DGIPR JALNA
Saturday, 25 July 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 : जालना जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध; आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू
जालना, दि. 25 (जिमाका)
: महाराष्ट्र शासनाच्या "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026" अंतर्गत जालना जिल्ह्यातील पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांची
यादी 24 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या योजनेत जिल्ह्यातील 954 गावांतील
पात्र शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली असून संबंधित गावांच्या ग्रामपंचायत कार्यालय,
गाव चावडी, विविध कार्यकारी सेवा संस्था तसेच संबंधित बँक शाखांमध्ये ही यादी उपलब्ध
करून देण्यात आली आहे.
राज्यातील शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांत अनियमित
पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट आणि हवामान बदलाच्या परिणामांमुळे मोठ्या आर्थिक
अडचणींचा सामना करावा लागत आहे. उत्पादन खर्चात वाढ, बाजारभावातील चढ-उतार आणि नैसर्गिक
संकटांमुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक
दिलासा देण्यासाठी आणि त्यांना पुन्हा पीक कर्ज उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी
राज्य शासनाने ही कर्जमुक्ती योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह प्रति शेतकरी दोन लाख रुपयांपर्यंत
कर्जमाफी देण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या
अल्पमुदत पीक कर्जाचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. तसेच 30 सप्टेंबर 2025 पर्यंत
थकीत असलेले आणि 31 मार्च 2026 पर्यंत न भरलेले कर्ज या योजनेसाठी पात्र राहणार आहे.
ज्या शेतकऱ्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांनी अतिरिक्त रक्कम
भरल्यानंतर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी शासनाने 31 मार्च 2027 पर्यंत
मुदत दिली आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार
रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र
शेतकऱ्यांनी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील विशिष्ट क्रमांक, आधार कार्ड आणि बँकेचे
पासबुक घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात किंवा संबंधित बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण
करून घेणे आवश्यक आहे.
आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आपले सरकार
सेवा केंद्र चालकांनीही कोणत्याही प्रकारचे शुल्क घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात
आले आहेत.
आधार प्रमाणीकरणाच्या वेळी
आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा कर्जाच्या रकमेबाबत काही त्रुटी आढळल्यास त्याबाबतची
ऑनलाइन तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदविण्यासाठी सेवा केंद्र चालकांना सांगावे. तसेच
बोटांचे ठसे न उमटल्यामुळे आधार प्रमाणीकरण होत नसल्यास त्याबाबतची ऑनलाइन तक्रार तहसीलदारांकडे
नोंदविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी वेळेत आधार प्रमाणीकरण
करून योजनेचा लाभ घ्यावा तसेच सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन
करून कोणतेही शुल्क आकारू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था, जालना विष्णु रोडगे यांनी केले आहे.
Friday, 24 July 2026
लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला 13 ऑगस्टपासून होणार सुरुवात आयव्हीबीपी संस्थेकडून 1 कोटी लसींचे वितरण
जालना,दि.24(जिमाका)
: लाळखुरकूत या घातक विषाणूजन्य रोगापासून राज्यातील पशूधनाचे रक्षण करण्यासाठी
पशुसंवर्धन विभागातर्फे 'लाळखुरकूत (एफएमडी) लसीकरण मोहीम फेरी-9' चे आयोजन करण्यात आले आहे. ही लसीकरण मोहीम येत्या 13 ऑगस्ट 2026 पासून राज्यभरात सुरु करण्याचे नियोजन
करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी १ कोटी लसमात्रा केंद्र शासनाकडून राज्यस्तरावर प्राप्त
झाल्या आहेत.
लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम राज्यभरात वेळेत
व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रत्यक्ष लसीकरण सुरु होण्यापूर्वी सर्व जिल्ह्यांपर्यंत
लस साठा पोहोचणे आवश्यक आहे. उपलब्ध झालेला १ कोटी लसींचा पुरवठा राज्यातील सर्व जिल्ह्यांना
शीत साखळीची खबरदारी घेऊन वितरित (वाटप) करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे
राज्यातील कोट्यवधी पशूधनाला लाळखुरकूत रोगापासून संरक्षण मिळणार असून, पशुपालकांना
मोठा दिलासा मिळणार आहे.
परिणामकारक लसीकरण होण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत
पशुधनाचे जंतनिर्मुलन करण्यात येत असून, आवश्यक औषधींचा पुरवठा सर्व संस्थांना करण्यात
आला आहे. महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व खाजगी
कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत
पशुधनाला एफएमडी लसीकरण करून त्याची नोंद NDLM वर घेतल्यास प्रती पशुधन रु. 5/- प्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.
राज्यातील पशुधन रोगांपासून सुरक्षित ठेवणे व पशुपालकांचे
आर्थिक नुकसान टाळणे यासाठी ' लाळखुरकूत (एफएमडी) लसीकरण मोहीम फेरी-९' अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यातील सर्व
जिल्ह्यांमध्ये 13 ऑगस्टपासून ही मोहीम व्यापक स्वरुपात
राबवली जाईल. सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे 100% लसीकरण करून घेऊन या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. असे आवाहन पशुसंवर्धन
आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
पशुवैद्यकीय सेवांसाठी कॉल करा 1962, व्हॉट्स अप चॅटबॉट सेवेसाठी
9063142299
-*-*-*-*-*-
शालेय बस-व्हॅनसाठी नवे नियम लागू; सुरक्षा उपाय अनिवार्य 23 ते 30 जुलैदरम्यान विशेष तपासणी मोहीम; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई
जालना,दि.24(जिमाका) : राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित
प्रवासाला प्राधान्य देत शालेय बस, शालेय व्हॅन आणि शैक्षणिक संस्थांच्या वाहनांसाठीच्या
नियमांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केली आहे. महाराष्ट्र मोटार वाहन (शालेय बससाठीचे
नियम) (पहिली सुधारणा) नियम, 2026 अंतर्गत 16 जुलै रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या नव्या
नियमांनुसार शालेय वाहतुकीचे भाडे प्रथमच अधिकृत नियमावलीच्या कक्षेत आणण्यात आले असून
ते निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांना (आरटीए) देण्यात आले आहेत.
नवीन
नियमांनुसार प्रत्येक शालेय बस व व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली, सीट बेल्ट, डिजिटल हजेरी
प्रणाली, पॅनिक बटण, व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस तसेच अन्य आवश्यक
सुरक्षा सुविधा असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासावर
अधिक प्रभावी देखरेख ठेवणे शक्य होणार असून शालेय वाहतूक अधिक सुरक्षित आणि पारदर्शक
होणार आहे. पालकांना आता मोबाईल अॅपच्या माध्यमातून
आपल्या पाल्याच्या प्रवासावर थेट लक्ष ठेवता येणार आहे. वाहनांमधील सीसीटीव्ही फुटेज
किमान 30 दिवस सुरक्षित ठेवणे तसेच आवश्यकतेनुसार परिवहन, शिक्षण किंवा पोलिस विभागाला
उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी चालक व
मदतनिसांची पोलिस पडताळणी आणि शारीरिक सक्षमता तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच
इयत्ता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये महिला मदतनीस
नियुक्त करणेही सक्तीचे करण्यात आले आहे.
याशिवाय
बसमध्ये चढणाऱ्या व उतरणाऱ्या विद्यार्थ्यांची डिजिटल नोंद ठेवणे, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी
आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि परिवहन व शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून
संयुक्त तपासणी करणे आवश्यक राहणार आहे. जिल्हा शालेय बस सुरक्षा समित्यांना दर तीन
महिन्यांनी अहवाल सादर करावा लागणार आहे. दरम्यान, शाळा व महाविद्यालयांचे शैक्षणिक
वर्ष 2026-27 सुरू झाल्यानंतर शालेय वाहतुकीबाबत विविध तक्रारी प्राप्त झाल्याच्या
पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने दि.
23 जुलै ते 30 जुलै 2026
या कालावधीत विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत शालेय बस, शालेय व्हॅन
आणि शैक्षणिक संस्थांच्या वाहनांची सखोल तपासणी केली जाणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या
वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
परिवहन
विभागाने शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, प्राचार्य, शालेय बस समित्या तसेच वाहनधारकांनी
नव्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी सूचना केली आहे. तपासणीदरम्यान वाहनांची सर्व
वैध कागदपत्रे सोबत ठेवावीत, अन्यथा नियमानुसार कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनिष दौंड यांनी
केले आहे.
-*-*-*-*-*-*-
‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन 29 जुलै रोजी जालन्यात विविध सांस्कृतिक, साहित्यिक व सर्जनशील स्पर्धा; युवकांना सहभागाचे आवाहन
जालना,दि.24(जिमाका) : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या
अंतर्गत कार्यरत माय भारत, जालना
यांच्या वतीने जिल्ह्यात ‘नशामुक्त
युवा फॉर विकसित भारत’ या जनजागृतीपर अभियानांतर्गत विविध जिल्हास्तरीय
स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. व्यसनमुक्तीबाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण करणे,
त्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे आणि विकसित भारताच्या उभारणीत युवकांचा सक्रिय सहभाग
वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या
अभियानांतर्गत युवकांसाठी सांस्कृतिक, साहित्यिक आणि सर्जनशील अशा विविध स्पर्धा घेण्यात
येणार आहेत. यामध्ये सामूहिक लोकगीत
गायन, सामूहिक नृत्य, पथनाट्य, वैयक्तिक चित्रकला स्पर्धा, शॉर्ट फिल्म किंवा रिल स्पर्धा,
घोषवाक्य लेखन, स्लॅम पोएट्री (मौखिक कविता) तसेच भाषण स्पर्धेचा समावेश
असणार आहे.
या
सर्व स्पर्धेंचा विषय ‘नशामुक्त युवा
फॉर विकसित भारत’ या अभियानाशी संबंधित असून, व्यसनमुक्ती, निरोगी
जीवनशैली, सामाजिक जबाबदारी आणि विकसित भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका या विषयांवर
आधारित सादरीकरणे अपेक्षित आहेत. या माध्यमातून युवकांना समाजप्रबोधनाची संधी मिळणार
असून व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात येणार आहे.
या
जिल्हास्तरीय स्पर्धा दि. 29 जुलै 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता डॉ. वेदप्रकाश पाटील आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन
केंद्र, रेगाव रोड, जालना येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
या
स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, युवक मंडळे, स्वयंसेवी
संस्था तसेच 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी
मोठ्या संख्येने सहभागी होऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मयुरकुमार गोरमे, जिल्हा युवा अधिकारी, माय भारत,
जालना यांनी केले आहे.
स्पर्धांबाबत
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा
युवा अधिकारी, माय भारत, जालना यांच्याशी 8830057471 किंवा 7875464703 या क्रमांकांवर संपर्क साधावा किंवा mybharatjalna@gmail.com
या ई-मेलवर संपर्क साधावा.
-*-*-*-*-*-*-*-

.jpeg)
