Friday 11 June 2021

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना तातडीने मदत द्या - जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे

 



            जालना, दि. 24 :-  कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यात ज्या बालकांचे पालक कोव्हीड19 आजाराने गमावले असतील अशा बालकांचे सर्व्हेक्षण करुन या बालकांना शासन निर्देशानुसार तातडीने मदत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिले.

            कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती संगीता लोंढे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे श्री पारवे, जिल्हा रुग्णालयाच्या श्रीमती मुळे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी गजानन इंगळे, अमोल राठोड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यात ज्या बालकांचे पालक कोव्हीड19 आजाराने गमावले असतील अशा बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत लाभाकरिता कृतीदलाची (टास्क फोर्स) ची स्थापना करण्यात आली असुन जालना जिल्ह्यातील अशा बालकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्यात यावी.   कोरोनामुळे पालक गमावलेले जे बालक आपल्या नातेवाईकांकडे राहत असतील अशा बालकांचा सांभाळ योग्यरितीने होतो किंवा नाही याबाबत खात्री करुन घेण्यासाठी पथक तयार करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिले.

कोव्हीड19 मुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक अथवा एक पालकाचे निधन झाले असेल अशा बालकांना सर्वोतोपरी संरक्षण उपलब्ध करुन देणे अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार अथवा तस्करी सारख्या गुन्हेगारीमध्ये सापडणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. पालकत्व गमावलेल्या बालकांना त्यांचे कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यकतेनुसार न्यायिक सल्ला इतर सुविधा उपलब्ध करुन देणे. तसेच या बालकांचे आर्थिक मालमत्ता विषयक हक्क अबाधित राहतील याकरिता दक्षता घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी केल्या.

जालना जिल्ह्यामध्ये कोव्हीड19 आजारामुळे एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 97 एवढी तर दोनही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 03 एवढी आहे. या बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी कार्यवाही सुरु करण्यात आली असल्याची माहिती श्रीमती संगीता लोंढे यांनी यावेळी दिली.       

            कोविड-19 मुळे बालकाला काळजी संरक्षणाची कुठलीही गरज भासत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन क्र. 1098, महिला बालविकास विभाग मदत क्रमांक 8308992222,7400015518, बालकल्याण समिती जालना 9890841439, अधीक्षक, शासकीय मुलांचे निरीक्षणगृह बालगृह 9404000405, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी- 7972887043, 8830507008 अथवा जिल्हा महिला बालकविकास अधिकारी कार्यालय, जालना 02482-224711 या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.

*******

No comments:

Post a Comment