Thursday, 2 July 2026

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 11 प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्ती आदेशांचे वितरण

 


जालना, दि.2 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्यामुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सुशिक्षित युवक-युवतींना उद्योग व सेवा क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा, त्यांचे कौशल्य विकसित व्हावे आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी अधिक सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने सदर योजना राबविण्यातयेतअसूनयामध्ये 18 ते 35 वयोगटातील किमान 12 वी पास उमेदवारांना 11 महिन्याचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाते.यामध्ये त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार 12 वी करीता 6,000 रुपये  आय.टी.आय./ डिप्लोमाकरीता 8,000 रुपये  वपदवीवपदविधरकरीता 10,000 रुपये इतके विद्यावेतन डी.बी.टी.व्दारे थेट उमेदवारांच्या खात्यात अदा केले जाते.

            सदर योजनेच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जालना यांनी 11 उमेदवारांची निवड करण्यात आली असून निवड झालेल्या 11 प्रशिक्षणार्थ्याना सतीश टोपे, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,जालनावश्री. गणेश चिमणकर, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालनायांच्याहस्ते प्रशिक्षणाकरीता नियुक्ती आदेशांचे वितरणदि. 1 जुलै 2026 रोजी करण्यात आले.

            यावेळी अध्यक्ष, सतीश टोपे, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी उमेदवारांचे अभिनंदन करून प्रशिक्षणाच्या कालावधीत शिस्त, प्रामाणिकपणा आणि समर्पणाने काम करण्याचे आवाहन केले. बँकिंग क्षेत्रातील हे प्रशिक्षण त्यांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच गणेश चिमणकर, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही युवकांच्या कौशल्य विकासाला चालना देणारी आणि उद्योग क्षेत्राशी प्रभावी दुवा निर्माण करणारी महत्त्वपूर्ण योजना असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींनी या योजनेत नोंदणी करून शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

            या कार्यक्रमास अशितोष देशमुख, कार्यकारी संचालक, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सुरेश जाधव, सरव्यवस्थापक, अमोल बोरकर, कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी, डॉ. अमोल परिहार, समुपदेशक, मॉडेल करिअर सेंटर, रविंद्र पाडमुख, जिल्हा समन्वयक, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तसेच जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-*-

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याकरीता 14 जुलैपर्यंत मुदतवाढ

 


 

जालना, दि.2 (जिमाका) : पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना सन 2026-27 या वर्षाकरीता जालना जिल्ह्यात अधिसुचित फळपिकांकरिता ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे.

या योजनेत मृग बहार सन 2026-27 मधील मोसंबी, द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, संत्रा, लिंबू, पेरू, चिकू आणि हळद या पिकांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत कमी पाऊस, पावसाचा खंड, जास्त तापमान, सापेक्ष आद्रता या हवामान घोक्यापासून संरक्षण मिळणार आहे. मोसंबी, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, लिंबू, पेरू, चिकू आणि हळद पिकाकरीता भाग घेण्याची अंतिम मुदत 14 जुन, 2026 अशी होती. परंतु मृग बहार सन 2026-27 मध्ये मोसंबी, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, लिंबू, पेरू, चिकू आणि हळद या पिकाकरीता पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याकरीता दि. 14 जुलै, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 तसेच पुढीप्रमाणे फळपिकारीता अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 जुलै, 2026 आहे. मोसंबी उत्पादन वय 3 वर्ष,  विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर नियमित 1 लाख रुपये, द्राक्ष उत्पादन वय 2 वर्ष,  विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर नियमित 3 लाख 80 हजार रुपये, डाळिंब   उत्पादन वय 2 वर्ष,  विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर नियमित 1 लाख 60 हजार रुपये, संत्रा उत्पादन वय 3 वर्ष,  विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर नियमित 1 लाख रुपये, लिंबू उत्पादन वय 4 वर्ष,  विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर नियमित 80 हजार रुपये, पेरु उत्पादन वय 3 वर्ष  विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर नियमित 70 हजार रुपये, चिकू उत्पादन वय 5 वर्ष,  विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर नियमित 70 हजार  रुपये, हळद  विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर नियमित 1 लाख  80 हजार रुपये अशी आहे.

तर सीताफळ या फळासाठी दि. 31 जुलै 2026 अंतिम मुदत असून उत्पादन वय 3 वर्ष, विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर नियमित 70 हजार रुपये अशी आहे.

पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना विमा योजनेत भाग घेण्यासाठी फळपिक विमा ऑनलाईन पोर्टल www.pmfby.gov.in वर सहभाग नोंदवावा. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

अपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार 100 वर्षीय वृद्धेला अवघ्या 24 तासांत आर्थिक सहाय्य मंजूर

 



मुंबई, दि. 2 : गंभीर अपघातामुळे उपचारासाठी आर्थिक अडचणीत सापडलेल्या 100 वर्षीय सरूबाई मुंजवार यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवघ्या 24 तासांत आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले. या सहाय्यामुळे त्यांच्यावर आवश्यक शस्त्रक्रिया वेळेत पार पडून पुढील उपचार तातडीने सुरू करणे शक्य झाले.

 

            सरूबाई मुंजवार या रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झाल्या. या अपघातात त्यांच्या डाव्या मांडीला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. उपचारासाठी सुमारे सव्वा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने त्यांच्या कुटुंबासमोर आर्थिक अडचण निर्माण झाली.

 

            नातेवाईकांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयाच्या सहकार्याने 25 जून रोजी आर्थिक सहाय्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीकडे अर्ज सादर करण्यात आला.

 अर्ज प्राप्त होताच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाने आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रकरणावर तातडीने कार्यवाही केली. अवघ्या 24 तासांत आर्थिक सहाय्यास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे उपचारात कोणताही विलंब न होता आवश्यक वैद्यकीय सेवा वेळेत उपलब्ध होऊ शकली.

            या आर्थिक मदतीबद्दल सरूबाई मुंजवार यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षामार्फत गरजू रुग्णांना उपचारासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य कमीत कमी कालावधीत उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जात आहे. सरूबाई मुंजवार यांच्या प्रकरणात अर्ज प्राप्त होताच आवश्यक पडताळणी व कार्यवाही पूर्ण करून अवघ्या 24 तासांत आर्थिक सहाय्यास मंजुरी देण्यात आली. आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यास मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अल्पावधीत आर्थिक सहाय्य मंजूर करण्याची कार्यपद्धती अवलंबिली जाते. गरजू रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत अधिक माहिती अथवा मार्गदर्शनासाठी टोल फ्री क्रमांक 1800 123 2211वर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

विशेष लेखः- महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार


  

महाराष्ट्राच्या कृषी इतिहासात काही निर्णय हे केवळ प्रशासकीय निर्णय म्हणून नोंदले जात नाहीत, तर ते शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचे प्रतीक ठरतात. राज्य शासनाने नुकतीच जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ ही अशाच प्रकारची योजना आहे. ही योजना केवळ कर्जमाफी देणारी योजना नसून शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य, नव्याने पतपुरवठा आणि शाश्वत शेतीच्या दिशेने नेणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून पाहिली जात आहे.

 

2014 मध्ये राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाश्वत शेतीचा पुरस्कार केला आहे. महाराष्ट्रातील शेती आजही मोठ्या प्रमाणावर निसर्गावर अवलंबून आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, महापूर, हवामानातील अनिश्चितता आणि उत्पादन खर्चातील वाढ या अनेक कारणांमुळे शेतकरी वारंवार आर्थिक संकटात सापडतो. अशा परिस्थितीत कर्ज हा शेतीचा अविभाज्य भाग बनतो. परंतु जेव्हा हे कर्ज परतफेडीच्या क्षमतेपलीकडे जाते, तेव्हा त्याचे रूप आर्थिक विवंचनेत बदलते. त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी शासनाने यापूर्वीही विविध कर्जमुक्ती योजना राबवल्या होत्या. मात्र या वेळी शासनाने केवळ कर्जमुक्तीचा विचार न करता भविष्यात शेतकरी पुन्हा त्याच परिस्थितीत अडकणार नाही यासाठी व्यापक दृष्टीकोन स्वीकारला आहे.

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव या योजनेला देण्यात आले आहे, यालाही विशेष महत्त्व आहे. लोककल्याणकारी शासन, जलसंधारण, सिंचन व्यवस्था, ग्रामीण विकास आणि रयतेच्या हिताचा सातत्याने विचार करणाऱ्या अहिल्यादेवींच्या कार्याचा आदर्श आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात शेतकरी कल्याणाशी निगडित या योजनेला त्यांचे नाव देऊन शासनाने इतिहासातील लोकाभिमुख परंपरेला अभिवादन केले आहे.

या योजनेचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे तिची रचना. यापूर्वी अनेकदा असे होत असे की दोन लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा थोडी जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळत नसे. एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज दोन लाख दहा हजार रुपये असले तरी तो संपूर्णपणे अपात्र ठरत असे. त्यामुळे अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहत होते. यावेळी शासनाने ही त्रुटी दूर केली आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती शासनाकडून मिळणार आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घेण्याचा आणि शेती उभी करण्याचा मार्ग खुला होणार आहे.

 

 

या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान. अनेकदा चर्चेत केवळ थकीत कर्जदार येतात; मात्र वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळणे आवश्यक असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक शिस्त राखणाऱ्या आणि प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे.

 

योजनेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे एकवेळ समझोता योजना अर्थात वन टाइम सेटलमेंट (ओटीएस). अनेक शेतकऱ्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याने ते संपूर्ण कर्जमुक्तीच्या चौकटीत बसत नव्हते. आता अशा शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे तातडीचा आर्थिक भार कमी होऊन त्यांना नियोजनबद्ध पद्धतीने कर्जमुक्तीचा लाभ घेता येणार आहे.

 

मात्र या योजनेचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे तिच्यामागील शासनाची व्यापक भूमिका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील शासनाने ही बाब स्पष्टपणे मांडली आहे की, वारंवार कर्जमाफी देणे हे अंतिम समाधान नाही. शेतकरी पुन्हा कर्जाच्या चक्रात का अडकतो, त्याचे उत्पन्न स्थिर का राहत नाही आणि शेती आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम कशी होईल, याचा अभ्यास करण्यासाठी उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली होती. त्या समितीच्या शिफारशींमधून शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन सक्षमीकरणाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो शाश्वत शेतीचा. प्रत्येक शेतापर्यंत सिंचन सुविधा पोहोचणे, पाण्याचे सक्षम व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेती उत्पादन खर्च कमी करणे, योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि वेळेवर पतपुरवठा करणे या गोष्टींवर शासनाचा भर आहे. कर्जमुक्ती हा त्यातील एक भाग आहे; परंतु भविष्यात कर्जमाफीची गरजच भासू नये अशी परिस्थिती निर्माण करणे हा त्यामागचा मोठा उद्देश आहे.

 

राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून जवळपास ३६ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना मानली जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करून शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा संदेश दिला आहे.

 

योजनेची अंमलबजावणीही पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे. आधार प्रमाणीकरण, बँकांमधील माहितीची पडताळणी आणि तंत्रज्ञानाधारित प्रक्रिया यामुळे लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. राष्ट्रीयकृत, खाजगी, ग्रामीण, जिल्हा बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांमधील कर्जदारांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून साधारणता लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांच्या तपशीलाचे संकलन बँकामार्फत केले जाणार आहे.

 

आज महाराष्ट्रातील शेतकरी केवळ आर्थिक मदतीची अपेक्षा करत नाही, तर स्थैर्य, विश्वास आणि विकासाची संधी शोधत आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ ही त्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही योजना शेतकऱ्याच्या तातडीच्या आर्थिक अडचणी दूर करेलच; पण त्याचबरोबर सिंचन, पतपुरवठा, तांत्रिक सक्षमीकरण आणि शाश्वत शेतीच्या माध्यमातून भविष्यातील सक्षम कृषी व्यवस्थेची पायाभरणी करण्याचाही प्रयत्न करेल.

 

म्हणूनच या निर्णयाकडे केवळ कर्जमाफी म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. हा निर्णय शेतकऱ्याच्या आत्मविश्वासाचे पुनरुज्जीवन, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना आणि शेतीच्या शाश्वत विकासासाठी उचललेले एक धाडसी पाऊल म्हणून पाहिले पाहिजे. महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देण्याची क्षमता या योजनेत आहे आणि म्हणूनच ही योजना महाकर्जमुक्तीच्या पलीकडे जाऊन शेतकरी सक्षमीकरणाची नवी दिशा ठरू शकते.

 

                                                                                  प्रवीण टाके,

                                                                             उपसंचालक (माहिती),

विभागीय माहिती कार्यालय,

                                                                          कोल्हापूर

                                                                        9702858777

-*-*-*-*-*-

Wednesday, 1 July 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात वसंतराव नाईक यांना अभिवादन

 



 

            जालना दि. 1 (जिमाका) :-  राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, तुषार निकम, सतीश तायडे, दिपाली राऊत (वानखडे), शिल्पा मगरे,संपदा कुलकर्णी, प्रिती चौधरी, रीना नगरकर, ज्योती वाघ, स्वाती राठोड,अतुल केदार, डी.गोरे, आर.बी.कलगुंडे, एस के सहाने, सुनिल काळुंके व इतर तसेच प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

                                                              -*-*-*-*-*-*-

 

 

संत मुक्ताई पालखी सोहळा व रिंगण सोहळ्याच्या पुर्वतयारीचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला प्रत्यक्ष आढावा

 


 

जालना, दि.01 (जिमाका): आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याच्या तसेच जिल्ह्यात प्रथमच आयोजित होत असलेल्या रिंगण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन विविध विभागांच्या पुर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पालखी सोहळा व रिंगण सोहळा निर्विघ्न, सुरक्षित, शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी मित्तल यांनी वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी सर्व विभागांनी योग्य नियोजन करुन आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश दिले. पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, अखंडित वीज पुरवठा, आरोग्य सुविधा औषधीसाठा, तात्पुरती वैद्यकीय पथके, मोबाईल व सार्वजनिक स्वच्छतागृहे तसेच मुक्कामस्थळी आवश्यक सर्व मूलभूत सुविधा प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन, संवेदनशील ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवणे तसेच आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्याचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्याचबरोबर अग्निशमन, महसूल, सार्वजनिक बांधकाम, ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, महावितरण, सार्वजनिक आरोग्य, पशुसंवर्धन, अन्न व औषध प्रशासन, परिवहन तसेच इतर सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने नियोजन करून वारकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

पालखी मार्गावरील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, अन्नपदार्थांची तपासणी, सार्वजनिक आरोग्य विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यावर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान विशेष भर दिला.

जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या रिंगण सोहळ्याच्या अनुषंगाने जालना शहर महानगरपालिकेमार्फत स्वच्छता, आरोग्य सुविधा, मोबाईल टॉयलेट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज पुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, व्यासपीठ उभारणी तसेच इतर सर्व आवश्यक नागरी सुविधा दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण, पार्किंग व्यवस्था, आवश्यकतेनुसार वाहतूक वळविणे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी सक्षम नियोजन करण्याबाबत विशेष दक्षता घ्यावी, असेही त्यांनी निर्देशित केले.

सर्व यंत्रणांनी क्षेत्रीय स्तरावर नियमित पाहणी करून स्थानिक प्रशासनाशी सातत्याने समन्वय राखावा तसेच कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.

-*-*-*-*-*-*-*-

 

 

 

विशेष वृत्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 : जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा

 


जालना, दि.1 (जिमाका): मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांपैकी एक असलेल्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय म्हणून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' कडे पाहिले जात आहे. सततची नापिकी, वाढता उत्पादन खर्च, अनियमित पाऊस, अवकाळी पावसाचे संकट आणि शेतीमालाच्या अस्थिर बाजारभावामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा  आहे.

 

जालना जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे. जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, मका, तूर, ज्वारी आदी प्रमुख पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका या पिकांना बसत आहे. कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट होत आहे. त्यातच बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि सिंचनाचा वाढलेला खर्च यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. परिणामी अनेक शेतकरी पीककर्जाची नियमित परतफेड करू शकले नाहीत.

 

याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी महत्त्वाची संधी मानली जात आहे. या योजनेअंतर्गत शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांच्या पीककर्जाची माफी अथवा कर्जातून दिलासा देण्यात येणार आहे. त्यामुळे थकीत कर्जाचा बोजा कमी होऊन शेतकऱ्यांना नव्या हंगामासाठी पुन्हा बँकांकडून कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

 

जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना लाभाची अपेक्षा

जालना जिल्ह्यातील हजारो शेतकरी सहकारी तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीककर्ज घेतात. गेल्या काही वर्षांत प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेकांची कर्जे थकीत झाली आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमुक्तीच्या कक्षेत येणार आहे. त्यामुळे शेतीतील गुंतवणूक वाढण्याबरोबरच ग्रामीण अर्थ व्यवस्थेलाही चालना मिळू शकेल.

 

कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याचे आवाहन

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, सातबारा उतारा, बँक खाते, पीककर्जाची माहिती आणि इतर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यांची पडताळणी बँका, सहकारी संस्था आणि महसूल विभागाच्या नोंदींच्या आधारे केली जाणार असल्याने नोंदी अचूक असणे आवश्यक ठरणार आहे.

 

बँका आणि कृषी विभागाकडे वाढली चौकशी

योजनेची घोषणा झाल्यानंतर जालना जिल्ह्यातील कृषी विभाग, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमध्ये शेतकऱ्यांची चौकशी वाढली आहे. अनेक शेतकरी पात्रतेचे निकष, लाभाची मर्यादा आणि अर्ज प्रक्रियेबाबत माहिती घेत आहेत. शासनाकडून अधिकृत मार्गदर्शक सूचना जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीला वेग येणार आहे.

अफवांपासून दूर राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

दरम्यान, योजनेबाबत सोशल मीडियावर विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असल्याने शेतकऱ्यांनी कोणत्याही अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. योजनेची पात्रता, लाभ, अर्ज प्रक्रिया आणि इतर बाबींबाबतची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत आदेश, संबंधित बँका, कृषी विभाग किंवा जिल्हा प्रशासनाकडूनच घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण

मराठवाड्यातील शेती सातत्याने नैसर्गिक संकटांना सामोरे जात असताना 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' ही जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरू शकते. प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी झाल्यास ही योजना केवळ कर्जमुक्तीपुरती मर्यादित न राहता शेतकऱ्यांना नव्याने उभारी देणारी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी ठरेल.

-*-*-*-*-*-*-*-

पद्म पुरस्कारांकरीता नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

 

जालना, दि. 1 (जिमाका) : महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार प्रजासत्ताक दिन दि. 26 जानेवारी 2027 रोजी घोषित होणाऱ्या पद्म पुरस्कारांकरीता पद्मश्री, पद्म भुषण, पद्मविभूषण शिफारशी केंद्र शासनामार्फत नामांकन प्रस्ताव मागविण्या आले असून  पद्म पुरस्कार हेसर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी असून ते अतिशय प्रतिष्ठेचे आहेत. याबाबतचे अधिनियम आणि नियम केंद्र शसनाच्या गृह मंत्रालयाच्या www.pad,aawards.gov.in या संकेस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पद्म पुरस्कारासाठी पात्र व इच्छुक मान्यवरांची वैयत्किरित्या नामांकन पोर्टलवर दि. 31 जुलै 2027 पर्यंद सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रसिध्दीप्रत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

शैक्षणिक वर्ष 2026-27 महाडीबीटी 2.0 प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती/फ्रीशिप अर्ज प्रक्रिया सुरू

 


 

जालना, दि. 1 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता महाडीबीटी २.० ही नव्याने विकसित करण्यात आलेली ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, या प्रणालीद्वारे नवीन (Fresh) व नूतनीकरण (Renewal) शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क/परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप) योजनांचे अर्ज नोंदणी, तपासणी व मंजुरीची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. या नवीन प्रणालीमध्ये विद्यार्थी, महाविद्यालये व समाज कार्यवाही यावर भर देण्यात आला आहे. कल्याण विभाग यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या असून अर्ज प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, अचूकता व जलद कार्यवाही यावर भर देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनी करावयाची कार्यवाही

महाडीबीटी 2.0 प्रणालीमध्ये नवीन महाआयडी (MahalD) तयार करणे बंधनकारक आहे.आधार क्रमांकाशी संलग्न महाआयडी तयार करून आधार पोर्टलवरील माहिती (पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल, बँक खाते इ.) अद्ययावत ठेवावी.जातीचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, गुणपत्रिका आदी आवश्यक कागदपत्रे PDF स्वरूपात तयार ठेवावीत.नवीन (Fresh) व नूतनीकरण (Renewal) अर्जासाठी महाआयडी/आधारद्वारे लॉगिन करावे.नूतनीकरणासाठी "माझा अर्ज नूतनीकरण करावा" हा पर्याय निवडावा.

महाविद्यालयांनी करावयाची कार्यवाही.

महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या लॉगिनद्वारेच अर्ज तपासणी व मंजुरी करावी.महाविद्यालयाचे प्रोफाईल, शुल्क रचना व इतर माहिती अद्ययावत ठेवावी. पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज वेळेत तपासून मंजूर करावेत. कोणताही पात्र अर्ज प्रलंबित ठेवू नये.

समाज कल्याण विभागाने करावयाची कार्यवाही

सहाय्यक आयुक्त स्तरावर पात्र अर्जाची अंतिम मंजुरी देण्यात येईल. विद्यार्थी, पालक व महाविद्यालयांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल. वृत्तपत्रे, समाजमाध्यमे, कार्यशाळा व जनजागृतीद्वारे योजनांची व्यापक प्रसिद्धी करण्यात येईल. Zero Pendency (शून्य प्रलंबित) हे उद्दिष्ट ठेवून सर्व अर्जावर वेळेत कार्यवाही करण्यात येईल.

 

सर्व पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे अचूक व सत्य स्वरूपात अपलोड करावीत. महाविद्यालयांनी अर्ज तपासणीची कार्यवाही वेळेत पूर्ण करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व फ्रीशिप योजनांचा लाभमिळण्यासाठी सहकार्य करावे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना कार्यालयाशी संपर्क साधण्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. अनिता राठोड,  यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

अमृत तर्फे लोकसेवा आयोग परीक्षा मार्गदर्शन

 


 

जालना, दि. 1 (जिमाका) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तसेच अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्वतयारीसाठी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजना सन 2026-27 मध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

अमृतच्या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुंथर, गुजराती, जाट, हिंदू नेपाळी, भूमिहार, लोहाणा, कानबी आदी समाजघटकांचा समावेश आहे.

 

सन 2026-27 मध्ये संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा-2026 मध्ये उत्तीर्ण झालेल्या व या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संकेतस्थळावरिल संबंधित सूचना काळजीपूर्वक वाचून त्यानुसार ऑनलाइन अर्ज भरावा. योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी रुपये 50 हजार इतके प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसेच मुलाखत पूर्वतयारीसाठी रुपये 25 हजार इतके अर्थसहाय्य प्रदान करण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी अमृतच्या https://mahaamrut.org.in/याअधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. योजनेबाबतची सर्व माहिती, सूचना व अद्यतने अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. असे आव्हान अमृत जिल्हा कार्यालय यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क अमृत जिल्हा कार्यालय, दुसरा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना. मो.7391065474

-*-*-*-*-*-