Thursday 7 February 2019

शासनाच्या योजना तळागाळातील प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज - पालकमंत्री बबनराव लोणीकर



                जालना, दि. 7 – समाजातील उपेक्षित, वंचित, दीन दुबळे तसेच निराधारांसाठी शासन अनेकविध योजना राबवित आहे. या योजनेच्या माध्यमातुन निराधारांच्या जीवनातील अंधार दूर करण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत असुन शासनाच्या या योजना तळागाळातील प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच समाजातील प्रत्येकाने या कामात पुढाकार घेण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
                नेर येथे सामाजिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित लाभार्थ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
                व्यासपीठावर  भुजंगराव गोरे, सुभाषराव पालवे, हनुमंतराव उफाड, ज्ञानेश्वर माऊली शेजुळ, प्रकाशराव टकले, जिजाबाई जाधव, गावच्या सरपंच श्रीमती पठाण, मुरलीधर उफाड, बाबासाहेब मोरे, दिलीप पवार, अशोक डोके, डॉ. देशमुख, नसीरभाई, खलील चौधरी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सहदेव मोरे, सदस्य समाधान वाघमारे, संजय काळे, श्रीमती तारामती खरात, शेख खलील, उमेश मोहिते, तहसलिदार बिपीन पाटील, नायब तहसिलदार श्रीमती चामनार, तालुका कृषी अधिकारी श्री सुखदेव आदींची उपस्थिती होती.
                पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले,  सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून राज्य व केंद्र शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्यांना शासनाच्या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती नसल्याने या लाभापासून ते वंचित राहतात.  जालना जिल्ह्यात अर्थसहाय्य योजना समितीच्या माध्यमातुन व सर्व शासकीय विभागांच्या सहकार्याने सर्वसामान्यांना या योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात आल्याने गेल्या तीन वर्षात 12 हजार निराधारांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.  नेर व सेवली परिसरातील तीन हजार 300 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक पात्र व गरजू लाभार्थ्याला लाभ देण्यासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
                समाजातील दिव्यांगांच्या उन्नतीसाठी शासन अनेकविध योजना राबविते. समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, एस.टी. महामंडळामार्फत देण्यात येणारे लाभ तसेच कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक दिव्यांगांना एकाच छताखाली मिळण्यासाठी लवकरच महाशिबीराचे आयोजन येणार आहे.  परतूर, मंठा, नेर व सेवली भागात जवळपास 52 हजार दिव्यांगांची संख्या असुन आजपर्यंत 22 हजार दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली आहे.  या सर्व दिव्यांगांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांच्याप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन अधिकाधिक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच शासनाच्या योजनांपासुन एकही दिव्यांग वंचित राहणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
                राज्य शसनाने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरु करुन या योजनेच्या माध्यमातुन समाजातील अनेक गोरगरीबांना या योजनेमुळे जीवनदान दिले आहे.  या योजनेमध्ये समाविष्ट न होणाऱ्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातुन पाच लाख रुपयापर्यंतच्या वैद्यकीय सेवा मोफत स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे सांगत  राज्यातील 84 लाख कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळणार असुन या योजनेची माहिती गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी योजनेचा प्रचार, प्रसार करण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
                शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी   योजना सुरु केली आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना या योजनांतर्गत  प्रती शेतकरी कुटुंबाला प्रतीवर्ष सहा हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातुन प्रत्येक बेघराला त्याच्या स्वत:चे व हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सेवली  येथे 300 लाभार्थ्यांना तर आष्टी येथे 450 लाभार्थ्यांना घरकुले उपलब्ध करुन देण्यात आली असुन येत्या 2022 पर्यंत देशात एकही व्यक्ती बेघर राहणार नसल्याचे पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
                प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातुन देशातील पाच कोटी कूटुंबांना केवळ 100 रुपयांमध्ये गॅसचे वितरण करण्यात आले असुन जालना जिल्ह्यात एक लाख लाभार्थ्यांना याचे वाटप करण्यात आले आहे.  या योजनेच्या माध्यमातुन महिलांची धुरापासुन मुक्तता करण्यात आली असल्याचे सांगत पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसंदर्भातही उपस्थित लाभार्थ्यांना माहिती दिली.
                यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत निवृत्तीवेतन मंजुर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात मंजुरी आदेशाचे वितरणही करण्यात आले.  या योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल योजनेचे अध्यक्ष सहदेव मोरे यांच्यासह सर्व सदस्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
                कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह लाभार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******





No comments:

Post a Comment