Tuesday, 8 September 2026

मनोज जरांगे पाटील यांच्यावर मध्यरात्री सलाईनद्वारे उपचार; प्रकृती स्थिर जिल्हा प्रशासनाची माहिती

 


 

जालना, दि. 8 (जिमाका) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मागील दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची सोमवारी मध्यरात्री जालना येथील जिल्हा रुग्णालयाच्या पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी केली व सलाईन लावून उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

 

 सोमवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालयाच्या विशेष पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी केली. उपोषणामुळे श्री. जरांगे पाटील यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण आणि रक्तदाब कमी झाल्याचे तसेच त्यांचे वजन घटल्याचे तपासणीत आढळून आले.

श्री. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड तसेच जिल्हा प्रशासनाच्या विशेष पथकाने त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून श्री. जरांगे पाटील यांना सलाईन घेण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करत श्री. जरांगे पाटील यांनी सलाईनद्वारे उपचार घेण्यास संमती दिली. त्यानंतर त्यांना मध्यरात्री चार व आज दिवसभरात दोन सलाईन लावण्यात आल्या, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

 

-*-*-*-*-*-*-

 

युजीसी नेट परीक्षा काळात प्रतिबंधात्मक आदेश लागू


जालना दि. 8 (जिमाका) :-   NTA UGC NET  जुन 2026 परीक्षा दि. 9 सप्टेंबर 2026 रोजी जिल्ह्यातील इंस्टीट्युट ऑफ फार्मसी पाथ्रीकर कॅम्पस बदनापुर या परीक्षा उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे.

 वरील परीक्षा उपकेंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण होऊन परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असलयाने उपरोक्त नमुद परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक  कार्यवाही म्हणुन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागु करण्यात येत आहे. 


अपर जिल्हादंडाधिकारी जालना याद्वारे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकान्वये  Institute of Pharmacy Pathrikar Campus, Badnapur या परीक्षा उपकेंद्राचे 200 मीटर परिसरात परीक्षेचे दिवशी आदेशात नमुद कालावधीकरीता सर्व सार्वजनिक टेलिफोन/एसटीडी बुथ फॅक्स/झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके बंद ठेवणेकरीता याद्वारे प्रतिबंधात्मक आदेश लागु करीत आहे. सदर आदेशाच्या अंमलबजावणीसाठी नोटीस देण्यास पुरेसा कालावधी नसल्याने व परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे दृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार सदर आदेश एकतर्फी काढण्यात येत आहे. सदर आदेशाची प्रसिध्दी पोलीस अधिक्षक, जालना यांनी ध्वनिक्षेपकाद्वारे करावी.

हा आदेश दिनांक 9 सप्टेंबर 2026 रोजीचे सकाळी 7.00 वाजेपासून सायंकाळी 7.00 वा. पर्यंत अंमलात राहील.

*अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी*


जालना दि. 8 (जिमाका) :- जिल्ह्यात दि. 10 सप्टेंबर 2026 रोजी पोळा सण, दि.14 सप्टेंबर 2026 ते दि. 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत श्री गणेशोत्सव तसेच दि. 17 सप्टेंबर 2026 रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन इत्यादी सण- उत्सव साजरे होणार आहेत. सदर सण, उत्सव अनुषंगाने जालना जिल्ह्यात व शहरात मिरवणुका व विविध कार्यक्रम आयोजित होतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येत असतात.

तसेच सद्यिस्थितीत जालना जिल्ह्यामध्ये विविध समाजांच्या आरक्षणाच्या मागण्यांच्या तसेच आरक्षण बचावाच्या अनुषंगाने तसेच शेतकऱ्यांचे विविध मागण्यासाठी उपोषणे, आंदोलने, धरणे इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम सुरु आहेत. मागण्यांच्या अनुषंगाने भविष्यातही विविध स्वरुपाची आंदोलने, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी कार्यक्रम आयोजित होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही.

त्यामुळे अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.


तसेच अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.


हा आदेश कामावरील कोणताही ‍ अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही. तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.

हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि. 20 सप्टेंबर 2026 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-

कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसाठी जालना जिल्ह्यात विशेष शिबिरे

 

- १० ते १६ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यातील सर्व ६२ महसूल मंडळांत आयोजन 

- १८ हजार २९५ अर्जांपैकी १८ हजार २७६ अर्ज मंजूर

 

जालना, दि. ८ (जिमाका) : जिल्ह्यातील नागरिकांना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र सुलभ, पारदर्शक आणि जलदगतीने मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत दि. १० ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ६२ महसूल मंडळांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

जिल्ह्यात आढळून आलेल्या कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी नोंदी तसेच नोंदींच्या याद्या आतापर्यंत ४८ ग्रामपंचायत कार्यालयांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये नोंदी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांना त्यांच्या नोंदी सहजपणे पाहता येणार असून, प्रमाणपत्रासाठी आवश्यक पुराव्यांची पूर्वकल्पना मिळण्यास मदत होणार आहे.

६२ महसूल मंडळामध्ये विशेष शिबिराचे आयोजन

नागरिकांना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याच्य अनुषगांने कार्यवाही गतिमान करण्यासाठी १० ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मंडळस्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष शिबिरांमध्ये जुन्या महसूल नोंदी व पुरावे शोधणे, नागरिकांकडून प्राप्त अर्ज व कागदपत्रांची तातडीने पडताळणी करणे आणि पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करणे, ही प्रमुख उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील ६२ महसूल मंडळामध्ये हे शिबिर होणार आहेत.

 

या प्रक्रियेत नागरिकांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करून कामकाज गतिमान व पारदर्शक करण्यासाठी उपजिल्हाधिकारी (निवडणूक शाखा) शिरीष यादव यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नोडल अधिकारी दररोज तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी समन्वय साधून प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा करणार आहेत.

 

जिल्ह्यात ५ हजार २७ नोंदी

जालना जिल्ह्यात आढळून आलेल्या कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा अशा एकूण ५ हजार २७ नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात जात प्रमाणपत्रासाठी एकूण १८ हजार २९५ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी १८ हजार २७६ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. कागदपत्रांतील त्रुटींमुळे १९ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. दि. ८ सप्टेंबर २०२६ अखेर संबंधित कार्यालयांकडे प्रमाणपत्रासाठी एकही अर्ज प्रलंबित नाही. हैदराबाद गॅझेटवर आधारित अर्जांवरही शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. दि. २ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार प्राप्त झालेल्या ४२१ अर्जांपैकी ३७७ अर्ज मंजूर करण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाने नमूद केले आहे.

 

जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या महसूल मंडळातील विशेष शिबिरास आवश्यक कागदपत्रे व पुराव्यांसह उपस्थित राहून अर्ज नोंदणी करावी आणि या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

००००

Monday, 7 September 2026

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



 

जालना,दि.7(जिमाका): आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईकजयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.             

          यावेळी,  नायब तहसिलदार तुषार निकम, सहायक महसूल अधिकारी दिपाली राऊत,  रविंद्र हेलगट, संतोष पगार, शिल्पा मगरे, रिना नगरकर, कुंता पठाडे, स्वाती राठोड, आदिती कुलकर्णी, सविता भोकरे, सुनिल काळुंके आदी  कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

जालना जिल्ह्यात ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत अभियान’

 प्रलंबित महसूल प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याचे निर्देश

 

जालना,दि.7(जिमाका): महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी जालना जिल्ह्यात ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येणार आहे. हे अभियान दि. 1 सप्टेंबर 2026 ते दि. 31 मार्च 2027 या कालावधीत राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच मंडळ अधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयातील प्रलंबित महसूल प्रकरणांचा आढावा घेऊन त्यांचा निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अभियानांतर्गत मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी स्तरावर विशेष लोक अदालत घेण्यात येणार आहेत. पहिल्या फेरीत मंडळ अधिकारी स्तरावर दि. 2 सप्टेंबर, 2026 रोजी तर तहसीलदार स्तरावर दि. 9 सप्टेंबर 2026, उपविभागीय अधिकारी स्तरावर दि. 16 सप्टेंबर 2026, अपर जिल्हाधिकारी स्तरावर दि. 23 सप्टेंबर आणि जिल्हाधिकारी स्तरावर दि. 30 सप्टेंबर 2026 रोजी लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. दुसऱ्या फेरीत अनुक्रमे दि. 2, 9, 16, 23 आणि दि. 30 डिसेंबर, 2026 रोजी या लोक अदालतांचे आयोजन करण्यात येणार आहे. महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे वेळेत निकाली काढून नागरिकांना अनावश्यक विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहे.

 

****

3 ऑक्टोबरला अभिजात मराठी भाषा दिवस

 3 ते 9 ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह

 

जालना,दि.7(जिमाका): मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिचे संशोधन, संवर्धन आणि व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी  9 ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा दिवस’, तर दि. 3 ते दि. 9 ऑक्टोबर या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे.

याबाबत मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी शासन परिपत्रकद्वारे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने जालना जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय तसेच अन्य संस्थांनी अभिजात मराठी भाषा दिवस व सप्ताह उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

या उपक्रमांतर्गत सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील राज्यातील कार्यालये, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, खाजगी उद्योग व आस्थापना, व्यापारी बँका तसेच शैक्षणिक संस्था, विद्यापीठे व महाविद्यालये यांचा सहभाग अपेक्षित आहे.

अभिजात मराठी भाषेच्या प्राचीन साहित्याचा अभ्यास, संशोधन, संवर्धन आणि प्रसाराला चालना देतानाच मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेबाबत समाजात व्यापक जनजागृती निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. विविध संस्था व आस्थापनांनी सप्ताहाच्या कालावधीत अभिजात मराठी भाषेशी संबंधित विविध उपक्रमांचे आयोजन करून जास्तीत जास्त लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

****