जालना, दि.11
(जिमाका) :- जालना जिल्ह्यात रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण आणि
त्यामध्ये होणारी प्राणहानी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज एका विशेष परिपत्रकाद्वारे जिल्ह्यातील सर्व
शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना दुचाकी चालवताना 'आय.एस.आय.' मार्क असलेले
हेल्मेट परिधान करणे बंधनकारक केले आहे. तरी रस्ते सुरक्षेसाठी नागरिकांनी आणि
शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी
आशिमा मित्तल यांनी केले आहे.
जालना
मुख्यालयातील सर्व शासकीय कार्यालयांच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांना दुचाकी
चालविताना हेल्मेट वापरणे आता अनिवार्य असेल. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तसेच सर्व शासकीय व
निमशासकीय कार्यालयांमध्ये हेल्मेट परिधान केलेल्या व्यक्तींनाच (कर्मचारी व
अभ्यागत) प्रवेश दिला जाईल. प्रत्येक
कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांमार्फत तपासणी केली जाईल. हेल्मेट
नसलेल्या व्यक्तींना कार्यालय परिसरात वाहन लावण्यास सक्त मनाई असेल. या नियमांचे
उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागामार्फत मोटर
वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
कार्यालय
प्रमुखांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या नियमाची माहिती देऊन त्याची काटेकोर
अंमलबजावणी सुनिश्चित करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन
करणाऱ्या अधिकारी -कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा
इशाराही जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिला आहे. या आदेशाची अंमलबजावणी
आजपासूनच लागू करण्यात आली आहे. प्रशासकीय शिस्त आणि रस्ते सुरक्षेसाठी मोटर वाहन
अधिनियम 1988 मधील कलम 129 नुसार, दुचाकी चालक आणि पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने
हेल्मेट वापरणे कायदेशीररीत्या अनिवार्य आहे. प्रशासकीय स्तरावर याचा आदर्श
निर्माण व्हावा, या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत.
-*-*-*-*-
वृत्त क्र. दि. 11 फेब्रुवारी, 2026
अंबड येथे 295
पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
जालना, दि.11
(जिमाका):- जालना जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींसाठी रोजगाराची
मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र आणि महर्षी कणाद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंबड यांच्या संयुक्त
विद्यमाने शुक्रवार, दि.13 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य 'पंडित
दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील उमेदवारांनी
रोजगार मेळाव्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सहायक आयुक्त,
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांनी केले आहे.
उमेदवारांनी
सोबत बायोडाटा (5 प्रती), शैक्षणिक कागदपत्रे आणि आधारकार्डच्या छायांकित प्रती
घेऊन उपस्थित राहावे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी
-*-*-*-*-
वृत्त क्र. दि. 11 फेब्रुवारी, 2026
परळी वैजनाथ
येथे महापशुधन एक्स्पो 2026 चे आयोजन
जालना, दि.11
(जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दि. 13 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत परळी वैजनाथ (जि. बीड) येथे 'भारतीय पशुपक्षी महापशुधन एक्स्पो 2026' चे
भव्य आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन जातीवंत पशुधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा
एक अनोखा संगम ठरणार आहे. तरी जालना जिल्ह्यातील पशुपालक, तरुण उद्योजक आणि शेतकरी
बांधवांनी या महोत्सवात सहभागी होऊन आपले ज्ञान व उत्पन्न वाढवावे, असे आवाहन
जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महापशुधन एक्स्पो 2026 या प्रदर्शनात राज्यातील व राज्याबाहेरील
गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या आणि पक्ष्यांच्या विविध प्रजातींचे दर्शन घडणार आहे.
तसेच आधुनिक डेअरी फार्मिंग, चारा नियोजन आणि प्रक्रिया उद्योगांचे भव्य स्टॉल्स
येथे असणार आहेत. तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून पशुधनाचे आरोग्य व वैज्ञानिक संगोपनावर
विशेष मार्गदर्शन दिले जाणार आहे. या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायातील
जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान पाहता येईल. असे सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, जालना
यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
वृत्त क्र. दि. 11 फेब्रुवारी, 2026
18 फेब्रुवारीची पेंशन अदालत आता
27 फेब्रुवारीला
जालना दि. 11 (जिमाका) :- जालना जिल्हा परिषदेअंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या पेंशन अदालतीच्या 18 फेब्रुवारीच्या
तारखेत बदल करण्यात आला असून आता ही अदालत शुक्रवार दि.27 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न होणार आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर
विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार अदालत आयोजित करण्यात आलेली आहे.
तरी जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्तांनी आपल्या प्रलंबित प्रकरणाच्या संपूर्ण माहितीसह
या अदालतीला दि.27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जालना
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे
केले आहे.
-*-*-*-*-
वृत्त क्र. दि. 11 फेब्रुवारी, 2026
सैनिक कल्याण विभागाची
14 मार्च रोजी ऑनलाईन परीक्षा
जालना,
दि. 11 (जिमाका) :- महाराष्ट्र
राज्य सैनिक कल्याण विभाग आणि त्याअंतर्गत असलेल्या जिल्हा सैनिक कल्याण
कार्यालयातील रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या विभागातील 'लिपीक टंकलेखक' (गट-क) या संवर्गातील
एकूण 72 पदांसाठी ऑनलाईन परीक्षा टीसीएसमार्फत
दि.14 मार्च 2026 रोजी दुपारी 1 ते 3 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
-*-*-*-*-
वृत्त क्र. दि. 11 फेब्रुवारी, 2026
सोमवारी महिला लोकशाही दिन
जालना दि. 11 (जिमाका) :- महिलांच्या समस्यांचे निराकरण
करण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून
देण्याच्या उद्देशाने, जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, दि.16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत 'जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे'
आयोजन करण्यात आले आहे.
ज्या
महिलांना आपल्या तक्रारी किंवा प्रश्न मांडायचे आहेत, त्यांनी आपले अर्ज दोन प्रतीत जिल्हा महिला व बाल विकास
अधिकारी कार्यालय, जालना येथे सादर करावेत. महिलांनी प्रथम संबंधित तहसीलदार
यांच्याकडे लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी तक्रार नोंदवावी. तालुका स्तरावर तक्रार
केल्यानंतर एका महिन्याच्या आत
कार्यवाही न झाल्यास, संबंधित महिला जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आपली तक्रार मांडू
शकतात. तहसीलदार आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी तक्रारदारास एका महिन्याच्या
आत अंतिम उत्तर देणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यातील
पिडीत महिलांनी आपल्या तक्रारींसाठी तालुकास्तरावर तहसील कार्यालय आणि जिल्हा स्तरावर
जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क
साधून या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास
अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-
वृत्त क्र. दि. 11 फेब्रुवारी, 2026
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना;
ई-केवायसीसाठी पोर्टल पुन्हा सुरू
जालना दि. 11 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत
राबविण्यात येत असलेल्या "मुख्यमंत्री
माझी लाडकी बहीण" योजनेतील ज्या लाभार्थी महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत
तांत्रिक चुका झाल्या आहेत, अशा महिलांसाठी सुधारणा करण्याची संधी दि.31 मार्च
2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या
अर्जातील त्रुटीची सुधारणा करुन या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला
व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी
बहीण योजनेचा अर्ज भरताना किंवा ई-केवायसी प्रक्रिया
पूर्ण करताना अनेक महिलांनी कुटुंबातील सदस्यांच्या नोकरीविषयक माहितीमध्ये
नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला आहे. विशेषतः कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग,
उपक्रम, मंडळ किंवा स्थानिक संस्थेत नियमित/कंत्राटी
कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत किंवा कसे? तसेच कुटुंबातील सदस्य सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत किंवा कसे?
या पर्यायांची निवड करताना झालेल्या चुकांमुळे पात्र महिलांना लाभ मिळण्यास
तांत्रिक अडचणी येत आहेत.
-*-*-*-*-

.jpeg)
