Tuesday 31 May 2022

केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा मोठा वाटा राज्याच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीने योजना सर्वदूर पोहचल्या -- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंधरा जिल्ह्यातील लाभार्थींशी साधला संवाद पक्षभेद, राजकारण विसरून लोकांपर्यंत लाभ पोहचविणे महत्वाचे

 


 

मुंबई दि ३१ :  योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते.  हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

            विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थीशी सहयाद्री अतिथीगृहातून संवाद साधतांना ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाने राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यानिमित्त मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रत्येक लाभार्थीशी संवाद साधून त्यांना योजनांचा लाभ कसा मिळाला तसेच त्यांच्या आणखी काही अपेक्षा आहेत का ते जाणून घेतले. ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.

यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी मुंबईमधील यासीन शब्बीर शेख, निशा शर्मा, कुंजू पवार या महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्रही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते देण्यात आले.

 

योजनांमध्ये राज्याचा मोठा सहभाग

केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये राज्याचाही 40 टक्के वाटा आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेने अगदी तालुका आणि गाव पातळीवर काम करून या योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहचविले आहेत आणि लाभार्थींच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले की हीच आपल्या आयुष्याची कमाई वाटते.

 

महाराष्ट्राच्या प्रभावी कामगिरीचे  कौतुक

प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात ५,००,००० घरे ग्रामीण भागात बांधली असून यंदाही ५ लाख घरे बांधत आहोत. ३५०० कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करून दिला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की. २०२२-२३ मध्ये जल जीवन मिशनमध्ये  १९ लाख कुटुंबास नळ जोडणी व पिण्याचे शुद्ध पाणीपुरवठा देण्यासाठी  १९०० कोटी इतका निधी उपलब्ध करू दिला आहे.

 

याशिवाय पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना स्वच्छ भारत योजना (ग्रामीण व शहरी) इतर केंद्र शासन पुरस्कृत योजना राबविण्यात राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरीय यंत्रणाच्या सक्रीय सहभाग व नियोजनबद्ध अंमलबजावणीमुळे योजनांचा लाभ पोहचविणे शक्य झाले असेही ते म्हणाले.

 

व्याज परतावा सुरू करा

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांना देखील केंद्राने बंद केलेला पीक कर्जावरील दोन टक्के व्याज परतावा परत सुरू करावा व लाखो शेतकऱ्यांची अडचण दूर करावी अशी विनंती केली.

 

अंमलबजावणीचा दुष्काळ महाराष्ट्रात नाही

केवळ योजनांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असे चित्र महाराष्ट्रात नसून शेवटच्या घटकांपर्यंत अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अगोदरच्या पिढ्यांनी लढा दिला आहे. आपल्या देशातल्या लोकांना समाधानाने जीवन जगावे लागता यावे म्हणून प्रयत्न करून या पिढ्यांचे योगदान सार्थ ठरवते अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी महाआवास त्रैमासिक, आझाद का अमृत महोत्सव प्रगती अहवाल, मिशन महाग्राम या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी साधलेल्या संवादात, नगर जिल्ह्यातील दरेवाडीचे मीरा कारंडे, लोणी बुद्रुकचे विनोद पारखे, चांदेगावचे सुखदेव उबाळे, कोल्हापूर जिल्ह्यातील हसुर दुमालाचे जिजाबाई पाटील, सांगरुळचे लक्ष्मी साठे, अर्जूनीचे नितीन आढाव, नाशिक जिल्ह्यातील कवनईचे आनंद पाटील, सटवाई वाडीचे नामदेव मेधाने, बागलाणचे मीरा पवार, नागपूर जिल्ह्यातील भंडारबोडीचे मीराबाई गणवीर, सुमन दोनारकर, खेर्डीचे संगीता निकम, औंरगाबाद जिल्ह्यातील रायपूर येथील बाळू राऊत, भराडीचे कृष्णा महाजन, फुलंब्रीचे सुवर्णा भुईगल या लाभार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले.

-*-*-*-*-*-*-

 

वृत्त क्र. 485                                                                                                                        दि.31.5.2022

चांगले आरोग्य राखण्यासाठी तंबाखू खाणे टाळावे – अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे

विविध स्पर्धा, व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून तंबाखू विरोधी जनजागृती

 

जालना, दि. 31 (जिमाका) – चांगले आरोग्य राखण्यासाठी तंबाखू खाणे टाळावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबाद सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना आणि जिल्हा प्रशासन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने व धरतीधन ग्रामविकास संस्था यांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, समाज कल्याण कार्यालय, जालना येथे आज आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. पिनाटे बोलत होते.

कार्यक्रमास दंत शल्य चिकित्सक डॉ. अतुल देशमुख, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र गायके, एनटीपीसी जिल्हा समन्वयक संदीप गोरे, नर्सिंग कॉलेजच्या प्रचार्या सुनिता रायकर, एमसीईडीच्या प्रकल्प अधिकारी भारती सोसे, बार्टीचे जिल्हा समन्वयक मुंजाजी कांबळे, क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबादचे प्रबंधक संतोष देशमुख, धरतीधन ग्राम विकास संस्था, जालनाचे अध्यक्ष मिलिंद सावंत, समुपदेशक सोनाजी भुतेकर उपस्थित होते.

यावेळी रांगोळी, प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा, व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  डॉ. अतुल देशमुख, डॉ. राजेंद्र गायके, संदीप गोरे यांनी उपस्थितांना तंबाखू, धुम्रपान आणि गुटखा आदी सारख्या आरोग्यास घातक सवयी आणि त्यांच्या दुष्परीणामांबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष देशमुख यांनी केले, सूत्रसंचालन मिलिंद सावंत यांनी केले व आभार प्रदर्शन सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार यांनी केले. कार्यक्रमा दरम्यान केंद्र शासनाचे पंजीकृत कलापथक शाहीर परिहार आणि संच, जालना यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे तंबाखू विरोधी विषयावर जनजागृती करण्यात आली.

यावेळी आयोजित चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धेत नर्सिंग कोलेज च्या सर्व विद्यार्थिनींनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. यातील चित्रकला स्पर्धेतील भाग्यश्री गणेश रेटावाल, शितल सखाराम राउत, वैष्णवी निवृत्ती वायाळ आणि कांचन गजानन भारसाकळे यांनी, रांगोळी स्पर्धेतील भाग्यश्री रेटावाल, शितल राउत, निकिता मोरे, भारती कातीरे, निकिता करपे, आणि अन्विता साळवे यांनी आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेतील अपूर्वा संदीप आल्हाद, प्रमोद सोनुने, जाकिर शेख, डॉ. जालिंदर प्रभाकर ढिल्पे आणि कोमल आल्हाद मधाडे या पुरस्कार विजेत्यांना क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबाद तर्फे बक्षीस व आरोग्य विभागातर्फे प्रमाणपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले. यावेळी सर्वांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोचे प्रदीप पवार, प्रिती पवार, राहुल मोहोड आणि प्रभात कुमार, धरतीधान ग्राम विकास संस्था चे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment