जालना, दि.
23 (जिमाका) :- भारतीय
संविधानाविषयी जनतेमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टीने दरवर्षी 26 नोव्हेंबर हा
दिवस 'संविधान दिन' म्हणून
साजरा करण्यात
येत असतो. तरी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समिती,
महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत,
प्राथमिक व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये दि. 26
नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन
करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.
संविधानाबाबत
जनजागृती व्हावी म्हणून सर्व शाळा, महाविद्यालयामार्फत त्या दिवशी 'संविधान
यात्रा' काढण्यात यावी व त्यामध्ये संविधानाची उद्देशिका, मुलभूत हक्क, कर्तव्ये व
जबाबदाऱ्या आदी संविधानातील महत्वाची कलमे ठळकरित्या दिसतील असे बॅनर्स व पोस्टर्स
दाखवण्यात येतील. शाळा,
महाविद्यालयामध्ये निबंध, भित्तीपत्रक, सांस्कृतिक
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. तर शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य
संस्थांमार्फत संविधानाबाबत जनजागृती करणारे व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित करावे.
उत्सवांचा एक महत्वाचा भाग म्हणजे संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन आणि त्याची
विचारधारा टिकवून ठेवण्याचा आपल्या वचनबध्दतेची पुष्टी करणे. राज्य सरकारची सर्व
कार्यालये, स्वायत्त संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांनी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी
11 वाजता कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन आयोजित करावे. संविधानीक मुल्ये आणि
भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत तत्वांवर चर्चा, वेबिनारसह इतर कार्यक्रम देखील आयोजित करावेत.
संविधान दिन साजरा करण्यात येवून कार्यक्रमाचा सचित्र अहवाल सहाय्यक आयुक्त, समाज
कल्याण, जालना या कार्यालयास पाठविण्यात यावा. अशा सुचनाही जिल्हाधिकारी डॉ.विजय
राठोड यांनी दिल्या आहेत.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment