जालना,दि.2(जिमाका): केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व
हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम 2026
अंतर्गत कचऱ्याचे स्रोतस्थानी वर्गीकरण करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. या
नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दंडात्मक कारवाईचे
अधिकार प्रदान करण्यात आले असून, नागरिक, व्यावसायिक आस्थापना आणि मोठे कचरा
उत्पादक यांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रशासनाने
जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातून निर्माण
होणारा कचरा चार स्वतंत्र प्रकारांत वर्गीकृत करून स्थानिक स्वराज्य संस्थांकडे
द्यावा. यामध्ये ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी कचरा आणि विशेष देखभाल/घातक कचरा
यांचा समावेश आहे. कचरा मिसळून दिल्यास अथवा नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर
दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.
कचऱ्याचे वर्गीकरण का आवश्यक आहे ?
कचऱ्याचे योग्य वर्गीकरण केल्यास
पुनर्वापर, पुनर्निर्मिती आणि वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे सुलभ होते.
यामुळे लँडफिलमध्ये जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी होऊन पर्यावरण संरक्षणास मदत
होते. तसेच शहर आणि ग्रामीण भागातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक परिणामकारक बनते.
मोठ्या कचरा उत्पादकांवर विशेष
जबाबदारी
घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार दररोज
मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या संस्था, कार्यालये, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स,
रुग्णालये, बाजारपेठा, गृहसंकुले आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना Bulk Waste
Generator (BWG) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. अशा संस्थांनी त्यांच्या
परिसरातच ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रक्रिया यंत्रणा उभारणे बंधनकारक
आहे.
नियमांनुसार दररोज 100 किलो किंवा
त्यापेक्षा अधिक कचरा ज्यांचे क्षेत्र 20 हजार स्के.मी आहे अथवा 40,000
लिटरपेक्षा जास्त पाणी वापर करणाऱ्या संस्थांनी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे
आवश्यक आहे. तसेच कचऱ्याचे वर्गीकरण करूनच स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सुपूर्द
करणे अपेक्षित आहे. जे BWG Entity निर्देशांचे
पालन करणार नाहीत त्यांचे पाणी / वीज पुरवठा थांबविण्याचे अधिकार जिल्हाधिकारी
यांना देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील सर्व नागरिक, संस्था आणि
व्यावसायिक आस्थापनांनी घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 तसेच न्यायालयीन निर्देशांचे
पालन करून स्वच्छ, निरोगी आणि प्रदूषणमुक्त परिसर निर्माण करण्यासाठी सहकार्य
करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.
कचऱ्याचे चार प्रकार आहेत
ओला कचरा : स्वयंपाकघरातील
अवशेष (भाज्यांचे देठ, पाने, साल), शिळे अन्न, फळांच्या साली व बिया, गवत, बागेतील
कचरा, फुले व पाने, चहा व कॉफीचा चोथा, पशुखाद्य अवशेष
सुका कचरा : प्लास्टिक
(बाटल्या, पिशव्या, खेळणी), कागद (वर्तमानपत्र, पुस्तके, पुठ्ठा), धातू
(अॅल्युमिनियम, स्टील, लोखंड), काच
(बाटल्या, तावदाने), लाकडी वस्तू (फर्निचर, बांबू), कापड व चामडे, जुने कपडे, शूज
व इतर वस्तू
सॅनिटरी कचरा : सॅनिटरी
पॅड, डायपर, फेस मास्क, बँडेज, सॅनिटरी वापरातील वस्तू , संसर्गजन्य पदार्थांचे
अवशेष,
विशेष देखभाल / घातक कचरा : बॅटऱ्या
(मोबाईल, रिचार्जेबल), ट्यूबलाईट व बल्ब, पेंट, थिनर व रासायनिक पदार्थ, कीटकनाशके
व त्यांचे अवशेष, ई-कचरा (जुने फोन, संगणक भाग), सॅनिटायझर व इतर धोकादायक पदार्थ
घनकचरा व्यवस्थापन नियमांची
अंमलबजावणी अधिक कडक होणार असून, प्रत्येक नागरिकाने घरातूनच कचऱ्याचे वर्गीकरण
करण्याची सवय लावणे काळाची गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
****


.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)