जालना,
दि. 21 (जिमाका) :- अंमली पदार्थाच्या
सेवनाने पिढ्यानपिढ्या भरुन न येणारे नुकसान होत असते. एखादा व्यक्ती अंमली पदार्थाच्या आहारी गेल्यास
त्याच्या संपूर्ण कुटुंबावर याचा विपरीत परिणाम होत असतो. परिणामी तो व्यक्ती
आपल्या शरीरासह आर्थिक व सामाजिक प्रतिभा कालांतराने लोप पावतो. अंमली पदार्थाच्या
वापराला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी
विशेष प्रयत्न केले जात असून जिल्ह्यातील सुजान नागरिकांनी आपल्या परिसरात
अंमली पदार्थाची विक्री, वाहतुक अथवा साठवणूक होत असल्याचे आपल्या निदर्शनास येताच
क्षणी ती माहिती जवळच्या पोलिस स्टेशनला तात्काळ उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले
आहे.
अंमली पदार्थाच्या
वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी
कार्यालयात पार पडली, या प्रसंगी ते बोलत
होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.अक्षय शिंदे, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक
आयुक्त श्रीमती वर्षा महाजन, पोलिस
उपअधिक्षक बी.एन.राजगुरु, आय.एम.बहुरे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अमित घवले,
पोलिस निरीक्षक श्री.सय्यद, आरोग्य विभागाचे डॉ.गायके, रेल्वे, पोस्ट विभागासह
संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राठोड म्हणाले की, अंमली पदार्थाच्या
वापराला आळा घालण्यासाठी तसेच त्याच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती
देण्यासाठी शाळा व महाविद्यालयस्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात यावेत आणि या
कार्यक्रमात नशेच्या आहारी जाणार नाही याबाबतची प्रतिज्ञा सर्व शालेय व
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांस प्राधान्याने देण्यात यावी. जिल्ह्यात अंमली पदार्थ प्रकरण उघडकीस आल्यास
पोलिस विभागाने वेळोवेळी कठोर कारवाई करुन अंमली पदार्थांची वाहतूक, विक्री तसेच
साठवणूक करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment