जालना, दि. 10 (जिमाका):- भोकरदन तालुक्यातील वालसा डावरगाव येथील रेशीम शेतीस जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी भेट देऊन अभिनव अशा या उपक्रमाचे कौतुक करत जालना जिल्ह्यास रेशीमची राजधानी बनवण्यासाठी शेतकऱ्यांनी रेशीम शेतीवर भर देण्यासाठी तुती लागवड करत रेशीम शेतीला सुरूवात करावी. यासाठी प्रशासनामार्फत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.) रविंद्र परळीकर, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, रामेश्वर भुते, नायब तहसीलदार, नंदकिशोर दांडगे, जिल्हा रेशीम कार्यालय, जालना येथील वरीष्ठ तांत्रिक सहाय्यक बी.पी.शेवडे, क्षेत्र सहाय्यक एस.यु.गणाचार्य, मनरेगा तांत्रिक अधिकारी नितीन चव्हाण, मनरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, प्रकाश मगरे आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी वालसा डावरगाव येथील रेशीम शेतकऱ्यांचे प्रति एकर उत्पादन पाहुन समाधान व्यक्त करत गावातील तसेच जिल्हयातील इतर शेतकऱ्यांनी देखील रेशीम शेतीचा अवलंब करत तुती लागवड करून रेशीम शेतीस सुरूवात करावी, असे आवाहन केले. जालना जिल्हयातीळ प्रत्येक तालुक्यात एक चॉकी किटक संगोपन केंद्राची उभारणी करण्यात येईल, असे सांगून सर्व सुविधायुक्त रेशीम कोष बाजारपेठेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबरोबरच मनरेगा, पोकरा योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी रेशीम शेतीतून विकास साधावा, असेही सांगितले.
प्रास्ताविकात रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांनी रेशीम कोषांना देशांतर्गत तसेच रेशीम धाग्यास जागतिक स्तरावर मागणी असल्याने रेशीम कोषांना हमखास बाजारपेठ व चांगले बाजारभाव उपलब्ध आहेत. त्यामुळे एकात्मीक-शाश्वत शेती पध्दतीमध्ये रेशीम उद्योगाचे स्थान अटळ आहे. सद्य:स्थीतीत रेशीम कोषांचे दर प्रति क्विंटल 82 हजार रुपये पाहता जालना जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योग वाढीस शासन, प्रशासन यांचे परीपूर्ण सहकार्य असून त्यामुळे जालना जिल्हयात मोठया प्रमाणात तुती लागवड वाढविण्यास संधी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
*******
No comments:
Post a Comment