जालना, दि, 16 :- बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील शेतकऱ्यांशी आज दिनांक 16 मे रोजी केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
केंद्रीय पथकामध्ये केंद्रीय सह सचिव अश्वीनी कुमार, आर.डी. देशपांडे, के. डब्ल्यु. देशकर, चाहत सिंग, एम.जी. टेंभुर्णे, ए. मुरलीधरन, डॉ. डी.के. श्रीवास्तव यांचा समावेश होता. यावेळी कृषी आयुक्त एस.पी. सिंह, प्र. जिल्हाधिकारी पी.बी. खपले, प्र.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उर्मिला चिखले, तहसीलदार योगिता कोल्हे आदींची उपस्थिती होती.
पथकाने सर्व प्रथम भोकरदन तालुक्यातील बाभुळगाव व सिपोरा बाजार या गावांना भेट दिली. त्यानंतर जाफ्राबाद तालुकयातील बोरगाव या गावाला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. भोकरदन, जाफ्राबाद भागात कापसाची मोठया प्रमाणात लागवड करण्यात येते. परंतु बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापूस पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती तिन्ही गावातील शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाला दिली. यावेळी पथकातील सदस्यांनी गावातील शेतकऱ्यांकडून त्यांनी किती एकरावर कापसाची लागवड केली होती, किती उत्पन्न झाले, कापूस पिकाला बोंड अळीचा प्रादुर्भाव कधी झाला, कोणत्या औषधाची फवारणी केली, विमा उतरवला होता काय आदी बाबींची माहिती जाणून घेतली.
---*-*-*-*-*-*-*
No comments:
Post a Comment