Thursday, 27 August 2026

मराठा-कुणबी प्रमाणपत्रांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाइन कक्ष

 

जालना,दि.27(जिमाका) :  मराठा समाजातील नागरिकांना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र हेल्पलाइन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शासनाच्या निर्देशानुसार हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे स्थापन करण्यात आलेल्या हेल्पलाइन कक्षाच्या माध्यमातून मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया, कागदपत्रे व पुराव्यांबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

हेल्पलाइन कक्षासाठी नव्याने नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार (गृह) परमेश्वर शिंदे, तसेच महसूल सहाय्यक संदिप इंगळे यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे..

नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळविताना आवश्यक असलेल्या पुराव्यांची माहिती उपलब्ध करून देणे, अर्जाची प्रक्रिया समजावून सांगणे, उपलब्ध अभिलेखांमधून आवश्यक नोंदी शोधण्यास मदत करणे तसेच अर्जदारांच्या अडचणींचे योग्य प्रकारे निराकरण हेल्पलाइन कक्षामार्फत करण्यात येणार आहे. यामध्ये विशेषतः उपलब्ध अभिलेखांमध्ये कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा किंवा कुणबी जातीच्या नोंदी आढळल्यास त्याबाबत आवश्यक मार्गदर्शन नागरिकांना केले जाणार आहे. तसेच संबंधित नोंदी व पुराव्यांच्या आधारे पात्र नागरिकांना प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत सहकार्य व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत हेल्पलाइन कक्षात उपस्थित राहून, नागरिकांकडून कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करणे, उपलब्ध अभिलेखांची नोंद घेणे, आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे तसेच सेवे संबंधी बाबींमध्ये आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य करणार आहेत. तसेच हेल्पलाईनवर प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या शंका व अडचणींचे योग्य प्रकारे निराकरण करून, आवश्यकतेनुसार संबंधित विभाग/अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कार्यवाही करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. याकरीता जिल्ह्यातील नागरिकांनी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे व पुरावे घेऊन हेल्पलाइन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र संदर्भात माहिती, मार्गदर्शन अथवा अडचणींसाठी हेल्पलाइन क्रमांक ०२४८२-२२३१३२ वर संपर्क साधवा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी केले आहे.

 

****

 

 

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत जिल्ह्यातील गणेश मंडळांना सहभागी होण्याच आवाहन

 



जालना,दि.27(जिमाका) :  शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026' आयोजित करण्यात आली आहे. यावर्षी या स्पर्धेचा विस्तार राज्यस्तरासोबत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेला असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध स्तरांवर पारितोषिके जिंकण्याची संधी उपलब्ध आहे. स्पर्धेचे अर्ज अकादमीच्या संकेतस्थळावर https://ganeshotsav.pldmka.co.in, या ऑनलाईन पोर्टलद्वारे स्वीकारण्यात येणार असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख सोमवार, दि.7 सप्टेंबर, 2026 निश्चित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी केले आहे.

या महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा राज्य, जिल्हा, तालुका या तीनही स्तरावर होणार आहे. या स्पर्धेचे अर्ज https://ganeshotsav.pldmka.co.in,या पोर्टलद्वारे ऑनलाईन स्वरूपात स्वीकारले जाणार आहेत. स्पर्धेचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2026 असून ही स्पर्धा विनामूल्य आहे. नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहेत.

विजेत्या मंडळांना जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांनी गौरविले जाणार आहे. यासोबतच, महाराष्ट्रातील घरगुती गणपतीचे दर्शन, सार्वजनिक गणपतीचे दर्शन व विविध प्रसिद्ध गणेश मंदिरातील गणपतींचे लाईव्ह दर्शन अकादमीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या https://ganeshotsav.pldmka.co.in पोर्टलद्वारे घरबसल्या घेता येणार आहे. आपल्या घरगुती अथवा सार्वजनिक गणेशोत्सवाचे छायाचित्र या पोर्टलद्वारे विनामूल्य प्रसिद्ध करता येईल. याकरिता अधिकाधिक मंडळांनी व कुटुंबांनी आपल्या गणपतीची छायाचित्रे https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे प्रसिद्ध, करावीत असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी केले आहे.

 

*****

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘खेळो इंडिया संवाद – युवा कनेक्ट’ उत्साहात संपन्न


जालना,दि.27(जिमाका) : राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर मेरा युवा भारत, जालना यांच्या सहकार्याने जी.ई.एस. महाविद्यालय, जालना येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘खेळो इंडिया संवाद – युवा कनेक्ट’ या विशेष कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, क्रीडाप्रेमी तसेच युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांशी व्हिडिओ संवाद साधून केलेले मार्गदर्शन. आपल्या संवादातून त्यांनी युवकांना खेळाकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता जीवनाचा महत्त्वाचा भाग म्हणून स्वीकारण्याचे आवाहन केले. नियमित क्रीडा सहभागामुळे शरीर सुदृढ राहण्यासोबतच शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संघभावना आणि संघर्ष करण्याची क्षमता विकसित होते, असे त्यांनी सांगितले. युवकांनी खेळाच्या माध्यमातून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असा संदेशही त्यांनी दिला.

जी.ई.एस. महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अत्रेहोत्री, उपप्राचार्य डॉ. उमेश मोगले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुमंत बिक्कड, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. किशोर कुमार तापडिया, डॉ. हेमंत वर्मा यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच विविध विभागांचे प्राध्यापक, क्रीडा विभागाचे पदाधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक आणि युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान युवकांना क्रीडा क्षेत्रातील विविध संधी, खेळाडू म्हणून घडताना येणारी आव्हाने आणि क्रीडेमुळे व्यक्तिमत्त्व विकासाला मिळणारी चालना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संवाद उत्साहाने ऐकला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयी नव्या उमेदीची भावना निर्माण झाली.

कार्यक्रमानंतर खो-खोच्या राष्ट्रीय खेळाडू गायत्री शिंदे तसेच इतर खेळाडूंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या क्रीडा प्रवासातील अनुभव, सरावातील सातत्य, स्पर्धेतील आव्हाने आणि यशासाठी आवश्यक असलेली मेहनत याविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘खेळा, निरोगी राहा आणि देशाच्या विकासात योगदान द्या’ हा संदेश देण्यात आला. क्रीडा क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींची माहिती मिळाल्याने युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचा समारोप ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताने करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, स्वयंसेवक, मेरा युवा भारतचे पदाधिकारी तसेच युवक मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

****

लोकशाही दिनाचे 7 सप्टेंबर रोजी आयोजन

 

जालना,दि.27(जिमाका) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 7 सप्टेंबर, 2026 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.  लोकशाही दिनात अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज 15 दिवस अगोदर दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.  लोकशाही दिनासाठी अर्ज देताना संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही कार्यवाही झालेली नसावी अशाच अर्जदारांनी टोकन क्रमांकाच्या पावतीसह अर्ज दोन प्रतीत सादर करावा. ज्या अर्जदाराने तालूकास्तरीय लोकशाही दिनात भाग घेतला नाही, अशा अर्जदाराचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी कार्यालय यांनी कळविले आहे. 

लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्वी, अपील, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची तहसिलदार यांच्या स्वाक्षरीची पोहोच पावती व त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापूर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल.  ज्यांनी यापूर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे. परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नयेत.  तसेच लोकशाही दिनात द्यावयाच्या अर्जाचा विहित नमुना http://jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

 

****

Tuesday, 25 August 2026

‘खेलो इंडिया संवाद – युवा कनेक्ट’ कार्यक्रमाचे जालना येथे आयोज

 

जालना,दि.25(जिमाका) :  आगामी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर मेरा युवा भारत (MY Bharat), जालना यांच्या सहकार्याने जे.ई.एस. महाविद्यालय व अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या वतीने ‘खेलो इंडिया संवाद – युवा कनेक्ट’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. यानिमित्त युवकांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढविणे, क्रीडा विकासाला चालना देणे आणि राष्ट्रनिर्माणात युवकांची भूमिका अधिक बळकट करणे, या उद्देशाने देशभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

‘युवा कनेक्ट’ उपक्रमाच्या माध्यमातून युवक, खेळाडू, युवा नेते, स्वयंसेवक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना एका व्यासपीठावर आणून भारतातील क्रीडा क्षेत्राचा विकास, युवकांच्या आकांक्षा आणि भविष्यातील संधी यावर संवाद साधण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभासी संवाद. देशभरातील विविध ठिकाणांहून लाखो युवक या उपक्रमाशी जोडले जाणार असून, जालना जिल्ह्यातील युवकांनाही या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

कार्यक्रमाच्या अनुषंगाने युवक, MY Bharat स्वयंसेवक, NSS स्वयंसेवक आणि स्थानिक खेळाडू यांच्यात विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास, क्रीडा क्षेत्रातील उपलब्ध संधी, ग्रामीण व तळागाळातील खेळाडूंना प्रोत्साहन तसेच भारतात विकसित होत असलेल्या क्रीडा परिसंस्थेबाबत विचारमंथन करण्यात येणार आहे.

यावेळी आयोजित ‘युवा संवाद’ मध्ये युवकांना भारतीय क्रीडा क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात आपल्या कल्पना, सूचना व आकांक्षा मांडण्याची संधी मिळणार आहे. क्रीडा परिसंस्थेचे बळकटीकरण, २०३६ ऑलिम्पिकसाठी क्रीडा प्रतिभेचे संवर्धन, युवा नेतृत्व व प्रशासनातील सहभाग आणि विकसित भारतासाठी युवा सक्षमीकरण या विषयांवर विशेष चर्चा होणार आहे.

युवकांच्या सूचना व कल्पना QR कोडच्या माध्यमातून संकलित करण्यात येणार असून, उपस्थित युवकांना VBYLD Quizमध्ये सहभागी होण्यासाठीही प्रोत्साहित केले जाणार आहे. मेरा युवा भारत (MY Bharat), जालना, जे.ई.एस. महाविद्यालय आणि अंकुशराव टोपे महाविद्यालय यांच्या वतीने जिल्ह्यातील युवकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, भारतीय क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आपल्या कल्पना व सूचना मांडाव्यात आणि ‘विकसित भारत’ घडविण्याच्या राष्ट्रनिर्माण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

****

 

*राष्ट्रीय लोकअदालतीतून प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन*

 

*12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन* 

 

जालना,दि.25(जिमाका) :  जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये येत्या 12 सप्टेंबर 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. धनादेश अनादर, अपघात भरपाई, कौटुंबिक व दिवाणी वाद सामोपचाराने मिटविण्याची सुवर्णसंधी पक्षकारांना उपलब्ध होणार असून, अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये ही लोकअदालत आयोजित केली जाणार आहे.

लोकअदालतीमध्ये धनादेश अनादर प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई दावे, कौटुंबिक व वैवाहिक वाद, दिवाणी दावे (जमीन, मालमत्ता, वाटप, भाडेकरू वाद आदी), तडजोडपात्र फौजदारी गुन्हे तसेच बँकिंग, वीज वितरण कंपन्या आणि फायनान्स कंपन्यांशी संबंधित दाखलपूर्व (Pre-Litigation) प्रकरणे तडजोडीसाठी ठेवता येणार आहेत. तसेच कामगार, औद्योगिक, सहकार न्यायालय व ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रलंबित प्रकरणांचाही समावेश करण्यात आला आहे.

लोकअदालतीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे कोर्ट फी परतावा. लोकअदालतीत तडजोडीने वाद मिटल्यास पक्षकारांनी भरलेली न्यायालयीन फी नियमानुसार परत मिळते. तसेच लोकअदालतीच्या निवाड्याविरुद्ध अपीलची आवश्यकता नसल्याने प्रकरणाचा कायमस्वरूपी निपटारा होतो. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचण्यासोबतच परस्पर सलोखा व नातेसंबंध टिकून राहण्यास मदत होते.

ज्या पक्षकारांची प्रलंबित किंवा दाखलपूर्व प्रकरणे सामोपचाराने मिटवायची आहेत, त्यांनी आपल्या संबंधित वकिलामार्फत प्रकरण लोकअदालतीत दाखल करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

****

अमरावती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासन सतर्क; महिला, नवजात बालके व अतिसंवेदनशील रुग्णांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

*जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे तातडीने फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट करावे – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल*

 


जालना,दि.25(जिमाका) : अमरावती येथील रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांच्या अग्निसुरक्षा आणि विद्युत सुरक्षेचा तातडीने आढावा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील महिला व बाल रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच इतर सर्व शासकीय आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यासंदर्भात जिल्हाधिकारी मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली आज संबंधित विभागांची ऑनलाईन आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, जालना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन विभाग, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग तसेच संबंधित आरोग्य व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

रुग्णालयांच्या सुरक्षा ऑडिटदरम्यान आढळणाऱ्या त्रुटींची केवळ नोंद करून न थांबता त्यावर तातडीने सुधारात्मक कार्यवाही करण्यात यावी. संबंधित यंत्रणांनी केलेल्या कार्यवाहीचे अनुपालन सुनिश्चित करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

विशेषतः महिला व बाल रुग्णालयातील SNCU, NICU, प्रसूती कक्ष, बालरुग्ण विभाग, ICU, ऑपरेशन थिएटर आणि ऑक्सिजन सुविधा असलेल्या विभागांची प्राधान्याने तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची व्यवस्था सक्षम आहे की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यावर भर देण्यात आला आहे.

फायर ऑडिटमध्ये फायर एक्स्टिंग्विशर, फायर अलार्म, स्मोक डिटेक्टर, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग तसेच रुग्णालयातील अग्निसुरक्षेच्या अन्य उपाययोजनांची कार्यक्षमता तपासण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्युत वायरिंग, विद्युत पॅनेल, अर्थिंग, जनरेटर आणि इतर विद्युत उपकरणांची कार्यस्थितीही प्रत्यक्ष तपासण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले.

रुग्णालयांमध्ये आग किंवा अन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कोणत्या पद्धतीने रुग्णांचे स्थलांतर करायचे, यासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेने स्पष्ट Hospital Fire & Emergency Response Plan तयार ठेवावा. या योजनेत नवजात बालके, गर्भवती व प्रसूती झालेल्या महिला, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, ICU मधील रुग्ण तसेच हालचाल करण्यास असमर्थ रुग्णांच्या सुरक्षित आणि जलद स्थलांतरासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करावी, असेही सांगण्यात आले.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अग्निसुरक्षा प्रशिक्षणासोबत प्रत्यक्ष मॉकड्रिल घेण्याचे निर्देश ही यावेळी देण्यात आले आहेत. डॉक्टर, परिचारिका, तांत्रिक कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि अन्य रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना आग लागल्यानंतर करावयाच्या प्रथम प्रतिसादाची माहिती देण्यात यावी.

अग्निशमन उपकरणांचा योग्य वापर, फायर अलार्म यंत्रणा, आपत्कालीन संपर्क व्यवस्था आणि रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर याबाबत कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात यावे. आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही प्रकारची गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी नियमित सराव करण्यावरही भर देण्यात आला.

“रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेषतः महिला, नवजात बालके, लहान मुले, दिव्यांग व्यक्ती आणि अतिदक्षता विभागातील रुग्ण आपत्कालीन परिस्थितीत अधिक असुरक्षित असतात. त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. अग्निसुरक्षा आणि विद्युत सुरक्षेबाबत कोणत्याही स्तरावरील निष्काळजीपणा स्वीकारला जाणार नाही. संभाव्य धोका आधीच ओळखून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात,” असे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.

फायर ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट, ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटींची पूर्तता, मॉकड्रिल आणि कर्मचारी प्रशिक्षण या सर्व बाबींवर आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचा विद्युत विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयाने तातडीने कार्यवाही करावी. या सर्व कार्यवाहीचा अनुपालन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी दिले.

 

****