Friday, 14 August 2026

“हर घर तिरंगा अभियाना” अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन

 


 

जालना,दि.14 (जिमाका) : राज्यात दि. 9 ऑगस्ट ते दि. 17 ऑगस्ट 2026 कालावधीत हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी जालना यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतंर्गत जालना शहरात सायकल रॅलीचे 15 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 8.00 वाजता आयोजन केले आहे.

या सायकल रॅलीचे जिल्हाधिकारी कार्यालय येथून सकाळी 8.45 वाजता अंबड चौफुली-नुतन वसाहत-रेल्वे स्टेशन-चमन-शनि मंदिर-छत्रपती संभाजी महाराज पुतळा - मोतीबाग - जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे आयोजित करण्यात आली आहे. या सायकल रॅलीत जास्तीत जास्त नागरिक व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी रामदास दौंड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

अंमली पदार्थाच्या गैरवापराविरुद्ध 18 ऑगस्टला जालना येथे राष्ट्रीय शपथ

 


 

जालना,दि.14 (जिमाका) :  अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापराविरोधात जनजागृती निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने ‘नशा मुक्त भारत, विकसित भारत’ अभियानांतर्गत जालना जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या गैरवापराविरुद्ध राष्ट्रीय शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दि. 18 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद कार्यालय, जालना येथे होणार आहे.

संयुक्त राष्ट्र महासभेच्या डिसेंबर 1987 मध्ये झालेल्या ठरावानुसार दरवर्षी 26 जून हा दिवस ‘अंमली पदार्थांचा गैरवापर आणि बेकायदेशीर तस्करीविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून पाळला जातो. अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, तसेच समाजाला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व्यापक लोकसहभाग निर्माण करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

भारत सरकारने अंमली पदार्थांच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग्ज मुक्त भारत’ संकल्प निश्चित केला असून, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांच्या माध्यमातून ‘नशा मुक्त भारत, विकसित भारत’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विशेषतः युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम याबाबत जागृती करण्यात येत आहे.

जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे विभागप्रमुख व अधिनस्त कार्यालये यांच्या सहभागातून हा शपथ कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर महिला मंडळे, युवक मंडळे, स्थानिक स्वयंसेवी संस्था, अनुदानित संस्था, महाविद्यालये, माध्यमिक व प्राथमिक विद्यालये, दिव्यांग संस्था, आश्रमशाळा, जिल्हा रुग्णालय, बसस्थानक व रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक कार्यकर्ते यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे.

अंमली पदार्थांचे सेवन ही केवळ व्यक्तीची समस्या नसून त्याचा परिणाम कुटुंब, समाज आणि देशाच्या भवितव्यावर होत असतो. त्यामुळे अंमली पदार्थांच्या विरोधातील लढ्याला लोकसहभागाची जोड देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अंमली पदार्थांच्या गैरवापराविरुद्ध राष्ट्रीय शपथ घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

ऑनलाइन शपथ घेण्याचेही आवाहन

नागरिकांना कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्याबरोबरच ऑनलाइन पद्धतीनेही अंमली पदार्थांच्या गैरवापराविरुद्ध शपथ घेता येणार आहे. यासाठी https://nmba.dosje.gov.in/volunteer/registration या संकेतस्थळावर ऑनलाइन शपथ घेऊन त्याचे प्रमाणपत्र प्राप्त करावे. तसेच शपथ घेतल्याचे छायाचित्र संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अंमली पदार्थमुक्त समाज निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी होऊन ‘नशा मुक्त भारत, विकसित भारत’ या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-*-

रेशीम उत्पादनाच्या 'जालनाई ब्रँड 'चा जालन्यातून देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ सिल्क, सीड आणि स्टीलची सिटी म्हणून आता जालना जिल्हा ओळखला जाणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालन्यातील रेशीम बाजारपेठेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शानदार उदघाटन

 












जालना,दि.14(जिमाका) :  जालना जिल्ह्याची ओळख आता ‘सिल्क, सीड आणि स्टील’ अर्थात ‘ट्रिपल एस सिटी’ म्हणून निर्माण झाली असून, रेशीम उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्यात नव्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. रेशीम शेतीला प्रोत्साहन देतानाच उत्पादनापासून प्रक्रिया, वस्त्रनिर्मिती, ब्रँडिंग आणि बाजारपेठेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी जालन्यात विकसित करण्यावर शासनाचा भर आहे. जालना लवकरच देशातील महत्त्वाचे रेशीम केंद्र म्हणून पुढे येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

जालना येथे नव्याने उभारण्यात आलेल्या रेशीम बाजारपेठेच्या नवीन इमारत लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.  यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन तथा पालकमंत्री पंकजा मुंडे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री संजय सावकारे, लोकसभा सदस्य कल्याण काळे, जालना महानगर पालिकेच्या महापौर वंदना मगरे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, आमदार हिकमत उढाण, माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार अरविंद चव्हाण, माजी आमदार विलास खरात, वस्त्रोद्योग विभागाच्या सचिव शैला ए., छत्रपती संभाजीनगर, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, रेशीम संचालनालय संचालक नागपूर विनय मुन, पोलीस महानिरीक्षक विरेंद्र कुमार मिश्र, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया, महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा,  पोलीस अधिक्षक तेघबीरसिंग संधु यांची उपस्थिती होती.

रेशीम बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जालन्याला ‘सिल्क सिटी’ करण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन कौतुकास्पद आहे. रेशीम उद्योगातून मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था निर्माण होण्याची क्षमता आहे. नव्याने सुरू झालेल्या रेशीम बाजारपेठेमुळे उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या मालासाठी थेट बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. पहिल्या लिलावाला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक असून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अधिकाधिक चांगला दर मिळावा, यासाठी व्यापारी आणि संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

कापूस-सोयाबीनला रेशीम शेतीचा पर्याय

मागील अनेक वर्षांपासून शेतकरी कापूस आणि सोयाबीन या प्रमुख नगदी पिकांवर अवलंबून आहेत. या पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी शेतकऱ्यांना पर्यायी नगदी पिकांचा पर्याय देणे आवश्यक आहे. रेशीम शेती हा त्यासाठी अत्यंत चांगला पर्याय असून, अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही यातून चांगले उत्पन्न मिळविण्याची संधी आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना रेशीम शेतीकडे वळविण्यासाठी प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्पादनापासून वस्त्रनिर्मितीपर्यंत संपूर्ण मूल्यसाखळी

केवळ रेशीम उत्पादन करून उपयोग नाही, तर त्यापुढील प्रक्रिया, धागानिर्मिती, वस्त्रनिर्मिती, साडी विणकाम, ब्रँडिंग आणि बाजारपेठ अशी संपूर्ण मूल्यसाखळी उभारणे महत्त्वाचे आहे. जालन्यात या दिशेने विविध प्रयोग सुरू आहेत. स्थानिक पातळीवर रेशीम वस्त्रनिर्मितीला चालना मिळाल्यास शेतकरी, महिला, विणकर, व्यापारी आणि युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

जालन्याच्या सिल्क उत्पादनांना ‘जालनाई’ ब्रँडने ओळखले जाईल

जालन्यातील महिलांनी रेशीमपासून साडी विणकाम सुरू केले असून त्यांचे कौशल्य आणि तयार होणाऱ्या वस्त्रांची गुणवत्ता उल्लेखनीय आहे. या महिलांना अधिक प्रशिक्षण, कौशल्यविकास आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास रेशीम वस्त्रनिर्मितीला मोठी चालना मिळू शकते. पैठणीला जशी स्वतंत्र ओळख मिळाली, त्याच धर्तीवर पालकमंत्री पकंजा मुंडे यांनी सुचविल्यानुसार जालन्यात तयार होणाऱ्या सिल्कच्या उत्पादनांना 'जालनाई' या स्वतंत्र ब्रँडने ओळखले जाईल अशी घोषणा करुन, ‘जालनाई’ ब्रॅन्ड लोगोचे विमोचन केले.

 ज्याप्रमाणे पैठणी साडी जगप्रसिद्ध आहे, त्याच धर्तीवर स्थानिक महिलांच्या कौशल्याच्या जोरावर 'जालना सिल्क' ला देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठा ब्रँड म्हणून विकसित केले जाईल असे त्यांनी सांगितले.

ड्रायपोर्टमुळे निर्यातीला मिळणार चालना

जालना येथे ड्रायपोर्ट सुरू झाल्यामुळे रेशीम उत्पादनाला देशांतर्गत बाजारपेठे बरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. एकेकाळी भारत जगाला रेशीम निर्यात करणारा देश होता. आता पुन्हा भारताने जागतिक रेशीम बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जालना येथील रेशीम बाजारपेठ आणि ड्रायपोर्ट या दृष्टीने महत्त्वाची पायाभूत सुविधा ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आणि कौशल्यविकासावर भर

रेशीम उद्योगाचा विस्तार करण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. रेशीम उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया, गुणवत्ता, बाजारपेठ आणि मूल्यवर्धन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच प्रशिक्षणासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करावा. कौशल्यविकासाच्या माध्यमातून शेतकरी आणि महिलांना या संपूर्ण मूल्यसाखळीत सहभागी करून घेण्यावर आगामी काळात भर दिला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गुन्हेगारीवर वचक  आणि जलद न्याय

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रभावी तपास आणि जलद न्यायप्रक्रिया आवश्यक असून, अलीकडील एका गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी अल्पावधीत आरोपपत्र दाखल करून न्यायालयीन प्रक्रिया गतिमान केल्याबद्दल त्यांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण होण्यासाठी अशा प्रकारची जलद आणि प्रभावी कार्यवाही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार अर्जुन खोतकर म्हणाले की, जालन्यात रेशीम (कोष) खरेदी केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे आता शेतकरी बांधवांना न्याय मिळाला असून, पूर्वी रेशीम कोष विक्रीसाठी हजारो किलोमीटर दूर जावे लागणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे. आता जालन्यासाठी 'टेक्सटाईल पार्क' मंजुर करण्याची मागणी केली.

प्रारंभी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जालना जिल्ह्यातील रेशीम शेती व उद्योगातील संधीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती सादर केली.

विविध विकास कामांचे लोकार्पण

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते अंबड येथील नविन पोलिस स्टेशन इमारत आणि जिल्हा परिषद जालना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र रांजणी, राणी उंचेगाव, पिंपरखेड बु., दुधना काळेगाव, हसनाबाद, शहागड, वाकुळणी या सात नविन इमारतीचे ऑनलाइन लोकार्पण करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी घनसावंगी तालुक्यातील शेतकरी श्री. भागवत पंडीतराव भानुसे आणि श्री. भाऊसाहेब दत्ता निवदे यांचा सपत्नीक सत्कार केला. तसेच गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी अल्पावधीत आरोपपत्र दाखल करून न्यायालयीन प्रक्रिया गतिमान राबविल्याबद्दल सरकारी वकील श्रीमती मुकीम यांचा सत्कार केला.

यावेळी कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, उपसंचालक महेंद्र ढवळे, रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता डी.एन. कोल्हे, जिल्हा रेशीम अधिकारी वाखारे, रेशीम विकास अधिाकरी शंकर बराट, शेतकरी, व्यापारी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांची उपस्थिती होती. 

-*-*-*-*-*-


Thursday, 13 August 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जालना जिल्हा दौरा

 

 

जालना,दि.13 (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी जालना  जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छत्रपती संभाजीनगर येथून जालना येथे सकाळी 11.45 वाजता आगमन व रेशीम कोष बाजारपेठ, नवीन इमारत, सिरसरवाडी रोड, जालना येथील रेशीम कोष बाजारपेठ इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 12.10 वाजता एमआयडीसी फेस वन छत्रपती संभाजीनगर चौफुली-जालनाकडे प्रयाण करतील. दुपारी 12.15 वाजता एमआयडीसी फेस वन छत्रपती संभाजीनगर चौफुली-जालना येथे आगमन व भारतीय जनता पार्टी, जालना जिल्हा कार्यालयाच्या भूमीपूजन समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर 01.30 वाजता जालना येथुन छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 


 

            जालना,दि.13 (जिमाका):  राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहेत.

पालकमंत्री श्रीमती मुंडे यांचे शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह छत्रपती संभाजीनगर येथून जालनाकडे प्रयाण करतील. सकाळी 10.00 वाजता आगमन व एमआयडीसी फेस वन छत्रपती संभाजीनगर चौफुली- जालना येथील भाजपा जिल्हा कार्यालय नवीन इमारत भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती राहतील. त्यानंतर  सकाळी 11.00 वाजता  रेशीम कोष बाजारपेठ, नवीन इमारत, सिरसरवाडी रोड, जालना येथे रेशीम कोष बाजारपेठ इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित राहतील. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत, रांजणी,राणी उंचेगाव, पिंपरखेड बु. दुधना काळेगाव, हसनाबाद, शहागड, वाकुळणी येथील  सार्वजनिक आरोग्य  विभाग, जिल्हा परिष्ज्ञद, लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी 1.00 वाजता जालना येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील. दुपारी 2.00 वाजता  महात्मा फुले चौक औंरगापुरा छत्रपती संभाजीनगर येथे आगमन व मुख्यमंत्री महोदयांच्या हर घर तिरंगा अभियान रॅलीत सहभागी होतील. सायंकाळी 5.00 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून जालनाकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6.00 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथे आगमन व राखीव.

            शनिवार, दि. 15 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथील  भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजीत शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी 9.35 वाजता शासकीय वाहनाने परळी वैजनाथ जिल्हा बीडकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-*-

 

जालना जिल्ह्यात 15 ऑगस्टपासून ‘जलसंधारण सप्ताह’ 21 ऑगस्टला महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर; युवकांसाठी रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन स्पर्धा

 


 

जालना,दि.13(जिमाका) : मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यात 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत जलसंधारण सप्ताह, तर 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची आठवण म्हणून 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येत असून, या उपक्रमांतून मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जलसंधारण सप्ताहाचा प्रमुख आकर्षण असलेल्या महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर चे आयोजन 21 ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यात करण्यात येणार आहे. (Save Soil, Save Water, Secure Tomorrow) ही या उपक्रमाची संकल्पना असून, पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हा संदेश देण्यात येणार आहे. या वॉकेथॉनमध्ये 15 वर्षे व त्यावरील पुरुष व महिला सहभागी होऊ शकतील. जास्तीत जास्त तीन किलोमीटर अंतराची ही वॉकेथॉन असून, सहभागींकडून मृद व जलसंधारणाची शपथही घेण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

वॉकेथॉनमध्ये लोकप्रतिनिधी, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, NCC, NSS, नेहरू युवा केंद्र, स्वयंसेवी संस्था, विविध क्रीडा व सामाजिक संघटना, डॉक्टर, कलाकार, उद्योजक, खेळाडू, व्यापारी संघटना तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी 6 वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थिती, 6.15 वाजता वॉर्मअप, 6.45 वाजता मृद व जलसंधारणाची शपथ, 7 वाजता वॉकेथॉनचा प्रारंभ आणि 8 वाजता समारोप होणार आहे. प्रथम पाच विजेत्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

युवकांसाठी रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन स्पर्धा

जलसंधारण सप्ताहादरम्यान 15 ते 30 वर्षे वयोगटातील युवक-युवतींसाठी ‘Reel for Soil and Water Conservation’ ही जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धकांनी 30 ते 60 सेकंदांची Instagram Reel तयार करून स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करायची असून, संबंधित अधिकृत Instagram Account ला Tag करणे तसेच #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे.

माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, पावसाचे पाणी संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, पारंपरिक जलसंधारण पद्धती तसेच नाविन्यपूर्ण जलसंवर्धन उपाय यांसारख्या विषयांवर रील तयार करता येणार आहे. Storytelling, Acting, Music, Dance, Animation, AI Creative, Comedy, Short Film, Before-After आणि Drone Visuals अशा विविध माध्यमांचा वापर करता येईल.

स्पर्धेचे परीक्षण विषय व संदेश, कल्पकता, सामाजिक संदेश, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता आणि Instagram Engagement या निकषांवर एकूण 100 गुणांमध्ये करण्यात येणार आहे. केवळ Likes किंवा Followersच्या आधारे विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि Social Media Engagement यांचा समतोल साधण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ या नावाने प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 25 हजार, 15 हजार आणि 10 हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

शाळा-महाविद्यालयांत विविध उपक्रम

15 ऑगस्ट ते 26 जानेवारी दरम्यान जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला व पोस्टर, वाद-विवाद अशा स्पर्धांसह ‘एक शाळा–एक शोषखड्डा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देणे, जलमित्र किंवा जलदूत घोषित करणे, 21 ऑगस्ट रोजी सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करणे, मृद व जलसंधारणाची शपथ घेणे तसेच पुरस्कार व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.

अभियानाच्या कालावधीत ग्रामीण व शहरी भागात मृद व जलसंधारणाच्या कामांचे भूमीपूजन व लोकार्पण, अमृत सरोवरांना भेट, वृक्षारोपण, ‘एक पेड मां के नाम’ उपक्रम, लोकसहभागातून नाला, तलाव, विहीर व पाझर तलाव स्वच्छता तसेच शेततळे, शेतबंधारे, CCT व Deep CCT कामांची पाहणी आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

एक रिल... मातीसाठी ! एक रिल... पाण्यासाठी! एक रिल... सुरक्षित भविष्यासाठी ! या संदेशातून युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रिल आणि वॉकेथॉनच्या नोंदणीकरीता https://register.mahaevent.co.in/ या लिंकचा वापर करण्यात आला आहे. जलसंधारण ही केवळ शासकीय जबाबदारी न राहता लोकचळवळ व्हावी, यासाठी जालना जिल्ह्यातील नागरिकांनी या सर्व उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता एन. पी. कटके यांनी केले आहे.

माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा; जलसमृद्ध महाराष्ट्र घडवा हा संदेश या अभियानाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

-*-*-*-*-*-*-

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत सीईटीच्या विद्यार्थ्यांना प्रलंबित अर्जामधील त्रुटीपूर्तता करण्याचे आवाहन

 


जालना,दि.13 (जिमाका) : सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात राज्य सामाईक प्रवेश परिक्षेच्या आधारे आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, विजा-अ, भज, इमाव, विमाप्र, एसईबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतून उर्तीण झालेल्या विद्यार्थ्याच्या अर्जाची पडताळणी करण्याची कार्यवाही जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या स्तरावर सुरु आहे. त्या अनुषंगाने जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी त्रुटी पूर्तता करणेसाठी विशेष मोहिम समिती कार्यालयामार्फत हाती घेण्यात आली आहे.

 

माहे जून 2025 ते जुलै 2026  या कालावधीत समितीकडे एकुण 14 हजार 520 अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी तब्बल 12 हजार 690 इतक्या मोठ्या संख्येने वैधता प्रमाणपत्रे निकाली काढण्यात आली असून ती ऑनलाईन स्वरुपात वितरित करण्यात आली आहेत. यात अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, एसईबीसी, विमाप्र व इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्याचा व लाभार्थ्यांचा समावेश आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल 2026 पासून आजतागायत एकुण 4 हजार 300 लाभार्थ्यांना वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. वास्तविकतः जात वैधता प्रमाणपत्रासाठी कागदपत्रांची तपासणी ही अत्यंत वेळेची व गुंतागुंतीची प्रक्रिया असते. मात्र जालना समितीने ऑनलाईन व ऑफलाईन आलेल्या कागदपत्रांची अचूक तपासणी करुन ही प्रक्रिया गतिमान केली आहे. कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्यास लाभार्थ्यांना तात्काळ कळविले जाते. लाभार्थ्यांनी त्रुटींची पूर्तता केल्यानंतर, प्रस्तावाला तत्वतः मान्यता देऊन तो अंतिम मंजूरीसाठी समितीसमोर ठेवला जातो. समिती कागदपत्रांची कसून पडताळणी करुन प्रस्तावाला अंतिम मान्यता देते आणि त्यानुसार लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित केले जाते.

 

नवीन अर्ज दाखल करणारे किंवा ज्यांचे अर्ज प्रलंबित आहेत अशा अर्जदारांची फसवणूक व दिशाभूल करण्यासाठी समिती कार्यालयाच्या परिसरात किंवा बाहेर काही असामाजिक तत्व (दलाल) सक्रिय असण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा कोणत्याही व्यक्तिवर अर्जदारांनी विश्वास ठेवू नये अणि आपली फसवणूक टाळावी, असा इशारावजा महत्वाचा इशारा जालना जात पडताळणी समितीकडून देण्यात येत आहे.

-*-*-*-*-*-*-