रमाची पूर्वतयारी 15 एप्रिल 2023
ते 15 मे, 2023 या कालावधीत
करण्यात येत आहे. या कालावधीत नागरिकांपर्यंत विविध विभागांच्या योजनांची माहिती
पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करुन त्यांच्याकडून अर्ज भरुन
घेण्यात येत आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ
देण्याचे उद्दिष्ट असेल. जालना जिल्हयात सुमारे एक लाख लाभार्थ्यांना लाभ देण्याचे
निश्चित करण्यात आले आहे.
-*-*-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment