Thursday 1 August 2019

महसुल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामाचे काटेकोर नियोजन करावे-- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे


जालना, दि. 1 – महसुल विभाग हा प्रशासनाचा कणा समजला जातो.  महसुल विभागात काम करत असताना प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांने जनतेचा विश्वास संपादन करुन महसुली वर्षातील कामाचे काटेकोरपणे नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले.
            महसुल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजीव नंदकर, उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, श्री स्वामी, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती पुष्पा पवार, महसुल संघटनेचे सर्वश्री म्हस्के,  श्री भोजने, महेश सुधळकर, राजु निहाळ, पी.बी. मते, श्री चंदन, श्री गोरे, वैजनाथ घुगले, व्ही.के आडे आदींची उपस्थिती होती.
            श्री बिनवडे म्हणाले की, महसुल प्रशासनाकडे विश्वासाने पाहिले जाते. शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी महसुल विभागामार्फत करण्यात येते.  प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने कुठल्याही दबावाला बळी न पडता आत्मविश्वासाने व अभ्यासुवृत्तीने काम करण्याची गरज असुन प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने आपल्या वर्षभराच्या कामाचा आराखडा तयार करण्याच्या सुचना करत महसुल विभागाचे काम अधिक जलदगतीने व अचूक होण्याच्या दृष्टीकोनातुन येणाऱ्या काळात महसुल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगत आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाचे ज्ञान प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने आत्मसात करण्याची गरज आहे.  महसुल कायद्यामध्ये होत असलेल्या बदलांची माहिती त्याचा अभ्यास करुन सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करण्याची गरज असल्याचेही श्री बिनवडे यांनी यावेळी सांगितले.
           

            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ म्हणाले की, जन्मापासुन ते मृत्यूपर्यंतच्या नोंदी, शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यामध्ये महसुल विभाग अग्रेसर आहे.  महसुल विभागामध्ये काम करत असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतू या विभागामध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना समाजामध्ये मानही तेवढाच मोठा मिळतो.  त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम करत असताना नकारात्मक भावना न बाळगता सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करण्याची गरज आहे.  प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने आपल्या कामाचे नियोजन केल्यास त्यांच्यावर येणारा तणावर कमी होऊन आपल्या परिवारालादेखील पुरेसा वेळ देता येईल.  येणाऱ्या काळात महसुल विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगत जीवनाचा सातबारा ही महसुल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आधारित कविताही त्यांनी यावेळी सादर केली.
            यावेळी महसुल प्रशासनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल उप विभागीय अधिकारी सर्वश्री केशव नेटके, शिवकुमार स्वामी, ब्रिजेश पाटील, नायब तहसिलदार श्रीमती मयुरा पेरे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तसेच दहावी व बारावीमध्ये विशेष प्राविण मिळवलेल्या महसुल प्रशसनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे संचलन श्रीमती माधुरी मोरे यांनी केले तर आभार नायब तहसिलदार श्रीमती स्नेहा कुहिरे यांनी मानले.  
कार्यक्रमास महसुल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण
            सर्वप्रथम महसुल दिनाचे औचित्य साधुन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजीव नंदकर यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
*******



No comments:

Post a Comment