Tuesday, 25 August 2026

‘खेलो इंडिया संवाद – युवा कनेक्ट’ कार्यक्रमाचे जालना येथे आयोज

 

जालना,दि.25(जिमाका) :  आगामी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर मेरा युवा भारत (MY Bharat), जालना यांच्या सहकार्याने जे.ई.एस. महाविद्यालय व अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या वतीने ‘खेलो इंडिया संवाद – युवा कनेक्ट’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. यानिमित्त युवकांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढविणे, क्रीडा विकासाला चालना देणे आणि राष्ट्रनिर्माणात युवकांची भूमिका अधिक बळकट करणे, या उद्देशाने देशभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

‘युवा कनेक्ट’ उपक्रमाच्या माध्यमातून युवक, खेळाडू, युवा नेते, स्वयंसेवक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना एका व्यासपीठावर आणून भारतातील क्रीडा क्षेत्राचा विकास, युवकांच्या आकांक्षा आणि भविष्यातील संधी यावर संवाद साधण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभासी संवाद. देशभरातील विविध ठिकाणांहून लाखो युवक या उपक्रमाशी जोडले जाणार असून, जालना जिल्ह्यातील युवकांनाही या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

कार्यक्रमाच्या अनुषंगाने युवक, MY Bharat स्वयंसेवक, NSS स्वयंसेवक आणि स्थानिक खेळाडू यांच्यात विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास, क्रीडा क्षेत्रातील उपलब्ध संधी, ग्रामीण व तळागाळातील खेळाडूंना प्रोत्साहन तसेच भारतात विकसित होत असलेल्या क्रीडा परिसंस्थेबाबत विचारमंथन करण्यात येणार आहे.

यावेळी आयोजित ‘युवा संवाद’ मध्ये युवकांना भारतीय क्रीडा क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात आपल्या कल्पना, सूचना व आकांक्षा मांडण्याची संधी मिळणार आहे. क्रीडा परिसंस्थेचे बळकटीकरण, २०३६ ऑलिम्पिकसाठी क्रीडा प्रतिभेचे संवर्धन, युवा नेतृत्व व प्रशासनातील सहभाग आणि विकसित भारतासाठी युवा सक्षमीकरण या विषयांवर विशेष चर्चा होणार आहे.

युवकांच्या सूचना व कल्पना QR कोडच्या माध्यमातून संकलित करण्यात येणार असून, उपस्थित युवकांना VBYLD Quizमध्ये सहभागी होण्यासाठीही प्रोत्साहित केले जाणार आहे. मेरा युवा भारत (MY Bharat), जालना, जे.ई.एस. महाविद्यालय आणि अंकुशराव टोपे महाविद्यालय यांच्या वतीने जिल्ह्यातील युवकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, भारतीय क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आपल्या कल्पना व सूचना मांडाव्यात आणि ‘विकसित भारत’ घडविण्याच्या राष्ट्रनिर्माण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

****

 

*राष्ट्रीय लोकअदालतीतून प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन*

 

*12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन* 

 

जालना,दि.25(जिमाका) :  जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये येत्या 12 सप्टेंबर 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. धनादेश अनादर, अपघात भरपाई, कौटुंबिक व दिवाणी वाद सामोपचाराने मिटविण्याची सुवर्णसंधी पक्षकारांना उपलब्ध होणार असून, अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये ही लोकअदालत आयोजित केली जाणार आहे.

लोकअदालतीमध्ये धनादेश अनादर प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई दावे, कौटुंबिक व वैवाहिक वाद, दिवाणी दावे (जमीन, मालमत्ता, वाटप, भाडेकरू वाद आदी), तडजोडपात्र फौजदारी गुन्हे तसेच बँकिंग, वीज वितरण कंपन्या आणि फायनान्स कंपन्यांशी संबंधित दाखलपूर्व (Pre-Litigation) प्रकरणे तडजोडीसाठी ठेवता येणार आहेत. तसेच कामगार, औद्योगिक, सहकार न्यायालय व ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रलंबित प्रकरणांचाही समावेश करण्यात आला आहे.

लोकअदालतीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे कोर्ट फी परतावा. लोकअदालतीत तडजोडीने वाद मिटल्यास पक्षकारांनी भरलेली न्यायालयीन फी नियमानुसार परत मिळते. तसेच लोकअदालतीच्या निवाड्याविरुद्ध अपीलची आवश्यकता नसल्याने प्रकरणाचा कायमस्वरूपी निपटारा होतो. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचण्यासोबतच परस्पर सलोखा व नातेसंबंध टिकून राहण्यास मदत होते.

ज्या पक्षकारांची प्रलंबित किंवा दाखलपूर्व प्रकरणे सामोपचाराने मिटवायची आहेत, त्यांनी आपल्या संबंधित वकिलामार्फत प्रकरण लोकअदालतीत दाखल करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

****

अमरावती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासन सतर्क; महिला, नवजात बालके व अतिसंवेदनशील रुग्णांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

*जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे तातडीने फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट करावे – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल*

 


जालना,दि.25(जिमाका) : अमरावती येथील रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांच्या अग्निसुरक्षा आणि विद्युत सुरक्षेचा तातडीने आढावा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील महिला व बाल रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच इतर सर्व शासकीय आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यासंदर्भात जिल्हाधिकारी मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली आज संबंधित विभागांची ऑनलाईन आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, जालना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन विभाग, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग तसेच संबंधित आरोग्य व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

रुग्णालयांच्या सुरक्षा ऑडिटदरम्यान आढळणाऱ्या त्रुटींची केवळ नोंद करून न थांबता त्यावर तातडीने सुधारात्मक कार्यवाही करण्यात यावी. संबंधित यंत्रणांनी केलेल्या कार्यवाहीचे अनुपालन सुनिश्चित करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

विशेषतः महिला व बाल रुग्णालयातील SNCU, NICU, प्रसूती कक्ष, बालरुग्ण विभाग, ICU, ऑपरेशन थिएटर आणि ऑक्सिजन सुविधा असलेल्या विभागांची प्राधान्याने तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची व्यवस्था सक्षम आहे की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यावर भर देण्यात आला आहे.

फायर ऑडिटमध्ये फायर एक्स्टिंग्विशर, फायर अलार्म, स्मोक डिटेक्टर, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग तसेच रुग्णालयातील अग्निसुरक्षेच्या अन्य उपाययोजनांची कार्यक्षमता तपासण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्युत वायरिंग, विद्युत पॅनेल, अर्थिंग, जनरेटर आणि इतर विद्युत उपकरणांची कार्यस्थितीही प्रत्यक्ष तपासण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले.

रुग्णालयांमध्ये आग किंवा अन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कोणत्या पद्धतीने रुग्णांचे स्थलांतर करायचे, यासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेने स्पष्ट Hospital Fire & Emergency Response Plan तयार ठेवावा. या योजनेत नवजात बालके, गर्भवती व प्रसूती झालेल्या महिला, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, ICU मधील रुग्ण तसेच हालचाल करण्यास असमर्थ रुग्णांच्या सुरक्षित आणि जलद स्थलांतरासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करावी, असेही सांगण्यात आले.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अग्निसुरक्षा प्रशिक्षणासोबत प्रत्यक्ष मॉकड्रिल घेण्याचे निर्देश ही यावेळी देण्यात आले आहेत. डॉक्टर, परिचारिका, तांत्रिक कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि अन्य रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना आग लागल्यानंतर करावयाच्या प्रथम प्रतिसादाची माहिती देण्यात यावी.

अग्निशमन उपकरणांचा योग्य वापर, फायर अलार्म यंत्रणा, आपत्कालीन संपर्क व्यवस्था आणि रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर याबाबत कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात यावे. आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही प्रकारची गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी नियमित सराव करण्यावरही भर देण्यात आला.

“रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेषतः महिला, नवजात बालके, लहान मुले, दिव्यांग व्यक्ती आणि अतिदक्षता विभागातील रुग्ण आपत्कालीन परिस्थितीत अधिक असुरक्षित असतात. त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. अग्निसुरक्षा आणि विद्युत सुरक्षेबाबत कोणत्याही स्तरावरील निष्काळजीपणा स्वीकारला जाणार नाही. संभाव्य धोका आधीच ओळखून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात,” असे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.

फायर ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट, ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटींची पूर्तता, मॉकड्रिल आणि कर्मचारी प्रशिक्षण या सर्व बाबींवर आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचा विद्युत विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयाने तातडीने कार्यवाही करावी. या सर्व कार्यवाहीचा अनुपालन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी दिले.

 

****

सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी मोफत मोटर व्यावसायिक ड्रायव्हर प्रशिक्षण

 

*जालना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उपक्रम; रस्ता सुरक्षेसह रोजगाराच्या संधींना चालना देण्याचा प्रयत्न*

 

जालना,दि.25(जिमाका) : महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारी कमी करण्याबरोबरच रस्ता सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी युवकांना मोटर व्यावसायिक ड्रायव्हर प्रशिक्षण देण्याचा उपक्रम जालना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे. केंद्र शासन, महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (CIRT), पुणे आणि इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च (IDTR), पुणे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे.

या उपक्रमांतर्गत पात्र युवक-युवतींना हलके मोटार वाहन (LMV) तसेच जड मोटार वाहन (HMV) चालविण्याचे शास्त्रोक्त, तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. प्रशिक्षणामुळे युवकांना वाहनचालक क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये आत्मसात करता येणार असून, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर परिवहन क्षेत्रातील विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना केवळ वाहन चालविण्याचे प्रशिक्षण न देता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रस्ता सुरक्षा, वाहतूक नियम, वाहनांची तांत्रिक माहिती आणि सुरक्षित वाहनचालक म्हणून आवश्यक असलेल्या विविध बाबींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणामध्ये VR Simulator, हायवे ड्रायव्हिंग तंत्र, ट्रॅफिक साईनबोर्डची माहिती व प्रत्यक्ष प्रात्यक्षिके यांचा समावेश असणार आहे.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाच्या कालावधीत निवासाची तसेच भोजनाची मोफत व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान दररोजचा अल्पाहार व जेवणाची सुविधा देण्यात येणार असून, निवासी प्रशिक्षणामुळे युवकांना प्रशिक्षणावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येणार आहे. तसेच प्रशिक्षणार्थींची आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार चष्म्याचे वाटपही केले जाणार आहे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने प्रथमोपचार व आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक कौशल्ये, वाहनांची देखभाल, सुरक्षित ड्रायव्हिंग आणि वाहतूक नियमांचे पालन याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.

LMV आणि HMV प्रशिक्षण

उपलब्ध माहितीनुसार, LMV प्रशिक्षणाचा कालावधी सुमारे ३० दिवस, तर HMV प्रशिक्षणाचा कालावधी साधारण ३० ते 45 दिवस आहे. HMV प्रशिक्षणासाठी ‘SARATHI Project’ आणि LMV प्रशिक्षणासाठी ‘PARWAZ Project’ अंतर्गत प्रशिक्षणाची आखणी करण्यात आली आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर युवकांना व्यावसायिक वाहनचालक म्हणून रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होणार आहे.

या प्रशिक्षणामुळे युवकांना वाहनचालक क्षेत्रातील आवश्यक व्यावसायिक कौशल्ये प्राप्त होतील. परिणामी परिवहन क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासोबतच बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

या प्रशिक्षण उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), जालना येथे संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनिष दौंड यांनी केले आहे. प्रशिक्षण इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च (IDTR), फुरसुंगी, पुणे येथे होणार आहे. उपक्रमाचे समन्वयक म्हणून केंद्र शासन, महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, CIRT पुणे व IDTR पुणे यांच्या प्रतिनिधींचा सहभाग आहे. अधिक माहितीसाठी idtrpune@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल. जालना येथील आर.टी.ओ. कार्यालयाच्या माध्यमातूनही इच्छुक युवकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी idtrpune@gmail.com ई-मेलनी  ITDR पुणे येथे संपर्क साधावा,

****

Monday, 24 August 2026

*मागासवर्गीयांच्या आर्थिक विकासासाठी विविध कर्ज योजना; पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन*

 

 

जालना,दि.24(जिमाका) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत मागासवर्गीय समाजाच्या आर्थिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य प्रशिक्षण विकास योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना, बीजभांडवल योजना तसेच थेट कर्ज योजना आदी विविध योजना राबविण्यात येतात.

जालना जिल्ह्यात संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ, संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ, स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी) आर्थिक विकास महामंडळ, सोळा कुळस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ, श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समस्त शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ, संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ, लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ, सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ आणि आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत.

या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसह www.msobcfdc.org या वेब पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे. अधिका माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना दूरध्वनी क्र. 02482-223420 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ  मर्या. जालना यांनी केले आहे.

 

****

Friday, 21 August 2026

जालना जिल्ह्यात परदेश अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड

 


जालना,दि.21(जिमाका) :  राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी मिळणार असून, या अभ्यास दौऱ्यासाठी पात्र अर्जदारांची सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते.

कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सन २०२६-२७ या वर्षात ‘राज्य पुरस्कृत योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया, बाजार व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, कृषी यांत्रिकीकरण तसेच विविध कृषी विषयक तांत्रिक बाबींचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जालना जिल्ह्यासाठी या योजनेंतर्गत एकूण 5 शेतकऱ्यांची लक्षांकित निवड करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांकडून 14 ऑगस्ट, 2026 रोजी पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची मार्गदर्शक सूचनांनुसार छाननी करण्यात आली असून, जालना जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या निर्धारित लक्षांकापेक्षा अधिक असल्याने पात्र लाभार्थ्यांची निवड सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे.

ही सोडत 31 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जालना येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येणार असून संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच अर्जदार शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील संबंधित पात्र अर्जदार शेतकऱ्यांनी सदर सोडतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. गहीनीनाथ कापसे यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी

 


            जालना दि. 21 (जिमाका) :-   जिल्ह्यात दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी ईद-ए- मिलाद, दि. 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षा बंधन, दि. 4 सप्टेंबर 2026 रोजी श्रीकृष्ण जयंती, तसेच दि. 5 सप्टेंबर 2026 रोजी गोपाळकाला (दहिहंडी) इत्यादी सण – उत्सव साजरे होणार आहेत. या सण, उत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात व शहरात मिरवणुका व विविध कार्यक्रम आयोजित होतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येत असतात.

 तसेच  सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये विविध समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांच्या तसेच आरक्षण बचावच्या दृष्टीने तसेच शेतक-यांचे विविध मागणीसाठी उपोषणे आंदोलने,मोर्चे, धरणे इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम सुरु आहेत. या मागण्यांच्या दृष्टीने  भविष्यातही विविध स्वरुपाची आंदोलने, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी कार्यक्‌रम आयोजित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची

शक्यता नाकारता येत नाही. 

         त्यामुळे अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही  आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.

            तसेच  अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये  पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.   

हा आदेश कामावरील कोणताही ‍ अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही.  तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.

       हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि.23.8.2026 रोजीच्या 6.00 वाजेपासुन ते  दि. 6.9.2026 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

                                                                    -*-*-*-*-*-