जालना, दि. 25 - मनोधैर्य योजनेंतर्गत
बलात्कार, ऍ़सिड हल्ला, बाललैंगीक अत्याचार पिडीतांचे पुनर्वसनासाठी स्थापन करण्यात
आलेल्या जिल्हा ट्रॉमा टिमसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित प्रशिक्षणाचे
उदघाटन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी
व्यासपीठावर जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्रीमती वर्षा पवार, जिल्हा शल्य चिकीत्सक
श्रीमती सरीता पाटील, मानसोपचार तज्ञ श्री पवार, राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक
ॲड. पी.जे गवारे, पियुश गडे यांची उपस्थिती
होती.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे म्हणाले
की, पोलीस, महिला व बालविकास विभाग, आरोग्य
विभाग यांनी सामाजिक दृष्टीकोन ठेऊन संवेदनशिलपणे व तत्परनेते काम करावे. तसेच पोलीस
विभागाने पिडीतांचा प्रथम खबरी अहवाल तातडीने नोंदवून घेऊन त्याची प्रत जिल्हा महिला
व बालविकास अधिकारी यांच्याकडे पाठविण्याच्या सुचना देऊन मनोधैर्य योजनेसंदर्भात उपस्थितांना
सविस्तर असे मार्गदर्शन केले.
राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक ॲड. पी.जे गवारे यांनी
मनोधैर्य योजना व बालकांचे कायदे या विषयावर मार्गदर्शन करुन उपस्थितांच्या शंकांचे
निरसन केले. ॲड पियुष गडे यांनी ट्रॉमा टिमची कार्ये व भुमिका या बद्दल माहिती विषद केली.
प्रास्ताविकात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती
वर्षा पवार यांनी मनोधैर्य योजनेची पार्श्वभूमी व सध्या जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी
कशा पद्धतीने होत आहे याबाबत सविस्तर अशी माहिती दिली.
मनोधैर्य
योजोंतर्गत प्राप्त प्रकरणांवर केली जाणारी कार्यवाही व पोलीसांची भुमिका याबद्दल जिल्हा
संरक्षण अधिकारी व्हि. पी. नागरे यांनी तर परिविक्षा अधिकारी श्री अमोल राठोड यांनी
मनोधैर्य योजनेतून अनुदान वाटपाबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय राठोड तर
आभार समुपदेशक संतोष कऱ्हाळे यांनी मानले.
*******
No comments:
Post a Comment