Thursday 7 February 2019

वाटूर येथे कृषी प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन संपन्न नैसर्गिक शेतीसाठी सेंद्रीय शेती हा उत्तम पर्याय - पालकमंत्री बबनराव लोणीकर





      जालना, दि. 7 – आजघडीला पारंपरिक शेतीमध्ये अधिकचे उत्पन्न घेण्याच्यादृष्टीने रासायनिक खते तसेच किटकनाशकाच्या  अती वापराने शेतीची सुपिकता घटत चालली आहे.  रासायनिक खतापासुन निर्मित अन्नधान्यामुळे मानवी आरोग्यावर घातक परिणाम होत आहे. जमीनीचा पोत टिकुन राहुन कमी खर्चात  नैसर्गिक शेतीसाठी सेंद्रीय शेती हा उत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            वाटुर येथे आर्ट ऑफ लिव्हींग व शासनाचा आत्मा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान कृषिमंत्र 2019 नैसर्गिक शेती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असुन या प्रदर्शनाचे उदघाटन पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.  त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
            व्यासपीठावर विजयअण्णा बोराडे, पुरुषोत्तम वायाळ, भगवान काळे, भुजंगराव गोरे, अंकुर गुप्ता राहुल हुसे, रामेश्वर तनपुरे, कैलास बोराडे, आश्रुबा डक, तहसिलदार श्री कदम आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातुन संपुर्ण देशभरात नैसर्गिक शेतीच्या प्रचार व प्रसाराबरोबरच जलसंधारणाची कामे, युवकांसाठी व्यसनमुक्तीचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. शासनाच्या विविध कृषि योजना, संशोधित कृषी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रयोगशिल शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषीपूरक व्यवसाय आदीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे व या माध्यमातुन शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करुन आपली उन्नती साधावी यादृष्टीकोनातुन या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असुन या प्रदर्शनाचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            विजयअण्णा बोराडे यांच्या माध्यमातुन खरपुडी येथे कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातुन शेतीमधील नवनवीन प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे सांगत  कडवंची या गावाने शेततळयाची निर्मिती करुन पाण्याचे उत्तम व्यवस्थापन करत दुष्काळी परिस्थितीमध्येसुद्धा कोट्यावधी रुपयांचे द्राक्षाचे पीक घेतल्याचे नमूद करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही अशाच प्रकारे शेती केल्यास त्यांच्या उत्पन्नात नक्कीच भर पडेल असा विश्वासही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केला.
            भारत हा कृषिप्रधान देश असुन 70 टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेतीव्यवसायावर निर्भर आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी सन्मानाने जगला पाहिजे. तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासनामार्फत अनेकविध योजना राबविण्यात येत आहेत.  वाटुर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीच्या व नैसर्गिक शेतीची माहिती मिळण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार असुन या प्रदर्शनाची शासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाहीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली.
            यावेळी विजयअण्णा बोराडे यांनीही मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पुरुषोत्तम वायाळ यांनी आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातुन करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे आभार परमेश्वर राजबिंडे यांनी मानले.
                सर्वप्रथम पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे फित कापून उदघाटन करण्यात आले.  यावेळी पालकमंत्र्यांनी प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन स्टॉलधारकांकडून माहिती जाणून घेतली.
                कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह शेतकरी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******

No comments:

Post a Comment