Friday, 6 February 2026

अमृतच्या उ‌द्योगविषयक प्रशिक्षणाचे आयोजन; 9 फेब्रुवारीपासून होणार जालना येथे सुरुवात

 


 

जालना, दि. 6 (जिमाका) :- जिल्ह्यातील युवक-युवती व उ‌द्योजकांसाठी स्वयंरोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाची नवी संधी उपलब्ध करून देणारे उ‌द्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण, लघु उ‌द्योग प्रशिक्षण सोमवार दि.9  फेब्रुवारी 2026 पासून जालना येथे सुरू होत आहे. तरी जालना जिल्ह्यातील नवीन उ‌द्योग सुरु करू इच्छिणाऱ्या युवक-युवती व उ‌द्योजकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने हा प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणात नवीन व्यवसाय सुरू करणे तसेच चालू व्यवसायाचा विस्तार यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींवर मार्गदर्शन केले जाणार आहे. उद्योग उभारणीच्या मूलभूत संकल्पना, योग्य व्यवसाय निवड, उत्पादन प्रक्रिया, खर्च नियंत्रण, नफा व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, ब्रेडिंग व ट्रेडमार्क नोंदणी यासह शासकीय योजनांचा उ‌द्योगासाठी प्रभावी वापर कसा करावा, याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

डिजीटल युगाची गरज लक्षात घेऊन प्रशिक्षणार्थीना 'अमृत पेठ' या ई-कॉमर्स विक्री माध्यमाची ओळख करून देण्यात येणार असून, त्याद्वारे जालना जिल्ह्यातील लघु उ‌द्योगांची उत्पादने संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्याची संधी मिळणार आहे. यामुळे स्थानिक उ‌द्योगांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होऊन रोजगार निर्मितीस चालना मिळेल. अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना घेता येणार असून, वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेले जालना जिल्ह्यातील पात्र नागरिक या प्रशिक्षणासाठी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी  महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे- 7391065474, जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी - 9421944752 यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                          दि. 6 फेब्रुवारी  2026

 

जिल्हा कारागृहात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न  

 

जालना, दि. 6 (जिमाका) :- जालना जिल्हा कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह बंदीची गुरुवार दि.5 फेब्रुवारी 2026 रोजी शिबिरात आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबीराचे आयोजन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र पाटील,डॉ.प्रदीप कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एकुण 75 जणांची आरोग्य तपासणी करुन औषधी  वाटप करण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर, कारागृह अधिक्षक प्रविण विभांडीत, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रज्ञा कुलकर्णी,  डॉ. ओम ढाकणे यांच्यासह कारागृहातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. असे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                          दि. 6 फेब्रुवारी  2026

 

18 फेब्रुवारी रोजी पेंशन अदालत

जालना दि. 6 (जिमाका) :- छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयातील आस्थापना उपायुक्त यांनी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निकाली काढण्याबाबत निर्देश दिले आहेत.  त्यानूसार पेंशन अदालत दि.18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जालना जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे.

आपली प्रकरणे पेंशन अदालतीमध्ये ठेवण्यासाठी सेवानिवृत्तांनी प्रलंबित प्रश्न, अर्ज, पोस्टाने, ई-मेल किंवा हस्तपोच जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागात दि.12 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करावेत. तरी पेंशन अदालतीसाठी सेवानिवृत्तांनी, कुटुंबनिवृत्ती वेतन धारकांनी प्रकरणाच्या माहितीसह उपस्थित रहावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

 

Thursday, 5 February 2026

जालना जिल्ह्यातील नागरिकांसाठी RBI कडून बँकिंग तक्रार निवारणाची सुविधा

 


जालना, दि.६(जिमाका): अलीकडील काळात जालना जिल्ह्यात बँकिंग व्यवहारांशी संबंधित तक्रारी, गैरसमज आणि काही अप्रिय घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना बँकिंग तक्रार निवारण व्यवस्थेबाबत स्पष्ट व अधिकृत माहिती मिळावी यासाठी जिल्हा अग्रणी बँकेकडून प्रसिद्धी करण्यात आली आहे.

बँकिंग व्यवहारांबाबत कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी प्रथम संबंधित बँकेच्या अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणेकडे (Internal Grievance Redressal Mechanism) तक्रार दाखल करावी. प्रत्येक बँकेच्या शाखा परिसरात तसेच RBI बँकिंग ओम्बुड्समनबाबत तपशील ठळकपणे प्रदर्शित केलेले असतात.

तक्रार दाखल केल्यानंतर ३० दिवसांत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास नागरिकांना थेट भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) एकात्मिक बँकिंग ओम्बुड्समन योजनेअंतर्गत तक्रार नोंदवता येते. यासाठी जिल्हा प्रशासन किंवा इतर शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.

RBI बँकिंग ओम्बुड्समन योजनेअंतर्गत एटीएम व्यवहार, खात्यातील चुकीची कपात, कर्ज व व्याजदर, चेक, डिजिटल फसवणूक, सेवा शुल्क, पेन्शन व विमा इत्यादी तक्रारींचे निवारण केले जाते. तसेच संबंधित यंत्रणेला दंडात्मक कारवाई करण्याचा आणि तक्रारदार ग्राहकांना नुकसानभरपाई देण्याचा अधिकार आहे.

नागरिक खालील माध्यमांतून तक्रार दाखल करू शकतात:

* RBI Complaint Management System (CMS) पोर्टल: https://cms.rbi.org.in,

* ई-मेल: crpc@rbi.org.in

RBI कडील तक्रार निवारण सेवा पूर्णतः मोफत, ऑनलाइन आणि पारदर्शक असून, तक्रारींचा पाठपुरावा देखील ऑनलाइन पद्धतीने करता येतो. नागरिकांनी अफवा, गैरसमज किंवा आंदोलनाचा मार्ग न अवलंबता उपलब्ध अधिकृत तक्रार निवारण यंत्रणांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार यांनी केले आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा 2026 कॉपीमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्याबाबत कडक निर्बंध •

   “शिक्षण ही राष्ट्रनिर्मितीची पायाभूत शक्ती असून, परीक्षा प्रक्रियेतील प्रामाणिकपणा हा त्याचा आत्मा आहे. कॉपीमुक्त परीक्षा हीच गुणवत्तेची खरी ओळख आहे.”



जालना, दि.5 (जिमाका): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी  ची परीक्षा एकुण 102 परीक्षा उपकेंद्रावर व इयत्ता 12 वीची परीक्षा एकुण 79 परीक्षा उपकेंद्रावर दि. 10 फेब्रुवारी, 2026 ते 18 मार्च, 2026 या कालावधीत जालना जिल्ह्यात पार पडणार आहेत. या परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त, पारदर्शक व शांततेच्या वातावरणात पार पडाव्यात, यासाठी शासन व प्रशासनामार्फत कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

त्याअनुषंगाने, परीक्षा कालावधीत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163लागू करण्यात आले असून, परीक्षा केंद्रांच्या परिसरात जमावबंदी, अनधिकृत प्रवेश, गैरवर्तन तसेच शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही प्रकारास सक्त मनाई करण्यात आली आहे.

परीक्षा प्रक्रियेत कोणताही परीक्षार्थी, पालक, बाह्य व्यक्ती, खाजगी एजंट किंवा केंद्राशी संबंधित कर्मचारी जर कॉपी, नकल, मोबाईल फोनचा वापर, बनावट ओळखपत्र, प्रश्नपत्रिका फोडणे किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारात सहभागी आढळून आल्यास, त्यांच्यावर गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तींविरोधात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 126 तसेच महाराष्ट्र सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) अधिनियम, 1982 चे कलम 7 अन्वये थेट गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आलेले आहेत.

परीक्षा काळात जालना जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर अत्याधुनिक सी.सी.टी.व्ही. कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून, परिक्षा केंद्रातील प्रत्येक हॉल मध्ये सी.सी.टी.व्ही   बसविण्यात आलेले आहे. प्रत्ये्क परीक्षा केंद्र परीसरामध्ये   ड्रोनद्वारे टेहाळणी देखील करण्यात येणार आहे. प्रशासनामार्फत सर्व परीक्षा उपकेंद्रावर बैठे पथक व भरारी पथक नेमण्यात आलेले आहे. तसेच  पोलीस यंत्रणा, शिक्षण विभाग यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, डिजिटल पाळत, अचानक तपासणी व तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. 

विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवा, आमिष किंवा दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, तसेच पालक व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा  दक्षता समीती अध्यक्ष आशिमा मित्तल यांनी केले आहे.



Tuesday, 3 February 2026

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न

 



 

जालना, दि.3 (जिमाका): राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षेत संपन्न झाली.

बैठकीत जिल्हाधिकारी मित्तल म्हणाल्या की,  तंबाखूमुक्त तसेच आरोग्यसंपन्न समाजासाठी तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्यासोबतच विविध स्वंयसेवी संस्था, शाळा यांनी सक्रिय सहभाग घेवून प्रभावी जनजागृती करावी. शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती व्हावी यासाठी जनजागृती करावी. तसेच तंबाखुमुक्त शाळा अभियान यशस्वीरीत्या पुर्ण करण्यासाठी तंबाखुमुक्त शैक्षणिक संस्था या मार्गदर्शक सुचनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शहरी आणि ग्रामिण भागात अवैधरित्या तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी, असे सांगितले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

बैठकीस अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त निखिल कुलकर्णी, शिक्षणाधिकारी प्राथमिक संगिता भागवत, उपशिक्षणाधिकारी संजय कायंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गजानन म्हस्के, महानगरपालीकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अतुल राजे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सल्लागार डॉ. संदिप गोरे, सायकॉलॉजीस्ट सोनाजी भुतेकर, सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा कोरडे व ग्रामीण विकास संस्थेचे विभागिय व्यवस्थापक मंगेश गायकवाड इ. सदस्य उपस्थित होते.  

-*-*-*-*-*-*-

प्रशिक्षण संस्थाना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


 

जालना, दि.3 (जिमाका): जिल्हास्तरीय सर्वसाधारण योजना अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2025-26 मध्ये प्रशिक्षण राबविण्यासाठी इच्छुक व पात्र प्रशिक्षण संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. नॅशनलत स्कील डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (NSDC) यांचेकडील Skill India Digital Hub या पोर्टलवर सूचीबद्ध (Listed) असलेल्या प्रशिक्षण संस्था या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्यास पात्र राहणार आहेत.

प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक विहित नमुन्यातील परिशिष्टे तसेच मान्यता प्राप्त अभ्यासक्रमांची यादी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पात्र व इच्छुक प्रशिक्षण संस्थांनी अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना या कार्यालयास प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्रं. ०२४८२-२९९०३३ वर कार्यालयीन वेळेत संपर्क करून विहित नमुन्यात परिपूर्ण व आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव दि. 16 फेब्रुवारी, 20265पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.  

-*-*-*-*-*-*-

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाच्या ऑफलाईन अर्जातील त्रुटी पुर्तता करण्यासाठी शेवटची संधी

 


जालना, दि.3 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते. या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार देय असलेली रक्कम विद्यार्थ्याच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये जमा केली जाते. या योजनेसाठी संबधित लाभार्थ्याना त्रुटी पुर्तता करण्याबाबतचे पत्र संबधीत लाभार्थ्यांच्या मुळ पत्यावर पाठविण्यात आलेले आहे. तसेच यापूर्वी वेळोवेळी अंतीम संधी त्रुटीपुर्तता करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.

सन 2022-23 ते 2023-24 या आर्थीक वर्षातील विद्यार्थ्याना अंतीम संधी म्हणून दि. 10 फेब्रूवारी, 2026 पर्यतच्या मुदतीत आपल्या अर्जातील त्रुटी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जालना डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सादर कराव्यात.

संबधित कालावधीतील लाभार्थी यांनी विहित मुदतीत त्रुटी पुर्तता सादर न केल्यास सदरील अर्ज नस्तीबदध् करण्यात येतील. व त्यानंतर सन 2022-23 ते 2023-24  या कालावधीतील कोणत्याही विद्यार्थ्याना त्रुटी पुर्ततेची संधी दिली जाणार नाही. तसेच कोणताही विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचीत राहिल्यास त्यास समाज कल्याण, जालना कार्यालय जबाबदार राहणार नाही.

त्याअनुषगांने सन 2022-23 ते 2023-24 वर्षामध्ये अर्ज सादर केलेल्या (फ्रेश व नुतनीकरण) ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यत त्रुटीची पुर्तता केलेली नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांच्या संचीका नस्तीबध्दं करण्यात येतील यांची सर्व लाभार्थ्यानी नोंद घ्यावी. असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, जालना राजु एडके यांनी केले आहे.   

-*-*-*-*-*-*-

 

बालकामगारांना कामावर ठेवू नये–जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 


 

जालना, दि.3 (जिमाका): जिल्ह्यात कोणत्याही आस्थापनांनी बालकामगारांना कामावर ठेवू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहत दि. 30 रोजी संपन्न झालेल्या बालकामगार व वेठबिगार कृती दलाची बैठकीमध्ये जिल्हाधिकारी मित्तल बोलत होत्या. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त यु.स. पडियाल यांच्यासह विविध विभागातील अधिकारी यांची उपस्थिती होती.

            जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालकामगार व वेठबिगार बाबत जन जागृती करण्याचे निर्देश दिले. तसेच 14 वर्षाच्या आतील बालकास कामावर ठेवणे व 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन कामगारास कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा असूनख् त्याबाबत 20 ते 50 हजार रु. दंड व 6 महिने ते 2 वर्ष शिक्षेची तरतुद आहे. बालकामगार कामावर ठेवल्याने बालकामगाराचे शारिरीक व मानसिक नुकसान होते. बालकामगारास अत्यंत वेदना होतात व शिक्षणाच्या वयात काम करावे लागल्याने त्यांचे संपूर्ण भविष्य उध्वस्त होते. त्यामुळे जालना जिल्ह्यात कोणत्याही आस्थापनेने, कारखान्याने अथवा हॉटेल, गॅरेज इ. चालकांनी बालकामगारांना कामावर ठेवू नये. कोणत्याही आस्थापनेवर बालकामगार काम करताना आढळून आल्यास त्या संबंधीत आस्थापना मालकाविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही बालकामगारांना कामावर ठेवू नये. व बालकामगारांचे भविष्य वाचवावे असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.   

 

-*-*-*-*-*-*-