Wednesday 5 December 2018

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची केंद्रीय पथकाकडून पहाणी शेतकऱ्यांशी संवाद साधुन घेतली पीकपरिस्थितीची माहिती



            जालना दि. 5 -  जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासुन पावसाने दडी मारल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीची पहाणी केंद्रीय पथकाने आज दि. 5 डिसेंबर रोजी बदनापुर व जालना तालुक्यातील गावांना भेटी देऊन केली व उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधुन पीकपरिस्थितीची माहिती घेतली.
            केंद्र शासनाच्या या पथकामध्ये निती आयोगाचे सहसल्लागार मानश चौधरी, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे एस.सी.शर्मा, यांचा समावेश होता तर पहाणी दरम्यान पथकासमवेत जलसंधारण विभाग (वाल्मी) औरंगाबादचे आयुक्त दीपक सिंघला अपर आयुक्त शिवानंद टाकसाळे, आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय माईनकर, तहसिलदार बिपीन पाटील, बदनापुरच्या तहसिलदार श्रीमती छाया पवार आदींची उपस्थिती होती.
            सर्वप्रथम पथकाने बदनापुर तालुक्यातील जवसगाव या गावाला भेट देत या गावातील शेतकरी श्रीमती सुवर्णा सुखदेव अंभोरे यांच्या शेतामधील कापूस पिकाची पहाणी केली. तद्नंतर जालना तालुक्यातील बेथलम या गावातील शेतकरी प्रकाश जयसिंग निर्मल यांच्या शेतातील ज्वारी पीकाची पहाणी केली.
            यावेळी पथकातील सदस्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत किती दिवसापासुन पाऊस नाही, पीकाची पेरणी कधी केली, गतवर्षात किती उत्पन्न मिळाले होते, यावर्षी किती उत्पन्न अपेक्षित आहे, पीकविमा भरला होता काय तसेच बँकेकडून पीकांच्या लागवडी कर्ज घेतले होते काय आदी माहिती विचारली.  तसेच आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनीही पीक परिस्थितीबाबत पथकाला माहिती दिली.
            यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यातील पाणी पुरवठा, टंचाईच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजना, टंचाई आराखडा, रोहयोच्या माध्यमातुन मजुरांना काम यासह दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने केंद्रीय पथकाला माहिती दिली.             पथकाने भेट दिलेल्या दोनही गावात शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******






No comments:

Post a Comment