Friday, 22 May 2026

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘पुतळा समितीची’ आढावा बैठक संपन्न

 



जालना, दि.22 (जिमाका): जिल्ह्यातील पुतळे आणि स्मारकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘पुतळा समिती’ची  आढावा बैठक पार पडली. यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल तसेच विविध संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बैठकीत मुख्यत्वे जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पुतळ्यांच्या परिसरातील कायदा, सुव्यवस्था आणि सुरक्षिततेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संवेदनशील ठिकाणांवर विशेष पोलीस गस्त ठेवण्याबाबत तसेच सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित करण्याबाबत पोलीस अधीक्षकांशी चर्चा झाली.

जिल्हाधिकारी यांनी महापुरुष आणि क्रांतीकारकांच्या पुतळ्यांच्या परिसराची नियमित स्वच्छता, रंगरंगोटी व योग्य देखभाल राखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना तातडीने आवश्यक सूचना देण्याचे निर्देश दिले. याशिवाय, कोणत्याही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून किंवा विनापरवाना पुतळे उभारले जाणार नाहीत, याची दक्षता प्रशासनाने घेण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले.

बैठकीत प्रशासनाने पुतळ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करत असल्याचे स्पष्ट केले असून, नागरिकांनी देखील या नियमांचे पालन करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

-*-*-*-*-*-

जालना जिल्हा घरगणना मोहिमेत राज्यात अव्वल हाऊस लिस्टिंग ऑपरेशनमध्ये 94.59 टक्के प्रगती

 


 

जालना, दि.22(जिमाका) : जनगणना 2027 अंतर्गत सुरू असलेल्या घरगणना (House Listing Operation) कार्यक्रमात जालना जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत जालना जिल्ह्याने राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक प्रगती साधली आहे.

 

राज्यस्तरीय आढाव्यानुसार, जालना जिल्ह्यातील एकूण 2863 HLB पैकी 2708 HLB चे काम पूर्ण झाले असून, जिल्ह्याने तब्बल 94.59 टक्के प्रगती साधली आहे. ही प्रगती राज्यातील सर्वाधिक असून, जिल्हा प्रशासनाच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीची आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयाची ही मोठी पावती मानली जात आहे.

 

जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा जनगणना कक्ष, पर्यवेक्षक, प्रगणक अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत ही कामगिरी साध्य केली आहे. प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे घरगणना मोहिमेला वेग मिळाला असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

या यशाबद्दल जिल्हाधिकारी  आशिमा मित्तल यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून, उर्वरित कामही निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जनगणना-2027 ही देशाच्या नियोजन प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची मोहीम असल्याने नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

-*-*-*-*-*-

जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ

 



जालना,दि.22(जिमाका):  माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त दि. २१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ घेण्यात आली.

 यावेळी नायब तहसिलदार तुषार निकम, सतिश तायडे, किशोर तायडे, महसुल सहायक याया पठाण, रवी हेलगट, अनिल शिंगाडे, राहुल खंदारे, संपदा कुलकर्णी, शिल्पा मगरे, सविता भोकरे, पांडे आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-

अपंग प्रशिक्षण केंद्रात 30 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

  

 जालना,दि.22(जिमाका):  दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर या संस्थेत म.रा. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मार्फत मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी 18 ते 40 वयोगटातील दिव्यांग (अस्थिव्यंग, मुकबधीर, अंध, मतिमंद) मुला- मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. या प्रशिक्षण केंद्रात विद्युत तारतंत्री, सर्व्हिसिंग ऑफ इलेक्रिर क डोमेस्टिक ऍप्लायंसेस, मोबाईल रिपेअरिंग अँड सर्व्हिसिंग, फिटर, एलिमेंट ऑॅफ कॅप्म्युटर इंजीनिअरिंग, कॉम्प्युटर ऑपरेशन विथ एम.एस. ऑफिस, डेस्कटॉप पब्लिशिंग डीटीपी, कॉम्प्युटर अकाँटिंग व ऑफिस ऑटोमेशन व अरबत्ती, खडू, धुप बनवणे इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. तरी इच्छुक दिव्यांग (अस्थिव्यंग, मुकबधीर, अंध, मतिमंद) मुला- मुलींनी किंवा पालकांनी दि 30 जुन 2026 पर्यंत  तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,भायेगाव रोड, देगलूर ता. देगलुर जि. नांदेड मो. नं. 9960900369,9403207100,7378641136 येथे पत्रव्यवहार करावे किंवा समक्ष भेटण्याचे आवाहन प्राचार्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी

  

     जालना दि. 22 (जिमाका) :-   जिल्ह्यात दि.27 मे 2026  रोजी  बकरी ईद (चंद्र दिवस पुढे किंवा माग्र), ‍दि.28 मे 2026 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दि. 31 मे 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती, सण उत्सव साजरे होणार आहेत. तसेच दि. 31 मे 2026 रोजी एम.पी.एस.सी. चया परीक्षा होणार आहे. सदर सण, उत्सव जयंतीच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यात व शहरात मिरवणुका व विविध कार्यक्रम आयोजित होतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येत असतात.

     तसेच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण बचाव व धनगर समाज एस. टी. प्रवर्गात समाविष्ठ करावे या अनुषंगाने  जालना जिल्ह्यात विविध प्रकारचे आंदोलन कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे अनुचित प्रकार घडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो.

     तसेच महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द गटबाजी व आरोप प्रत्यारोप विविध कारणांवरुन सुरु आहेत. तसेच शेतकऱ्यांचे विविध मागण्यासाठी विविध संघटनाकडून आत्मदहन,उपोषण, धरणे मोर्चे, निर्दशने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारतायेत नाही. 

        त्यामुळे अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही  आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.

 

   तसेच  अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये  पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.

 

     हा आदेश कामावरील कोणताही ‍ अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही.  तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.

       हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि.23 मे  2026 रोजीच्या 6.00 वाजेपासुन ते  दि. 5 जुन 2026   रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

                                                                    -*-*-*-*-*-     

Thursday, 21 May 2026

जालना शहरातील चार परीक्षा केंद्रांभोवती 200 मीटर परिसरात जमावबंदी लागू · 31 मे रोजी परीक्षा केंद्र परिसरात कलम 163 लागू

  

जालना,दि.21(जिमाका): महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 च्या पार्श्वभूमीवर शहरातील चार परीक्षा केंद्रांच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश दि. 31 मे, 2026 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही परीक्षा 31 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच परीक्षेच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.

ज्या परीक्षा केंद्रांच्या 200 मीटर परिसरात हा आदेश लागू राहणार आहे, त्यामध्ये पुढील केंद्रांचा समावेश आहे :

1)    बद्रीनारायण बारवाले कॉलेज, न्यू एमआयडीसी परिसर, औरंगाबाद रोड, जालना

2)   मत्स्योदरी शिक्षण संस्था, अंकुशराव टोपे कॉलेज, मोतीबाग ओव्हरब्रिजजवळ, जालना

3)    आर.जी.बागडिया आर्ट्स, एस.बी. लाखोटिया कॉमर्स अँड आर. बेनझोनजी सायन्स कॉलेज (जेईएस कॉलेज), दुर्गा माता रोड, जालना

4)  राष्ट्रीय हिंदी विद्यालय, देऊळगाव राजा रोड, जालना

आदेशानुसार परीक्षा केंद्रांच्या परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच परीक्षा काळात सर्व सार्वजनिक लाऊडस्पीकर, ध्वनिवर्धक यंत्रणा आणि तत्सम साधनांच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले असून संबंधित आदेशाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

 

Wednesday, 20 May 2026

जालना तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा


  जालना,दि.20(जिमाका): जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामकाजाला गती देण्यासाठी तसेच विविध प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज तहसील कार्यालय, जालना येथील महसुल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

 यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी विशेष सखोल पुर्नरिक्षण कार्यक्रम (SIR) अंतर्गत निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेला. मतदार यादी अद्ययावत करणे, पात्र मतदारांची नोंदणी व त्रुटी दूर करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याचे निर्देश दिले. तसेच जनगणना प्रक्रियेचा आढावा घेत जनगणनेचे काम अचूक व वेळेत पूर्ण करण्याच्या मार्गदर्शक सूचना केल्या. तसेच शासकीय जमिनींवरील अतिक्रमण हटविणे आणि सिलींग जमिनींसंदर्भातील प्रकरणांचाही सविस्तर आढावा घेत, शासकीय जमिनी अतिक्रमणमुक्त करण्याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत सुरू कामांचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सुलभ दळणवळणासाठी पाणंद रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रलंबित सिलींग प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्याचे निर्देश दिले.  

यावेळी बैठकीस जालना तहसीलदार छाया पवार, नायब तहसिलदार यांच्यासह तहसील कार्यालयातील विविध विभागांचे कर्मचारी, मंडळ अधिकारी आदींची उपस्थिती होती.

 

-*-*-*-*-*-