मुंबई, दि. ३ : मुंबईचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज गोरेगाव परिसरातील पूरस्थितीची पाहणी करून सुमारे दीड हजाराहून अधिक पूरबाधित कुटुंबियांना मदत पुरविली. शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा फटका बसलेल्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईसह उपनगरात शुक्रवारी रात्री पडलेल्या पावसाचा मोठा फटका नागरिकांना बसला. ओशिवरा नदीच्या उपनद्यांना पूर आल्याने गोरेगाव परिसरातील शास्रीनगर, सिद्धार्थनगर, प्रेमनगर व मोतीलाल नगर भागातील अनेक घरे पाण्याखाली गेली. तेथील सुमारे दीड हजाराहून अधिक नागरिकांना पावसाचा फटका बसला. दरम्यान, मुंबईचे पालकमंत्री श्री. देसाई यांनी या भागाला भेट देत थेट पाण्यात उतरून बाधितांना मदतीचा हात दिला. यावेळी महापालिकेच्या सहाय्यक आय़ुक्त चंदा जाधव, सहाय्यक अभियंता अमित पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पिण्याचे पाणी व जीवनावश्यक वस्तुंचेही वाटप करण्यात आले.
यावेळी श्री. देसाई यांनी सखल भागात साचलेल्या पाण्याचा तत्काळ निचरा करण्याच्या सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच येथील नागरिकांना आवश्यक लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवाव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या.
मुंबई व परिसरात पुढील चोवीस तासात पुन्हा जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन श्री. देसाई यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment