Friday, 7 August 2026

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा जालना जिल्हा दौरा

 



 

जालना,दि.7 (जिमाका) :  राज्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास  महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे शनिवार, दि. 8 ऑगस्ट, 2026 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.

श्री.  पाटील हे शनिवार, दि. 8 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता  शासकीय विश्रामगृह, जालना येथे महामंडळाचे लाभार्थी व मराठा संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत महामंडळ विषयक बैठकीस उपस्थित राहणार आहेत. तसेच दुपारी 2.00 वाजता बीडकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-*-

 


शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडीबीटी 2.0 पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

 

 

जालना,दि.7 (जिमाका) : महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील सर्व विद्यार्थी, पालक, शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य/मुख्याध्यापक यांना याद्वारे सूचित करण्यात येते की, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृती योजनांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडिबीटी 2.0 (MahaDBT २.०) या नवीन प्रणालीवर शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता सुरू करण्यात आलेली आहे.

शिष्यवृत्तीच्या लाभाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नीकृत (Aadhaar Seeded) बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याने, अचूक माहिती अर्जामध्ये भरावी. महाडीबीटी 2.0 पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी विद्यार्थी/पालकांना पुढील सूचना देण्यात आल्या आहेत.

यामध्ये महाआयडी (Maha (D) नव्याने तयार करणे सर्व विद्यार्थ्यांसाठी महाआयडी (Maha ID) नव्याने तयार करणे बंधनकारक आहे. मागील पोर्टलवरील युझर आयडी/पासवर्डची आता गरज नाही. आधार आधारित नोंदणी विद्यार्थ्यांनी आपला आधार क्रमांक वापरून नवीन महाआयडी बनवावा. आधार पोर्टलवर आपली सर्व माहिती (पत्ता, मोबाइल, ई-मेल आणि बैंक खाते) अचूक व अद्यावत ठेवावी. दस्तऐवज संकलनः आवश्यक सर्व कागदपत्रे (जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रके इ.) स्पष्ट PDF स्वरूपात अपलोड करावीत. नवीन व नूतनीकरण अर्ज: नवीन (Fresh) व नूतनीकरण (Renewal) अशा दोन्ही अर्जासाठी नवीन महाआयडी/आधार लॉगिन करणे आवश्यक आहे. नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांनी लॉगिन नंतर "माझा अर्ज नूतनीकरण करावा" ही विशिष्ट टॅब निवडावी. भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्जदारांकडून संबंधित महाविद्यालय शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस शिक्षण शुल्क घेत नसल्याने केंद्र हिस्सा विद्यार्थ्यांच्या खात्यावर प्राप्त होताच.

महाविद्यालयांसाठी आता केवळ एकच लॉगिन उपलब्ध असेल जे थेट महाविद्यालयाच्या प्राचार्याचे असेल (लिपिक लॉगिन पूर्णपणे बंद). ज्या महाविद्यालयांना अद्यापही लॉगिन पासवर्डबाबत काही अडचणी असतील तर त्यांनी त्यांच्या संबंधित शैक्षणिक विभागास संपर्क साधावा. प्रोफाइल व शुल्क निश्चितीः महाविद्यालयाने मागील युझर आयडी व नवीन डीफॉल्ट पासवर्डने लॉगिन करून आपली प्रोफाईल तपासून अभ्यासक्रमनिहाय निश्चिती करण्यात आलेले शुल्क (Fee Structure) तात्काळ अद्ययावत करावी. प्राचार्यांची जबाबदारी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित (Pending) ठेवू नयेत, अर्ज विहित मुदतीत मंजूर करून पुढे पाठविण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्राचार्यांची असेल.

महाडीबीटी पोर्टलकरिता https://mahadbt2.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस, उपरोक्त पोर्टलवरील लिंकवर लॉगिन या टॅबवर "नागरिकांसाठी लॉगिन" किंवा "महाआयडीशिवाय प्रवेश करा" या पर्यायाचा वापर करून आधार बेस लॉगिन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी हा पर्याय निवडा. त्यानंतर आधार संलग्न मोबाईल क्रमांक ओटीपी अद्यावत केल्यानंतरच लॉगिन होईल.

लॉगिन झाल्यानंतर पात्र योजनेचा तपशील अद्ययावत केल्यानंतर आपणास लागू होणाऱ्या विभागनिहाय 3 योजनांची यादी उपलब्ध होईल. आपणास ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा त्या योजनेच्या नावासमोर "पहा" क्लिक केले असता योजनेची सर्व माहिती दिसू शकेल.

त्यानंतर आपण निवड केलेल्या योजनेच्या समोर Apply टॅबवर क्लिक करून विद्यार्थ्यांनी (उदा. वैयक्तिक माहिती, चालू व मागील शैक्षणिक तपशील, योजनेसंबंधित आवश्यक कागदपत्रे) याप्रमाणे तपशील अद्ययावत करून अर्ज ऑनलाइन सबमीट करावा व प्रिंट किंवा पीडीएफमध्ये जतन करून ठेवावा.

आवश्यक ती सर्व माहिती उदा. जात, प्रवर्ग, महाराष्ट्राचे रहिवासी, दिव्यांगत्व, कौटुंबिक उत्पन्न इ. पोर्टलमध्ये काळजीपूर्वक भरावी. अधिक माहितीकरिता 022-49150800/18001025311 अथवा helpdesk@mahadbt.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क करावा. तांत्रिक अथवा प्रशासकीय तक्रारीकरिता आपल्या लॉगीनमधून स्क्रीनशॉटसह तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.

महाविद्यालयांनी  महाडीबीटी 2.0 पोर्टलवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे व अर्ज करण्यासाठी सहकार्य करावे. अनुसूचित जातीच्या कोणत्याही पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्काची रक्कम घेवू नये, आपल्या महाविद्यालयाचे नाव, महाविद्यालयास मान्य असलेल्या अभ्यासक्रमाची नावे, अभ्यासक्रमाचा कालावधी, अभ्यासक्रमनिहाय प्रवेश क्षमता, महाविद्यालयाच्या व अभ्यासक्रमाच्या मान्यतेचे विविध आदेश, शुल्क रचना इ. माहिती पोर्टलवर मॅप करण्यासाठी संबंधित शैक्षणिक यंत्रणा (उदा. संचालनालयास/विद्यापीठास/परिषदेस/FRA) यांचेकडून मॅप करून घेण्याची कार्यवाही करावी. अशी माहिती सहायक आयुक्त समजाकल्याण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-*-

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे · सन 2026-27 अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

 


 

जालना,दि.7(जिमाका) : कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार "राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे राज्य पुरस्कृत योजना सन 2026-27" राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान, उत्पादन पद्धती, कृषी प्रक्रिया, बाजार व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण, सेद्रिंय शेती तसेच कृषी एक्स्पोचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावर्षी युरोप व चीन या देशांमध्ये अभ्यास दौरे प्रस्तावित आहेत.

योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यास एकूण 5 शेतकऱ्यांचा लक्षांक प्राप्त झाला आहे, सदर निवड प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातून किमान एक महिला शेतकरी तसेच राज्य अथवा केंद्र शासन स्तरावरील विविध कृषी पुरस्कार प्राप्त व पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांना प्राधान्याने संधी देण्यात येणार आहे. संबंधित प्रवर्गातून पात्र अर्ज प्राप्त न झाल्यास मार्गदर्शक सूचनांनुसार इतर पात्र शेतकऱ्यांमधून निवड करण्यात येईल. इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात विहित मुदतीत सादर करावेत. शासनामार्फत अभ्यास दौऱ्याच्या खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रुपये 2 लाख (यापैकी जी रक्कम कमी असेल) इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. 14 ऑगस्ट 2026 पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावेत. असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहीनीनाथ कापसे यांनी केले आहे.

अर्जदाराकडे अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी, वैध पासपोर्ट, आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केलेली इतर पात्रता व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. पात्र प्रस्तावांची छाननी करून जिल्हास्तरावर पारदर्शक पद्धतीने सोडत काढण्यात येईल. सोडतीचा दिनांक, वेळ व स्थळ याबाबतची माहिती स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. अशी माहिती  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गहीनीनाथ कापसे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

-*-*-*-*-

पेन्शन अदालत व कार्यशाळेचे 11 ऑगस्ट रोजी आयोजन

 


 

जालना,दि.7(जिमाका) : महालेखापाल, नागपूर व जिल्हा कोषागार कार्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 11 ऑगस्ट,2026 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता सामाजिक न्यायभवन, जिल्हा समाजकल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे पेन्शन अदालत व कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

पेन्शन अदालत तसेच कार्यशाळेत आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडील निवृत्तीवेतन प्रकरणांविषयी अडचणी जाणुन घेऊन त्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच ज्या निवृत्तीवेतनधारकांची निवृत्तीवेतन विषयक प्रकरणे प्रलंबित आहेत किंवा वापस करण्यात आली आहेत यांच्याही अडचणी जाणुन घेऊन मार्गदर्शन केले जाणार आहे. सर्व आहरण व संवितरण अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी तसेच ज्या निवृत्तीवेतनधारकांची प्रकरणे प्रलंबीत असतील असे निवृत्तीवेतनधारकांनी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी

 


 

     जालना दि. 7 (जिमाका) :-    जिल्ह्यात श्री क्षेत्र शेगांव जि. बुलढाणा येथील श्री संत गजानन महाराज जयंती यांची पालखी पंढरपुर येथुन परतीच्या मार्गावर असून ही पालखी दि. 7 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करणार असून दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी जालना जिल्ह्यातील नियोजीत प्रवास पुर्ण  करुन बुलढाणा  जिल्ह्याचे हद्दीत प्रवेश करणार  आहे. तसेच दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण मासारंभ, दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी पतेती सण, दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्यादिन दि. 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमी इत्यादी सण, उत्सव  साजरे होणार आहेत. सदर सण, उत्सवाचे अनुषंगाने जालना जिल्ह्यात व शहरात मिरवणुका व विविध कार्यक्रम आयोजित होतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येत असतात.

तसेच सध्या महाराष्ट्रात व देशभरात आरक्षण उपवर्गीकरणाला तिव्र विरोध होत आहे. तसेच सध्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण  व धनगर आरक्षण मिळावे या अनुषंगाने जालना जिल्ह्यात विविध आंदोलनात्मक कार्यक्रम सुरु आहेत. तसेच सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द विविध कारणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहे. तसेच  शेतक-यांचे विविध मागणीसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

 

        पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही  आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.

 

तर पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये  पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.   

 

हा आदेश कामावरील कोणताही ‍ अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही.  तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.   हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि. 8 ऑगस्ट, 2026   रोजीच्या 6.00 वाजेपासुन ते  दि. 21 ऑगस्ट,2026 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

 

Thursday, 6 August 2026

राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची बदनापूर येथील कृषि विज्ञान केंद्र भेट व पाहणी

 







 

जालना,दि.6(जिमाका) : महाराष्ट्र राज्याचे कृषि, वित्त, नियोजन, मदत व पुनर्वसन तसेच विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज (दि. 6 ऑगस्ट) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत कृषि विज्ञान केंद्र (केव्हीके), बदनापूर येथे भेट देऊन बायोमिक्स लॅबोरेटरी, माती परीक्षण प्रयोगशाळा, कृषी प्रदर्शन स्टॉल तसेच कृषी संशोधन केंद्रातील विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी जैविक शेती, मृदा आरोग्य संवर्धन आणि शाश्वत कृषी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.

राज्यमंत्री जयस्वाल यांनी सर्वप्रथम केव्हीके बदनापूर येथील बायोमिक्स लॅबोरेटरीला भेट देऊन तेथे तयार करण्यात येणाऱ्या विविध जैविक उत्पादनांची निर्मिती प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिली. द्रवरूप जैविक खतांचे उत्पादन, त्यांचे दरपत्रक, गुणवत्ता नियंत्रण आणि शेतकऱ्यांसाठी त्यांचा होणारा उपयोग याबाबत त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. जैविक खतांच्या वापरामुळे मातीची सुपीकता व आरोग्य सुधारण्यास मदत होते, रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते, उत्पादन खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांचा नफा वाढतो, असे सांगण्यात आले. या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

यानंतर त्यांनी माती परीक्षण प्रयोगशाळेला भेट देऊन माती आरोग्य पत्रिका तयार करण्याची प्रक्रिया, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या शिफारशींची माहिती घेतली. कृषी प्रदर्शन स्टॉलवरील विविध जैविक उत्पादने, विस्तार साहित्य, सुधारित कृषी तंत्रज्ञान आणि शेतकरी हिताच्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन ही उत्पादने व तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी त्यांनी कृषि संशोधन केंद्र, बदनापूर येथील जंगली जातींच्या संवर्धित बागेलाही भेट दिली. केंद्रामार्फत विकसित करण्यात आलेल्या आणि शेतकऱ्यांमध्ये प्रसारित होत असलेल्या कडधान्य पिकांच्या सुधारित वाणांची त्यांनी माहिती जाणून घेतली. विशेषतः तूर पिकातील ‘गोदावरी’ वाण तसेच हरभरा पिकातील ‘परभणी चना-१६’ या सुधारित वाणांच्या वैशिष्ट्यांबाबत त्यांनी शास्त्रज्ञांशी सविस्तर चर्चा केली. तूर, मुग व उडीद पिकांच्या जंगली जातींचे संवर्धन, त्यांचे जनुकीय महत्त्व आणि भविष्यातील सुधारित वाण विकसित करण्यामधील त्यांचे योगदान याविषयीही त्यांनी माहिती घेतली.

भेटीदरम्यान राज्यमंत्र्यांनी कृषि महाविद्यालय, बदनापूर येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कृषी संशोधन, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नवोन्मेष, जैविक शेती आणि कृषी क्षेत्रातील उदयोन्मुख संधी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत संशोधनाधिष्ठित शेतीचा प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कृषि महाविद्यालय, बदनापूरचे अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील, डॉ. एस. बी. पवार, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूरचे प्रभारी अधिकारी डॉ. गजेंद्र जगताप, कृषि विज्ञान केंद्र, बदनापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. सचिनकुमार दिगंबरराव सोमवंशी, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) डॉ. सचिन रामचंद्र धांडगे, विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) डॉ. राहुल लक्ष्मणराव कदम, विषय विशेषज्ञ (कृषिविद्या) डॉ. दिपाली रमेश कांबळे, विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) प्रा. फारुक रुबाब तडवी तसेच कृषी संशोधन केंद्र, बदनापूरचे डॉ. प्रशांत सोनटक्के, डॉ. विष्णू गीते, डॉ. प्रशांत पगार, डॉ. नितीन पतंगे यांच्यासह इतर शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित शास्त्रज्ञांनी विविध संशोधन प्रकल्प, जैविक खत निर्मिती, मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि कृषी विस्तार उपक्रमांची सविस्तर माहिती राज्यमंत्र्यांना दिली.

 

-*-*-*-*-*-*-

माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत सक्रिय सहभाग घ्यावा - राज्यस्तरीय समन्वयक अधिकारी अमोल पाटील

 


 

जालना,दि.6(जिमाका) : ‘माझं गाव आरोग्य संपन्न’ अभियान अंतर्गत राज्यस्तरीय समन्वयक अधिकारी अमोल पाटील यांनी भोकरदन तालूक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नळणी बुद्रुक अंतर्गत राजूर येथे आयोजित असंसर्गजन्य रोग निदान शिबिर शिबिराला भेट दिली. यावेळी नागरिकांना प्रत्यक्ष भेटून ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची माहिती देऊन या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपले आरोग्य संपन्न होईल याची दक्षता घेण्याचे आव्हान केले.

या शिबिरामध्ये 30 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या एकूण 75 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 60 नागरिकांची रक्त तपासणी आणि 45 नागरिकांचा ईसीजी (ECG) करून आवश्यक वैद्यकीय उपचार व सल्ला, मार्गदर्शन, पोषण आहार व प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत माहिती देण्यात आली.

या शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून राज्यस्तरीय समन्वयक अधिकारी अमोल पाटील, डी. एस. बोराडे, ऋतुजा पाटील, सुनील बोडखे, यांची उपस्थिती होती. तसेच ग्रामसेवक पुंगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित सावंत, डॉ. दीपक निहाल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नळणी येथील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान व उपस्थिती होती. ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने आयोजित केलेल्या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

-*-*-*-*-*-