Monday, 25 May 2026

*दिव्यांग सक्षमीकरणासाठी जालना येथे विशेष शिबिर*

*जिल्हाधिकारी कार्यालय, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट यांचा संयुक्त उपक्रम*





जालना,दि.25(जिमाका): दिव्यांग व्यक्तींना सक्षम व स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय जालना, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा परिषद प्रशाला, स्टेशन रोड येथे जालना जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात, कृत्रिम पाय तसेच पोलिओग्रस्त व्यक्तींना कॅलिपर्सचे वाटप विशेष सहाय्य वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, जवळपास 80 लाभार्थ्यांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमादरम्यान लाभार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत योग्य नियोजन व उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थित दिव्यांग बांधवांनी प्रशासनाच्या या संवेदनशील उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. तसेच बुधवार, दि. 26 मे 2026 रोजी हे विशेष शिबिर सुरू राहणार असून अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी केले.

यावेळी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्री. खरात यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.


****



बोव्हाईन ब्रिडींग ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करा : आयुक्त पशुसंवर्धन यांचे निर्देश

जालना,दि.25(जिमाका): राज्यातील गाई-म्हशींच्या जातींमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी व प्रजनन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम, 2023” लागू केला असून, या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी अधिनस्त अधिकारी वर्गाला दिले आहेत.

राज्यात या कायद्याची अंमलबजावणी दि. 5 डिसेंबर, 2024 पासून सुरू झाली आहे. कृत्रिम रेतन प्रक्रियेद्वारे उत्तम दर्जाच्या व उच्च वंशावळीच्या वळूंचा वापर करून दुधाळ जनावरांची पैदास वाढविणे तसेच प्रजनन प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.

या अधिनियमांतर्गत राज्यातील सर्व रेत केंद्रे, भ्रूण प्रत्यारोपण केंद्रे, कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्था व सेवा पुरवठादारांना महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित संस्थांना केवळ प्रमाणित व उच्च वंशावळीच्या वळूंचेच रेत प्रजननासाठी वापरण्याची परवानगी राहणार आहे.

या सर्व प्रक्रियांवर देखरेख ठेवण्यासाठी ‘महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरण’ स्थापन करण्यात आले असून, प्राधिकरणाला संबंधित केंद्रांची तपासणी, झडती तसेच नियमबाह्य साहित्य जप्त करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. क्षेत्रीय स्तरावर अनेक खाजगी कृत्रिम रेतन सेवा पुरवठादार व संस्था यांनी अद्याप प्राधिकरणाकडे नोंदणी केलेली नसल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांवर अधिनियमांतर्गत नियमोचित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई व दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांनी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी लवकरात लवकर प्राधिकरणाकडे नोंदणी करावी, असे आवाहन आयुक्त पशुसंवर्धन यांनी केले आहे.

*दंड व शिक्षेच्या तरतुदी :*

कलम 4 व 5 अन्वये नोंदणी प्रमाणपत्रधारक व्यक्तीने विहित मानकांचे पालन न केल्यास दोष सिद्ध झाल्यावर रु. 50 हजारांपर्यंत दंड आकारण्यात येईल. नोंदणी प्रमाणपत्राविना गोजातीय प्रजनन क्रिया करणे अथवा प्रमाणित वळूव्यतिरिक्त इतर वळूंपासून गोठवलेले रेत उत्पादन करणे किंवा अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास दोष सिद्ध झाल्यावर रु. 1 लाखांपर्यंत दंड आकारण्यात येईल. नोंदणी प्रमाणपत्रानुसार मंजूर सेवांबाबत चुकीची किंवा दिशाभूल करणारी जाहिरात अथवा प्रसिद्धी केल्यास दोष सिद्ध झाल्यावर सहा महिन्यांपर्यंत साधा कारावास किंवा रु. 2 लाखांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

*शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना :*

फक्त प्रमाणित व अधिकृत विर्यामात्रांचाच वापर करावा. सेवा घेण्यापूर्वी तंत्रज्ञाचा नोंदणी क्रमांक तपासून नोंदणीकृत तंत्रज्ञांकडूनच सेवा घ्यावी. कोणतीही अनियमितता आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवून पशुधनाचे संरक्षण करावे.

*शेतकऱ्यांना होणारे फायदे :*

सुधारित व उच्च उत्पादनक्षम वंशामुळे अधिक दूध उत्पादन मिळणार आहे. उत्तम प्रजनन कार्यक्षमतेमुळे जनावरांची संख्या व गुणवत्ता वाढणार आहे. वैज्ञानिक व नियंत्रित प्रजननामुळे दीर्घकालीन पशुधन विकास साध्य होणार आहे. दुग्ध व्यवसायात स्थैर्य निर्माण होऊन आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे.


****


“कुपोषणमुक्त जालना” साठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 


 

मिशन न्युट्रीशन जालना अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

 


जालना,दि.25(जिमाका): मिशन न्युट्रीशन जालना अंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालय, जालना येथे दि. 25 मे ते 7 जून, 2026 या कालावधीत आयोजित जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दि. 25 मे रोजी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी कुपोषणमुक्त जालना हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग तसेच सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करून बालकांचे आरोग्य सुदृढ करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभाग व महिला व बाल विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, गटप्रवर्तक, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका यांना पोषण आहार, संतुलित आहार, माता व बालकांच्या आरोग्याची काळजी तसेच कुपोषण प्रतिबंध याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठी आयआयटी मुंबई यांच्या माध्यमातून पोषण आहारासंदर्भातील शैक्षणिक व्हिडिओचा उपयोग करण्यात येत असून व्हील ग्लोबल फाऊंडेशन यांच्या सहकार्याने प्रशिक्षण प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत सुमारे 250 प्रशिक्षणार्थींना विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून प्रशिक्षणानंतर प्रत्येक प्रशिक्षणार्थीने 1:3 या प्रमाणात मातां व बालकांना दत्तक घेऊन त्यांचे समुपदेशन करायचे आहे. यामध्ये पोषण आहाराचे महत्त्व, संतुलित आहार, बालकांच्या वाढीचे निरीक्षण आणि कुपोषण टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे 2 हजार 250 माता व बालकांपर्यंत या मोहिमेचा लाभ पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, डॉ. प्राची तापशेटीवार, डॉ. जी. डी. म्हस्के, महिला व बाल विकास विभागाच्या श्रीमती कोरे, जिल्हा प्रकल्प समन्वयक संदीप गुसाळे, साक्षी उगले तसेच आरोग्य विभाग व एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

****

Friday, 22 May 2026

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘पुतळा समितीची’ आढावा बैठक संपन्न

 



जालना, दि.22 (जिमाका): जिल्ह्यातील पुतळे आणि स्मारकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘पुतळा समिती’ची  आढावा बैठक पार पडली. यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल तसेच विविध संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बैठकीत मुख्यत्वे जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पुतळ्यांच्या परिसरातील कायदा, सुव्यवस्था आणि सुरक्षिततेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संवेदनशील ठिकाणांवर विशेष पोलीस गस्त ठेवण्याबाबत तसेच सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित करण्याबाबत पोलीस अधीक्षकांशी चर्चा झाली.

जिल्हाधिकारी यांनी महापुरुष आणि क्रांतीकारकांच्या पुतळ्यांच्या परिसराची नियमित स्वच्छता, रंगरंगोटी व योग्य देखभाल राखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना तातडीने आवश्यक सूचना देण्याचे निर्देश दिले. याशिवाय, कोणत्याही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून किंवा विनापरवाना पुतळे उभारले जाणार नाहीत, याची दक्षता प्रशासनाने घेण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले.

बैठकीत प्रशासनाने पुतळ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करत असल्याचे स्पष्ट केले असून, नागरिकांनी देखील या नियमांचे पालन करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

-*-*-*-*-*-

जालना जिल्हा घरगणना मोहिमेत राज्यात अव्वल हाऊस लिस्टिंग ऑपरेशनमध्ये 94.59 टक्के प्रगती

 


 

जालना, दि.22(जिमाका) : जनगणना 2027 अंतर्गत सुरू असलेल्या घरगणना (House Listing Operation) कार्यक्रमात जालना जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत जालना जिल्ह्याने राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक प्रगती साधली आहे.

 

राज्यस्तरीय आढाव्यानुसार, जालना जिल्ह्यातील एकूण 2863 HLB पैकी 2708 HLB चे काम पूर्ण झाले असून, जिल्ह्याने तब्बल 94.59 टक्के प्रगती साधली आहे. ही प्रगती राज्यातील सर्वाधिक असून, जिल्हा प्रशासनाच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीची आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयाची ही मोठी पावती मानली जात आहे.

 

जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा जनगणना कक्ष, पर्यवेक्षक, प्रगणक अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत ही कामगिरी साध्य केली आहे. प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे घरगणना मोहिमेला वेग मिळाला असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

या यशाबद्दल जिल्हाधिकारी  आशिमा मित्तल यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून, उर्वरित कामही निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जनगणना-2027 ही देशाच्या नियोजन प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची मोहीम असल्याने नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

-*-*-*-*-*-

जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ

 



जालना,दि.22(जिमाका):  माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त दि. २१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ घेण्यात आली.

 यावेळी नायब तहसिलदार तुषार निकम, सतिश तायडे, किशोर तायडे, महसुल सहायक याया पठाण, रवी हेलगट, अनिल शिंगाडे, राहुल खंदारे, संपदा कुलकर्णी, शिल्पा मगरे, सविता भोकरे, पांडे आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-

अपंग प्रशिक्षण केंद्रात 30 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

  

 जालना,दि.22(जिमाका):  दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर या संस्थेत म.रा. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मार्फत मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी 18 ते 40 वयोगटातील दिव्यांग (अस्थिव्यंग, मुकबधीर, अंध, मतिमंद) मुला- मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. या प्रशिक्षण केंद्रात विद्युत तारतंत्री, सर्व्हिसिंग ऑफ इलेक्रिर क डोमेस्टिक ऍप्लायंसेस, मोबाईल रिपेअरिंग अँड सर्व्हिसिंग, फिटर, एलिमेंट ऑॅफ कॅप्म्युटर इंजीनिअरिंग, कॉम्प्युटर ऑपरेशन विथ एम.एस. ऑफिस, डेस्कटॉप पब्लिशिंग डीटीपी, कॉम्प्युटर अकाँटिंग व ऑफिस ऑटोमेशन व अरबत्ती, खडू, धुप बनवणे इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. तरी इच्छुक दिव्यांग (अस्थिव्यंग, मुकबधीर, अंध, मतिमंद) मुला- मुलींनी किंवा पालकांनी दि 30 जुन 2026 पर्यंत  तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,भायेगाव रोड, देगलूर ता. देगलुर जि. नांदेड मो. नं. 9960900369,9403207100,7378641136 येथे पत्रव्यवहार करावे किंवा समक्ष भेटण्याचे आवाहन प्राचार्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-