Thursday, 14 May 2026

जनगणना-2027 च्या पहिल्या टप्प्यासाठी प्रशासन सज्ज घरयादी व घरगणनेच्या क्षेत्रीय कामांना गती; प्रशिक्षण, नियोजन आणि प्रसिद्धीवर भर

 


 

जालना,दि.14(जिमाका) : केंद्र शासनाने जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत देशव्यापी जनगणना-2027 जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, जालना (जनगणना विभाग) यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी करून जनगणना-2027 च्या पहिल्या टप्प्यातील घर यादी व घर गणनेच्या क्षेत्रीय कामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, स्वगणनेचा कालावधी दि. 1 मे, 2026ते दि. 15 मे, 2026 दरम्यान राहणार असून, प्रत्यक्ष क्षेत्रीय कामकाज दि. 16 मे, 2026 ते दि. 14 जून, 2026 या कालावधीत पार पाडले जाणार आहे. या प्रक्रिये दरम्यान नागरिकांच्या घरांची, कुटुंबांची तसेच विविध सामाजिक व मूलभूत माहितीची नोंद केली जाणार आहे.

या कामासाठी प्रशासनाने जनगणना अधिकाऱ्यांची नियुक्ती, सामान्य जनतेची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या यासंदर्भातील वैधानिक अधिसूचना प्रसिद्ध केल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, घर यादी व घर गणने दरम्यान विचारण्यात येणारे 33 प्रश्न अधिसूचित करण्यात आले आहेत. जनगणनेची प्रक्रिया सुरळीत आणि अचूक पार पडावी यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना फील्ड ट्रेनरमार्फत प्रशिक्षण देण्यात आले असून, प्रशिक्षण साखळीतील अंतिम टप्प्यातील प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षणही पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हास्तरावरील प्रशासकीय संरचना मजबूत करण्याबरोबरच प्रत्येक प्रशासकीय घटकात घर यादी गट तयार करण्याचे कामही पूर्णत्वाकडे आले असुन, यामध्ये  परिपत्रकात पुढील महत्त्वाच्या बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे. यात

·      आवश्यक प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करून 23 एप्रिल ते 8 मे,2026 दरम्यान त्यांचे प्रशिक्षण आयोजन करणे.

·      सर्व घरयादी गटांना क्षेत्रीय कामांचे वाटप करून 16 मे, 2026 पासून प्रत्यक्ष कामास सुरुवात करणे. आणि 14 जून, 2026 पर्यंत क्षेत्रीय काम पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजन करणे.

·      घरयादी, घरगणना तसेच स्व-गणनेबाबत व्यापक प्रसिद्धी करून नागरिकांमध्ये जनजागृती करणे.

·      1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या स्व-गणनेसंदर्भातील आवश्यक व्यवस्था करणे.

प्रशासनाने क्षेत्रीय कामकाजात डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करण्यावरही भर दिला असून, सर्व संबंधित विभागांनी वेळेत समन्वय साधून काम केल्यास जनगणना प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नसल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. जनगणना-2027 ही देशाच्या लोकसंख्येची, सामाजिक रचनेची आणि विकास आराखड्याची महत्त्वपूर्ण आधारभूत माहिती ठरणार असल्याचे जिल्हा प्रशासन, जालना यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

****

 

जालना जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे विविध खेळांच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन

 


 

 

जालना,दि.14(जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना यांच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण होऊन शारीरिक क्षमता व कौशल्य विकास व्हावा या उद्देशाने विविध खेळांच्या मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये जिम्नॅस्टिक, रायफल शूटिंग, तलवारबाजी, खो-खो, लॉन टेनिस, सॉफ्ट टेनिस, ज्युदो, टेनिक्वाईट, नेटबॉल, सॉफ्ट टक्का, आर्चरी, सॉफ्टबॉल आणि बेसबॉल या खेळांचा समावेश करण्यात आला आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात खेळांचा प्रचार व प्रसार होऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विशेषतः 8 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व शारीरिक क्षमतेच्या विकासासाठी प्राथमिक कौशल्य विकास प्रशिक्षणावर भर देण्यात येणार आहे.

ही प्रशिक्षण शिबिरे दि. 19 मे ते 30 मे, 2026 या कालावधीत सकाळी 6.30 ते 9.00 आणि सायंकाळी 5.00 ते 7.00 या वेळेत आयोजित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

शिबिरासाठी विविध खेळांचे प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले असून विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे. जिम्नॅस्टिकसाठी सिद्धेश कदम, रायफल शूटिंगसाठी आशिष जांगडे, तलवारबाजीसाठी विजय गाडेकर, खो-खोसाठी सचिन मोहिते, लॉन टेनिस आणि सॉफ्टटेनिस साठी विकास काळे, ज्युदोसाठी अमोल मोहिते, टेनिक्वाईटसाठी शेख चाँद पी.जे., आर्चरीसाठी सचिन टेकुर तसेच सॉफ्टबॉल आणि बेसबॉलसाठी एकनाथ सुरशे हे प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहणार आहेत.

प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे करण्यात आले असून काही खेळांचे प्रशिक्षण शिशु विहार इंग्लिश स्कूलजवळील मैदान, रामचंद्र सांस्कृतिक क्रीडा मंडळ, सी.पी. कॉलेज परिसर तसेच ज्ञानसागर विद्यालय, सिपोरा अंबोरा (ता. जाफ्राबाद) येथे होणार आहे. शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित क्रीडा मार्गदर्शकांशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी व दि. 19 मे रोजी सकाळी 6.30 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी केले आहे.

****

छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

 



            जालना,दि.14(जिमाका) : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

यावेळी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, मनीषा दांडगे,  सुकेशनी पगारे यांच्यासह तुषार निकम, सतीश तायडे, रवी मगरे, संपदा कुलकर्णी, शिल्पा मगरे, प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करुन छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले.

****

 

 

Wednesday, 13 May 2026

भग्न दगडांपासून अखंड श्रद्धेपर्यंत : सोमनाथची गाथा - ब्रिजेश सिंह, प्रधान सचिव तथा महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय


 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लवकरच, १३ नोव्हेंबर १९४७ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल सोमनाथ येथे गेले. समुद्रकिनारी उभे राहून त्यांनी मंदिराच्या भग्नावशेषांकडे गंभीर नजरेने पाहिले आणि एक प्रतिज्ञा केली सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाची. तो क्षण म्हणजे भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा पहिला मोठा जागर; आपल्या सभ्यतेच्या स्वाभिमानाच्या सार्वजनिक पुनर्प्राप्तीचा क्षण होता.

 

आणि आता, ११ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ अमृत महोत्सवात उपस्थित राहून मंदिराच्या पुनर्स्थापित तेजात सहभाग घेतला, तेव्हा तीच प्रतिज्ञा पुन्हा नव्याने प्रज्वलित झाल्यासारखी वाटते. विशेष महापूजा, कुंभाभिषेक, ध्वजारोहण आणि लाखो भाविकांची उपस्थितीहे सर्व मिळून भग्नावस्थेतून पुनर्निर्माणाकडे आणि पुनरुत्थानाकडे झालेल्या अखंड प्रवासाची घोषणा करतात. सरदार पटेलांच्या दूरदृष्टीपासून आजच्या आत्मविश्वासपूर्ण भारतापर्यंतचा हा अखंड सांस्कृतिक प्रवाह आहे. ही परंपरा, कालातीत आणि प्रेरणादायी, प्रत्येक पिढीला आपल्या वारशाचे जतन करण्याचे, ऐक्याचे रक्षण करण्याचे आणि भारताच्या सनातन आत्म्यावर दृढ श्रद्धा ठेवत समृद्ध, सुसंवादी आणि अखंड भविष्याकडे वाटचाल करण्याचे आवाहन करते.

 

अमेरिकन लेखक मार्क ट्वेन यांनी एकदा म्हटले होते की वाराणसी इतिहास, परंपरा आणि आख्यायिकांपेक्षाही प्राचीन आहे. पण कदाचित त्यांनी प्रभास पाटण आणि सोमनाथ पाहिले नसावे. भागवत पुराणानुसार, चंद्राला त्याचे सासरे दक्ष यांनी शाप दिला होता. त्या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्राने याच स्थळी भगवान शिवाची आराधना केली आणि म्हणूनच सोमनाथचंद्राचा अधिपती’ हे नाव उदयास आले.

 

मंदिर उभे राहण्याच्या खूप आधीपासून प्रभास पाटण हे मानवी वस्तीचे केंद्र होते. इ.स.पू. ३००० पासून येथे शेती आणि पशुपालन करणारी पूर्व-हडप्पा संस्कृती अस्तित्वात होती. सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासानंतरही येथे जीवन टिकून राहिले. येथे सापडलेली रेड पॉलिश्ड वेअर मातीची भांडी आणि प्रारंभीच्या लिपींचे पुरावे याची साक्ष देतात. इसवी सनाच्या प्रारंभीच्या शतकांत हे एक साधे पण महत्वाचे नगर होते. समुद्रकिनाऱ्यालगत ७ ते १० मीटर खोलीवर सापडलेले दगडी नांगर प्राचीन सागरी व्यापाराचे साक्षीदार आहेत. हा किनारा केवळ निसर्गरम्य नव्हता, तर व्यापाराचे प्रवेशद्वार होता. येथे वस्ती आणि पवित्रता एकत्र वाढत गेली.

 

प्राचीन ग्रंथांमध्ये प्रभास क्षेत्राला तीर्थ म्हणून संबोधले आहे. महाभारतामध्ये भगवान कृष्णाच्या देहत्यागाचे स्थळ म्हणून प्रभासाचा उल्लेख आहे. दगडांनी अमरत्वाची भाषा शिकण्यापूर्वीच हा किनारा सांसारिक आणि आध्यात्मिक जगामधील एक पवित्र संगम होता. त्याची प्रारंभीची रूपे साधीलाकूड आणि गवताचीअसली, तरी ती मानवी मनाच्या दैवी शोधाची खूण होती.

 

इ.स. ६४९ च्या सुमारास वल्लभीच्या मैत्रक राजवटीत पहिले ऐतिहासिकदृष्ट्या प्रमाणित मंदिर उभे राहिले. पुढे ९व्या१०व्या शतकात चालुक्य/सोलंकी काळात सोमनाथ हे काशी आणि उज्जैनच्या बरोबरीचे प्रमुख तीर्थस्थान बनले. पुरातत्त्ववेत्ता बी. के. थापर यांना १९५०५१ मधील उत्खननात असलेले गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप यांचा समावेश असलेली भव्य रचना. पूर्वाभिमुख त्रि-अंग संधार प्रासादाचे अवशेष सापडले. लक्षुलीश मूर्तीच्या अवशेषांनी त्याची शैव परंपरा सिद्ध केली. विद्वान मंदिराच्या नेमक्या कालखंडावर मतभेद करतात, परंतु एक गोष्ट निर्विवाद आहेसोमनाथ त्या काळात अत्यंत वैभवशाली झाले होते आणि लवकरच त्याची कठोर परीक्षा होणार होती.

 

ही परीक्षा अनेक लाटांमध्ये आली. इ.स. ७२५ मध्ये उमय्यद सेनापती जुनैद इब्न अब्द अल-रहमान अल-मुरीने हल्ला केला, जो पहिला इस्लामी आक्रमण मानला जातो. परंतु सर्वात मोठा आघात ८ जानेवारी १०२६ रोजी झाला, जेव्हा गझनीचा महमूद आपल्या पंधराव्या मोहिमेत सोमनाथावर चालून आला. शिवलिंग फोडण्यात आले, खजिना लुटण्यात आला. अल बिरुनी यांनी मंदिरातील संपत्तीचे वर्णन केले आहे. सोने, चांदी, मोती, रत्ने आणि गावांच्या महसुलातून जमा झालेली संपदा.

 

तथापि, पुरातत्त्वीय पुरावे दर्शवतात की मंदिराचे भग्नावशेष त्वरित एकत्र करून सुरक्षितपणे पुरले गेले. म्हणजेच, श्रद्धा उद्ध्वस्त झाली नव्हती. इ.स. १०३८ मध्ये गोव्याच्या कदंब राजाने सोमनाथाला भेट दिली, यावरून पूजा-अर्चा किंवा पुनरुज्जीवनाची भावना त्वरित पुन्हा उभी राहिल्याचे दिसते. मंदिराचे रूप तुटले, पण संस्कृतीचे चेतन कायम राहिले.

 

पुढील काळातही विध्वंस आणि पुनर्निर्माण यांचे चक्र सुरूच राहिले. इ.स. ११६९ मध्ये सोलंकी राजा कुमारपालाने पाचवे भव्य दगडी मंदिर उभारले. प्रभास पाटण येथील भद्रकाली मंदिरातील शिलालेखात त्याचा उल्लेख आहे.

 

त्यानंतर १२९९ मध्ये अलाउद्दीन खिलजीचा सेनापती उलुघ खानने मंदिर उद्ध्वस्त केले. स्थानिक रक्षक वाजा मालसुत आणि पदमल यांनी मंदिररक्षण करताना प्राण दिले. पुढे चुडासमा राजा महिपाल देव यांनी १३०८ मध्ये मंदिराचे पुनर्निर्माण केले आणि त्यांचा पुत्र खेङ्गाराने शिवलिंगाची पुनःप्रतिष्ठा केली.

 

यानंतर झफर खानने १३९५ मध्ये मंदिर उद्ध्वस्त करून तेथे जामा मशिद आणि प्रशासकीय ठाणे उभारल्याचे उल्लेख आहेत. पुढे महमूद बेगडा, पोर्तुगीज आक्रमक, आणि नंतर औरंगजेब यांच्या आदेशाने १६६५ आणि १७०६ मध्ये पुन्हा विध्वंस घडवून आणण्यात आला. पुजाऱ्यांची हत्या, मंदिर परिसरातील अपवित्र कृत्ये आणि संपूर्ण रचना पाडण्याचे प्रयत्न झाले; परंतु तीर्थक्षेत्र टिकून राहिले.

 

जरी मंदिर वारंवार उद्ध्वस्त झाले, तरी स्मृती कधीच नष्ट झाली नाही. इ.स. १७८२८३ मध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या वैयक्तिक निधीतून सोमनाथाजवळ नवीन दगडी मंदिर उभारले. हे मंदिर १९व्या आणि २०व्या शतकात सोमनाथच्या श्रद्धेचे केंद्र राहिले.

 

१८४२ मध्ये ब्रिटिश गव्हर्नर-जनरल लॉर्ड एलेनबरो यांनी अफगाणिस्तानातील महमूद गझनीच्या कबरीतून चंदनाचे दरवाजे आणले आणि ते सोमनाथचे मूळ दरवाजे असल्याचा खोटा दावा केला. हा ब्रिटिश सत्तेचा हिंदू समाजाचे समर्थन मिळवण्यासाठी आणि ब्रिटिश राजवटीला वैध ठरवण्यासाठी राजकीय प्रचार होता. हे दरवाजे नंतर आग्रा किल्ल्यात ठेवण्यात आले.

 

१९२२ मध्ये के.एम. मुन्शी यांनी सोमनाथचे भग्नावशेष पाहिले. त्यांनी त्या अनुभवाचे वर्णन भक्ती आणि लज्जा असे केले आणि याच अनुभवातून त्यांच्या मनात मंदिर पुनर्निर्माणाची आजीवन बांधिलकी निर्माण झाली.

 

स्वातंत्र्यानंतर सोमनाथच्या इतिहासाचे अंतिम पर्व सुरू झाले. ऑक्टोबर १९४७ मध्ये जुनागढ भारतात विलीन झाले आणि हिंदूंना मंदिर दुरुस्तीवरील बंदी हटवण्यात आली. १२१३ नोव्हेंबर १९४७ रोजी सरदार पटेल, एन. व्ही. गाडगीळ आणि जामसाहेब यांनी भग्नावशेषांना भेट दिली. तेव्हा पटेलांनी जाहीर केले: या शुभ नववर्षदिनी आम्ही सोमनाथ मंदिर पुनर्निर्माणाचा निर्णय घेतला आहे.

 

जुनागढ प्रशासन आणि जामसाहेबांनी तत्काळ देणग्या दिल्या. सुमारे ५,००० एकर जमीन मंदिर, संस्कृत विद्यापीठ आणि सांस्कृतिक केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आली.

 

यानंतर वाद निर्माण झाला. महात्मा गांधींच्या सल्ल्यानुसार सरकारने थेट निधी न देता लोकवर्गणीतून मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून हे राज्यप्राय धार्मिक प्रकल्प न राहता लोकसहभागातून उभे राहिलेले सांस्कृतिक पुनरुत्थान ठरेल.

 

दरम्यान, तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु यांनी या प्रकल्पाला हिंदू पुनरुत्थानवाद म्हणून विरोध केला. परंतु सार्वजनिक देणग्यांमुळे प्रकल्प थांबवता आला नाही.

 

१५ डिसेंबर १९५० रोजी सरदार पटेल यांचे निधन झाले, तरी काम सुरूच राहिले. अखेर ११ मे १९५१ रोजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सोमपुरा शिल्पकारांनी बांधलेल्या मारू-गुर्जर शैलीतील मंदिरात नवीन ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली. शतकानुशतके कुजबुजत राहिलेली प्रतिज्ञा अखेर दगडात साकार झाली. नेहरू या समारंभाला उपस्थित नव्हते.

 

आज सोमनाथ हे केवळ पर्यटनस्थळ किंवा धार्मिक प्रतीक नाही; ते दगड आणि गाळात लिहिलेले भारतीय संस्कृतीचा इतिहासग्रंथ आहे. त्याची खरी ओळख अखंड वैभवात नसून प्रत्येक विध्वंसानंतर पुन्हा उभे राहण्याच्या मानवी निर्णयात आहे.

 

त्याच्या पायाभूत थरांमध्ये हडप्पाकालीन वसाहती, प्राचीन व्यापारी आणि शांतीच्या शोधात आलेले भक्त सामावलेले आहेत. प्रत्येक पुनर्निर्माणमैत्रक राजे, सोलंकी सम्राट, मराठा राण्या किंवा नवस्वतंत्र भारत यांनाही समाप्ती नाही; आम्ही पुन्हा उभारू हा एक जाणीवपूर्वक केलेला उच्चार होता.

 

सोमनाथ आपल्याला शिकवते की लवचिकता म्हणजे कधीही न पडणे नव्हे, तर पडूनही कायमचे न राहणेपुन्हा पुन्हा उभे राहणे. समुद्रकिनारी उभे असलेले हे मंदिर केवळ भगवान शिवाचे स्मारक नाही; तर त्या अदम्य मानवी आत्म्याचे प्रतीक आहे, जो शतकानुशतके समुद्राच्या काठावर येऊन शांतपणे म्हणत राहतो

 

आम्ही अजूनही येथे आहोत.

आम्ही स्मरण ठेवतो.

आम्ही पुन्हा उभारतो.

आम्ही टिकून राहतो.

एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

 


जालना,दि.13(जिमाका) : राज्यात संभाव्य एल निनो परिस्थितीचा परिणाम लक्षात घेता पाणीटंचाई, कृषी तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक पार पडली. याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय पूर्वतयारी व प्रतिबंधात्मक आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधीत विभाग प्रमुखांची आढावा बैठक पार पडली. यावेळी बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्‍णकांत कनवारिया, महानगर पालिका आयुक्त अंजली शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मनिषा दांडगे यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग यांची उपस्थिती होती.

यावेळी बैठकीत भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सून हंगामात एल निनोचा प्रभाव जाणवण्याची शक्यता व्यक्त केली असून, राज्यातील काही भागांमध्ये पर्जन्यमान कमी होण्याचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव यांनी पूर्वतयारी अधिक प्रभावी करण्याचे निर्देश  जिल्हा प्रशासानाला दिले असल्याचे सांगुन  जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यावेळी म्हणाल्या की, जलसंपदा विभागाला सर्व प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियमित नियोजन करावे. ग्रामीण भागातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन टँकर नियोजन, विहिरींचे पुनर्भरण, जलसंधारणाची कामे आणि गावनिहाय कृती आराखडे तातडीने तयार करावेत. जिल्ह्यातील सर्व के.टी. वेअर, बंधारे आणि जलसाठा संरचनांची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी. तसेच संबंधित विभागांनी नाले, तलाव आणि बंधाऱ्यांमधील गाळ काढणे व खोलीकरणाची कामे त्वरित हाती घ्यावी. गाळ काढण्याच्या मोहिम तात्काळ सुरु करुन, याकरीता सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना आणि दानशूर व्यक्तींचा सहभाग वाढवून लोकसहभागातून जलसंधारणाची व्यापक चळवळ उभारण्याचे काम करावे. संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नियोजन तातडीने करण्यावर भर द्यावा. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पर्यायी पाण्याचे स्रोत उपलब्ध ठेवण्यात यावे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी गावस्तरीय कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण आयोजित करावे. गावनिहाय आणि शेतकरीनिहाय सविस्तर सर्वेक्षण करून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहोचविण्यात यावी. तसेच सर्व पात्र शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी. कृषी कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर अधिक सक्रिय राहून, प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यवाही करावी. गावपातळीपर्यंत हवामान बदल, एल निनो परिस्थिती आणि अनियमित पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन करत, माहिती पोहोचवावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. तसेच शेतकऱ्यांना कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांबाबत मार्गदर्शन करावे. तसेच बियाणे, खत आणि सूक्ष्म सिंचन योजनांचा प्रभावी वापर करून शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून संभाव्य अतिवृष्टी, पूरस्थिती तसेच पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी करुन ठेवावी, असे निर्देशही  जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी यावेळी दिले.

बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांनी 100 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, अन्यथा दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते, असे सांगितले. तसेच हवामान आधारित कृषी सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे. फळबाग क्षेत्रात पाण्याची बचत आणि जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मल्चिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करावे. तसेच संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने पूर्णतः सज्ज राहावे, असे निर्देश दिले.

यावेळी बैठकीस जिल्हा जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, भूजल सर्वेक्षण विभाग, आरोग्य विभाग आदींची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-*-

जालन्यात डिजिटल स्व-गणना मोहिमेला वेग जिल्ह्यातील 5 गावांत 100 टक्के नोंदणी पूर्ण; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 


जालना,दि.13(जिमाका) : भारत सरकारच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या जनगणना 2027 अंतर्गत डिजिटल स्व-गणना (Self Enumeration) मोहिमेला जालना जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक गावांनी शंभर टक्के स्व-गणना पूर्ण करण्याचा मान मिळवला आहे. केंद्र सरकारच्या जनगणना विभागाने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांना घरबसल्या स्व-गणना करण्याची सुविधा मिळाली असून जिल्हा प्रशासन, तहसील कार्यालये आणि ग्रामपंचायत यंत्रणा यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर जनजागृती मोहिमा, विशेष शिबिरे आणि ऑनलाइन सहाय्य केंद्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील अनेक गावांनी अल्पावधीत शंभर टक्के स्व-गणना पूर्ण करत आदर्श निर्माण केला आहे. भोकरदन तालुक्यातील मोहदरी या गावाने विशेष कामगिरी करत गावातील सर्व कुटुंबांची स्व-गणना पूर्ण केली आहे. गावातील एकूण 80 कुटुंबांपैकी सर्वांनी ऑनलाइन नोंदणी केली असून प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच हातडी या गावातील 62 कुटुंबांनीही स्व-गणना पूर्ण केली आहे. या दोन्ही गावांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, तलाठी आणि महसूल कर्मचाऱ्यांनी घरभेटी देत नागरिकांना ऑनलाइन प्रक्रियेबाबत माहिती दिली.

याशिवाय जाफ्राबाद तालुक्यातील डोंगरगाव येथेही स्व-गणना मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. गावातील सर्व कुटुंबांनी ऑनलाइन माध्यमातून माहिती नोंदवून मोहिम यशस्वी केली आहे. बदनापूर तालुक्यातील मंठा येथील 168 घरांपैकी 100 घरांनी स्व-गणना पूर्ण केल्याची माहिती प्रशासनाने दिली. या भागात तहसील कार्यालय, महसूल विभाग आणि जनगणना कर्मचारी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत मोहिमेबाबत जनजागृती केली.

जिल्हा प्रशासनाकडून गावोगावी प्रचार आणि प्रबोधन मोहीम राबवली जात असून नागरिकांना डिजिटल स्व-गणनेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. जनगणना प्रक्रियेमध्ये नागरिकांचा थेट सहभाग वाढविणे, माहिती संकलन अधिक अचूक करणे आणि वेळेची बचत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नागरिकांनी https://se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. ऑनलाइन नोंदणी करताना अडचणी आल्यास टोल फ्री क्रमांक 1855 वर संपर्क साधण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

स्व-गणना मोहिमेस केवळ दोन दिवसाचा कालावधी राहिला असुन, या दोन दिवसात जिल्ह्यातील गावांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबवून शंभर टक्के स्व-गणना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून डिजिटल भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

-*-*-*-*-*-*-

मुरघास संयंत्र वाटप योजना : पशुपालकांना उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

 


जालना,दि.13(जिमाका) :  पशुसंवर्धन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून पशुपालकांना स्वावलंबी व उद्योजक बनविण्याच्या उद्देशाने शासनामार्फत मुरघास संयंत्र वाटप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पशुपालकांना मुरघास हार्वेस्टर व बेलर संयंत्र खरेदीसाठी भरघोस अनुदान देण्यात येणार असून, पात्र पशुपालक तसेच शेतकरी समुहगटांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एकाच वेळी चार ओळी हार्वेस्ट करणारे मुरघास हार्वेस्टर व मुरघास बेलर संयंत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपकरणाची किंमत मर्यादा 26 लाख रुपये निश्चित करण्यात आली असून, सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान (कमाल रु. 13 लाख) तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी 75 टक्के अनुदान (कमाल रु. 19.50 लाख) देण्यात येणार आहे.

*पात्रता निकष*

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे किमान 10 मोठे पशुधन किंवा 100 शेळ्या / मेंढ्या असणे आवश्यक आहे. तसेच स्वतःच्या मालकीचा किमान ५० एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर असणे बंधनकारक आहे. निवड प्रक्रियेत अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक, वनहक्क धारक व महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी 5 टक्के तर महिलांसाठी 30 टक्के आरक्षण लागू राहील.

*आवश्यक कागदपत्रे*

योजनेसाठी अर्ज करताना पशुधन विकास अधिकाऱ्यांचे पशुधन संख्या प्रमाणपत्र, ट्रॅक्टरचे आरसी कार्ड, बँकेचे कर्ज मंजुरी पत्र अथवा स्वनिधी उपलब्ध असल्यास त्यासंबंधी बँक स्टेटमेंट सादर करणे आवश्यक आहे. दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआयडी प्रमाणपत्र तसेच बचत गट सदस्यांनी संबंधित प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.

*महत्त्वाच्या अटी*

निवड झालेल्या लाभार्थ्यांनी जिल्हा उपायुक्त कार्यालयाकडून कळविण्यात आल्यानंतर एका महिन्याच्या आत आवश्यक रकमेचा भरणा करणे आवश्यक राहील. मंजुरीनंतर तीन महिन्यांच्या आत संयंत्र खरेदी करणे बंधनकारक असून, अन्यथा प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल. उपकरणाच्या किंमतीत शासनाने निर्धारित केलेल्या खर्चापेक्षा अधिक खर्च झाल्यास अतिरिक्त रक्कम लाभार्थ्यांना स्वतः भरावी लागेल. अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे.

*शेतकरी समुहगटांचाही समावेश*

वैरण विकास योजना अंतर्गत मुरघास संयंत्र वाटप योजनेव्दारे उद्योजकता विकास करणे या उपक्रमात विविध शेतकरी समुहगटांचाही समावेश करण्यात आला आहे. यात सहकार अधिनियम अथवा धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी समूह, महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत समूह आधारित संसाधन केंद्र तसेच उमेद अंतर्गत नोंदणीकृत प्रभाग संघांचा समावेश आहे.

सदर संस्थांकडे किमान 50 शेतकरी सदस्य असणे, किमान 5 लाख रुपयांचे भागभांडवल असणे, मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण पूर्ण असणे व संस्था नफ्यात असणे आवश्यक आहे. पात्र समुहगटांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार असून, शासनाने नमूद केलेल्या इतर सर्व अटी लागू राहतील.

पशुपालकांना चारा टंचाईवर मात करून स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पात्र पशुपालक व शेतकरी समुहगटांनी जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

-*-*-*-*-