Monday 16 October 2017

कर्जमाफीचा पहिला हफ्ता 18 ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



कर्जमाफीचा पहिला हफ्ता 18 ऑक्टोबरपासून
शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार
                               –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
           जालना, दि. 16 :- शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याच्या शासन निर्णयाची अमलबजावणी सुरु आहे. 18  ऑक्टोबर, 2017 पासून कर्जमाफीचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या कर्जमाफीचा फायदा राज्यातील गरजू शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली .
          जालना तालुक्यातील कडवंची या गावातील सिमेंट नालाबंधाऱ्याची पहाणी व जलपूजन मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.  त्या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार अरविंद चव्हाण, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, कडवंचीचे सरपंच चंद्रकांत क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.
          मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, शासकीय योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. शासन, लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्या माध्यमातून गावाचा कसा विकास, कायापालट होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे कडवंची हे गाव आहे.  कडवंचीच्या ग्रामस्थांनी अत्यंत मेहनतीमधून गावात जलसंधारणाची कामे केली आहेत. या गावाची आदर्श गाव म्हणून सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे.  कडवंचीचा आदर्श इतर गावांनींही घेऊन गावात जलसंधारणाची कामे करावीत, यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल. शाश्वत शेतीच्या अभावामुळेच शेतकरी अडचणीत आहेज.  शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करुन शेतकऱ्याच्या शेतीला शाश्वत सिंचन मिळाल्यास शेतकरी निश्चित समृद्ध होऊ शकतो, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
           शेतकऱ्यांच्या पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शासन प्रयत्न करीत आहे. गटशेती ही नवीन योजना तयार करण्यात आली आहे.  शेतीक्षेत्रात यापूर्वी गुंतवणूक होत नव्हती परंतु राज्य शासनाने या क्षेत्रात 25 हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक वाढवलेली आहे.  देशातील द्राक्षे व डाळींबाला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.  जालना जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात आहे. तसेच ड्रायपोर्ट हा प्रकल्प साकारला जात आहे.   जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळपिकांना या प्रकल्पाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात नक्कीच परिवर्तन होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
          जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या पुस्तिका व सीडीचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी तसेच कडवंची व परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******





No comments:

Post a Comment