Friday 26 October 2018

जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठी पिण्यासाठी आरक्षित करा उपलब्ध पाणी काळजीपूर्वक व जपुन वापरा - पालकमंत्री बबनराव लोणीकर



            जालना, दि. 26 -  जिल्ह्यातील ज्या प्रकल्पामध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे, अशा ठिकाणचा पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलाशयातील पाणीसाठा आरक्षित करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
            यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, अपर जिल्हाधिकारी प्रकाश खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, जिल्ह्यात पाऊस नसल्याने प्रकल्पातील पाण्याची पातळी अत्यंत खोल गेली आहे.  अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा वापर काळजीपूर्वक व जपुन करणेचे गरजेचे असुन ज्या प्रकल्पामध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे अशा ठिकाणचा पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात यावा. त्याचबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे.  लोअरदुधना सारख्या प्रकल्पात पाणी उपलब्ध असुन अशा ठिकाणी चारानिर्मितीसाठी पाणी उपलब्ध करुन देण्याचा शासनाने निर्णय घेतला असुन शेतकऱ्यांना चारा निर्मितीसाठी बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. परजिल्ह्यातुन चारा उपलब्ध करुन घेऊन त्यावर खर्च करण्यापेक्षा जिल्ह्यातच उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याच्या ठिकाणी चाऱ्याची निर्मिती केल्यास जनावरांच्या चाराचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            जिल्ह्यातील काही प्रकल्पामध्येच पाणीसाठा उपलब्ध आहे.  उपलब्ध असलेले पाणी काळजीपूर्वक व जपुन वापरण्यासाठी सर्व नगरपालिकांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित करुन जनमानसामध्ये पाण्याचा वापर काटकसरीने व काळजीपूर्वक करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
            मराठवाड्यातील जनतेला शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी  वॉटरग्रीड योजना साकारण्यात येत आहे.  या योजनेचा डीपीआर बनवण्याचे काम इस्त्राईल देशातील कंपनीला देण्यात आले असुन या कंपनीने त्यांचा डीपीआर सादर केला आहे.  लवकरच या योजनेच्या निविदांची प्रक्रिया पुर्ण होणार असल्याची माहितीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली.
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री जोशी यांनी जिल्ह्यातील प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याची माहिती मंत्री महोदयांना दिली.
*******


No comments:

Post a Comment