जालना,दि.7(जिमाका): जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी 06 जुलै रोजी मौजे महाकाळा येथे मुक्काम
करून मंगळवारी (दि.7) सकाळी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावाला भेट देत
ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. यावेळी जलसंवर्धन, ग्रामविकास, विविध शासकीय
योजनांची अंमलबजावणी तसेच विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अभियानाचा आढावा घेत संबंधित
अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
गावभेटी दरम्यान जिल्हाधिकारी मित्तल यांनी ग्रामपंचायत कार्यालयात नागरिक,
महिला बचत गटांच्या सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या तसेच ग्रामस्थांशी
संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. विविध विषयांवर चर्चा करताना
त्यांनी भविष्यात उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने
वापर करण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांनी पाणी संवर्धनासाठी गावात
सप्तसूत्री अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना ग्रामपंचायत व ग्रामस्थांना
दिल्या. तसेच भूजल पातळी वाढविण्यासाठी 'जलतारा' ही संकल्पना नागरिकांसमोर मांडून
विहीर पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वनराई बंधारे उभारणे, बदलत्या हवामानाचा
विचार करून परंपरागत पीकपद्धतीत आवश्यक बदल करणे तसेच गावामध्ये ‘जलपंचायत’ स्थापन
करून लोकसहभागातून जलव्यवस्थापन करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
दौऱ्या दरम्यान जिल्हाधिकारी यांनी गावातील अंतर्गत रस्ते, नाल्या, स्वस्त
धान्य दुकान, शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. विविध
ठिकाणी आवश्यक सुधारणा करण्याबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी व संबंधित विभागाच्या
कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. शासकीय सुविधा अधिक परिणामकारकपणे
नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अभियानाचाही
त्यांनी सविस्तर आढावा घेतला. हे काम निर्धारित कालावधीत गुणवत्तापूर्ण पद्धतीने
पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी मतदान
केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व बीएलओ पर्यवेक्षक यांच्या कामाचा आढावा घेत एका
कुटूंबाचा एन्युमरेशन फॉर्म प्रत्यक्ष भरून घेण्याची प्रक्रिया तपासण्यात आली.
यामुळे क्षेत्रीय स्तरावरील कामाची गुणवत्ता व अचूकतेची खात्री करण्यात आली.
जिल्हाधिकारी मित्तल यांनी मौजे सौंदलगाव खुर्द येथे सुमारे वीस वर्षांपासून
बंद असलेला आणि समन्वयातून खुला करण्यात आलेला शेतरस्ता प्रत्यक्ष शेतात जाऊन
पाहिला. या रस्त्यामुळे शेतकऱ्यांची वाहतूक व शेतीकामे सुलभ झाल्याचे सांगत
शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या मुक्काम दौऱ्यात
जलसंवर्धन, ग्रामविकास, नागरिकांच्या समस्या सोडविणे, निवडणूक प्रक्रियेची तयारी
आणि स्थानिक पातळीवरील विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यावर विशेष भर देण्यात
आला. ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या सहभागातून गावाचा सर्वांगीण विकास
साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
-*-*-*-*-*-*-
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment