Friday, 29 May 2026

गतीमान प्रशासनासाठी ई-ऑफिस प्रणालीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा –अपर मुख्य सचिव विकास खारगे

 




 

जालना,दि.29(जिमाका): महसूल विभाग हा समाजासाठी काम करणारा महत्त्वाचा घटक असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखुन काम करत, गतिमान प्रशासनासाठी ई-ऑफिस प्रणाली आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महसुल विभागाच्या आढावा बैठकीत श्री. खारगे बोलत होते. यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी मनिषा देशपांडे, सुकेशिनी पगारे, सह जिल्हा निबंधक रामेश्वर रोडगे, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख एम. पी. मगर, तहसिलदार छाया पवार  यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अपर मुख्य सचिव श्री. खारगे पुढे म्हणाले की, नागरीकांना पारदर्शकपणे सेवा देण्यासाठी तसेच शासकीय कामकाजात गती आणुन कामाकाजातील प्रलंबितता कमी करण्यासाठी सर्व महसुल यंत्रणांनी ई-ऑफिस प्रणालीचा वापर करणे आवश्यक आहे. शासनने ईज ऑफ डुइंग बिझनेसचे धोरण स्विकारले आहे. तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस क्षेत्रीय दौरा करावा. यामुळे नागरिकांचे प्रश्न समजावून घेण्यास मदत होते. तसेच त्यांनी दिलेल्या निवेदनांवर सकारात्मक कारवाई करावी. तसेच विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करुन, गुणवत्ता जाणून घेण्यास मदत होते. प्रशासनाने नागरिकामध्ये जावून काम करण्याचा प्रयत्न करावा. नागरिकांच्या समस्या, तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करुन त्यांच्या तक्रारींचा पाठपुरावा घ्यावा. कोणताही पाणंद रस्ता घेण्यापूर्वी तो अतिक्रमणमुक्त असावा, तसेच भूमी अभिलेख कार्यालयाकडून त्याचे सीमांकन करुन घ्यावे. पाणंद रस्त्यांच्या दर्जेदार कामांवर लक्ष ठेवण्याचे आणि पावसाळ्यापूर्वी जास्तीत-जास्त रस्ते पूर्ण करण्याचे नियोजन करावे. तसेच शासकीय जमिनी अतिक्रमण विरहित कशा राहतील तसेच त्यांचे व्यवस्थापन कसे करता येईल याचे नियोजन करावे. शासकीय आणि खाजगी जागेची जबाबदारी महसुल विभागाकडे आहे. याकरीता सर्व सातबारा आणि मिळकत पत्रिका व्यवस्थित सुरक्षित ठेवाव्यात. तसेच नागरिकांना अनावश्यक त्रास होऊ नये, यासाठी सर्व अर्जांची वेळेत व पारदर्शक पद्धतीने पूर्तता करण्याचे आवाहन केले.

यावेळी अपर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी त्यांनी जनगणना, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान, शासकीय जमिनी वाटप व शर्तभंग प्रकरणे,पर्यायी वनीकरण,वन जमिनीचे 7/12 अद्ययावत करणे, सिलिंग जमिन प्रकरणे, शेत व पाणंद रस्ते योजना, ई-पीक पाहणी, फेरफार नोंदी, वनहक्क दावे, अवैध गौण खनिज, घरकुलांना वाळू उपलब्ध करुन देणे आदी विषयांसह महसूल विषयक इतर कामांचाही आढावा घेतला. तसेच महसूल विभागातील प्रलंबित कामे, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा तसेच प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम करण्याच्या सूचना दिल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी सादरीकरणांद्वारे महसुल विभागातील विविध विषयांचा सविस्तर माहिती सादर केली. यावेळी बैठकीस जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, उपअधिक्षक भूमि अभिलेख, सह दूय्यम निबंधक यांची ऑनलाईन उपस्थिती होती.

 

****

महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे; विविध प्रकल्पास भेट व कार्यालयांची पाहणी


 




जालना,दि.29(जिमाका): ज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे हे आज (दि. 29 मे) जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी आज विविध विकास प्रकल्प आणि शासकीय कार्यालयास प्रत्यक्ष भेट देवून कामांची पाहणी केली.

अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांच्या दौऱ्याची सुरुवात दरेगाव (ता. जालना) येथील ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या पाहणीने झाली. या प्रकल्पाची सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा तसेच भविष्यातील नियोजनाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. प्रकल्पाच्या कामांमध्ये गती आणण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

त्यानंतर त्यांनी जालना शहरातील मोतीबाग चौपाटी येथे सुरू असलेल्या सुशोभिकरण कामांची पाहणी केली. कामाची गुणवत्ता, प्रगती आणि नागरिकांसाठी निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. शहर सौंदर्यीकरणाच्या कामांमध्ये दर्जा राखण्याबाबत त्यांनी संबंधित यंत्रणेला सूचना केल्या.  यानंतर जालना येथील सिरसवाडी रोडवरील जिल्हा रेशीम कोष बाजारपेठेस भेट देऊन बाजारपेठेतील सुविधा आणि कार्यपद्धतीची माहिती घेतली.

तसेच यावेळी त्यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, सह दुय्यम निबंधक कार्यालयास, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जालना तहसिल कार्यालय, जालना, आपले सरकार सेवा केंद्र तहसिल कार्यालय, जालना येथे भेट देऊन येथील उपलब्ध सोयी सुविधांची पाहणी केली. तसेच संबंधीत कर्मचाऱ्यांशी संवाद साधुन नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांची देखील माहिती घेतली. तसेच त्यांनी बदनापुर येथील कृषी विज्ञान/संशोधन केंद्रास भेट दिली. कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

-*-*-*-*-*-*-

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी नामांकने पाठवण्याचे आवाहन • नामांकने पाठवण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2026 • नामांकने, राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर, ऑनलाईन सादर करता येणार

 

 

जालना,दि.29(जिमाका): राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीसी) 2026 साठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि कला-संस्कृती अशा विविध क्षेत्रात, अद्वितीय, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांचा, हे पुरस्कार देऊन, सन्मान केला जातो.

 पाच वर्षे वयाच्या पुढचे आणि 18 वर्षांपर्यंतचे (31 जुलै, 2026 रोजी) कोणतेही मुले/मुली या पुरस्कारासाठी पात्र आहेत. मात्र, ते भारतीय नागरिक आणि भारतात वास्तव्य करणारे असणे आवश्यक आहे.

नागरिकांनी मानांकने केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल https://awards.gov.in वरुनच भरावीत. स्वयं-नामांकन आणि कोणीही केलेल्या शिफारसी स्वीकारल्या जातीत. ऑनलाइन आवेदने पाठवण्याची शेवटची तारीख 31 जुलै, 2026 आहे. अधिक सविस्तर माहितीसाठी,  कृपया राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलला भेट द्या. (https://awards.gov.in).

 

समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद येथे जागतिक तंबाखु विरोधी दिनानिमित्ताने शपथ

 


 

जालना,दि.29(जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग – जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, सहारा सामाजिक विकास संस्था, तेजस जनविकास संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखु विरोधी दिनानिमित्ताने जिल्हा परिषद येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात अधिकारी, कर्मचारी यांना तंबाखु मुक्तीची शपथ देण्यात आली यावेळी- नशा मुक्त भारत अभियांनाची या कार्यक्रमात नशाबंदी मंडळाच्या वतीने पोस्टर प्रदर्शने करण्यात आले. जिल्हा संघटक तथा सहारा संस्थेचे अध्यक्ष बिस्मिल्ला सय्यद यांनी तंबाखू विरोधी दिनाचे महत्त्व अधोरेखित करुन तंबाखूचे दुष्परिणाम व व्यसनामुळे होणाऱ्या गंभीर आजार विषयी माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. या कार्यक्रमाचे संचलन तेजस जनविकास संस्थेचे अध्यक्ष शिवाजी तायडे यांनी केले तर आभार समाजकल्याणचे राम मांटे यांनी व्यक्त केले. समाज कल्याण विभागाचे सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

-*-*-*-*-*-*-

 

जिल्हा प्रशासनाचे आवाहन नागरिकांनी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने दक्षता घ्यावी

 


 

 जालना, दि.29 (जिमाका) :- प्रादेशिक हवामानशास्‍त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या सूचनेनुसार जालना जिल्‍ह्यात दि. 31 मे ते 2 जुन 2026 या कालावधीत  अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्‍या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. तरी दि. 31  मे ते 2 जुन 2026 रोजी पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्‍या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 40-50 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलक्‍या ते मध्यम स्‍वरुपाच्‍या पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. तसेच दि. 31 मे ते 2 जुन 2026 रोजी पर्यंत  यलो अलर्ट जारी केला असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्‍या ते मध्यम स्‍वरुपाच्‍या पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी वादळी वारे, विजेपासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती दक्षता बाळगावी,  असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 मेघगर्जनेच्‍या वेळी, विज चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.  गडगडाटीच्या वादळादरम्यान व विज चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल,  सायकल यांच्यापासून दूर रहावे.  मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या, लोंबणाऱ्या तारांपासून दूर रहावे. वीज चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमिनीशी कमीतकमी संपर्क असावा. शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी किंवा झाकून ठेवावी. आपत्कालीन परिस्थितीत जिल्‍हाधिकारी कार्यालयातील जिल्‍हा नियंत्रण कक्ष तसेच नजीकच्या तहसील कार्यालयात, पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

 

 

Wednesday, 27 May 2026

अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांचा जालना जिल्हा दौरा

 


 

जालना, दि.26 (जिमाका):  राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे हे  दि. 29 मे 2026 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे

             शुक्रवार दि. 29 मे,2026 रोजी सकाळी 8.00 वाजता ड्रायपोर्ट प्रकल्प दरेगाव, ता. जालना येथे भेट देवून पाहणी करणार आहेत. सकाळी 9.00 वाजता मोतीबाग चौपाटी येथे आगमन व सुशोभिकरण कामाला भेट व पाहणी करणार आहेत. सकाळी 9.15 वाजता जिल्हा रेशीम कोष बाजारपेठ, सिरसवाडी रोड, जालना येथे आगमन भेट व पाहणी करणार आहेत. सकाळी 10.00 ते 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह, जालना येथे राखीव.

सकाळी 11.00 ते दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आढावा बैठक व पाहणी.  दुपारी 12.30 वाजता उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय, प्रशासकीय इमारत दुसरा मजला, जालना येथे भेट व पाहणी. दुपारी 1.15 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, जालना येथे भेट व पाहणी. दुपारी 2.00 वाजता कृषी पर्यटन केंद्र लालवाडी, ता. अंबड येथे आगमन व भोजन.

दुपारी 3.00 वाजता तहसिल कार्यालय, अंबड व आधार केंद्र, तहसिल कार्यालय परिसर तसेच महा -ई -सेवा केंद्र अंबड येथे भेट व पाहणी.  दुपारी 3.45 वाजता सह दुय्यम निबंधक कार्यालय, अंबड येथे भेट व पाहणी. सायंकाळी 4.30 वाजता उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय, अंबड येथे भेट व पाहणी. सायंकाळी 5.30 वाजता सुपर फिफ्टी उपक्रमास भेट (स्थळ- प्रियीयम इन्स्टीट्युट ऑफ सायन्स, मंठा चौफुली, जालना) सोईनुसार छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-*-

पद्म पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


 

जालना दि.27 (जिमाका) : प्रजासत्ताक दिन दि. 26 जानेवारी, 2027 रोजी घोषित होणाऱ्या पद्म पुरस्काराकरिता (पद्मश्री, पद्म भूषण, पद्मविभूषण) शिफारशी केंद्र शासनामार्फत नामांकन प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

पद्म पुरस्कार हे सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असून ते अतिशय प्रतिष्ठेचे आहेत. याबाबतचे अधिनियम आणि नियम केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या  www.padmaawards.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यानुसार जालना जिल्ह्यातील पद्म पुरस्कारासाठी पात्र व इच्छुक मान्यवरांची वैयक्तीकरीत्या ऑनलाईन नामांकन पोर्टलवर दि. 31 जुलै 2026 पर्यंत सादर करण्यासाठी  जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, यांनी आवाहन केले आहे.

-*-*-*-*-*-*-