Monday, 18 May 2026

*जालना जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याची शक्यता;*

  • *नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी - जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

जालना,दि.18(जिमाका) : भारत हवामान विभागाने दिनांक 18 मे 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजानुसार मराठवाडा विभागात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट (Heat Wave) कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून] जालना जिल्ह्यात तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत सर्व नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सद्यस्थितीत वाढत्या तापमानामुळे उष्माघात, निर्जलीकरण तसेच उष्णतेशी संबंधित आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता असून विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, शेतकरी, शेतमजूर, बांधकाम कामगार तसेच मैदानी भागात काम करणाऱ्या नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. नागरिकांनी दुपारी 12 ते सायंकाळी 4 या कालावधीत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. भरपूर पाणी पिणे, ओआरएस, ताक, लिंबूपाणी, घरगुती पेये यांचे सेवन करणे, हलके व सुती कपडे वापरणे तसेच डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. उष्णतेमुळे चक्कर येणे, अशक्तपणा, उलटी, ताप, जास्त घाम येणे किंवा बेशुद्धावस्था जाणवल्यास तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत.

जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांना उष्माघात बाधित रुग्णांवर तातडीने उपचारासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आवश्यक औषधसाठा, ओआरएस, पिण्याचे पाणी व इतर सुविधा उपलब्ध ठेवण्याबाबत आरोग्य विभागास निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ग्रामपंचायत, नगर परिषद व नगरपालिका स्तरावर सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाणपोई व सावलीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. शाळा, अंगणवाडी, बांधकाम स्थळे तसेच मनरेगा कामांमध्ये दुपारच्या वेळेत आवश्यक ती काळजी घेण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.

शेतकरी बांधवांनी सकाळी अथवा सायंकाळी पिकांना हलके सिंचन करावे. भाजीपाला व फळबागांमध्ये मल्चिंग, शेडनेट आदी उपाययोजना कराव्यात. जनावरांना पुरेसे पिण्याचे पाणी व सावली उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा प्रशासन व हवामान विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.


****


*महाराष्ट्रात मतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहिम; ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा*


जालना,दि.18(जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये 'विशेष सखोल पुनरिक्षण' (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश असून, राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.

बीएलओच्या प्रत्यक्ष घरांना भेटी

महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम अत्यंत व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे. यात राज्यातील एकूण ९,८६,४४,४१३ मतदारांच्या तपशिलाची खातरजमा मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांमार्फत (BLO)नियुक्त करण्यात  येणार आहे.  हे अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहिती गोळा करतील. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे नेमण्यात आलेले 'बूथ लेव्हल एजंट्स' (BLA) त्यांना सहकार्य करणार आहेत.

जनगणनेच्या कामाशी सांगड

सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामात व्यस्त असलेल्या क्षेत्रीय यंत्रणेचा विचार करून या तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ही प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू होऊन ऑक्टोबरमध्ये पूर्ण होईल.

महाराष्ट्रासाठीचे महत्त्वाचे वेळापत्रक:

  दिनांक २० ते २९ जून २०२६ या कालावधील बीएलओ यांना प्रशिक्षण आणि पूर्वतयारी करण्यात येईल. त्यानंतर ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन भेटी देण्यात येतील. ५ ऑगस्ट २०२६ रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल तसेच ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती नोंदविता येतील आणि ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादीची प्रसिद्ध करण्यात येईल.

राजकीय पक्षांना आवाहन

भारत निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर आपले एजंट (BLA) नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे मतदार यादीतून दुबार नावे तसेच  मृत व्यक्तींची नावे काढणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि अचूक होण्यास मदत होणार आहे.


****


Friday, 15 May 2026

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग कार्यालयाच्या नावात बदल · ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग’ या नावाने पत्रव्यवहार करण्याचे आवाहन

 


 

जालना,दि.15(जिमाका) : महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग’ कार्यालयाच्या नावात ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग’ असा बदल केला आहे. यापुढे ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग’ या नावाने पत्रव्यवहार किंवा संपर्क करावा असे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग, मुंबई येथील सदस्य सचिव एस. एन. पवार यांनी कळविले आहे.

 

****

 

जनगणना 2027 अंतर्गत घरसूचीकरण व घरगणना मोहिमेची आजपासून सुरुवात

 


 

जालना,दि.15(जिमाका) : भारत सरकारच्या निर्देशानुसार देशातील 16 वी जनगणना प्रक्रिया जानेवारी 2026 ते फेब्रुवारी 2027 या कालावधीत दोन टप्प्यांत राबविण्यात येणार असून, त्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या घरसूचीकरण आणि गृहगणना (House Listing Operations-HLO) मोहिमेला जिल्ह्यात 16 मे, 2026 म्हणजे आजपासून सुरुवात होत आहे. ही प्रक्रिया 14 जून, 2026 पर्यंत चालणार असून, यासाठी नियुक्त करण्यात आलेले प्रगणक व पर्यवेक्षक घराघरांत जाऊन माहिती संकलन करणार आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून या मोहिमेसंदर्भातील सर्व आवश्यक सूचना व माहिती प्रसिद्ध करण्यात आली असून, नागरिकांनी या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार प्रक्रिया

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 15 मे 2026 रोजी सर्व प्रगणक (Enumerators) व पर्यवेक्षकांना ट्रेनिंग अॅप काढून अधिकृत HLO अॅप डाउनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  16 मे पासून प्रत्यक्ष मॅपिंगच्या कामास सुरुवात होणार असून, प्रगणक आपल्या नियुक्त HLB क्षेत्राची पाहणी करून कच्चे नकाशे तयार करतील. त्यानंतर 16 ते 18 मे दरम्यान प्रगणक, पर्यवेक्षक आणि चार्ज ऑफिसर यांच्या समन्वयाने सीमांकन व इमारतींचे रेखांकन पूर्ण केले जाणार आहे. 19 ते 20 मे या कालावधीत प्रत्येक घरावर ‘सी.एच. नंबर’ टाकण्याचे काम करण्यात येणार असून, ही प्रक्रिया उत्तर-पश्चिम दिशेकडून दक्षिण-पूर्व दिशेकडे केली जाणार आहे. यानंतर 21 मे ते 5 जून, 2026 या मुख्य कालावधीत प्रगणक मोबाईल अॅपच्या सहाय्याने घराघरांत जाऊन 1 ते 33 प्रश्नांद्वारे माहिती संकलित करणार आहेत. 6 ते 14 जून, 2026 या अंतिम टप्प्यात फायनल सिंक व तपासणी प्रक्रिया पार पडणार असून, वरिष्ठ अधिकारी रॅन्डम  (Random) पद्धतीने प्रत्यक्ष पाहणी करून माहितीची पडताळणी करणार आहेत.

मोहिमेची वैशिष्ट्ये

घरगणना मोहिमेत डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. प्रगणकांकडून दर 5 ते 10 नोंदीनंतर डेटा सिंक केला जाणार आहे. तसेच इमारतींचे क्रमांक आणि सीएच नंबर यामध्ये कोणताही बदल करता येणार नसल्याने माहिती नोंदविताना विशेष दक्षता घेतली जाणार आहे.  प्रत्येक इमारतीवर व घराबाहेर प्रत्यक्ष क्रमांक लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय, स्वतः ऑनलाईन पद्धतीने जनगणना करणाऱ्या कुटुंबांना ‘SE ID’ प्राप्त करून घ्यावा लागणार असून, घरभेटी दरम्यान प्रगणकांकडून त्याची पडताळणी केली जाणार आहे.

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

जनगणना 2027 हे देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल असून, सर्व नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करून अचूक माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा, असेही प्रशासनाने आवाहन केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

 

भारतीय सशस्त्र दलातील अधिकारी पदासाठी मोफत पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

 


जालना,दि.15(जिमाका) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी इच्छुक युवक-युवतींसाठी महाराष्ट्र शासनातर्फे छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे Combined Defence Service (CDS) परीक्षा पूर्व प्रशिक्षण कोर्स क्र. 67 आयोजित करण्यात आला आहे. हा प्रशिक्षण वर्ग दि. 15 जून 2026 ते 28 ऑगस्ट 2026 या कालावधीत होणार असून निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी दि. 14 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता प्रशिक्षण केंद्रात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या कोर्सदरम्यान प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षणासोबत निवास व भोजनाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी दि. 4 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील DSW Portal (Resources Nashik-CDS-67) मधून प्रवेशपत्र व संबंधित परिशिष्टांची प्रिंट काढून ती पूर्ण भरून सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातूनही प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षण वर्गासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक असून त्यांनी लोकसेवा आयोग (UPSC), नवी दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या CDS परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केलेला असावा. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी training.pctcnashik@gmail.com या ई-मेलवर अथवा दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 व व्हॉट्सअॅप क्रमांक 9156073306  वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजनासाठी कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

 


 

जालना,दि.15(जिमाका) : संत रोहिदास चर्मोउदयोग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित यांच्यामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार,मोची,ढोर होलार) इ. व्यक्तींचा शैक्षणिक व सामाजिक विकास होण्यासाठी आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये विविध योजना राबविल्या जाणार आहेत. इच्छुकांकडून कर्ज प्रस्ताव दि.11 जून पर्यंत मागविण्यात आले आहेत.

महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या 50 टक्के अनुदान योजनेसाठी 41, बीजभांडवल योजनेसाठी 20 असे एकूण 61 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

निकषः- अर्जदार हा चर्मकार (चांभार, मोची, ढोर, व होलार) इ. समाजातील असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष इतके असावे. अर्जदाराने यापुर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराने आवश्यकतेनुसार स्वतः अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून कर्ज प्रस्ताव दाखल करावेत. त्रयस्थ/ मध्यस्थांमार्फत कर्ज प्रकरणांचे अर्ज देण्यात अथवा स्वीकारण्यात येणार नाही.

आवश्यक कागदपत्रेः- जातीचा दाखला, चालु वर्षाचा उत्पन्नाचा दाखला,रेशन कार्ड,रहिवासी दाखला,मतदान ओळखपत्र, आधारकार्ड,पॅन कार्ड,शैक्षणिक दाखला, तीन फोटो, उद्योग आधार, सीबील क्रेडिट स्कोर (500 च्या पुढे असावा),ज्याठिकाणी व्यवसाय करावयाचा आहे त्या जागेचा पुरावा, वीज बील/ टॅक्स पावती /भाडे करारनामा/भाडे पावती/ जागा वापर संमती पत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा,कागदपत्रे खरी असल्याबाबत लाभार्थ्याचा विनंती अर्ज व ज्या जागी व्यवसाय चालु आहे त्याच जागेचे प्रमाणित छायाचित्र, एक सक्षम जामिनदार (नोकरदार/मालमत्ताधारक/शेतकरी),जामिनदाराचे हमीपत्र, ग्रामपंचायत, महानगरपालिका अथवा नगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र, व्यवसायासंबंधी तांत्रीक प्रमाणपत्र, अनुभवाचा दाखला, प्रकल्प अहवाल (सीए यांच्या सही शिक्क्यानिशी),खरेदी करावयाच्या साहित्याचे जीएसटी क्रमांक असलेले दरपत्रक,अर्जदाराचे वारसदाराच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र, विहित नमुन्यातील शपथपत्र, विवाहित स्त्री असल्यास लग्नापुर्वीचे व लग्नानंतरच्या दोन्ही नावाची व्यक्ती हि एकच असल्याबाबतचे शपथपत्र, लाभार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक व आधार संलग्न बँक खाते क्रमांक असलेल्या पासबुकची छायांकीत प्रत.

ज्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेऊन व्यवसायासाठी कर्ज घ्यावयाचे असेल अशा इच्छुकांनी आपले कर्ज प्रस्ताव दि. 11 जून पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत क्र. 3. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे सादर करावेत. गरजू लाभार्थ्यांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अरुण सी. राऊत यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

Thursday, 14 May 2026

जनगणना-2027 च्या पहिल्या टप्प्यासाठी प्रशासन सज्ज घरयादी व घरगणनेच्या क्षेत्रीय कामांना गती; प्रशिक्षण, नियोजन आणि प्रसिद्धीवर भर

 


 

जालना,दि.14(जिमाका) : केंद्र शासनाने जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत देशव्यापी जनगणना-2027 जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, जालना (जनगणना विभाग) यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी करून जनगणना-2027 च्या पहिल्या टप्प्यातील घर यादी व घर गणनेच्या क्षेत्रीय कामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, स्वगणनेचा कालावधी दि. 1 मे, 2026ते दि. 15 मे, 2026 दरम्यान राहणार असून, प्रत्यक्ष क्षेत्रीय कामकाज दि. 16 मे, 2026 ते दि. 14 जून, 2026 या कालावधीत पार पाडले जाणार आहे. या प्रक्रिये दरम्यान नागरिकांच्या घरांची, कुटुंबांची तसेच विविध सामाजिक व मूलभूत माहितीची नोंद केली जाणार आहे.

या कामासाठी प्रशासनाने जनगणना अधिकाऱ्यांची नियुक्ती, सामान्य जनतेची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या यासंदर्भातील वैधानिक अधिसूचना प्रसिद्ध केल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, घर यादी व घर गणने दरम्यान विचारण्यात येणारे 33 प्रश्न अधिसूचित करण्यात आले आहेत. जनगणनेची प्रक्रिया सुरळीत आणि अचूक पार पडावी यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना फील्ड ट्रेनरमार्फत प्रशिक्षण देण्यात आले असून, प्रशिक्षण साखळीतील अंतिम टप्प्यातील प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षणही पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हास्तरावरील प्रशासकीय संरचना मजबूत करण्याबरोबरच प्रत्येक प्रशासकीय घटकात घर यादी गट तयार करण्याचे कामही पूर्णत्वाकडे आले असुन, यामध्ये  परिपत्रकात पुढील महत्त्वाच्या बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे. यात

·      आवश्यक प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करून 23 एप्रिल ते 8 मे,2026 दरम्यान त्यांचे प्रशिक्षण आयोजन करणे.

·      सर्व घरयादी गटांना क्षेत्रीय कामांचे वाटप करून 16 मे, 2026 पासून प्रत्यक्ष कामास सुरुवात करणे. आणि 14 जून, 2026 पर्यंत क्षेत्रीय काम पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजन करणे.

·      घरयादी, घरगणना तसेच स्व-गणनेबाबत व्यापक प्रसिद्धी करून नागरिकांमध्ये जनजागृती करणे.

·      1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या स्व-गणनेसंदर्भातील आवश्यक व्यवस्था करणे.

प्रशासनाने क्षेत्रीय कामकाजात डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करण्यावरही भर दिला असून, सर्व संबंधित विभागांनी वेळेत समन्वय साधून काम केल्यास जनगणना प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नसल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. जनगणना-2027 ही देशाच्या लोकसंख्येची, सामाजिक रचनेची आणि विकास आराखड्याची महत्त्वपूर्ण आधारभूत माहिती ठरणार असल्याचे जिल्हा प्रशासन, जालना यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

****