Friday 27 October 2023

कृषी विभागाचे आवाहन मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर करावेत

 


जालना दि. 27 (जिमाका) :-  मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सन 2023-24 अंतर्गत जालना जिल्ह्याकरीता 5 अन्न प्रक्रिया उद्योगांना 135.00 लाख रुपयांचा लक्षांक प्राप्त झालेला आहे. या योजनेत पौष्टिक तृणधान्य प्रक्रिया प्रकल्पांना तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ वैयक्तिक लाभार्थी व गट लाभार्थी घेवु शकतात. तरी इच्छुकांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जालना येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी केले आहे.

साधारण एका प्रकल्पाचे मुल्य 90 लाख असल्यास 30 टक्के अनुदान रक्कम रु. 27 लाख मिळु शकते. या योजनेंतर्गत शेतमालाचे मुल्यवर्धन व गुणवत्ता वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित तृणधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला, तेलबिया, मसाला इत्यादी शेतमालाकरीता नवीन अन्न प्रक्रिया प्रकल्प स्थापित करण्यास तसेच कार्यरत असलेल्या अन्न प्रक्रिया उद्योगांचे स्तरवृध्दी, विस्तारीकरण व आधुनिकीकरणास 30 टक्के अनुदान (कमाल मर्यादा रु.50.00 लाख) देण्यात येते.

योजनेमध्ये कृषी व अन्न प्रक्रिया प्रस्थापना (नवीन प्रकल्प उभारणी) व कार्यरत असलेल्या कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाचे स्तरवृध्दी, विस्तारीकरण व आधुनिकीकरण.  मुल्यवर्धन, शीतसाखळी आणि साठवणुकीच्या पायाभुत सुविधा या तीन उपघटकांचा समावेश आहे. योजनेच्या माहितीसाठी कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यकाकडे  संपर्क साधुन त्वरीत अर्ज करण्यात यावे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment