Tuesday 29 December 2020

शासकीय योजनांची गतीने अंमलबजावणी करा प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या परिसरात घनवन प्रकल्प राबवा जिल्हा नियोजन समितीमार्फत प्राप्त निधी संपुर्णपणे खर्च करा अवैधरित्या गौणखनिजांची वाहतुक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा -- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे निर्देश

 




 

            जालना, (जिमाका) दि. 29 :- सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी शासनामार्फत अनेकविध योजना राबविण्यात येतात.  योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध करुन देण्यात येतो.  या योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी योजनांची गतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिले.

            जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या कार्यालय प्रमुखांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज दि. 29 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते.

            यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती शर्मिला भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, शासनाच्या योजना राबवत असताना प्रत्येक शासकीय विभागांचा एकमेकांशी संबंध येत असतो.  योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अनेकवेळा वेगवेगळया विभागांच्या परवानग्या, नाहरकत प्रमाणपत्र आदींची आवश्यकता असते.  त्यामुळे शासनाच्या योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवुन त्याचा लाभ सर्वसामान्यांना होण्यासाठी प्रत्येक विभागाने एकमेकामध्ये समन्वय साधुन काम करण्याची गरज आहे.  योजना राबविण्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या जिल्हा प्रशासनाला कळवाव्यात.  योजना राबविण्यामध्ये असलेल्या अडचणी जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरावर पाठपुरावा करुन दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचबरोबर यापुढे प्रत्येक विभागाचा योजनानिहाय आढावा घेण्यात येऊन योजनांच्या प्रगतीबाबतची माहिती घेण्याबरोबरच  योजना राबविताना येणाऱ्या अडचणींची सोडवणुक करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी  श्री बिनवडे यांनी यावेळी सांगितले.

            जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन सर्व शासकीय विभागांना त्यांच्या मागणीनुसार विकास कामांसाठी दरवर्षी निधी उपलब्ध करुन देण्यात येत असतो.  यावर्षी कोव्हीड19 मुळे जिल्हा नियोजन समितीमार्फत निधीमध्ये कपात करण्याच्या शासनाने सुचना दिल्या होत्या.  परंतु आता जिल्ह्याला मंजुर करण्यात आलेला संपुर्ण निधी प्राप्त होणार असल्याने ज्या ज्या विभागांना निधी मंजुर केलेला आहे त्यांनी तो सर्व निधी मार्चअखेरपर्यंत प्रस्तावित केलेल्या योजनेवर खर्च होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिले.

            प्रत्येक जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवड करुन वृक्षांचे प्रमाण वाढविण्यात येत आहे.  त्यानुसार जालना जिल्ह्यातही वृक्ष लागवडीवर भर देण्यात यावी.  प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये घनवन वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्याच्या विभागीय आयुक्तांनी सुचना दिलेल्या असुन त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये घनवन प्रकल्प राबविण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.

सद्यस्थितीमध्ये ऊस कारखाने सुरु झालेले आहेत.  ऊसाची मोठ्या प्रमाणात वाहतुक करण्यात येत आहे. ऊसाची बैलगाडी अथवा ट्रॅक्टर, ट्रॉलीमधुन वाहतुक होत आहे.  परंतु या ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने अनेकवेळा अपघात घडतात.  त्यामुळे ऊसाची वाहतुक करणाऱ्या प्रत्येक ट्रॉलाला रिफ्लेक्टर असतील याची काळजी घेण्याबरोबरच जालना जिल्ह्यामध्ये जे अपघात स्थळे आहेत, अशा ठिकाणी बोर्ड, रम्बलर यासारख्या उपाय योजना करण्याबरोबरच अवैधरित्या गौणखनिजांची वाहतुक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.

            यावेळी जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी कृषि, कोषागार, राज्य उत्पादन शुल्क, सांख्यिकी, भूमी अभिलेख, पाटबंधारे,  लघु पाटबंधारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कौशल्य विकास,  जलसंधारण, आटीओ, सामाजिक वनीकरण, वनविभाग, सहकार, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन, एस.टी. महामंडळ, समाजकल्याण, कामगार विभाग, राष्ट्रीय महामार्ग, आरोग्य विभाग यासह ईतर विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेण्याबरोबरच योजना राबवत असताना त्यांना येणाऱ्या समस्याही जाणुन घेतल्या.

            बैठकीस सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

*******

No comments:

Post a Comment