Wednesday, 24 June 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्ज तपासणीस मुदतवाढ

 


जालना, दि.24 (जिमाका): शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या/शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनु. जाती व नवबौध्द प्रवर्गातील विदयार्थ्यांपैकी 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात/ शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विदयार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील मुलां/मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणीक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून सदर योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर दि. 30 मे 2026 पर्यंत स्विकारण्यात आलेले होते. महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या निर्देशानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जाच्या तपासणीसाठी अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे.

 

स्वाधार योजनेच्या अर्जामध्ये विविध त्रुटी आढळून आल्याने तसेच विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या मागण्यांचा विचार करून अर्ज तपासणी प्रक्रिया पूर्ण 7 जुलै 2026 पर्यंत विद्यार्थ्यांना अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत ऑनलाईन पोर्टलवर ज्या विदयार्थ्याना 210 विदयार्थ्यांना सेंट बैंक करण्यात आले आहे अशा विदयार्थ्यानी त्रुटीचे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावयाचे आहेत. या कालावधीत विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाची स्थिती तपासून आवश्यक कागदपत्रे व माहितीची पूर्तता करावी. संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, तालुका समन्वयक, समतादूत तसेच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना याबाबत आवश्यक मार्गदर्शन करावे. मुदत संपल्यानंतर अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असल्याने मागील शैक्षणिक वर्षातील 210 Sent Back विदयार्थ्यांनी त्रुटीची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. अनिता राठोड,  यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

 

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

 

जालना, दि.24 (जिमाका): वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याकरिता इच्छुकांनी https://vnvjntdc.org/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार, राजे उमाजी नाईक, परमपुज्य गंगानाथ महाराज, ब्रम्हलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी, श्रीकृष्ण आणि विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) अंतर्गत बीज भांडवल कर्ज योजना, एक लाख रूपये थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना राबवून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो. व्याज परतावा योजनेत संपूर्ण कर्ज बँकेचे राहणार आहे. तथापि कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास कमाल 12 टक्क्यापर्यंतचे व्याज लाभार्थीचा बँक खात्यावर महामंडळाच्यावतीने जमा करण्यात येणार आहे. एक लाख थेट कर्ज योजनेमध्ये संपूर्ण कर्ज महामंडळाकडून दिले जाणार आहे. लाभार्थीने 2 हजार 85 रुपायांचा नियमितपणे 48 समान मासिक हप्त्यामध्ये परतफेड केल्यास लाभार्थ्यांना व्याज अदा करावे लागणार नाही, परंतु थकित हप्त्यांवर दर साल दर शेकडा 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल. अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत अ, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना 431203. तसेच कार्यालयाच्या 02482-224790 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे  आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. आर. बडगुजर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे  केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

अमृत मानस मित्र चे मोफत प्रशिक्षण मिळणार 29 जून 2026 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 


 

जालना, दि.24 (जिमाका): "अमृत" मार्फत सुवर्णसंधी! अमृत मानस मित्र' प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची अमृत मार्फत मोफत प्रशिक्षण मिळणार आहे.या प्रशिक्षणाचे प्रमुख वैशिष्ट्ये  15 दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण, अधिकृत प्रमाणपत्र, फील्ड प्लेसमेंट व रोजगारक्षम कौशल्य विकासाची संधी हे आहे.

मानस मित्र प्रशिक्षण नेमकं काय आहे?

विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक सक्षमीकरण आणि समुपदेशन सेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत (AMRUT) यांच्या वतीने "अमृत मानसमित्र" समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH), पुणे ही महाराष्ट्र शासनाची मानसिक आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था तांत्रिक व शैक्षणिक भागीदार म्हणून कार्यरत राहणार आहे. हा अभ्यासक्रम मानसिक आरोग्य, विद्यार्थी समुपदेशन, भावनिक आधार, संवाद कौशल्ये, Active Listening, सहानुभूतीपूर्ण प्रतिसाद, संकट व्यवस्थापन, जीवनकौशल्ये आणि मानससामाजिक सहाय्य या विषयांवर आधारित असून सहभागी उमेदवारांना प्रत्यक्ष कार्यक्षम समुपदेशक म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.

 

अधिकृत प्रमाणपत्र

प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अमृत व महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था यांचे संयुक्त अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

प्रशिक्षणाचे स्वरूप

पुणे येथे प्रथम 15दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण, Interactive Sessions, Case Studies, Practical Activities आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन. त्यानंतर एक महिना प्रॅक्टिकल फिल्ड एक्सपोजर (यात जिल्हा पातळीवर एका शाळा महाविद्यालयाला जोडून देण्यात येईल), त्यानंतर 3 ते 5 महिने प्रत्यक्ष व्यवसायासाठी MIMH चे monitoring, mentoring, नियमित ऑनलाईन सत्र आणि प्रत्यक्ष अडचणीचे निवारण आणि मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष व्यावसायिक सहाय्य, असे सर्वसाधारण स्वरूप आहे.

प्रशिक्षण कोण घेणार?

संपूर्ण प्रशिक्षण महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे घेतले जाईल. त्याचप्रमाणे अमृतमार्फत विविध तज्ञ मार्गदर्शकाचे वेळोवेळी अनुभवाधारित प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि सहकार्य मिळणार आहे.

प्रशिक्षणानंतर काय?

 

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH) च्या तज्ज्ञांकडून नियमित ऑनलाइन मार्गदर्शन दिले जाईल. यामध्ये -  केस डिस्कशन, नियमित ऑनलाइन सुपरव्हिजन,  Mentoring Sessions, प्रत्यक्ष कामातील अडचणीचे निराकरण, व्यावसायिक मार्गदर्शन, कौशल्य वृद्धीसाठी सतत Hand-holding Support यांचा समावेश असेल.

 

 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020

 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार कौशल्याधारित शिक्षण, समाजाभिमुख प्रशिक्षण आणि रोजगारक्षमतेवर भर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या समुपदेशना ची तरतूद आहे.

रोजगार व करिअर संधी

अमृत मानस मित्र उपक्रमात मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्य करण्याची संधी, मानसिक आरोग्य क्षेत्रातील रोजगारक्षम कौशल्ये, सामाजिक संस्थांमधील रोजगाराची संधी आणि व्यावसायिक नेटवर्किंग अशा विविध संधी उपलब्ध आहेत.

 

पात्रता निकष

 

खालीलपैकी कोणतीही पदव्युत्तर पदवी असलेले अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

 

एम.ए./एम.एस्सी. मानसशास्त्र, एम.ए./एम.एस्सी. समुपदेशन मानसशास्त्र,मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW).

या क्षेत्रात पूर्वीपासून कार्यरत व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

 

निवास व्यवस्था

अमृत मानस मित्र हे प्रशिक्षण अमृत च्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी पूर्णपणे मोफत आहे. तथापि प्रशिक्षणासाठी आवश्यक निवास, भोजन व राहण्याची व्यवस्था उमेदवारांनी स्वतः स्वखर्चाने करावयाची आहे.

 

अर्ज कसा करावा? छाननी प्रक्रिया कशी आहे ?

 

https://mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर सर्व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करावा. पात्र उमेदवारांच्या अर्जाची छाननी करून, ओरिएंटेशन सत्र आणि इतर आवश्यक परीक्षा / मुलाखत घेऊन, पात्र व योग्य उमेदवारां ची नावे निश्चित करण्यात येतील. या क्षेत्रातील अनुभव लक्षात घेऊन, तसेच प्रथम येईल त्यास प्राधान्य या तत्त्वानुसार उमेदवारांची नावे निश्चित करण्यात येतील.

 

अर्ज कधीपर्यंत करता येईल ?

 

पहिल्या बॅच साठी अर्जदारांना 29 जून 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

डॉ. कापसे (MIMH, पुणे) यांचे मत :

 

"विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या वाढत्या गरजा लक्षात घेता प्रशिक्षित विद्यार्थी समुपदेशकांची आवश्यकता आज पूर्वर्वीपक्षा अधिक आहे. 'अमृत मानसमित्र' प्रशिक्षण हा केवळ प्रमाणपत्र अभ्यासक्रम नसून प्रत्यक्ष कौशल्य विकास, फील्ड अनुभव, तज्ज्ञांचे पर्यवेक्षण आणि व्यावसायिक मार्गदर्शन यांचा समन्वय साधणारा राज्यातील एक अभिनव उपक्रम आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात अर्थपूर्ण करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी ही निश्चितच एक सुवर्णसंधी आहे. इच्छुकांनी या संधीचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, अमृत कार्यालय,यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.अधिक माहितीसाठी : जिल्हा कार्यालय, दूसरा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना संपर्क क्र. 7391065474

-*-*-*-*-*-

 

 

दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण

 


 

जालना, दि.24 (जिमाका): महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा परिषद, सांगली आत कायर्रत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था पौड दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षणा देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गाना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबईची शासन मान्यता आहे. या संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील FICCI AWARD 1999 हा प्राप्त झालेला आहे. सन 2026-27 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे. माफक जागा असल्याने त्वरीत संपर्क साधा.

 

प्रवेशासाठी नियम अटी व सवलती.

अभ्यासक्रमाचे नाव  

 सर्टिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन वुईथ एम. एस. ऑफिस (संगणक कोर्स)

मोटार अॅन्ड आर्मेचर वायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज, (इलेक्ट्रीक कोर्स)

शैक्षणिक पात्रता - किमान इ. 8 वी पास किमान इ. 9 वी पास,वयोमर्यादा: 16 ते 40 वर्ष, प्रशिक्षण कालावधी: 1 वर्ष, फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जातो.

सोई व सवलती

प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय.अद्यावत व परीपूर्ण संगणक कार्यशाळा.भरपूर प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण.नेटवकींग व इंटरनेटची सुविधा.अनुभवी व तज्ञ निदेशक.उज्वल यशाची परंपरा.समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी बीज भांडवल योजना

अर्ज केंव्हा, कसे व कोठे करावेत

 

प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज ता. मिरज जि. सांगली पिनकोड: 416 410 नंबर 0233-2222908 मोबाईल 9922577561,9325555981 या पत्यावर पोस्टा व्दारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरुन द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, SSC मार्कशिट व प्रमाणपत्र, अपंगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, UDID कार्ड, Domicile प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे पाठवावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ञ समिती व्दारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल.

 

तरी माफक जागा असल्याने गरजू दिव्यांगाना या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरीत संपर्क साधावा. ग्रामीण व शहरी भागातील लोकांना आवाहन करणेत येते की या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणांस ज्ञात असलेल्या गरजू दिव्यांग बांधवाना या शासकीय योजनेची माहिती करुन देण्याचे आवाहन शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र, मिरज ता. मिरज जि. सांगली अधिक्षक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व 37 (3) अन्वये आदेश जारी

 


 

जालना, दि.24 (जिमाका): जिल्ह्यात दि.17 जुन, 2026 ते दि. 26 जुन,2026 या कालावधीत मोहरम सण साजरा होणार आहे. दि. 26 जुन,2026 रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) व छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात येणार आहे.तसेच दि. 29 जुन,2026 रोजी वटपोर्णिमा इत्यादी सण, जयंती, उत्सव साजरे होणार आहेत. या सण, उत्सव, जयंतीच्या अनुषंगाने जिल्ह्यात व शहरात मिरवणुका व विविध कार्यक्रम आयोजित होतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरीक एकत्र येत असतात.

 तसेच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण बचाव,धनगर समाज तसेच बंजारा समाज एस.टी. प्रवर्गात समाविष्ट करावा यासाठी विविध प्रकारचे आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारात येत नाही.

तसेच महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द गटबाजी व आरोप प्रत्यारोप विविध कारणांवरुन सुरु आहे. तसेच शेतक-यांचे विविध मागणीसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

त्यामुळे अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही  आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.

 

   तसेच  अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये  पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.   

 

हा आदेश कामावरील कोणताही ‍ अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही.  तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.

       हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि.24 जुन,2026 रोजीच्या 6.00 वाजेपासुन ते  दि. 7 जुलै,202  रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

                                                                    -*-*-*-*-*-        

 

 

 

 

Tuesday, 23 June 2026

जालना जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा 1 जुलै रोजी मुंबईत राज्यस्तरीय कृषि पुरस्कारांनी होणार गौरव

 


जालना, दि.23 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत वर्ष 2023 आणि 2024 मधील विविध राज्यस्तरीय कृषि पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, जालना जिल्ह्यातील प्रयोगशील, नाविन्यपूर्ण आणि अभ्यासू शेतकऱ्यांनी या पुरस्कारांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्ह्याच्या कृषि क्षेत्राचा गौरव वाढविणाऱ्या या गुणवंत शेतकऱ्यांचा भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, दि. 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम (एनएससीआय डोम), वरळी येथे आयोजित करण्यात आला आहे.

 

या सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषि राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मृद व जलसंधारण राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कृषि सचिव परिमल सिंह आणि कृषि आयुक्त सूरज मांढरे यांचीही कार्यक्रमास विशेष उपस्थिती असणार आहे.

 

पुरस्कारांच्या रकमेतील चौपट वाढ

 

महाराष्ट्र शासनाने 7 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यस्तरीय कृषि पुरस्कारांच्या रकमेतील मोठी वाढ केली आहे. नव्या धोरणानुसार पुरस्कारांच्या रकमांमध्ये जवळपास चौपट वाढ करण्यात आली असून, निवड झालेल्या शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि वाढीव रोख रक्कम प्रदान करण्यात येणार आहे.

 

यामध्ये वसंतराव नाईक कृषि भूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार आणि कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कारासाठी प्रत्येकी दोन लाख रुपये, युवा शेतकरी पुरस्कारासाठी एक लाख वीस हजार रुपये तर वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी 44 हजार रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे. तसेच पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक पुरस्कार्थीस 15 हजार रुपये दैनिक व प्रवास भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती कृषि विभागाने दिली आहे.

 

वर्ष 2023 मधील जालना जिल्ह्याचे पुरस्कार विजेते

 

वर्ष 2023 साठी जालना जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांची विविध पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. परतूर तालुक्यातील रायपूर येथील अभयकुमार बाजीराव काळुके यांना प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक कृषि भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. बदनापूर तालुक्यातील वरुडी येथील जयकिशन रामदास शिंदे यांना कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार तर वाकुळणी येथील सोमनाथ सुधाकर अवघड यांना युवा शेतकरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील श्रीकांत बेलेश्वर आखाडे यांची वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

 

 

 

वर्ष 2024 मधील पुरस्कार विजेते

 

वर्ष 2024 साठी अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील सौ. रंजना हनुमंतराव काळे यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याच तालुक्यातील लालवाडी येथील गोवर्धन प्रभाकर उगले यांना कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अंबड तालुक्यातील आलमगाव येथील प्रल्हाद दत्तात्रय येळेकर यांची वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

 

जिल्ह्याच्या कृषि प्रगतीचा सन्मान

 

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, जलव्यवस्थापन, पीकपद्धतीतील नवकल्पना आणि कृषी क्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रयोगांच्या बळावर राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या पुरस्कारांमुळे जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळणार असून, कृषि क्षेत्रातील नवोपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल तसेच जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी सर्व पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशाबद्दल गौरव व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्याच्या कृषि वैभवात भर घालणाऱ्या या यशस्वी शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय सन्मान हा संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

-*-*-*-*-*-*-

जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश; भूसंपादन प्रकरणातील 1.31 कोटींची रक्कम उच्च न्यायालयात जमा देवला येथील शेतकरी बांधवांकडून जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार


 


जालना,दि.23(जिमाका) : दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या भूसंपादन व जप्ती प्रकरणात जालना जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे महत्त्वपूर्ण प्रगती झाली असून, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रयत्नांतून कार्यकारी अभियंता, जालना पाटबंधारे विभाग, जालना यांनी रुपये 1 कोटी 31 लाख 93 हजार 56 इतकी रक्कम उच्च न्यायालयात जमा केली आहे. या कार्याबद्दल मौजे देवला, ता. परतूर येथील रामदास लाटे व शंकर लाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.

 

प्राप्त माहितीनुसार, संबंधित भूसंपादन व जप्ती प्रकरण अनेक वर्षांपासून न्यायप्रविष्ट होते. या प्रकरणात न्यायालयीन आदेशानुसार आवश्यक रक्कम जमा करण्याची प्रक्रिया रखडलेली होती. मात्र जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांशी सातत्याने समन्वय साधून आवश्यक कार्यवाही केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जालना पाटबंधारे विभागाने आवश्यक निधीची पूर्तता करून एकूण रु.1,31,93,056  इतकी रक्कम उच्च न्यायालयात जमा केली.

 

या निर्णयामुळे संबंधित जमीनधारकांना न्याय मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली असून प्रकरण निकाली निघण्यासाठी महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. जिल्हा प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेबद्दल परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 

याच पार्श्वभूमीवर मौजे देवला येथील रामदास लाटे व शंकर लाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच संबंधित प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून न्यायालयीन प्रक्रियेला गती दिल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

-*-*-*-*-*-*-