पावसाळयाच्या
दिवसात आकाशातून अंगावर वीज कोसळून अनेकांना प्राण गमवावे लागतात. यामध्ये मनुष्य
प्राण्यासोबतच अनेक मुक्या जनावरांचाही मृत्यू होतो. ही
प्राणहानी टाळण्यासाठी पुरेक्षा प्रमाणात दक्षता घेतल्यास जीव वाचवता येऊ शकतो.
आकाशात विजा चमकत असल्यास कोसळणाऱ्या विजेपासून स्वत: चे रक्षण करण्यासाठी खालील दक्षता
घ्यावी.
हे करा --
• शेतात काम करीत असताना शेताजवळील
घराचा त्वरित आसरा घ्यावा. विद्युत उपकरणे बंद ठेवावीत.
• शेतात काम करीत असाल व सुरक्षित
ठिकाणचा आसरा घेतला नसेल तर शक्यतो जिथे आहात तेथेच रहा.
• शक्य असेल तर पायाखाली लाकूड,
प्लास्टीक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा दोन्ही पाय एकत्र करून
गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे झुकवा, तथापि डोके जमिनीवर ठेऊ नका.
• ओल्या शेतात अथवा तलावात काम
करणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे, पोहणारे, मच्छिमारी
करणारे यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे.
• झाडाच्या उंचीपेक्षा झाडापासून
दुप्पट अंतरावर उभे रहा. एखादे उंच झाड सुरक्षित ठेवायचे असल्यास उंच वृक्षाच्या
खोड अथवा फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून
ठेवावे, म्हणजे हे झाड सुरक्षित होईल.
• वीजवाहक वस्तूपासून दूर रहा. उदा.
रेडीयटर, स्टोव्ह, मेटल, लोखंडी पाईप, टेलिफोनचे खांब, विजेचे खांब, टेलिफोन टॉवर
यांपासून दूर रहा. मजबूत असलेले पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे.
• जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट
झाडांचा आसरा घ्या. वृक्ष, दलदलीच्या ठिकाणे तथा पाण्याचे स्रोत यापासून शक्यतो
दूर रहा. तथापि मोकळ्या आकाशाखाली असण्यापेक्षा लहान झाडाखाली आसरा घेणे चांगले.
मोकळ्या आकाशाखाली राहणे आवश्यकच असेल तर खोलगट ठिकाणी रहा.
हे टाळा –
• विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका.
• झाडाखाली उभे राहू नका, उंच जागेवर,
झाडावर चढू नका.
• पाण्याचे नळ, फ्रिज, टेलिफोन यांना
स्पर्श करु नका.
• धातूंच्या वस्तूंपासून दूर रहा.
• प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू
नका. दूरध्वनीचा वापर करू नका.
• गांव, शेत, आवार, बागबगीचा आणि घर
यांच्या भोवती तारेचे कुंपन घालू नका, कारण ते विजेला सहजतेने आकर्षित करते.
• दोन चाकी वाहन, सायकल, ट्रक,
ट्रॅक्टर, नौका यांवर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जा. अशावेळी वाहनातून
प्रवास करू नका.
• वाहनाच्या बाहेर थांबणे आवश्यक
असल्यास, धातूचे कोणतेही उपकरण हातात बाळगू नका.
• एकाच वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र
राहू नका. दोन व्यक्तीमधील अंतर किमान 15 फूट असेल असे रहा.
• धातूची दांडी असलेल्या छत्रीचा
उपयोग करू नका.
-- जिल्हा माहिती कार्यालय,
जालना
-*-*-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment