जालना,
दि. 14 – शेतीशी निगडीत असलेल्या शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या जालना जिल्ह्यातील
वैजिनाथ साहेबराव फुके, उमेरखेडा ता. भोकरदन, आसाराम रामकृष्ण बोराडे पाटोदा ता. मंठा, सुरेश पंडितराव काळे, वडीगोद्री
ता. अंबड, दीपक रंगनाथ म्हस्के, वरुड ता. जालना, कृष्णा विठ्ठल उबाळे, पळसखेडा मुर्तड
ता. भोकरदन, उमेश अंकुशराव फुके, उमरखेड ता. भोकरदन या लाभार्थ्यांना शेतीशी निगडीत
विविध योजनेअंतर्गत लाभ मिळाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी
व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे लोकसंवाद कार्यक्रमातून संवाद साधून शासनाकडून मिळालेल्या
लाभाबाबत आस्थेवाईकपणे विचारपूस केली. यावेळी
उपस्थित शेतकऱ्यांनी शासनाच्या या योजनांमुळे शेतीमध्ये समृद्धता आल्याची भावना मुख्यमंत्र्यांकडे
व्यक्त केली.
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी शासनामार्फत ट्रॅक्टर खरेदीसाठी देण्यात आलेले अनुदान ऑनलाईन
थेट खात्यात मिळाले काय ? अनुदान मिळवण्यासाठी काही अडचणी आल्या का असा प्रश्न विचारताच
आसाराम रामकृष्ण बोराडे यांनी साहेब मी माळकरी माणुस आहे खोटे बोलणार नाही अनुदान थेट
माझ्या खात्यात जमा झाले यासाठी मला कुठलाही त्रास सहन करावा लागला नसल्याचे सांगत
केवळ 15 दिवसात ट्रॅक्टर खरेदीसाठी एक लाख पंचवीस हजार रुपये मिळाले. यामुळे शेतीच्या मशागतीचे कामे वेळेत व कमी खर्चात
करणे सोईचे झाले असल्याचे बोराडे यांनी सांगितले.
भोकरदन तालुक्यातील उमरखेडा या गावातील
शेतकरी वैजिनाथ फुके मुख्यमंत्र्यांशी बोलताना म्हणाले की, मी गरीब कुटुंबातील असुन
एकट्याने शेती करणे परवडत नसल्याने गटशेती करतो. बीजोत्पादनासाठी 10 गुंठ्यामध्ये शेडनेटचा
लाभ मिळाला. शेडनेटच्या माध्यमातुन मिर्ची पीक घेतले व यातून तीन लक्ष रुपयांचा लाभ
मला मिळाला. मागेल त्याला शेततळे योजनेमधुन 50 हजार रुपये अस्तरीकरणासाठी 75 हजार रुपयेही
मला मिळाले असुन शासनाच्या या योजनांमुळे माझ्या आर्थिक उत्पन्नात भर पडुन माझे जीवन
सुकर झाले असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अत्यल्प पावसामुळे कापुस पिकाचे अपेक्षित
उत्पन्न मिळाले नाही परंतू प्रधानमंत्री पीक
विमा योजनेच्या माध्यमातुन 73 हजार 800 रुपयांचा विमा मिळाल्यामुळे मशागतीसाठी झालेला
माझा खर्च निघाला. तसेच फळपीक योजनेच्या माध्यमातुन 1 लाख 18 हजार रुपयांचे अनुदान
मिळाल्याने मी शासनाचा आभारी असल्याची भावना अंबड तालुक्यातील वडीगोद्री या गावातील
शेतकरी सुरेश पंडितराव काळे यांनी व्यक्त केली.
माझी 25 एकर शेती असुन पाच एकरवर द्राक्ष
पिकाची लागवड केली आहे. या पिकासाठी आधुनिक
औजारांची आवश्यकता होती. शासनाच्या राष्ट्रीय
अन्न सुरक्षा योजनेतुन लाभ मिळाल्याने मोठा लाभ झाल्याची भावना वरुड ता. जालना येथील
शेतकरी दीपक रंगनाथ म्हस्के यांनी व्यक्त केली. आमचे असलेले म्हणणे थेट मुख्यमंत्री
महोदयांपर्यंत पोहोचविण्याची संधी लोकसंवाद कार्यक्रमातुन मिळाल्याचा आनंद व्यक्त करत
शासनाचे आभारही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कृष्णा
विठ्ठल उबाळे पळसखेड मुर्तड ता. भोकरदन येथील शेतकरी कृष्णा विठ्ठल उबाळे यांना मागेल
त्याला शेततळे या योजनेचा लाभ मिळाल्याने 50 हजारावरील उत्पन्न 3 लाखापर्यंत गेल्याने
शासनाचे आभार व्यक् केले तर भोकरदन तालुक्यातील उमरखेडा या गावातील शेतकरी उमेश अंकुशराव
फुके यांनी एचडीएफसी बँकेकडून चार लक्ष रुपयांचे कर्ज घेतले होते. परिस्थिती जेमतेम
असल्याने कर्जाची परतफेड करणे शक्य नव्हते परंतू छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान
योजनेच्या माध्यमातुन दीड लाख रुपयांचे कर्ज माफ झाल्याने मोठा आधार मिळाल्याची भावना
त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे लोकसंवाद कार्यक्रमात व्यक्त केली.
चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना
अनुदानासाठी कोणाला पैसे द्यावे लागतात का, असा थेट प्रश्न विचारला. त्यावर बहुतांश
शेतकऱ्यांनी शेतीच्या कुठल्याही अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होते. ऑनलाईनमुळे
भ्रष्टाचाराला आळा बसल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांतील लाभार्थ्यांशी लोकसंवाद कार्यक्रमातून
संवाद साधला.
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली
लोकसंवाद कार्यक्रमाचे समन्वयक जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांच्यासह जिल्हा
अधीक्षक कृषि अधिकारी विजय माईनकर, माहिती सहाय्यक अमोल महाजन व लाभार्थी यावेळी उपस्थित
होते.
*******
No comments:
Post a Comment