जालना, दि. 8 (जिमाका) :- जालना जिल्हयामध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत आहे. तापमान 40 अंशच्या वर जात आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालय प्रमुखांना परिपत्रकाव्दारे उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
परिपत्रकाव्दारे
दिलेल्या सुचनेनुसार जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालय प्रमुखांनी शालेय परिपाठ सकाळी कमीत कमी वेळेत व
राष्ट्रगीत / प्रतिज्ञा पूरेतो मर्यादीत ठेवावे. परिपाठ शक्यतो सावलीच्या ठिकाणी
घेण्यात यावा. शाळेची
वेळ वर्गखोल्याचे योग्य नियोजन करुन सकाळच्या सत्रात मध्यान्हापूर्वी ठेवण्यात
यावी. शालेय विद्यार्थ्यांचे मैदानी खेळ, खेळाच्या तासीका, पि.टी./ कवायत इ.
उन्हाच्या कालावधीत आयोजीत करण्यात येवू नये. शालेय
विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या आवारात मुबलक प्रमाणात स्वच्छ पिण्याचे पाणी, पंखे,
प्रथमोचाराची सुविधा शाळा व्यवस्थापनाने उपलब्ध करुन द्यावी. जे विद्यार्थी,
स्कुलबस अथवा इतर वाहनांनी शाळेत ये-जा करतात त्यांच्या व त्यांच्या पालकांसाठी
वाहन येईपर्यंत थांबण्यासाठी शाळेच्या आवारात शेड/सावलीची व्यवस्था करावी. वाढते तापमान
लक्षात घेता शाळेच्या दर्शनी भागात/स्कुलबसमध्ये आपत्कालीन वैद्यकीय सुविधा बाबतचे
क्रमांक ठळक अक्षरात प्रदर्शीत करावे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थी स्कुलबस द्वारे
ये-जा करतात अशा सर्व स्कुलबसमध्ये चालकासोबत एक मदतनीस ठेवण्यात यावा. शालेय कालावधीदरम्यान उष्णतेच्या
लाटेचा अंदाज लक्षात घेता कोणताही विद्यार्थी, शिक्षक अथवा कर्मचारी यांना
उष्माघाताचा त्रास होणार नाही यादृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना शाळा
व्यवस्थापनाने कराव्यात. याव्यतिरिक्त
उष्णतेच्या लाटेच्या कालावधीत उष्माघातापासून विद्यार्थ्यांचा बचाव करण्यासाठी
आवश्यक असतील अशा उपययोजना शाळा व्यवस्थापनाने कराव्यात.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment