Tuesday 31 May 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांशी साधला दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद सर्वसामान्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी शासन कटीबध्द -- पालकमंत्री राजेश टोपे

 





            जालना, दि. 31 (जिमाका) --- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी आज  विविध राज्यातील लोककल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला.  तर  जिल्हास्तरावरील कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य  व कुटुंब कल्‍याण आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी  शासनाव्दारे विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ तळागळातील लोकांना मिळण्यासाठी शासन नेहमीच कटीबध्द आहे. पात्र लाभार्थींनीही केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा अवश्य लाभ घेऊन आपली प्रगती करावी, असे आवाहन  केले.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी  व मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे यांनी आज  विविध लोककल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी  दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  शिमला येथील  राष्ट्रीय कार्यक्रमाव्दारे  तर  मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे यांनी मुंबई येथून  संवाद साधला.  

श्री. मोदी यांनी  सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी  केंद्र शासन समर्पित  भावनेने काम करीत  आहे. यापुढेही  जास्तीतजास्त गरजूंना  विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही देऊन आपल्या भाषणात केंद्र शासनाने देश व जनतेसाठी केलेल्या कार्याबददल मार्गदर्शन केले.  त्यांनी यावेळी विविध राज्यातील  लाभार्थ्यांशी आपुलकीने दिलासादायक संवाद साधला.  याप्रसंगी त्यांच्या हस्ते कळ दाबून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी  योजनेतंर्गत देशातील दहा हजार कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर रुपये 21  हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम हस्तांतरीत करण्यात आली.  

तर जिल्हास्तरावर  जालना येथील  शौर्य रिसॉर्ट  ॲण्ड लॉन्स येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री राजेश टोपे यांनी मार्गदर्शन केले.  माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी  डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल आदींसह स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांसह  लाभाथी व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

            पालकमंत्री  श्री. टोपे म्हणाले की, लोकहितासाठी  केंद्र व राज्य शासनाच्या  अनेकविध योजना आहेत.  राज्याची रमाई आवास योजना आहे, तशीच केंद्राची  प्रधानमंत्री आवास योजना आहे.  प्रधानमंत्री  जन आरोग्य योजनेप्रमाणेच  महात्मा  जोतिराव फुले  जन आरोग्य योजना आहे.  बेरोजगार तरुणांसाठी मुद्रा योजना आहे.  या योजनांचे निकष जरी वेगळे असले तरी  या योजनांमधून लोकांचे कल्याण साधले जाते.  शेतकरी, विदयार्थी, कामगार, आदिवासी,  उदयोग, अल्पसंख्याक  या सर्वांसाठीच वेगवेळया प्रकारच्या अनेक योजना आहेत. त्यांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देणे शासनाचे कर्तव्य आहे.  त्यादृष्टीने प्रशासनाकडून  प्रभावीपणे योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजनांच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांची प्रगती  साधली जावून आपसुकच  गाव, तालुका, जिल्हा व देशाची  प्रगती  होते.

 

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment