जालना
दि. 22 (जिमाका) :- जिल्ह्यात दि.27 मे 2026 रोजी बकरी ईद (चंद्र दिवस पुढे किंवा माग्र), दि.28
मे 2026 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दि. 31 मे 2026 रोजी पुण्यश्लोक
अहिल्याबाई होळकर जयंती, सण उत्सव साजरे होणार आहेत. तसेच दि. 31 मे 2026 रोजी
एम.पी.एस.सी. चया परीक्षा होणार आहे. सदर सण, उत्सव जयंतीच्या अनुषंगाने जालना
जिल्ह्यात व शहरात मिरवणुका व विविध कार्यक्रम आयोजित होतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर
नागरिक एकत्र येत असतात.
तसेच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण बचाव व धनगर समाज एस. टी. प्रवर्गात
समाविष्ठ करावे या अनुषंगाने जालना जिल्ह्यात विविध प्रकारचे आंदोलन
कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे अनुचित प्रकार घडून कायदा
सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो.
तसेच महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या
सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द गटबाजी व आरोप प्रत्यारोप विविध कारणांवरुन
सुरु आहेत. तसेच शेतकऱ्यांचे विविध मागण्यासाठी विविध संघटनाकडून आत्मदहन,उपोषण,
धरणे मोर्चे, निर्दशने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम
घेण्याची शक्यता नाकारतायेत नाही.
त्यामुळे अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त
अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)
अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही
व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु
जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु
जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार
नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन
दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य
वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे
किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल
किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार
नाही.
तसेच अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त
अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3)
अन्वये पाच
किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.
हा आदेश कामावरील कोणताही अधिकारी किंवा
कर्मचारी यांना लागु होणार नाही. तसेच विवाह, अंत्ययात्रा
आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या
मिरवणुका, सभा, मोर्चा
यांना लागु राहणार नाही.
हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि.23 मे 2026 रोजीच्या 6.00 वाजेपासुन ते दि. 5
जुन 2026 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात
राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.
-*-*-*-*-*-