जालना दि.30 (जिमाका) : जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना
देणे, उद्योजकांच्या विविध समस्या सोडविणे, स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक
संधी उपलब्ध करून देणे तसेच जिल्ह्याच्या निर्यातक्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने
जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हास्तरीय सल्लागार समिती, आजारी उद्योग पुनर्वसन समिती,
स्थानिक लोकांना रोजगारात प्राधान्य समिती आणि जिल्हा निर्यात प्रचालन समिती यांची
संयुक्त बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली
संपन्न झाली.
बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक तथा सदस्य सचिव योगेश
सारणीकर, महापालिकेचे उपायुक्त त्रिंबक कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी
अभियंता ए. एल. सगरुळे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, एम आय डीसीचे उपअभियंता
बी. व्ही. राऊत, एन एच एल एम एलचे प्रकल्प व्यवस्थापक विकास मलीक, औद्योगिक संस्थेचे
प्रतिनिधी अर्जुन गेही, मेटा रोल्सचे शुभम सोनी तसेच उद्योजक सुनील रायठट्टा यांच्यासह
विविध विभागांचे अधिकारी व औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील औद्योगिक पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भात विविध
महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जुन्या एम आय डीसी क्षेत्राला जोडणाऱ्या
कन्हैयानगर ते मंठा चौफुली या मार्गासाठी स्वतंत्र बायपास रस्ता विकसित करण्याचा प्रस्ताव,
औद्योगिक वसाहतीत वाहनतळ व सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी, विद्युत सुविधांचे नूतनीकरण,
जालना औद्योगिक वसाहतीसाठी 'सिटी बस' सेवा सुरू करणे, समृद्धी महामार्गाच्या प्रवेशद्वाराजवळ
फ्लायओव्हर उभारणे तसेच एमआयडीसीतील मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाच्या
कामांचा आढावा घेण्यात आला.
उद्योगांना विविध शासकीय सेवांचा लाभ 'मैत्री' पोर्टलच्या माध्यमातून
ऑनलाइन पद्धतीने मिळावा, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन नवीन उद्योग उभारणीला
चालना द्यावी, यावरही बैठकीत भर देण्यात आला.
यावेळी कृषी विभागाच्या
सहकार्याने जालना जिल्ह्याला 'सिल्क हब' म्हणून विकसित करण्याच्या संकल्पनेवर सविस्तर
चर्चा झाली. रेशीम उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि उद्योगवाढीस
चालना मिळू शकते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
जिल्ह्याच्या निर्यातवाढीसाठी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, औद्योगिक
संघटना आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून सातत्याने पाठपुरावा करावा, असे
आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. जालना जिल्ह्याची औद्योगिक क्षमता अधिक
प्रभावीपणे देश-विदेशातील बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी संयुक्तपणे
प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीत
विविध उद्योगांशी संबंधित अडचणी, पायाभूत सुविधांतील सुधारणा, स्थानिकांना रोजगारात
प्राधान्य देण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच उद्योगवाढीस पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी
संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्यावर एकमत झाले. जिल्ह्याच्या सर्वांगीण
औद्योगिक विकासासाठी अशा बैठका प्रभावी ठरत असून, विविध विषयांवर लवकरात लवकर कार्यवाही
करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment