Tuesday, 24 February 2026

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत तीन दिवसीय विक्री व प्रदर्शनाचे आयोजन

 


 

जालना, दि.24 (जिमाका):-  जालनातील पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांच्या हाताला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी भारत सरकारच्या 'एमएसएमई' मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना प्रदर्शन व विक्री' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जुना जालना भागातील मस्तगढ येथील शितल गार्डन येथे दि.25 ते 27 फेब्रुवारी 2026 दरम्यान हे प्रदर्शन भरणार असून यात 50 हून अधिक वैविध्यपूर्ण स्टॉल्सचे आकर्षण असणार आहे. तरी स्थानिक कारागिरांच्या मेहनतीला दाद देण्यासाठी आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी जालना जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन एमएसएमई विकास कार्यालयाचे सहायक संचालक राहुलकुमार मिश्रा यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

प्रदर्शन विक्रीचे उदघाटन बुधवार, दि.25 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 5 वाजता शितल गार्डन जालना येथे महापौर वंदना मगरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., एमएसएमई विकास कार्यालयाचे सहायक संचालक राहुलकुमार मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून त्यांचे मार्गदर्शनही मिळणार आहे.

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांच्या उत्पादनांना थेट व्यासपीठ मिळवून देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये सुतार, लोहार, सुवर्णकार, कुंभार, मूर्तिकार, मोची, चटई, झाडू आणि खेळणी निर्माते अशा विविध 18 प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना आपली कला सादर करण्याची आणि वस्तूंची थेट विक्री करण्याची नि:शुल्क संधी देण्यात आली आहे. केवळ विक्रीच नव्हे, तर उद्योजकांना तांत्रिक बळ देण्यासाठी या तीन दिवसांत ब्रँड नोंदणी आणि बौद्धिक संपदा या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. तसेच 26 फेब्रुवारी रोजी स्वयंरोजगार कार्यशाळा आणि संध्याकाळी 'संगीत संध्या' या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद नागरिकांना घेता येईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तीन दिवसीय प्रदर्शन सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुले असून सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य राहणार आहे. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, खादी व ग्रामोद्योग अधिकारी  बी. के. वाघमारे, कौशल्य विकास विभागाचे अधिकारी  यांची यावेळी उपस्थिती होती. या उपक्रमाला लघु उद्योग भारती आणि दलित भारतीय वाणिज्य एवं उद्योग चेंबर (डिक्की), भीम उद्योग अभियान, अखिल भारतीय व्यापारी परिसंघ जालना ईकाईसह विविध व्यापारी संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                            दि. 24 फेब्रुवारी, 2026

 

शासकीय सेवा व योजनाच्या महामेळाव्याचे आयोजन

 

जालना, दि.24 (जिमाका):-  नागरिकांच्या प्रलंबित शासकीय अडचणी सोडवण्यासाठी आणि विविध सरकारी योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जालना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. शनिवार दि.28 फेब्रुवारी रोजी भोकरदन तालुक्यातील राजूर येथे भव्य 'शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा' आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्यात महसूल, कृषी, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, पोलीस प्रशासन, महावितरण आणि परिवहन यासह किमान 30 विविध शासकीय विभागांचे स्टॉल्स उभारले जाणार आहेत. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नितेश एम. बंडगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

राजूर-भोकरदन रोडवरील पुण्याई लॉन्स येथे सकाळी 10 वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा जालना जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अरुण आर. पेडणेकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. तर न्यायमूर्ती सुशील मनोहर घोडेस्वार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा एम. मोहिते असतील. कार्यक्रमास जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक अजय बन्सल, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. बाबासाहेब इंगळे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अनिरुद्ध घुले पाटील आणि भोकरदन तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                       दि. 24 फेब्रुवारी, 2026

 

2 मार्चला लोकशाही दिनाचे आयोजन

जालना, दि. 24  (जिमाका) :-   जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याचे पहिल्या सोमवारी करण्याबाबत निर्देश आहेत. तरी जालना जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि. 2  मार्च 2026  रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

लोकशाही दिनाकरीता अर्जदार यांनी अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठवणे आवश्यक आहे. या लोकशाही दिनामध्ये अर्ज देताना त्यांनी संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व या तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही कार्यवाही झाली नाही, अशाच अर्जदाराने टोकन क्रमांकाच्या पावतीसह विहीत नमुन्यात दोन प्रतीमध्ये अर्ज सादर करावा. ज्या अर्जदाराने तालुकास्तरीय लोकशाही दिनात भाग घेतला नाही, अशा अर्जदाराचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांचे कार्यालयाकडुन सुचित करण्यात येत आहे. लोकशाही दिनात न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व,अपील, सेवाविषयक आस्थापनाविषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाशी तहसीलदार यांच्या स्वाक्षरीची पोच पावती तसेच त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापुर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल. ज्यांनी त्यापुर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे. परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नये. तसेच लोकशाही दिन विहीत नमुन्याचा अर्ज  http://jalna.nic.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

 

Monday, 23 February 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगे बाबा महाराज यांना अभिवादन

 


 

जालना, दि.23 (जिमाका):-  थोर समाजसुधारक संत गाडगे  बाबा  महाराज  यांच्या जयंतीनिमित्त  आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी  संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार सतीश तायडे, संपदा कुलकर्णी, दीपाली राऊत, सविता भोकरे,सविता पेरके, सविता मगरे, वैशाली ‍डिघोळे, विठ्ठल बोरकर, अतुल केदार, सुनिल काळूंके, अनिल हिवाळे, इंद्रजित नानोटे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यावेळी संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                         दि. 23 फेब्रुवारी, 2026

 

मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन

 

जालना, दि.23 (जिमाका):-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने वेब डिझायनिग वर आधारित  एक महिना व १. सायबर सिक्युरिटी ॲण्ड डेटाबेस रिकव्हरी वर आधारित,  ॲनिमेशन  ॲण्ड ग्राफिक्सवर आधारित  दोन महिने कालावधीचे अनिवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा की अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व  युवतींनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करावा किंवा या तांत्रिक माहितीच्या आधारे रोजगार मिळवावा. तरी इच्छुक व्यक्तींनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र जालना येथे सुरेखा मोरे कार्यक्रम आयोजक, मो.9699334648 यांच्याशी संपर्क साधावा किंवा एमसीईडीच्या संकेतस्थळावर www.mced.co.in/Barti या लिंकवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी 

   प्रशिक्षणात संबंधित विषयाचे प्रॅक्टिकलसह तांत्रिक ज्ञान तसेच उद्योजकीय ज्ञान जसे उद्योग उभारणी कशी करावी, शासकीय कर्जविषयक, अनुदान योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल, विक्री कला, उद्योग व्यवस्थापन, उद्योगांना भेटी, कर कायदा लायसन याविषयीची माहिती इत्यादी बाबींविषयी तज्ञ मार्गदर्शकाद्वारे प्रशिक्षण दिल्या जाईल.  या प्रशिक्षणासाठी लाभार्थीची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. प्रशिक्षणासाठी लाभार्थी हा 18 ते 45 वयोगटातील असावा, तो अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा, किमान दहावी  शिक्षण घेतलेले असावे, तो गेल्या पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा तसेच स्वतःचा स्वयंरोजगार,  रोजगार करण्याची तयारी असावी. प्रवेश अर्जासोबत आधार कार्ड, फोटो, स्वतःचा जातीचा दाखला, अंतिम सत्र गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला जोडणे आवश्यक आहे. असेही महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                         दि. 23 फेब्रुवारी, 2026

 

पाणीपट्टी थकविणाऱ्या ग्रामपंचायतींना आवाहन

 

जालना, दि.23 (जिमाका):-  जालना पाटबंधारे विभागांतर्गत विविध प्रकल्पांतून अनेक ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. मात्र या योजनांकडून पाणीपट्टी भरण्याबाबत सातत्याने टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले आहे. सध्या विभागाची 4 कोटी 85 लाख 63 हजार रुपयांची थकबाकी आहे. तरी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत योजनाधारकांनी सात दिवसांची अंतिम मुदतीत  आपली थकबाकी जमा करावी, असे कार्यकारी अभियंता एस. बी. कोरके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 मधील भाग 6, कलम 49 (ज) नुसार कारवाई केली जाणार आहे. यामध्ये केवळ पाणीपुरवठाच नव्हे, तर संबंधित योजनेचा विद्युत पुरवठाही खंडित करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                         दि. 23 फेब्रुवारी, 2026

 

50 बचतगटांना मिनी ट्रॅक्टर वाटपासाठी आज निघणार लॉटरी

 

जालना, दि.23 (जिमाका):- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नोंदणीकृत स्वयंसहायता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर वाटप करण्याच्या योजनेची जिल्हास्तरीय सोडत (लॉटरी) मंगळवार दि. 24 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर होणार आहे. जालना जिल्ह्यासाठी 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता 50 मिनी ट्रॅक्टरचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून पात्र बचतगटांमधून लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडले जाणार आहेत. तरी पात्र ठरलेल्या बचतगटांमधील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांनी या निवड प्रक्रियेसाठी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राजू एडके यांनी केले आहे. 

समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनेंतर्गत 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने तब्बल 90 टक्के अनुदानावर पुरविली जातात. या सुवर्णसंधीसाठी जिल्ह्यातील अनेक बचतगटांनी अर्ज केले होते. अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र आणि अपात्र ठरलेल्या बचतगटांची अंतिम यादी समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सांस्कृतिक सभागृहात दुपारी 3 वाजता ही सोडत प्रक्रिया पार पडणार आहे. निवडीमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी लॉटरी पद्धतीचा अवलंब केला जात आहे. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                         दि. 23 फेब्रुवारी, 2026

 

जालना येथे 5 बालकामगारांची सुटका;

 एका आस्थापना मालकावर गुन्हा दाखल

 

जालना, दि.23 (जिमाका):- जिल्ह्यात बालकामगार प्रथेला चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष शोध मोहिमेत पाच बालकामगारांची सुटका करण्यात आली. तसेच एका आस्थापना मालकावर पोलीस ठाण्यात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. जिल्हा बालकामगार अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

14 वर्षांखालील मुलांना कामावर ठेवणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. कायद्यानुसार, दोषी मालकास किमान 3 महिने कारावास आणि 20 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. जिल्ह्यात कुठेही बालकामगार आढळल्यास नागरिकांनी तत्काळ 1098 या चाईल्डलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

बालकामगार शोध मोहिमेसाठी जिल्हा बालकामगार अधिकारी, चाइल्ड हेल्पलाईन, पोलीस प्रशासन, आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या प्रतिनिधींचे एक विशेष संयुक्त पथक गठित करण्यात आले होते. या पथकाने शहरातील विविध दुकाने, हॉटेल्स आणि छोट्या उद्योगांवर अचानक छापे टाकले. या कारवाईत एकूण पाच अल्पवयीन मुले काम करताना आढळली. यात एका 14 वर्षांखालील बालकाचा आणि 16 वर्षांवरील चार किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. सुटका करण्यात आलेल्या सर्व मुलांना बालकल्याण समिती समोर हजर करण्यात आले आहे. समितीच्या आदेशानुसार या मुलांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, बाल आणि किशोर कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम 1986 चे उल्लंघन केल्याप्रकरणी एका मालकावर कठोर कारवाई करत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

Thursday, 19 February 2026

सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम उत्सवात साजरा शिवरायांचे स्मरण केल्यास आत्मविश्वास निर्माण होतो - आमदार अर्जुन खोतकर




 

जालना, दि.19 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्तात भिती नावाच्या पेशी नव्हत्या त्यामुळे ते प्रत्येक काम कुठल्याही भीतीविना करत असत. शिवरायांचे स्मरण केल्यास आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे प्रतिपादन आ. अर्जुन खोतकर यांनी केले.

 

सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 18 व 19 फेब्रुवारी, 2026 रोजी जालना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य कर्तृत्व व  शौर्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, टाऊन हॉल, जालना येथे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्री. खोतकर बोलत होते.

यावेळी महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत,  जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल उपजिल्हाधिकारी रोहयो मनिषा दांडगे, उप विभागीय अधिकारी जालना रामदास दौंड, तहसीलदार जालना छाया पवार, अतिरिक्त आयुक्त जालना शहर महानगरपालिका अर्जुन गिराम, उपायुक्त जालना शहर महानगरपालिका नंदा गायकवाड, तहसीलदार बदनापूर अतुल बने यांची उपस्थिती होती.

श्री. खोतकर पुढे म्हणाले की, स्वराज्य म्हणजे सत्ता नव्हे, स्वाभिमान आहे हे शिवरायांनी आपल्या कार्यशैलीतून दाखवून दिले. शिवाजी महाराजांनी त्या काळी लोकाभिमुख प्रशासनाची निर्मिती करुन गुड गव्हर्नस चा पाया रचला होता. शिवरायांनी शिस्तबद्ध, जलद व गतीमान प्रशासनाचा पाया रचला. शिवरायांची चिकीत्सकवृत्ती, निरीक्षण क्षमता, उत्कृष्ट कौशल्य, उत्तम अर्थतज्ञ यासह अन्य व्यक्तीमत्त्व विकसनाचे पैलू, उत्कृष्ट युद्धनिती, आधुनिक विचार सरणी हे त्यांचे वाखाणण्याजोगे गुण होते.

आज शाहीर रामानंद उगले यांनी

शिवजन्माचा पोवाडा, माता जिजाऊने शिवरायांना कसे घडवले याबाबतचा पोवाडा, अफजलखानाचा वधाचा पोवाडा, दोनच राजे इथे गाजले, गाडी गुंगराची हे पोवाडेचे बहारदार सादरीकरण केले. यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी या कार्यक्रमास प्रतिसाद दिला.

 

**-*-*-*-*-*-*-

Wednesday, 18 February 2026

शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा - महापौर वंदना मगरे

 

शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न

शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा

-         महापौर वंदना मगरे

 

चिमुकल्यांना शिवरायांच्या वेशभूषेत पाहून मनाला विशेष समाधान

-         उपमहापौर राजेश राऊत

 

·         शाहिरी कडाडली आणि अंगावर शहारे उमटले..!

·         गुरुवारी शाहिरी शिवदर्शन

 

 

जालना, दि.18 (जिमाका) :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जालना शहरात दि.18 आणि 19 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचा जागर होणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न आहे. जालनेकरांनी या दोन दिवसीय सांस्कृतिक मेजवाणीचा लाभ घ्यावा. तसेच आजच्या पिढीने शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन महापौर वंदना मगरे यांनी केले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 18 व 19 फेब्रुवारी, 2026 रोजी जालना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य कर्तृत्व व  शौर्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, टाऊन हॉल, जालना येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, शिवजन्मोत्सव सोहळा अध्यक्ष विश्वंभर तिरुखे,  सामाजिक कार्यकर्ते अरविंद देशमुख, अशोक पडूळ, किशोर मरकड, तहसीलदार छाया पवार, नायब तहसीलदार तुषार निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे ऊर्जास्थान आहेत. जालना शहरात पूर्वी जेव्हा वाहने नव्हती, तेव्हा शिवजयंतीची मिरवणूक मोठ्या उत्साहात बैलगाडीतून निघत असे. आज काळ बदलला आहे, तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. आता मोटारगाड्या आणि आधुनिक वाजंत्रीसह मिरवणुका निघतात. काळानुसार साजरीकरणाची पद्धत बदलली असली, तरी शिवरायांवरील निष्ठा तीच आहे. जयंतीच्या उत्सवापुरते मर्यादित न राहता, महापुरुषांचे उदात्त विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. आजच्या सोहळ्यात चिमुकल्यांना शिवरायांच्या वेशभूषेत पाहून मनाला विशेष समाधान वाटत आहे. अशा संस्कारांतूनच उद्याची पिढी घडणार आहे. असे प्रतिपादन उपमहापौर राजेश राऊत यांनी केले.

यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि त्यांचे विचार आजच्या पिढीला प्रेरणा देणारे आहेत. या महान कार्याचे स्मरण व्हावे आणि तो वारसा जपला जावा, याच मुख्य हेतूने या दोन दिवसीय कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी यावेळी शिवरायांना अभिवादन करत सर्व जालनेकरांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. गुरुवार दि.19 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध शाहीर रामानंद उगले यांच्या शाहिरी शिवदर्शन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातही शिवरायांच्या शौर्याच्या अनेक गाथा मांडल्या जाणार असल्याने जालनेकरांनी या कार्यक्रमालाही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

‘जागर शिवशाहीचा’ सादरीकरणाने जालनेकर भारावले;

शाहिरी कडाडली आणि अंगावर शहारे उमटले..!

 

बुधवार दि.18 फेब्रुवारी रोजी शाहीर अजिंक्य लिंगायत व त्यांच्या 11 कलावंतांनी सादर केलेल्या ‘जागर शिवशाहीचा’ या कार्यक्रमाने जालनेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.  डफावर थाप पडली, तुणतुण्याचा सूर छेडला गेला आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही घ्या मानाचा मुजरा...’ या ललकारीने टाऊन हॉलचा परिसर शिवमय झाला.

छत्रपती शिवरायांच्या बाललीलांचे वर्णन करणाऱ्या ‘गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या’ या शिवपाळण्याने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू ठरला तो ‘छत्रपती शिवाजी जाहले’ हे शिवराज्याभिषेक गीत. या गीतावेळी शाहिरांचा बुलंद आवाज आणि वाद्यांची साथ यामुळे अंगावर रोमांच उभे राहिले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक गोंधळाने झाली. ‘गोंधळाला ये...’ आणि ‘दार उघड बया आता दार उघड...’ या गीतांनी सभागृहात चैतन्य निर्माण केले. केवळ गाणीच नव्हे, तर विस्मृतीत चाललेल्या ‘तुमडी’ या कलाप्रकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला’ या गाण्यासोबतच कलाकारांनी सादर केलेली युद्धकला आणि लढतीची प्रात्यक्षिके पाहून प्रेक्षक थक्क झाले. महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्यात शाहिरी परंपरेतून शिवरायांचे शौर्य मांडण्यात आले.

प्रत्येक पोवाड्यागणिक सभागृहात होणारा ‘जय भवानी, जय शिवाजी’ जयघोष वातावरणात नवचैतन्य निर्माण करत होता. तर सुरातून उलगडणारा शिवरायांचा देदीप्यमान इतिहास अनुभवण्यासाठी जालनेकरांनी सभागृहात गर्दी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्‍त त्यांच्या कार्यकतृत्वावर व शौर्यावर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे  मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन उदघाटन करण्यात आले.

गुरुवारी शाहिरी शिवदर्शन

गुरुवार दि.19 फेब्रुवारी 2026 रोजी जालना टाऊन हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झी मराठी, सोनी मराठी आणि कलर्स मराठी फेम टीव्ही स्टार प्रसिध्द शाहिर  रामानंद उगले, माधवी उगले-माळी, शाहीर अप्पासाहेब उगले आणि 16 सहकलावंताचा समुह  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम शाहिरी शिवदर्शन सादर करणार आहेत.

-*-*-*-*-

 

Tuesday, 17 February 2026

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी दोन दिवसात येणाऱ्या 15 लाखाहून अधिक भाविकांसाठी सूक्ष्म नियोजनप्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

 




 

नवी मुंबई,दि.17(विमाका)-: ‘हिंद-दी-चादर’ या भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी आज दूरदृश्यप्रणालीव्दारे संबंधित यंत्रणांची पूर्वतयारीची सविस्तर बैठक घेऊन आढावा घेतला. कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

     बैठकीदरम्यान कोंकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोकण विभागातील संबंधित यंत्रणांनी आतापर्यंत केलेल्या कामांचा सविस्तर अहवाल सादर केला.

     या बैठकीस विभागीय अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) फरोग मुकादम, अपर आयुक्त (महसूल) वैशाली इंदानी- उंटवाल, अपर आयुक्त (विकास) माणिक दिवे, अपर आयुक्त (आस्थापना) मिनल कुटे, सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) विजयकुमार म्हसाळ, सहआयुक्त (करमणूक) रविंद्र पवार, उपायुक्त (नगरपालिका) डॉ. सागर घोलप,  सहआयुक्त (विकास) डॉ.प्रदीप घोरपडे, प्रभारी माहिती उपसंचालक मनोज सानप, तहसिलदार गजानन धुमाळ उपस्थित होते.

     यावेळी कोंकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कार्यक्रमस्थळी पायाभूत सुविधा, वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सेवा, स्वच्छता व आपत्कालीन यंत्रणा आदी बाबींबाबतची तयारी पूर्णत्वाकडे जात असल्याची माहिती दिली.

      कार्यक्रमस्थळी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष मार्गयोजना तयार करण्यात आली आहे. पोलीस विभागाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून सीसीटीव्ही यंत्रणा, नियंत्रण कक्ष तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

     आरोग्य सेवांच्या दृष्टीने ग्रामीण भागात आतापर्यंत २ हजार १५९ आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. कार्यक्रमस्थळी ५ तात्पुरती वैद्यकीय केंद्रे आणि एक आयसीयू उभारण्यात येणार आहे. तसेच जवळील रुग्णालयांमध्ये ३५० खाटा आणि ७५ आयसीयू खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत तात्पुरती वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका व प्राथमिक उपचार केंद्रांची व्यवस्था केली जाणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.

     या कार्यक्रमासाठी निवडण्यात आलेल्या खारघर, नवी मुंबई येथील ओवे मैदानाची क्षमता एकावेळी सुमारे ५ लाख भाविकांची असून, मुख्य मंडपात ८० हजार भाविक बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे.  लंगर व्यवस्थेसाठी सुमारे अडीच लाख भाविकांचा विचार करण्यात आला असून, १२ हजार ५०० भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील ५ दिवसांत ते पूर्ण होणार आहे.तसेच पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, वीजपुरवठा आणि प्रकाशयोजना यांसाठी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.      

      कार्यक्रमादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून कार्यवाही करावी, असे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी अधोरेखित केले.

     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रचार व प्रसिध्दी हा महत्वाचा भाग असल्याने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोकण विभागातील शासकीय व खासगी शाळांमध्ये आतापर्यंत राबविण्यात आलेल्या "हिंद दी चादर" कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिध्दीसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रभातफेऱ्या, निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता मोहीम अशा विविध कार्यक्रमांचा अहवाल सादर केला.    

     कोकण विभागांतर्गत येणाऱ्या ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हयांच्या ग्रामीण भागातील ५ लाख १७ हजार विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभाग घेतला असून, ४ हजार ३८१ फोटो आणि २ हजार १२५ व्हिडिओ हिंद दी चादर या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या https://gurutegbahadurshahidi.com या पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत.     

    नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रातील सुमारे १७ लाख विद्यार्थी विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या प्रचारासाठी मुंबई शहर, उपनगर आणि कोकण विभागातील सर्व चित्रपटगृहांमध्ये सुप्रसिध्द गायक सतिंदर सरताज यांनी गायलेले विशेष गीत प्रदर्शित करण्यात येत आहे. तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल, उल्हासनगर, भिवंडी या नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात एकूण 219 होर्डिंग्जवर  "हिंद दी चादर" कार्यक्रमाची प्रचार प्रसिध्दी करणारे मजकूर लावण्यात आले आहेत. 

      देशभरातून या समागम कार्यक्रमास येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता वाहतूक व्यवस्थेसाठी ३० पार्किंग स्थळांची निश्चिती करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी कोपरा या ठिकाणी तात्पुरता पूल उभारण्यात येत आहे. एसटी, बसेससाठी निश्चित केलेल्या वाहततळापासून मुख्य कार्यक्रमस्थळापर्यंत पायी जाणाऱ्या भाविकांसाठी मुख्य रस्त्याच्या बाजूने तातुरत्या स्वरुपातील पायवाट तयार करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.  जेएनपीए परिसरात दररोज सुमारे २५ हजार जड वाहनांची ये-जा होत असल्याने, वाहतुकीचे नियोजन जिल्हा प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून करण्यात येत आहे.

      कार्यक्रमस्थळी पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. लंगर व्यवस्थेसाठी १ हजार गॅस सिलेंडर आणि आवश्यक इंधनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ४० ते ५० लाख पाण्याच्या बाटल्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात येत आहे.

     या बैठकीस अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, पुणे महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नाशिक महसूल आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नवी मुंबई समागम समन्वय अधिकारी रविंद्र राठोड, इतर महसूल विभागातील इतर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळाचे कोकण विभागीय अधिकारी, पनवेल व नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त, महसूल, जिल्हा परिषद, शिक्षण, आरोग्य, नगरपालिका, पोलीस विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जालना येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

 


जालना,दि.17 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्व व शौर्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, टाऊन हॉल, जालना येथे या कार्यक्रमाचे आायोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि लोककल्याणकारी कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.

या सांस्कृतिक सोहळ्याचे अध्यक्षस्थानी पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन तथा पालकमंत्री जालना जिल्हा पंकजा गोपीनाथ मुंडे उपस्थित राहणार आहेत. तर विशेष अतिथी म्हणून आमदार श्री. विक्रम काळे, श्री. राजेश राठोड, महापौर श्रीमती वंदना मगरे, खासदार श्री. कल्याण काळे आणि श्री. संजय जाधव, आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, बबनराव लोणीकर, अर्जुनराव खोतकर, नारायण कुचे, संतोष पाटील दानवे, हिकमत उढाण उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी.एम. आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची उपस्थिती लाभणार आहे.

या सांस्कृतिक कार्यक्रमात बुधवार, दिनांक 18 फेब्रुवारी, 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध शाहीर अजिंक्य लिंगायत यांचा ‘जागर शिवशाहीचा’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच गुरुवार, दिनांक 19 फेब्रुवारी, 2026 रोजी सकाळी 11 वाजता शाहीर रामानंद उगले, माधवी उगले-माळी, शाहीर अप्पासाहेब उगले आणि सहकलावंताचा समुह ‘शाहिरी शिवदर्शन’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम व त्यांच्या जीवनातील उदात्त मानवी मूल्यांची नवीन पिढीमध्ये रूजवणूक व्हावी या हेतूने या भव्य सांस्कृतिक सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, टाऊन हॉल, जुना जालना येथे संपन्न होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

Monday, 16 February 2026

मोती तलाव येथे जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव प्रशिक्षण संपन्‍न

 





जालना, दि. 16 (जिमाका): जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष आशिमा मित्तल  व निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत हदगल यांच्या मार्गदर्शनाखाली आज जालना शहरातील मोती तलाव येथील विसर्जन कुंड येथे जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव साहित्य हाताळणी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

    या प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात आले होते. जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायत अग्निशमन विभाग तसेच होमगार्डस् दलातील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक आधुनिक शोध व बचाव साहित्य हाताळणीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.

सदर प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश पूर, जलदुर्घटना तसेच इतर आपत्कालीन परिस्थितीत त्वरित व सुरक्षित बचावकार्य करण्यासाठी संबंधित यंत्रणांची कार्यक्षमता वाढविणे हा होता. प्रशिक्षणादरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत नव्याने खरेदी करण्यात आलेल्या विविध आपत्कालीन साहित्याच्या वापर, देखभाल व सुरक्षित हाताळणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये पुढील साहित्याचा समावेश होता :

           फायबर बोट – ४

           रबर बोट – ३

           स्कुबा सेट – २

           फायर जेल ब्लँकेट – २०

           लाईफबोये – १००

           बॅटरी कटर – ९

           बॅटरी स्प्रेडर – ९

           फ्लोटींग पंप – १०

           पोर्टेबल जनरेटर – ४

           पोर्टेबल पंप – १०

           मेगाफोन – २०

           सेफ्टी नेट – १०

           लाईफ जॅकेट – २२५

           रिफ्लेक्टर जॅकेट – २२५

सदर साहित्य मनपा तसेच जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत अग्निशमन विभागांना उपलब्ध करून देण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.‍जिल्‍हाधिकारी श्रीमती. आशिमा मित्‍तल या होत्‍या. यावे मा.अपर जिल्हाधिकारी श्री. रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण श्री. शशिकांत हदगल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. दिपक काजळकर, प्रभारी अग्निशमन अधिकारी, मनपा जालना श्री. संदीप दराडे तसेच मनपा जालना अग्निशमन विभाग, भोकरदन, परतूर व अंबड नगर परिषद अग्निशमन विभाग, बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी व तिर्थपुरी नगर पंचायत विभाग आणि होमगार्डस् विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****