Friday, 10 July 2026

विशेष वृत्त कर्जमाफीसाठी आधार व अॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य

 


जालना,दि.10(जिमाका): राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी आता शेतकऱ्यांना आधार कार्ड आणि अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांकाशिवाय कर्जमाफी अथवा प्रोत्साहनपर लाभ कोणत्याही परिस्थितीत दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक विष्णु रोडगे यांनी केले आहे.

योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज, जे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत होते आणि 31 मार्च 2026 पर्यंत त्याची परतफेड झालेली नाही, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या योजनेत जमीनधारणेचे क्षेत्र विचारात घेतले जाणार नसून, एका किंवा अनेक बँकांमधील मिळून कमाल दोन लाख रुपयांपर्यंतची मुद्दल व व्याजासह थकबाकी थेट संबंधित कर्ज खात्यात जमा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येणार आहे.

याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही शासनाने दिलासा दिला आहे. सन 2022-23, सन 2023-24 आणि सन 2024-25 या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांत पीक कर्ज घेऊन त्याची मुदतीत परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना कमाल 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

अॅग्रीस्टॅक नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी प्रथम आपला आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक आहे. त्यानंतर अॅग्रीस्टॅक पोर्टलवर जाऊन नोंदणी पूर्ण करावी. नोंदणी झाल्यानंतर मिळणारा अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक संबंधित पीक कर्ज खाते असलेल्या बँकेत जमा करणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांकडे हा क्रमांक आधीपासून उपलब्ध आहे, मात्र त्यांनी तो अद्याप बँकेत सादर केलेला नाही, त्यांनीही तो तातडीने बँकेकडे सादर करावा.

अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांकाशिवाय कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर लाभाची रक्कम खात्यात जमा होणार नसल्याने पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता आवश्यक नोंदणी करून संबंधित बँकेत माहिती सादर करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक  विष्णु रोडगे यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

सोशल मिडियावर अपप्रचार करून बदनामी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणार-उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वाहनधारकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये

 


 

जालना, दि.10 (जिमाका) : जिल्ह्यातील काही समाजकंटक सोशल मिडियाच्या माध्यमातून चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित करून शासकीय यंत्रणेची बदनामी करणाऱ्या तसेच वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जालना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिला आहे. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचे आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम 1988 व त्याअंतर्गत करण्यात आलेल्या नियमांनुसार वाहनधारकांनी विहित कालावधीत वाहनांची नोंदणी, फिटनेस, परवाना आदी बाबींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येते.

याच पार्श्वभूमीवर दिनांक 3 जुलै, 2026 रोजी नियमित तपासणीदरम्यान एका मालवाहू ट्रकवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली होती. मात्र या कारवाईनंतर संबंधीत व्यक्तींनी शासकीय वाहन अडवून शासकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, तसेच जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार केले. या घटनेप्रकरणी संबंधित व्यक्तींविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 अंतर्गत संबंधीतावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यानंतर काही समाजकंटकांकडून सोशल मिडियावर वस्तुस्थितीच्या विपरीत, दिशाभूल करणाऱ्या पोस्ट व संदेश प्रसारित करून उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि त्याच्या अधिकाऱ्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही कार्यालयाने स्पष्ट केले आहे. अशा प्रकारच्या खोट्या माहितीमुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होत असून, शासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शासकीय कार्यालय आणि अधिकाऱ्यांची सोशल मिडियावरुन बदनामी करणाऱ्या अशा समाजकंटाकाविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

तसेच काही समाजकंटक वाहनधारकांना केवळ केसेस सोडवून देण्याचे आमिष दाखवून, "तुमच्या वाहनावर जालना जिल्ह्यात कारवाई होऊ देणार नाही.", "आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांना आम्ही बांधून ठेवले आहे.", किंवा "परिवहन विभागाच्या काही अधिकाऱ्यांची बदली लवकरच होणार आहे.", अशा प्रकारच्या अफवा पसरवत असल्याचेही निदर्शनास आले आहे. अशा अपप्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन परिवहन प्रशासनाने केले आहे.

परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, वाहनधारकांनी वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करावे. कोणत्याही दलाल, मध्यस्थ किंवा अनधिकृत व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडू नये. नियमभंग करणाऱ्यांवर कोणताही दबाव किंवा राजकीय हस्तक्षेप न मानता नियमानुसार कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, रस्ता सुरक्षा ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून, सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नियमबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सोशल मिडियावर कोणत्याही प्रकारची माहिती प्रसारित करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहावी आणि अपप्रचार टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा संबंधीतावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

याशिवाय, कोणत्याही अधिकाऱ्यांचे नाव सांगून पैसे मागितले जात असल्यास किंवा कारवाई टाळण्याचे आमिष दाखविले जात असल्यास त्याची तात्काळ माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा जालना शहर पोलीस प्रशासनाला द्यावी, असेही उपप्रादेशिक परिवहन विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहनधारक, प्रवासी व सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित वाहतूक व्यवस्थेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, सोशल मिडियावरील अफवा आणि अपप्रचारापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

-*-*-*-*-*-*-*-

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त 'कौशल्य विकास काळाची गरज' वक्तृत्व स्पर्धेला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद


 


जालना, दि.10 (जिमाका): जागतिक युवा कौशल्य दिन (15 जुलै) निमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, जालना आणि विंध्याचल शिक्षण संस्थेच्या व्ही. व्ही. एस. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कौशल्य विकास काळाची गरज' या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला महाविद्यालयातील युवक-युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कौशल्य विकासाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.

स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी प्राप्त करून चालत नसून त्यासोबत विविध कौशल्ये आत्मसात करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले. कौशल्याच्या बळावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करता येते, रोजगाराच्या संधी वाढतात तसेच स्वयंरोजगार व उद्योजकतेचे नवे मार्ग खुलतात, असे विचार विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.

हा कार्यक्रम सहाय्यक आयुक्त गणेश चिमणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी दत्ता जाधव यांनी समावेशक, शांततापूर्ण आणि शाश्वत सामाजिक विकासासाठी आजच्या तरुणांनी आधुनिक काळाच्या गरजेनुसार विविध कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कौशल्यसंपन्न युवकच भविष्यात देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात समुपदेशक डॉ. अमोल परिहार यांनी कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, रोजगाराच्या संधी आणि शासनाच्या उपक्रमांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या करिअरची भक्कम पायाभरणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी व्ही. व्ही. एस. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. एच. डी. जेडगे यांनी विद्यार्थ्यांनी नियमित शिक्षणाबरोबरच उद्योगजगताच्या गरजेनुसार कौशल्ये विकसित केल्यास रोजगाराच्या संधी अधिक व्यापक होतील, असे मत व्यक्त केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात कौशल्याधारित शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभम मोहिते यांनी केले, तर उपप्राचार्य प्रा. गुलशन राठी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, जालना तसेच विंध्याचल शिक्षण संस्थेच्या व्ही. व्ही. एस. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बदनापूर येथील अधिकारी, कर्मचारी व प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.

-*-*-*-*-*-*-

Thursday, 9 July 2026

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत विकासकामांच्या प्रगती आढावा बैठक संपन्न

 




 

जालना,दि.9(जिमाका): जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन 2026-27 मधील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सचिव आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षेत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आढावा बैठक पार पडली.

यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारीया, मनपा आयुक्त अंजली शर्मा जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत जिल्हाधिकारी मित्तल यांनी राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या निर्देशानुसार सर्व विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज करण्याच्या सूचना दिल्या. सन 2025-26 आणि त्यापूर्वीच्या वर्षांतील विभागनिहाय मंजूर निधी, त्यातील खर्च, तसेच सन 2023-24 व त्यानंतरच्या वर्षांतील खर्च न झालेल्या निधीबाबत कारणांसह सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.

यावेळी सन 2025-26 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेल्या मात्र प्रत्यक्षात काम सुरू न झालेल्या सर्व योजनांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. अशा कामांची सद्यस्थिती, काम सुरू होण्यास झालेला विलंब आणि ती कामे विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित विभागांकडून माहिती घेण्यात आली. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या मागील बैठकीत पालकमंत्री यांनी दिलेल्या सूचनांनुसार कोणकोणती कार्यवाही करण्यात आली आहे, याचा आढावा ही  बैठकीत सादर घेण्यात आला. प्रत्येक विभागाने शासनाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित बाबी तातडीने निकाली काढाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी मित्तल यांनी यावेळी दिले.

सन 2026-27 च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा विकास आराखडा, गतिमान प्रशासन, व्यक्तिमत्त्व विकास, जिल्हा विकास आराखडा (महसूल व भांडवली) तसेच शाश्वत विकास ध्येय (SDG) अंतर्गत प्रस्तावित योजनांवरही सविस्तर चर्चा झाली. या योजनांचे प्रस्ताव वेळेत सादर करून विकासकामांना गती देण्याचे आवाहन करण्यात आले.

याशिवाय जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत सन 2026-27 मध्ये हाती घेण्यात येणाऱ्या विकासकामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सन 2025-26 मध्ये झालेल्या निधी खर्चाचा आढावा घेऊन खर्चाची गती वाढविण्यावर भर देण्यात आला. बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी मित्तल यांनी सर्व विभाग प्रमुखांनी समन्वयाने काम करत शासनाच्या प्राधान्यक्रमानुसार विकासकामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच उपलब्ध निधीचा शंभर टक्के विनियोग सुनिश्चित करावा आणि प्रलंबित प्रस्ताव व अहवाल विहित मुदतीत सादर करावेत, असे निर्देश दिले.

यावेळी बैठकीत विविध विभागांच्या योजनांची अंमलबजावणी, निधी खर्च, प्रलंबित कामे तसेच आगामी वर्षातील विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, नियोजन विभागाचे अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

-*-*-*-*-*-*-*-

जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 


जालना,दि.9 (जिमाका) :परतुर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, दिनांक 28 नोव्हेंबर 2026 (शनिवार) साठी अर्ज हे ऑनलाईन प‌द्धतीने भरले जात असुन जालना जिल्हयातील रहीवासी असलेल्या व इयत्ता पाचवी वर्गात सन 2026-27 मध्ये शिकत असणा-या विद्यार्थ्यांनी त्यांची नोंदणी सेवा केंद्रावरून व ईतर यंत्रणेचा वापर करून ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे सदर अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 अशी आहे.

तरी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी-2027 साठी च्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापुर्वी पाचवीच्या वि‌द्यार्थ्यांनी स्वतःची स्वाक्षरी, वडिलांची स्वाक्षरी, वि‌द्यार्थ्यांचा फोटो, जातीचे प्रमाणपत्र व आधारकार्ड सोबत असणे आवश्यक आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीची जाहीरात, माहीतीपत्रक, इ हे खालील दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. फॉर्म भरण्यासाठीचे प्रमाणपत्रे, फोटो, स्वाक्ष-या इ हे 10 ते 100 KB मध्ये स्कॅन करून संकेतस्थळ "www.navodaya.gov.in", व  https://cbseitms.rcil.gov.in/nvs यावरून भरावेत. विद्यार्थ्यांचा जन्म हा दिनांक 1 मे 2015 ते 31 जुलै 2017 च्या दरम्यानचा असावा.जिल्हाभरातील सर्व मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस. जी. पवार यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-


मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्ती आदेशांचे वितरण व उत्कृष्ट उद्योजक, कौशल्य प्रशिक्षण संस्था आणि आस्थापनांचा सन्मान

 




 

जालना,दि.9 (जिमाका) :जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्तश्री. गणेश चिमणकर, सहायक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कौशल्य सप्ताह (दि. 7 ते 15 जुलै 2026)अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्या वतीनेमुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्ती आदेशांचे वितरण तसेच उत्कृष्ट उद्योजक, कौशल्य प्रशिक्षण संस्था आणि युवकांना प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या आस्थापनांचा सन्मान करण्यात आला.

            महाराष्ट्र शासनाच्यामुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचाउद्देश सुशिक्षित युवक-युवतींना उद्योग व सेवा क्षेत्रात प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणे, त्यांचे व्यावसायिक कौशल्य विकसित करणे आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी अधिक सक्षम करणे हा आहे. या योजनेअंतर्गतवरकड हॉस्पिटल, जालना या आस्थापनेने 6 प्रशिक्षणार्थ्यांनाप्रशिक्षणासाठी संधी उपलब्ध करून दिली असून, त्यांना नियुक्ती आदेशांचे वितरणवरकड हॉस्पिटलचे प्रतिनिधी श्री. गौतम खरातवश्री. विशाल येवले, परि. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, जालनायांच्या हस्ते करण्यात आले.

            यावेळी कौशल्य विकास क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या उत्कृष्ट उद्योजक, गुणवत्तापूर्ण कौशल्य प्रशिक्षण संस्था तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या आस्थापनांचा गौरव करण्यात आला. सन्मानित संस्थांमध्येप्रियदर्शनी नागरी सहकारी बँक, जालना, समर्थ सहकारी नागरी बँक मर्या., जालना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तीगृह, जालना, भारत फायनान्स, जालना, आकाशदीप इन्स्टिट्यूट, जालनाआदी संस्थांचा समावेश होता.

            कार्यक्रमात मार्गदर्शन करतानाश्री. विशाल येवले, परि. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, जालनायांनी नियुक्ती प्राप्त प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन करत प्रशिक्षणाच्या कालावधीत शिस्त, प्रामाणिकपणा, वेळेचे नियोजन आणि समर्पित वृत्तीने कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच कौशल्य विकासासाठी सातत्याने सहकार्य करणाऱ्या उद्योजक, प्रशिक्षण संस्था व आस्थापनांचे आभार मानून भविष्यातही असेच सहकार्य लाभेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. या कर्याक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अमोल परिहार व रविंद्र पाडमुख यांनी केले तर आभार दत्ता जाधव यांनी मानले.

            या कार्यक्रमास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना येथील अमोल बोरकर, नितीन लोकडे, प्रदीप डोळे, कैलास काळे, विशाल जगरवाल, दीपक पालवे,वश्री. गणेश सुपारकर इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-

स्वाधार योजनेच्या लाभासाठी शासकीय वसतिगृहाचा अर्ज भरणे अनिवार्य

 


 

जालना,दि.9 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इयत्ता 11 वी व 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाहभत्ता व इतर आवश्यक सुविधावर खर्च करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू केली आहे.

 

सदर योजनेतंर्गत जालना महानगरपालिकेच्या हदीपासून 5 किलोमिटरच्या आत असलेल्या महाविद्यालयांमध्ये इयत्ता 11 वी 12 वी तसेच 12 वी नंतर व्यावसायिक व विगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार देय असलेली रक्कम मंजुर केली जाते. सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रूपये 2.50 लाखाच्या आत असणे अपेक्षीत आहे. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यास 10 वी, 11 वी व 12 वी या अभ्यासक्रमास किमान 50% गुण असणे अपेक्षीत आहे. तसेच अनु. जाती व नवबौध्द घटकातील दिव्यांगासाठी 40% गुण असणे अपेक्षीत आहे. सदर विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान 75% असणे अपेक्षीत आहे.

 

सन 2026-27 या वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑनलाईनद्रवारे भरण्यात येत आहे. यापुर्वी दिलेल्या विहित मुदतीमध्ये ज्या पात्र विद्यार्थ्यानी अदयापपर्यत ऑनलाईनद्ववारे अर्ज केलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org/ या पोर्टलवर दिनांक 31 जुलै,2026 पर्यत ऑनलाईनद्ववारे अर्ज भरावेत.

जर गुणवत्तेनुसार किंवा जागे अभावी विद्यार्थ्याला शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, तरच त्याला स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करता येईल. जे विद्यार्थी वसतिगृह योजनेचा अर्ज भरणार नाहीत, त्यांना स्वाधार व वसतिगृह या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाही. ज्या तालुक्यामध्ये शासकीय वसतिगृहे नाहीत, अशा तालुक्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सदर नियम शिथिल करण्यात आला आहे.

 

सन 2026-27 या वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज विद्यार्थ्यानी https://hmasnew.mahait.org/ या पोर्टलवर ऑनलाईनद्ववारे अर्ज भरावेत असे आवाहन डॉ. अनिता राठोड सहायक आयुक्त, समाजकल्याण,  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-