Friday, 11 September 2026

पुढील दोन वर्षांत जालना जिल्ह्यातील पाचशे जिल्हा परिषद शाळांचा दर्जेदार विकास करा - आढावा बैठकीत पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे निर्देश

 

'नवीन वर्षात नवी शाळा’ या संकल्पनेसह राज्याने जालन्याचा आदर्श घ्यावा असे काम करा

 


मुंबई, दि. ११ जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासह आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून करून देण्यासाठी सर्वसमावेश आराखडा तयार करावा. पुढील दोन वर्षांत जिल्ह्यातील पाचशे शाळांचा दर्जेदार विकास करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज दिले. नवीन वर्षात नवी शाळा’

 या संकल्पनेसह राज्याने आदर्श घ्यावा असे काम करा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

 

   पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत जालना जिल्हा परिषद शाळांच्या विकासकामांचा पुन्हा एकदा आढावा घेतला. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,  जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरिष बनसोडे, मनपा आयुक्त अंजली शर्मा यांच्यासह विविध अधिकारी दृरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. यापूर्वीही १ सप्टेंबर रोजीच्या बैठकीत पंकजाताई मुंडे यांनी जिल्हा परिषद शाळांचा आढावा घेऊन सूचना केल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शाळांचा सर्वेकरून अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. आज त्यावर चर्चा करून त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

 

शाळांचा निधी जागरूकतेने खर्च करा

---------

शाळा आणि अंगणवाड्यांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध होणारा निधी नियोजनबद्ध, काटेकोर आणि परिणामकारक पद्धतीने खर्च करावा. शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याबरोबरच विकासकामांचा दर्जाही उत्तम राखावा. जिल्ह्यातील शाळांचा विकास करताना आदर्श शाळेची संकल्पना डोळ्यासमोर ठेवावी. शाळांची आकर्षक रंगरंगोटी, उत्तम परिसर, आवश्यक पायाभूत सुविधा आणि दर्जेदार कामांवर भर द्यावा. जालना जिल्ह्यात विकसित होणाऱ्या या आदर्श शाळांचे अनुकरण राज्यातील तसेच इतर राज्यांतील शाळांनी करावे, अशा गुणवत्तेचे काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

नवीन वर्षात नवी शाळा

----------

 ‘नवीन वर्षात नवी शाळा’ ही संकल्पना घेऊन संबंधित यंत्रणांनी अभियान स्वरूपात काम करावे. शाळांच्या विकासकामांबाबत पुढील आढावा बैठक आपण स्वतः जालना येथे घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण योजनांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचाही आढावा घेतला. या योजनांसाठी उपलब्ध निधी निर्धारित वेळेत खर्च करावा. मंजूर कामांना कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही, याची दक्षता घेऊन ती गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 

****

जालना जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रशासनाची कारवाई

 गौण खनिज, दारू विक्री, वाहतूक नियमभंगाविरोधात कारवाई; वाळूसाठा अवैध दारु व मुद्देमाल जप्त

 

जालना,दि.11(जिमाका): जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह अवैध वाळू उत्खनन व वाहतूक, बेकायदेशीर दारू विक्री तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने संयुक्तपणे धडक मोहीम राबविली. या मोहिमेत गौण खनिज विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई केली.

जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात कारवाई करण्यात आली. परतूर तालुक्यातील रोहिणा बु. येथे कारवाई करून अवैध 12 ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मंठा तालुक्यातील इंचा परिसरात कारवाई करून सुमारे 40 ते 50 ब्रास अवैध वाळूसाठा जप्त करण्यात आला.

अवैध दारू विक्री व साठवणुकीविरोधात जिल्ह्यात एकूण 10 ठिकाणी छापे टाकण्यात आले. अंबड-शहागड रोड, जालना शहरातील विविध परिसर, खरपुडी तसेच भोकरदन परिसरातील हॉटेल्स, पत्री शेड व घरांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत अवैध देशी दारू, 15 लिटर हातभट्टी दारू आणि 200 लिटर रसायन जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची अंदाजित किंमत 41 हजार 880 रुपये आहे. या प्रकरणांत 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांविरुद्ध प्रादेशिक परिवहन विभागाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 128 वाहनांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 32 वाहनांवर कारवाई करण्यात आली. ओव्हरलोड वाहतूक, विनापरवाना वाहन चालविणे, पीयुसी नसणे, रिफ्लेक्टर, सीटबेल्ट तसेच एचएसआरपी नंबर प्लेट नसणे आदी नियमभंग आढळून आले. या कारवाईत जागेवर वसूल केलेला दंड रु. 1, 78, 000 तर बजावलेले ई-चलान (प्रलंबित दंड) रु. 48, 000 असून, एकूण दंडाची रक्कम रु. 2, 26, 000इतकी आहे.

तसेच जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागामार्फत प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या असुन, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. कलम 126 अंतर्गत 1 कारवाई तर  कलम 129 अंतर्गत 1 कारवाई करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

 

****

जालना जिल्हा जनगणना हस्तपुस्तिकेचे काम पूर्ण


जालना,दि.11(जिमाका): जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील जिल्हा जनगणना हस्तपुस्तिका (District Census Handbook–D.C.H.B.) तयार करण्याचे काम पूर्ण झाल्याचे जिल्हा निवडणुक जनगणना अधिकारी यांनी कळविले आहे.

जनगणना 2027 अंतर्गत दि. 16 ऑगस्ट 2026 ते दि. 14 सप्टेंबर 2026 या कालावधीत जिल्ह्यात जिल्हा जनगणना हस्तपुस्तिका संकलनाचे काम करण्यात आले. या हस्तपुस्तिकेत जिल्ह्यातील प्रत्येक गाव व शहरासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश करण्यात येतो. जनगणना हस्तपुस्तिका हे जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक व भौगोलिक परिस्थितीचे अधिकृत दस्तऐवजीकरण करणारे महत्त्वाचे साधन मानले जाते.

हस्तपुस्तिकेमध्ये जिल्ह्यातील लोकसंख्या, भौगोलिक व सामाजिक वैशिष्ट्ये, शैक्षणिक सुविधा, वैद्यकीय सुविधा, रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, वीजपुरवठा तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित अद्ययावत माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन, विविध शासकीय योजना राबविणे तसेच प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी या माहितीचा उपयोग होणार आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रधान जनगणना अधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात आले. भारताच्या जनगणना कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात हे काम नियोजित पद्धतीने पूर्ण करण्यात आले असून, त्यासाठी जिल्ह्यातील एकूण 872 क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कामात सहकार्य केले. यात ग्राम विकास अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी 10 सप्टेंबर, 2026 पर्यंत मोबाईल ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील 964 गावांची तसेच 03 नगरपालिका आणि 05 नगरपंचायत क्षेत्रातील माहिती संकलीत करण्याचे 100 टक्के काम पूर्ण केले. जनगणना हस्तपुस्तिकेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक गाव व शहरातील माहिती संकलित करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात काम केले. या माहितीच्या आधारे जिल्हा जनगणना हस्तपुस्तिकेचे काम पूर्ण करण्यात आले.


****


*जालना जिल्ह्यातील 25 हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्तीसाठी तिसरी यादी जाहीर*


*जिल्ह्यातील 862 गावांतील पात्र शेतकऱ्यांचा समावेश*


जालना,दि.11(जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत जालना जिल्ह्यातील थकबाकीदार पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी शुक्रवार (दि. ११) प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत जिल्ह्यातील 862 गावातील 25 हजार 847 पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे.

अनियमित पर्जन्य, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट आणि हवामान बदलामुळे शेती व्यवसायासमोर निर्माण झालेल्या अडचणी, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी ही योजना जाहीर केली आहे.

योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह प्रतिशेतकरी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा यामध्ये समावेश आहे. तसेच 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आणि 31 मार्च 2026 पर्यंत न फेडलेल्या पात्र कर्जांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे.

ज्या शेतकऱ्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांनी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असलेली अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर कर्जमुक्तीचा लाभ घेता येणार आहे. यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

गावपातळीवर यादी उपलब्ध

तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांची नावे संबंधित गावातील गावचावडी, ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सहकारी संस्था तसेच संबंधित बँक शाखेत प्रसिद्ध करण्यात येत आहेत. यादीतील शेतकऱ्यांनी आपला विशिष्ट क्रमांक, आधारकार्ड आणि बँकेचे पासबुक घेऊन नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन लवकरात-लवरकत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आधार प्रमाणीकरणासाठी आपले सरकार सेवा केंद्र चालकास कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही. प्रमाणीकरणावेळी आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा कर्जाची रक्कम चुकीची आढळल्यास त्याबाबत ऑनलाइन तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यासाठी सेवा केंद्र चालकास सांगावे.

तसेच, आधार प्रमाणीकरण करताना बोटांचे ठसे उमटत नसल्यास त्याबाबतची ऑनलाइन तक्रार तहसीलदारांकडे करण्याची सूचना करण्यात आली आहे.

मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी बँकेशी संपर्क साधावा

यादीतील शेतकरी मयत असल्यास त्यांच्या वारसांनी संबंधित बँक शाखेशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि कर्जखात्यावर वारसाचे नाव नोंदवून घ्यावे. आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी संबंधित शेतकऱ्यांना याबाबत माहिती द्यावी आणि कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना श्री. विष्णू रोडगे यांनी केले आहे.


****


कुणबी जात प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरात जालना जिल्ह्यात आतापर्यंत १२६ अर्ज प्राप्त



जालना, दि. ११ (जिमाका) : कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी जिल्ह्यात मंडळस्तरावर १२ शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये आतापर्यंत एकूण १२६ अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे.


तालुकानिहाय प्राप्त अर्जांमध्ये जालना तालुक्यातील दोन शिबिरांत १३, बदनापूरमधील एका शिबिरात १०, अंबडमधील एका शिबिरात २, घनसावंगीतील दोन शिबिरांत २०, भोकरदनमधील तीन शिबिरांत ५३, जाफराबादमधील एका शिबिरात १६, परतूरमधील एका शिबिरात ६ आणि मंठा तालुक्यातील एका शिबिरात ६ अर्जांचा समावेश आहे.

प्राप्त १२६ अर्जांपैकी समितीअंतर्गत ७८, तर गॅझेटअंतर्गत ४८ अर्ज आहेत. काही प्रस्तावांची ऑनलाइन प्रक्रिया बाकी असून, उर्वरित प्रकरणांवर तालुकास्तरीय वंशावळ समितीच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर तातडीने पुढील कार्यवाही करून अर्ज निकाली काढण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी कळविले आहे.

*उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड समितीची बैठक संपन्न*


जालना,दि.11(जिमाका): राज्य महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026’ साठी जालना जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या जिल्हास्तरीय निवड समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे 10 सप्टेंबर 2026 रोजी उपजिल्हाधिकारी (महसूल) मनिषा देशपांडे, जालना यांच्या अध्यक्षेत पार पडली.

या बैठकीत शासनाने दि. 17 ऑगस्ट 2026 रोजी दिलेल्या निर्देशांनुसार आगामी गणेशोत्सवासाठी जिल्ह्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मंडळांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची मंडळे निवडण्याची प्रक्रिया राबविण्याबाबत समितीमध्ये चर्चा झाली.

यावेळी बैठकीस नगरपालिका प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त तथा सदस्य सचिव शिवाजी गवळी, जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकणी, जिपच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश अग्निहोत्री, गजानन पडूळ, संपदा कुलकर्णी आदीची उपस्थिती होती.

समितीने गणेशोत्सव मंडळांच्या सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक उपक्रमांचा विचार करून शासनाने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे परीक्षण करण्याबाबत चर्चा केली.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, सामाजिक बांधिलकी, महिला व युवकांचा सहभाग तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांचा प्रभावी माध्यम म्हणून साजरा व्हावा, यासाठी शासनाकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या मंडळांची जिल्हास्तरावर निवड करून त्यांची शिफारस करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. जिल्हास्तरीय निवड समितीने संबंधित मंडळांच्या कामकाजाचे शासनाच्या निकषांनुसार मूल्यमापन करून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची मंडळे निश्चित करावीत व त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.


****


जालन्यात रंगणार दोन दिवसीय ‘लोकसंगीत महोत्सव’

 

 15 व 16सप्टेंबर रोजी जे.ई.एस. महाविद्यालयात लोकसंगीताची सुरेल मेजवानी; विविध लोककलावंतांचे सादरीकरण






 

जालना,दि.11(जिमाका): महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंगीत परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने जालना येथे दोन दिवसीय ‘लोकसंगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. 15 सप्टेंबर आणि बुधवार, दि. 16  सप्टेंबर 2026 रोजी सायं. 5.30 वाजता जे.ई.एस. महाविद्यालय, जालना येथे हा महोत्सव होणार आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, मंगळवार, दि. 15 सप्टेंबर रोजी विनल देशमुख, रमानंद उगळे, अश्विनी मिठे आणि शाहीरा माधवी माळी यांच्या लोकसंगीत व लोककलाविष्कारांचे सादरीकरण होणार आहे. तर बुधवार, दि. 16 सप्टेंबर रोजी श्रावणी महाजन, कुणाल वरळे, सानिका शिर्के आणि चेतन लोखंडे हे कलाकार आपल्या सादरीकरणातून रसिकांना लोकसंगीताची सुरेल अनुभूती देणार आहेत.

 

महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि लोकजीवनाशी घट्ट नाते असलेल्या लोकसंगीतामध्ये विविध भागांतील परंपरा, बोलीभाषा, जीवनशैली, सामाजिक वास्तव आणि सांस्कृतिक मूल्यांचे प्रतिबिंब उमटते. या समृद्ध लोकपरंपरेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच नव्या पिढीला महाराष्ट्राच्या लोकसंगीताची ओळख व्हावी, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध लोककला, लोकसंगीत, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 

या महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून जालना व परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन दिवसीय ‘लोकसंगीत महोत्सवा’चा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडकर यांनी केले आहे.

 

****