Sunday 14 May 2017

भविष्यातील जालना अतिशय उत्तम बनवू --मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - शहराच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे



          जालना, दिनांक 13 – रस्ते, पाणी या मुलभूत गरजांबरोबरच घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचा सुयोग्य वापर आणि भूयारी गटारांच्या सुविधांबरोबरच भविष्यात जालना शहर अतिशय उत्तम शहर असेल. त्याकरीता सर्वोतोपरी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, यासाठी एकत्रितपणे येऊन शहराच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. 
         महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत जालना शहरातील अंतर्गत पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आज मामा चौक येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रावसाहेब दानवे, पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे,  आमदार अतुल सावे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, औरंगाबादचे महापौर भगवान घडमोडे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, अरविंद चव्हाण,रामेश्वर भांदरगे, भास्कर आंबेकर आदींची उपस्थिती होती.     
          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मोठ्या जलसमस्येतून जालना शहर मुक्त झाले आहे. जालना शहराच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेऊन विकासासाठी पुढे यावे. देशात महाराष्ट्राचे मोठ्याप्रमाणात शहरीकरण झाले आहे. आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकाने शहरीकरणाचा स्वीकार करण्याचे सांगून शहरांना स्मार्ट करण्यासाठी विविध योजनांची निर्मिती केली. स्मार्ट शहर, अटल अमृत शहर योजना, 14 व्या वित्त आयोगाच्या आदी विविध योजनांच्या माध्यमातून निधीची  व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.
          गेल्या दोन वर्षात शहर विकासासाठी 21 हजार कोटी रूपये तरतूद करण्यात आली आहे. मागील सात आठ वर्षात बंद पडलेल्या 8 हजार कोटींच्या 150 योजना तीन वर्षात सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, भूयारी गटारे, सांडपाण्यावर प्रक्रिया उद्योगासाठी लागणारा आवश्यक तेवढा निधी सरकार उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
             प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक झोपडपट्टीतील गरिबाला घराची उपलब्धता करून देण्यावर भर देण्यात यावा. त्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावेत, असे आदेशही त्यांनी मुख्याधिकारी यांना दिलेत. त्याचबरोबर देशातील नामांकित, आंतरराष्ट्रीय संस्था असलेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या माध्यमातून जालन्यात जगभरातील उद्योग याठिकाणी येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. जालन्यातील सीडपार्कबाबत लवकरच जागेचे संपादन करण्यात येईल, समृद्धी महामार्ग जालना आणि औरंगाबादसाठी फायदेशीर आहे, असेही त्यांनी सांगितले.
          पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनीही यावेळी जालन्याच्या विकासकामांबाबत माहिती देऊन पुढील तीन वर्षात मराठवाडा वॉटर ग्रीड होईल, असे सांगितले. वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे कौतुक करून महात्मा फुले मार्केटचा विषय मार्गी लावण्यावर भर द्यावा, असे सांगितले. यावेळी खासदार रावसाहेब दानवे यांनीही विकासकामांबाबत माहिती देऊन जालना पहिला ड्रायपोर्ट जिल्हा असल्याचे सांगितले. त्याचबरोबर जिल्ह्याच्या विकासासाठी शासन सर्वोतोपरी मदत करत असल्याचे ते म्हणाले. आमदार राजेश टोपे यांनीही विचार मांडले. यामध्ये त्यांनी पाणी पुरवठा योजनेचे कौतुक केले.
        छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सव समितीच्यावतीने 35 हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आला. यावेळी आयएमए संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.
            तसेच प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर कोनशीलेचे अनावरण करण्यात आले. नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्याहसते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शाल-श्रीफळ देऊन, मान्यवरांचा पालिकेतर्फे शाल-श्रीफळ  देऊन सत्कार करण्यात आला.
         जालना जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांबाळे  यांचा देशात प्रधानमंत्री पीक विम्यामध्ये उत्तम कामगिरी केल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.
रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कागदपत्रे हस्तांतरित
देशातील क्रमांक एकची संस्था असलेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे जालना जिल्ह्यातील सिरसवाडी येथे उभारण्यात येणा-या शाखेच्या परिसराकरीता 203 एकर जमिनीच्या कागदपत्रांचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते तंत्रशिक्षण विभागाच्या डॉ. स्मिता लेले, महेश शिवणकर, तसेचमुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे माजी विद्यार्थी आशीष मंत्री, मनोज पांगरकर यांच्याकडे करण्यात आले आहे.
                                                     *******



No comments:

Post a Comment