Saturday, 1 August 2026

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



 

 

     जालना दि. 1 (जिमाका) :-लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे  यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात  मनपा उपआयुक्त, नंदा गायकवाड यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.             

          यावेळी, सहा. आयुकत मनपा सुप्रिया चव्हाण, नायब तहसिलदार  सतिश तायडे, सहायक महसूल  अधिकारी दिपाली राऊत,  राहुल मुंढे, एन.बी. सोळुंके, पी.ए. मुळे, डी.एल. पवार, बी. एच. भिसे, श्री. चव्हाण, सुनिल काळुंके आदी  कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-*-

Friday, 31 July 2026

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

 




 

जालना,दि.31 (जिमाका) : ग्राहकांच्या समस्यांची सोडवून ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा मिळाव्यात, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि ग्राहक संरक्षण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. यावेळी बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी (अ.का.) शशिकांत हदगल, वैधमापनशास्त्र उपनियंत्रक, आर.डी.दराडे, जि.अ.कृ.अ. संजय कायंदे, पोलीस उपअधिक्षक सचिन इंगोले, महावितरणचे अभियंता धनाजी जाधव, अन्न व औषध  प्रशासन सहा.आयुक्त जी.द.जाधव, अनुजा नगरारे, अश्वीनी तांबे, आरोग्य विभागाचे  डॉ.नारायण पवार, मोटार वाहन निरिक्षक कल्पेश सुर्यवंशी यांची उपस्थिती होते.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ म्हणाले की, ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा मिळाव्यात, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि ग्राहक संरक्षण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे. तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, तसेच ग्राहकांच्या तक्रारी त्वरित सोडविण्याचे आहे. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमार्फत नागरिकांना दैनंदिन व्यवहारात येणाऱ्या अडचणीबाबत उपाय योजना करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ग्राहकांना काही अडचणी असल्यास त्याबाबत जालना जिल्ह्याचे संकेतस्थळ jalna.nic.in यावर ग्राहकांच्या तक्रारीसाठी पोर्टल उपलब्ध करुन दिलेले असून, नागरिकांनी त्यांच्या समस्या या पोर्टलच्या माध्यमातून सादर करावे.

बैठकीत यावेळी अशासकीय सदस्यांनी बैठकीमध्ये विविध विषयाच्या ग्राहकांशी निगडीत तक्रारी मांडल्या, यामध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आयुष्मान कार्डचे वितरण व लाभ नियमानुसार वितरीत करावे. तसेच अनधिकृत वैद्यकीय व्यावसाय (बोगस डॉक्टर) करणाऱ्यावर कारवाई करावी. तसेच अन्न औषध प्रशासनाने भेसळयुक्त खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी. शहरातील विविध भागात अनाधिकृत केबल किंवा इंटरनेटच्या केबलमुळे नागरिकांना त्रास होत असुन, ही केबल काढण्यात यावेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षाचालक मनमानी भाडे आकारत आहे, त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच शालेय बस व व्हॅनची तपासणी करावी. महावितरणने नागरिकांची परवानगी घेवूनच स्मार्ट मिटर बसवावे. बैठकीत सिटी सर्व्हे कार्यालयाच्या कामकाजाबाबत गंभीर तक्रार मांडण्यात आली. काही प्रकरणांमध्ये संबंधित बँकेला कोणतीही पूर्वसूचना अथवा माहिती न देता मालमत्तेवरील बँकेचा बोजा कमी किंवा वगळला जात असल्याचे मुद्दे उपस्थित केले.

आजच्या बैठकीत अशासकीय सदस्यांनी मांडलेल्या तक्रारींची दखल घेवून, याबाबत योग्य कार्यवाही करुन, अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी यावेळी दिल्या.

यावेळी बैठकीत विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये आरोग्य विभागाच्यावतीने मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून (Cervical Cancer) संरक्षण देणारी सुरक्षित व प्रभावी लस उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. पालकांनी पात्र मुलींचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले. तसेच वैध मापन शास्त्र विभागाच्या वतीने महाराष्ट्रात परवाना नूतनीकरण, वजन-माप उपकरणांची पडताळणी व मुद्रांकन यासह विविध सेवा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. अन्न व औषध प्रशासन विभागाने ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने दूधापासून तयार केलेले पनीर आणि ॲनालॉग पनीर यातील फरक स्पष्ट केला. हॉटेल व रेस्टॉरंट चालकांनी ग्राहकांना कोणत्या प्रकारचे पनीर दिले जात आहे, याची माहिती मेनूमध्ये स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तसेच औषधांची एक्सपायरी डेट, निकृष्ट दर्जाची औषधे किंवा कफ सिरपसारख्या उत्पादनांबाबत ऑनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी विभागाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली. प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सारथी पोर्टल, वाहन पोर्टल व ई-चलान प्रणालीद्वारे विविध ऑनलाइन सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. महावितरण विभागाने स्मार्ट व प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प, तसेच शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजनेची माहिती दिली. कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी विकसित केलेल्या महाविस्तार मोबाईल ॲप विषयी माहिती दिली. या ॲपद्वारे हवामान, कृषी सल्ला, बाजारभाव व विविध कृषी योजनांची माहिती उपलब्ध होत असल्याचे सांगितले. तसेच महाडीबीटी पोर्टलद्वारे कृषी विभागाच्या विविध अनुदानित योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करता येत असल्याची माहिती देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना (PMFME) अंतर्गत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन दिले जात असुन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीच्या सुरुवातीस जिल्हा पुरवठा कार्यालयाचे श्री. डोईफोडे यांनी प्रास्ताविकात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे उद्दीष्ट सांगुन मागील बैठकीबाबत झालेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच jalna.nic.in या संकेतस्थळावर ग्राहकांच्या समस्यांसाठी पोर्टल उपलब्ध आहे. ग्राहकांच्या हिताशी संबंधित तक्रारी असल्यास त्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन केले.

-*-*-*-*-*-

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह दौरा कार्यक्रम

 


       

        जालना,दि.31(जिमाका) : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असुन, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे.

            केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह हे दि. 01 ऑगस्ट, 2026 रोजी दूपारी 4.15 वाजता महिको प्रा.लि. सीड रिसर्च कंपनी, जालना येथे आगमन. तर सायं. 5.15 वाजता महिको प्रा. लि. बीज संशोधन केंद्र भेट देतील. सायं. 5.45 वाजता कापूस प्रक्षेत्रास भेट देतील. सोयीने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-*-

व्यसनमुक्त भारतासाठी युवकांचा जागर; डि.जे.पी. कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ स्पर्धा उत्साहात संपन्न

 






जालना,दि.31(जिमाका) : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत मेरा युवा भारत, जालना  डॉ. वेदप्रकाश पाटील आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जिल्हास्तरीय नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ स्पर्धेचे आयोजन डि.जे.पी. कॅम्पस, रेवगाव रोड, जालना येथे उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा युवा अधिकारी मयुरकुमार गोरमे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

स्पर्धेत चित्रकला, घोषवाक्य लेखन, भाषण, लोकनृत्य, लोकगीत, रिल निर्मिती, पथनाट्य आणि मौखिक कविता अशा आठ विविध स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी नशामुक्त भारताचा संदेश प्रभावीपणे सादर करत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व धन्वंतरी प्रार्थनेने झाली.

कार्यक्रमाचे उद्घाटन सहायक जिल्हाधिकारी डॉ. रंगमंजु यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून सहायक आयुक्त (कौशल्य विभाग) गणेश चिमणकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. वेदप्रकाश पाटील आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मिनल ठोसर होत्या.

भागवत शिंदे प्रशासकीय अधिकारी डी.जे.पी, डॉ. विठ्ठल कुचके प्राचार्य ओजस कॉलेज फार्मसी, डॉ.कृष्ण कुमार सिंग प्राचार्य ओजस कॉलेज फिजीयोथेरीपी, डॉ.के.जे.रमीता प्राचार्य ओजस कॉलेज ऑफ नर्सींग, डॉ.संगीता गायकवाड बी.एड. कॉलेज डी.जे.पी, विनीत म्हणुन मयुरकुमार गोरमे जिल्हा युवा अधिकारी माय भारत, डॉ.मुकुंद बंडले उप.प्रा डॉ.वे.पा.आ.वै.महा. व पुरुषोत्तम राखुंडे प्रा. ओजस कॉलेज फार्मसी उपस्थिती होते.

प्रास्ताविकात डॉ. मिनल ठोसर यांनी नशामुक्त भारत अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले. सहायक जिल्हाधिकारी डॉ. रंगमंजु यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगत व्यसनमुक्त जीवनाचा संदेश दिला. तसेच गणेश चिमणकर यांनी सर्व उपस्थितांना नशामुक्तीची शपथ दिली.

स्पर्धांचे परीक्षण डॉ.बी.जी.श्रीरामे, डॉ.शिवानंद मुंढे, डॉ.मोनिश शिंदे, श्रीमती कांचन वाघ, व्ही.आर.ठोंबरे, डॉ.अभिषेक शुक्ला, डॉ. रेणुका भावसार बडवणे, डॉ.सुजाता देवरे, श्री शशिकांत वडले, मिलींद सावंत, डॉ. दिपक बुक्तरे, डॉ. अस्मिता शिंदे, डॉ.निशिकांत लोखंडे, विनोद जैतमहल, डॉ. अभिजीत जोशी, सतिष लिंगडे, लक्ष्मीकांत पोलास, डॉ. निधी शर्मा, परमेश्वर क्षिरसागर, गणेश नागवे, डॉ. गंगाधर धांडगे, बिस्मील्ला सय्यद, प्रशंसा घोरपडे यांनी केले.

स्पर्धेतील विजेत्यांमध्ये मौखिक कविता स्पर्धेत नम्रता पवार, प्रांजल तस व ऋतुजा गरजे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. लोकनृत्य स्पर्धेत वैष्णवी ढाकीणकर व टीम प्रथम, तनुजा पवार व टीम द्वितीय तर सारिका नागरे व टीम तृतीय ठरली. भाषण स्पर्धेत साक्षी सुरेश डांगे, श्वेता नवनाथ देशमुख व भूमिका आढाव यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. 

घोषवाक्य स्पर्धेत साक्षी राजेंद्र ठाकूर, स्नेहा श्याम खरात व नेहा संजय जोगदंड, रिल स्पर्धेत शिवराज टेकाळे, जयदीप शिंदे व प्रगती बोरुडे, लोकगीत स्पर्धेत पियुष पाटील व टीम, साईनाथ पवार व अर्जुन उबाळे, चित्रकला स्पर्धेत अनुश्री कदम, स्वराली लाडे व कल्याणी पाटील, तर पथनाट्य स्पर्धेत पल्लवी व टीम, श्रावणी व टीम आणि कैफ खान यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.

स्पर्धेतील विजेत्यांना अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत साळी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे संजय सोनवणे यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.

कार्यक्रमाचा समारोप जिल्हा युवा अधिकारी मयुरकुमार गोरमे यांनी केला. सूत्रसंचालन धरतीधन ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सावंत आणि सहारा सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष बी. एस. सय्यद यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जयपाल राठोड तसेच महाविद्यालयाचे अजित लाटे, अंकित कड, फैजान शेख, अफान हाश्मी, महेश देशमुख, प्रणव खेडकर व महाविद्यालयातील कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

-*-*-*-*-*-

थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त राज्यभर कार्यक्रम 'पराक्रम दिना' निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन !

 


 

जालना,दि.31 (जिमाका) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 18 ऑगस्ट हा दिवस राज्यभरात 'पराक्रम दिन' म्हणून साजरा करण्यात येत आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा व राष्ट्रनिष्ठेचा परिचय नवीन पिढीला व्हावा, या उद्देशाने राज्यभरात 1 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

पराक्रम दिन साजरा करण्यासंदर्भात अमृत संस्थेमार्फत 'पराक्रम दिन समिती' स्थापन करण्यात आलेली असून त्या समितीमध्ये काकासाहेब विधाते, पांडुरंग बलकवडे, जगन्नाथ लडकत, मोहन शेटे, मंगेश खाडिलकर, सौ. कौमुदी परांजपे या दिग्गज इतिहास तज्ञ आणि अभ्यासक यांचा समावेश आहे.या पराक्रम दिन निमित्ताने शाळा, महाविद्यालये व खुल्या गटातील नागरिकांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जात असून जास्तीत जास्त नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

स्पर्धेचे स्वरूप, विषय, बक्षीसे आणि अधिकृत नियमावली 'पराक्रम दिन'च्या अधिकृत संकेतस्थळावर  सहभाग कसा नोंदवाल? (https://parakramdin.mahaamrut.org.in/#) उपलब्ध करून देण्यात आली आहे. संदर्भ पुस्तके आणि ई बुक : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी संबंधित शेकडो पुस्तके उपलब्ध आहेत. तथापि या स्पर्धांसाठी निवडण्यात आलेल्या विषयांसाठी निवडक संदर्भ पुस्तके "पराक्रम दिन समिती' निश्चित केलेली आहेत. त्यांची यादी वरील संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे थोरले बाजीराव पेशवे यांचा जीवन प्रवास अतिशय सोपा आणि संक्षिप्त पद्धतीने ई बुक स्वरूपात या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि या ई बुक च्या आधारावरच प्रश्नावली देखील तयार करण्यात आलेले आहेत. सर्व शाळा व महाविद्यालयांनी तसेच सर्व इच्छुकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण योजनेअंतर्गत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

  

जालना, दि. 31(जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना कार्यालयामार्फत "तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण योजना" अंतर्गत जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

तृतीयपंथीयांची कार्यशाळा दि. 3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे आयोजित करण्यात आली आहे.

कार्यशाळेमध्ये तृतीयपंथीय व्यक्तींचे हक्क, शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, सामाजिक सुरक्षा, ओळखपत्रे, कायदेशीर संरक्षण तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच उपस्थित तृतीयपंथीयांच्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्यावर आवश्यक मार्गदर्शन व उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीय व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते  यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

Thursday, 30 July 2026

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान : तेलबिया काढणी पश्चात पायाभूत सुविधा (तेल काढणी युनिट) व गोदाम या घटकासाठी प्राप्त अर्जाची सोडत

 


 

            जालना,दि.30(जिमाका) : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया (सन 2026-27) अंतर्गत जालना जिल्ह्यासाठी फ्लेक्सी घटकातून गोदाम (250 मेट्रिक टन) बांधकाम तसेच काढणी पश्चात पायाभूत सुविधा (तेल काढणी युनिट) या घटकांसाठी लाभार्थी निवडीची सोडत दि. 4 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या दालनात काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया अंतर्गत जालना जिल्ह्यासाठी फ्लेक्सी घटकातून 250 मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामाच्या बांधकामासाठी एक भौतिक लक्ष्य प्राप्त झाले असून, या घटकासाठी प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 14.40 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. तसेच काढणी पश्चात पायाभूत सुविधा (तेल काढणी युनिट) या घटकासाठीही एक भौतिक लक्ष्य मंजूर असून, त्यासाठी प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल 9.90 लाख रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध आहे.

या दोन्ही घटकांसाठी इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत अर्ज स्वीकारण्यात आले असून, ते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राप्त अर्जांमधून लाभार्थ्यांची निवड पारदर्शक पद्धतीने सोडत काढून करण्यात येणार आहे.

सोडत प्रक्रियेदरम्यान संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच अर्जदार शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, संपूर्ण प्रक्रिया त्यांच्या समक्ष पार पाडण्यात येईल. त्यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे यांनी केले आहे.

 

-*-*-*-*-*-