जालना,दि.12(जिमाका) : राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ता
योजना”
अंतर्गत जिल्ह्यातील शेत व पाणंद रस्त्यांची कामे नियोजनबद्ध आणि गुणवत्तापूर्ण
पद्धतीने पूर्ण व्हावीत, यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज जालना व
घनसावंगी तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रस्तावित शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांची
प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये जालना तालुक्यातील लोंढ्याचीवाडी तसेच घनसावंगी
तालुक्यातील राणी उचेंगाव, राजेगाव, वडीरामसगाव आणि बाचेगाव येथील प्रस्तावित
शेत/पाणंद रस्त्यांची त्यांनी पाहणी केली. यावेळी संबंधित महसूल अधिकाऱ्यांकडून
प्रस्तावित रस्त्यांची सविस्तर माहिती घेतली.
पाहणीदरम्यान रस्त्यांची उपलब्ध जागा,
अतिक्रमण स्थिती, मोजणी प्रक्रिया, तांत्रिक बाबी तसेच कामांच्या अंमलबजावणीचा
आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी बारमाही सुविधा
उपलब्ध होणे, शेतीपर्यंत कृषी यंत्रसामग्री पोहोचण्यास सुलभता निर्माण होणे तसेच
ग्रामीण भागातील शेती रस्ते सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे
त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रस्तावित कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण
करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी
यावेळी दिल्या. ज्या ठिकाणी अतिक्रमण अथवा अन्य तांत्रिक अडचणी आहेत, त्या तातडीने
निकाली काढून कामांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. रस्त्यांच्या
कामांमध्ये गुणवत्ता राखणे, मुरूम व खडी दबाई योग्य प्रकारे करणे तसेच रस्त्यांचा
टिकाऊपणा सुनिश्चित करण्यावर विशेष भर द्यावा. तसेच मौजे लोंढ्याचीवाडी (ता.
जालना) तसेच राणी उचेंगाव, राजेगाव, वडीरामसगाव आणि बाचेगाव (ता. घनसावंगी) येथील
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अपूर्ण कामांचाही आढावा
घेत, अपूर्ण कामांबाबत नियमानुसार कार्यवाही करून ती तात्काळ पूर्ण करण्याच्या
सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या.
यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो)
श्रीमती मनीषा दांडगे, तहसीलदार घनसावंगी रमेश पागोटे, प्रभारी तहसीलदार जालना
राजू निहाळ, नायब तहसीलदार शैलेश राजमाने, नायब तहसीलदार (रोहयो) डॉ. नीलम लुणावत,
कार्यक्रम व्यवस्थापक सतीश देवढे यांच्यासह संबंधित गावांचे तलाठी व ग्रामरोजगार
सहाय्यक उपस्थित होते.
-*-*-*-*-*-*-



.jpeg)
