जालना, दि.20(जिमाका) : शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत राज्यभर 22 जुलै ते 2 ऑगस्ट, 2026 या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘समाधान शिबिर’ आयोजित करण्यात निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीचे औचित्य साधुन या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जालना जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची मुख्य नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, शिबिरांचे नियोजन, समन्वय, अंमलबजावणी, पर्यवेक्षण आणि अहवाल सादर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील समाधान शिबिरांचे वेळापत्रक
• परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघ : 22 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता गजानन मंगल कार्यालय, परतूर येथे शिबिर होणार असून उपविभागीय अधिकारी श्री. प्रभाकर गायकवाड हे मुख्य नोडल अधिकारी असतील.
• भोकरदन-जाफराबाद विधानसभा मतदारसंघ : 22 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता समृध्दी लॉन्स, भोकरदन येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले असून उपविभागीय अधिकारी श्रीमती सुकेशिनी कांबळे- पगारे यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
• घनसावंगी विधानसभा मतदारसंघ : 23 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता नृसिंह मंगल कार्यालय, घनसावंगी येथे शिबिर होणार असून उपविभागीय अधिकारी श्री. उमाकांत पारधी हे नोडल अधिकारी राहतील.
• जालना विधानसभा मतदारसंघ : 26 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता मुक्तेश्वर लॉन्स (मनपा), जालना येथे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी श्री. रामदास दौंड यांची मुख्य नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
• बदनापूर-अंबड विधानसभा मतदारसंघ : 31 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मागील मैदान, बदनापूर येथे शिबिर होणार असून तहसीलदार श्री. एस. एच. हंडेश्वर यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार या शिबिरांमध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रमाणपत्रे, महसूल विषयक सेवा तसेच इतर विभागांच्या सुविधा व इतर विभागांशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, अर्ज स्वीकृती, मार्गदर्शन आणि विविध सेवा देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
-*-*-*-*-*-*-



