Tuesday 29 November 2022

शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत - ‍जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रणदिवे

 


 

जालना, दि. 29 (जिमाका) :-  मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना सन 2022-23 या वर्षामध्ये अन्न प्रक्रिया प्रकल्प प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. योजनेत पौष्टिक तृणधान्य प्रक्रिया प्रकल्पांना तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ वैयक्तिक लाभार्थी व गट लाभार्थी घेवु शकतात. तरी जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, बचत भवन, मोतीबागसमोर, जालना येथे प्रस्ताव तात्काळ सादर  करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भिमराव रणदिवे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना सन 2022-23 अंतर्गत जालना जिल्ह्याकरीता 5 अन्न प्रक्रिया उद्योगांना 149 लाख रुपये इतके लक्षांक प्राप्त झाला आहे. साधारण एका प्रकल्पाचे मुल्य 98 लाख असल्यास 3 टक्के अनुदान रक्कम 29.40 लाख मिळू शकते. या योजनेंतर्गत शेतमालाचे मुल्यवर्धन व गुणवत्ता वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित तृणधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला, तेलबिया, मसाला इत्यादी शेतमालाकरिता नवीन अन्न प्रक्रिया प्रकल्प स्थापित करण्यास तसेच कार्यरत असलेल्या अन्न प्रक्रिया उद्योगांचे स्तरवृध्दी, विस्तारीकरण व आधुनिकीकरणास 30 टक्के अनुदान ( कमाल मर्यादा रुपये 50 लाख ) देण्यात येते. या योजनेमध्ये खालील तीन उपघटकांचा समावेश आहे. 1) कृषि व अन्न प्रक्रिया प्रस्थापना ( नवीन प्रकल्प उभारणी ) व कार्यरत असलेल्या कृषि व अन्न प्रक्रिया उद्योगाचे स्तरवृध्दी , विस्तारीकरण व आधुनिकीकरण. 2) मुल्यवर्धन, शीतसाखळी आणि साठवणुकीच्या पायाभुत सुविधा आणि  3) मनुष्यबळ निर्मिती व विकास योजना होय. योजनेच्या अधिक माहितीसाठी  कृषि विभागाचे तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांच्याकडे संपर्क साधुन त्वरीत अर्ज करावेत. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

           -*-*-*-*-

No comments:

Post a Comment