Thursday, 18 June 2026

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन कक्ष स्थापन • नागरिकांना मार्गदर्शनासाठी 02482-223132 क्रमांक उपलब्ध

 


जालना,दि.18(जिमाका): मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र तसेच ऑनलाइन कुणबी नोंदी शोधण्याबाबत मदत व मार्गदर्शन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे विशेष हेल्पलाईन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 7 सप्टेंबर 2023 च्या शासन निर्णयासह सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 2 सप्टेंबर 2025 च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या पत्रानुसार जिल्हा स्तरावर आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शासनाने मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी या जात प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेसाठी मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यपद्धती निश्चित केली आहे. या प्रक्रियेला अधिक गती देण्यासाठी आणि नागरिकांना सुलभ सेवा मिळावी यासाठी गावपातळीवर ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

आदेशानुसार, मराठा समाजातील भूपुत्र, भूमिहीन, शेतमजूर अथवा वडिलोपार्जित शेती करणाऱ्या व्यक्तींकडे जमीन मालकीचे पुरावे उपलब्ध नसल्यास त्यांनी 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी किंवा त्यानंतर संबंधित परिसरात वास्तव्यास असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे. या प्रतिज्ञापत्राच्या आधारे सक्षम प्राधिकाऱ्यांकडून स्थानिक चौकशी करण्यात येणार असून, संबंधित व्यक्तीच्या गावातील किंवा कुळातील नातेवाईकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्याचीही पडताळणी केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार गावपातळीवरील स्थानिक समिती आणि वंशावळ समितीच्या सहाय्याने चौकशी करून निर्णय घेतला जाईल.

नागरिकांना या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामार्फत नागरिकांना कुणबी नोंदी शोधणे, जात प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करणे, ऑनलाइन नोंदींचा वापर करणे तसेच जात पडताळणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

हेल्पलाईन कक्षासाठी खालील अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत :

          श्री. किशोर तायडे – नायब तहसीलदार (महसूल), जिल्हाधिकारी कार्यालय, जालना

          श्री. अशोक झळके – महसूल सहाय्यक, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना

नागरिकांनी कुणबी जात प्रमाणपत्र व जात पडताळणीसंदर्भातील माहिती, मार्गदर्शन किंवा शंकानिरसनासाठी हेल्पलाईन क्रमांक 02482-223132 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

 

एन निनो’ च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे आयुक्त पशसंवर्धन डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

 


जालना,दि.18(जिमाका): जागतिक हवामान बदलाचा परिणाम म्हणून निर्माण होणाऱ्या 'एल निनो'च्या संभाव्य संकटामुळे आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीचा पशुधन व दुग्धोत्पादनावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी राज्यातील सर्व पशुपालकांनी आतापासूनच सतर्क राहून चारा पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

पशुपालकांना या संकटाचा सामना समर्थपणे करता यावा, यासाठी पशुसंवर्धनविभागाच्यावतीनेपशुपालक व शेतकरी यांना पोषक व बहुउद्देशीय चारा पिकांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गाई व म्हशींच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दूध उत्पादनात घट होऊ नये म्हणून पशुपालकांनी पोषक असणाऱ्या चारा पिकांची लागवड करावी. अशी पिके निवडावीत ज्यातून मुख्य शेतमाल (धान्य/उत्पादन) तर मिळेलच, सोबतीला जनावरांच्या पोषणासाठी दर्जेदार चाराही उपलब्ध होईल.

शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर अथवा पडीक जमिनीवर येणारे नैसर्गिक गवत वाया न घालवता त्याचे योग्य जतन करावे. पावसाची ओढ किंवा टंचाईच्या संकट काळात हेच गवत जनावरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा आधार ठरणार आहे.भविष्यातील संभाव्य टंचाई टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या उपलब्ध जमिनीवर मोठ्या प्रमाणावर चारा उत्पादनावर भर द्यावा. उत्पादित केलेला अतिरिक्त चारा 'मुरघास' किंवा सुक्या चाऱ्याच्या स्वरूपात साठवून ठेवावा, जेणेकरून जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.

पशुसंवर्धन विभागामार्फत 'एल निनो' च्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी पशुपालक- शेतकरी बांधवांना विविध माध्यमातून मार्गदर्शन करण्यासाठी विभागाच्यावतीने नियोजन करण्यात येत आहे. या संभाव्य संकटकाळात पशुधनाची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सक्षम असून, कोणत्याही शंका तसेच अडचणी संदर्भात पशुपालकांनी 1962 या कॉल सेंटर नंबरवरुन माहिती व पशुवैद्यकीय सेवा प्राप्त करुन घ्याव्यात, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

एल निनोच्या सावटामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य टंचाईचा फटका आपल्या पशुधनाला बसू नये, ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. योग्य नियोजन, पोषक चारा पिकांची निवड आणि उपलब्ध चाऱ्याची साठवणूक करून आपण पशुधनाचे पोषण आणि आपले आर्थिक उत्पन्न दोन्ही सुरक्षित ठेवू शकतो. सर्व पशुपालकांनी या आवाहनाचा गांभीर्याने विचार करून तातडीने अंमलबजावणी करावी.

- डॉ. किरण पाटील, आयुक्तपशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य

-*-*-*-*-*-

एमएसएमई दिनानिमित्त वाशी येथे 27 जून रोजी शिखर परिषद व पुरस्कार वितरण सोहळा जालना जिल्ह्यातील पात्र उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन

 


जालना,दि.18(जिमाका): जागतिक बँकेच्या मदतीने राबविण्यात येणाऱ्या ‘रॅम्प’ (Raising and Accelerating MSME Performance - RAMP) कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) तर्फे 27 जून, 2026 रोजी वाशी येथील सिडको कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एमएसएमई शिखर परिषद व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत राज्यभरातील सुमारे 3 हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील उद्योजक आणि प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात येणाऱ्या या शिखर परिषदेचा उद्देश उद्योग क्षेत्रातील अग्रणी व्यक्ती, तज्ज्ञ, धोरणकर्ते तसेच एमएसएमई क्षेत्रातील प्रतिनिधींना एकत्र आणून उद्योगवृद्धी, सहकार्य, नवकल्पना, शाश्वतता आणि जागतिक बाजारपेठेतील संधी यांवर सखोल चर्चा घडवून आणणे हा आहे. या परिषदेदरम्यान रॅम्प उपक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करून व्यवसायात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणाऱ्या सूक्ष्म व लघुउद्योगांना (MSME) विशेष एमएसएमई पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. उत्पादन क्षमता, नवोन्मेष, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शाश्वत विकास आणि उद्योगातील उत्कृष्ट कामगिरी या निकषांच्या आधारे पुरस्कार विजेत्यांची निवड केली जाणार आहे.

एमएसएमई शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उद्योजकांनी ttps://mahamsmeawards.in/summit या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतरच परिषदेत सहभाग निश्चित मानला जाणार आहे. तसेच पात्र सूक्ष्म व लघुउद्योगांनी https://mahamsmeawards.in या संकेतस्थळावर एमएसएमई पुरस्कारांसाठी नामांकन (Nomination) सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील विविध क्षेत्रांतील एकूण आठ श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

पुरस्कारांसाठी पात्रता

एमएसएमई पुरस्कारांसाठी अर्ज करणाऱ्या उद्योगांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे :

          उद्योग महाराष्ट्रात नोंदणीकृत असावा व किमान तीन वर्षांपासून कार्यरत असावा.

           संबंधित उद्योगाने रॅम्प कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतलेला असावा.

यामध्ये आरबीएसएमएस (Raising & Business Support Measures), क्षमता विकास (Capacity Building), एव्हीडीपी (Advanced Vendor Development Programme) तसेच कौशल्य विकास (Skill Development) आदी योजनांचा समावेश आहे. जिल्हा उद्योग केंद्र, जालना यांनी जिल्ह्यातील पात्र सूक्ष्म व लघुउद्योजकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत शिखर परिषद व पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने नोंदणी करून सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यो. रा. सारणीकर यांनी जालना जिल्ह्यातील उद्योजकांना परिषदेत सहभागी होऊन उद्योग क्षेत्रातील नव्या संधी, तांत्रिक प्रगती आणि व्यवसायवृद्धीसाठी उपयुक्त मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

-*-*-*-*-*-

नशामुक्त भारत अभियानांतर्गत ‘विकसित भारत की पहचान’ उपक्रमास प्रारंभ जालना येथे जनजागृती कार्यक्रम; कर्मचाऱ्यांनी घेतली नशामुक्तीची शपथ

 


जालना,दि.18(जिमाका):  भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाज कल्याण आयुक्तालय, पुणे आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जालना यांच्या वतीने ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत ‘विकसित भारत की पहचान’ या विशेष जनजागृती उपक्रमास बुधवार दि.17 रोजी प्रारंभ करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून समाजात व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करून निरोगी व सुदृढ समाज घडविण्याचा संदेश देण्यात येत आहे.

यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नशामुक्तीची शपथ घेत अभियानाला सुरुवात केली. ‘विकसित भारत की पहचान’ या संकल्पनेवर आधारित हा विशेष जनजागृती सप्ताह 17 जून ते 26 जून, 2026 या कालावधीत राबविण्यात येणार असून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जागृती केली जाणार आहे. या अभियानादरम्यान शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृहे, संत भगवानबाबा उसतोड कामगारांच्या मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह तसेच महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा आणि विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसह युवकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.  कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड, विशेष अधिकारी (शा.नि.शा.) स्नेहल मोवळे, समाज कल्याण निरीक्षक सुरेंद्र चितेकर, मुख्याध्यापक डॉ. दिलीप गिरी यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी अमंली पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत माहिती दिली. व्यसनामुळे कुटुंब व्यवस्था आणि समाजजीवनावरही विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः तरुण पिढीत वाढत्या व्यसनाधीनतेबाबत चिंता व्यक्त करत या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सर्व स्तरांवर व्यापक जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

सूत्रसंचालन मुख्याध्यापक डॉ. दिलीप गिरी यांनी केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘नशामुक्त भारत’ घडविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनीही व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारून समाजहिताच्या या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

-*-*-*-*-*-

जिल्हा रुग्णालयात कर्करोगाची पहिलीच अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी ! 'मॅलिग्नंट फायलॉइड्स ट्यूमर'वर यशस्वी उपचार;

 



जालना,दि.18(जिमाका): जिल्हा सामान्य रुग्णालय आणि नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरत असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश आले आहे. रुग्णालयाच्या इतिहासात प्रथमच स्तनांच्या कर्करोगाची अत्यंत प्रगत आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. या ऐतिहासिक टप्प्यामुळे जालना जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सेवेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जिल्हा रुग्णालयातील नामवंत ऑन्को-सर्जन (कर्करोग तज्ज्ञ) डॉ. अब्दुल राफे आणि त्यांच्या वैद्यकीय टिमने एका महिला रुग्णावर अत्यंत दुर्मिळ अशा 'मॅलिग्नंट फायलॉइड्स ट्यूमर' साठीची 'मॉडिफाइड रॅडिकल मॅस्टेक्टॉमी' ही अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.

खासगी रुग्णालयांच्या आर्थिक लुटीतून सुटका!

यापूर्वी जालना जिल्ह्यातील सामान्य आणि गरीब रुग्णांना स्तनांच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर किंवा इतर मोठ्या शहरांमधील खासगी रुग्णालयांचा आसरा घ्यावा लागत असे. यासाठी रुग्णांना लाखो रुपयांचा खर्च करावा लागत असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. मात्र, आता जिल्हा रुग्णालयातच ही प्रगत शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे स्थानिक पातळीवरच गरिबांना मोफत आणि तज्ज्ञ उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

रुग्णालयाची पायाभूत सुविधा सक्षम

जिल्हा सामान्य रुग्णालयाची पायाभूत सुविधा आणि आमचे मनुष्यबळ कर्करोगासारख्या अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया हाताळण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे, हे या यशाने अधोरेखित केले आहे. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल मी डॉ. अब्दुल राफे, भूलतज्ज्ञ, शस्त्रक्रिया गृह कर्मचारी आणि परिचारिकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. सर्वसामान्य जनतेला अशाच सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही निरंतर कटिबद्ध असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, यांनी सांगितले.

-*-*-*-*-*-

 

Wednesday, 17 June 2026

जालना जलकवच अभियानांतर्गत बदनापूर येथे रेशीम शेती कार्यशाळा संपन्न

 


 

जालना,दि.17(जिमाका): जालना जलकवच अभियान - 2026 व आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत आज पंचायत समिती सभागृह, बदनापूर येथे रेशीम शेती विषयक कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. जलसुरक्षा, पीक विविधीकरण व शेतकरी उत्पन्नवाढ या उद्दिष्टांना केंद्रस्थानी ठेवून सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

एल-निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या जालना जलकवच अभियान अंतर्गत कमी पाण्यावर आधारित, शाश्वत व उत्पन्नवाढीस पूरक अशा पर्यायी शेती व्यवसायांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यशाळेस तालुक्यातील शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गट सदस्य, उमेद अभियानातील महिला, कृषी सखी, युवक-युवती तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांनी रेशीम शेतीचे आर्थिक महत्त्व, तुती लागवड, रेशीम किडे संगोपन, शासकीय अनुदान योजना, बाजारपेठ उपलब्धता तसेच रोजगार निर्मितीच्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. अंकुश गाडगे, केंद्रीय रेशीम बोर्ड यांनी रेशीम शेतीतील तांत्रिक बाबी, उत्पादन व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

ज्योती एन. राठोड गट विकास अधिकारी पंचायत समिती बदनापूर यांनी, जलकवच अभियान अंतर्गत येणारे सप्त कार्यक्रम विषयी माहिती दिली व  शाश्वत उत्पादन देणारी रेशीम शेतीचा अवलंब करण्याचा आज महिलांनी निर्णय घ्यावा व आपले आपले उत्पादन वाढवावे असे अवाहन केले

रेशीम शेती ही कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारी, ग्रामीण भागात रोजगार निर्मितीस चालना देणारी तसेच महिलांसाठीही उपयुक्त अशी व्यवसायाभिमुख शेती पद्धती असल्याने जलसुरक्षा, पीक विविधीकरण व शेतकरी उत्पन्नवाढ या जालना जलकवच अभियानाच्या उद्दिष्टांना पूरक ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

सदर कार्यक्रम, बदनापूर गटविकास अधिकारी ज्योती एन. राठोड, यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाला. कार्यक्रमास बदनापुर तालुक्याचे रेशीम अधिकारी,डॉ.गोविंद गीते हे उपस्थीत होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंचायत समिती बदनापूर, उमेद अभियान, कृषी विभाग व रेशीम विभाग यांनी समन्वयाने कार्य केले.

कमी पाण्यात अधिक उत्पादन - रेशीम शेतीकडे वाटचाल या संदेशाद्वारे शेतकऱ्यांना जलसाक्षरता व पर्यायी शेती व्यवसायाबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न या कार्यशाळेतून करण्यात आला.

-*-*-*-*-*-*-

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 3752 लाख समात्राचे वाटप टाट मोहीम गतिमान करण्याचे मा. आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

 


 

जालना,दि.17(जिमाका): राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सन 2026-27  या वर्षाकरिता आवश्यक असलेल्या गोटपॉक्स लसमात्रांचे उत्पादन पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे येथे सुरू झाले आहे. 21 व्या पशुगणनेनुसार राज्यातील जिल्ह्यानिहाय गायवर्ग पशुधनाची संख्या विचारात घेऊन, पहिल्या टप्यात एकूण लस उत्पादनाच्या 40 टक्के 37 लाख 52 हजार लसमात्रांचे वाटप नियोजनबद्ध रीतीने सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर व तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 

लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे या संस्थेने आवश्यक लसमात्रांचे उत्पादन यशस्वीपणे केले आहे. सर्व जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी पुरवण्यात आलेली लस क्षेत्रीय स्तरावर वेळेत पोहोचवताना तिची शीत साखळी कुठेही खंडित होणार नाही, याची काटेकोर दक्षता घ्यावी, गोटपॉक्स लसमात्रा प्राप्त होताच जिल्ह्यातील अधिक दूध देणाऱ्या व उच्च उत्पादनक्षमता असलेल्या पशुंचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, लसीकरणाच्या विहित नमुन्यातील बिनचूक आणि एकत्रित दैनंदिन अहवाल दररोज सकाळी 11 वाजेपर्यंत विभागनिहाय संस्थेकडे सादर करावा; अशा सूचना पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे या संस्थेचे सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ. याहयाखान पठाण यांनी जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय यांना केल्या आहेत.

 

हॉटस्पॉट तालुक्यांवर विशेष लक्ष

 

गतवर्षी ज्या तालुक्यांमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आला होता, त्या भागात प्राधान्य क्रमाने लसीकरण मोहीम राबवावी. या व्यापक मोहिमेसाठी जिल्ह्यातील सहकारी दुग्ध संघ, स्वयंसेवी संस्था तसेच खाजगी पशुवैद्यक व सेवादाते यांचे सक्रिय सहकार्य घेण्यात यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हास्तरीय यंत्रणेला करण्यात आले आहे. पशुधनाच्या सुरक्षिततेला प्राधान्य

"लंपी चर्मरोगासारख्या (LSD) संसर्गजन्य आजारांपासून आपल्या राज्यातील गोधनाची सुरक्षा करणे हे पशुसंवर्धन विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि आपल्या शेतकरी बांधवांचा मुख्य कणा आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी गोटपॉक्स लसीकरण हाच एकमेव आणि सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. सद्यस्थितीत हा उपाय क्षेत्रीय स्तरावर आम्ही मोहिम स्वरुपात योजत आहोत. पशुपालकांनीही विभागास सहकार्य करावे.

-*-*-*-*-*-