Monday, 13 April 2026

बीजोत्पादनातून महिला सक्षमीकरणाचा ‘जालना पॅटर्न’


 

शेती हा कष्टाचा व्यवसाय, त्यातही कोरडवाहू शेती म्हणजे नशिबाचा खेळ. पण याच कोरडवाहू मातीत जर जिद्द आणि आधुनिक तंत्रज्ञानाची पेरणी केली, तर समृद्धीचे पीक घेता येते, हे जालन्यातील प्रयोगशील महिला शेतकरी मोनिका पांडुरंग शर्मा यांनी सिद्ध करून दाखवले आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी बीजोत्पादनाचे शास्त्रशुद्ध तंत्र आत्मसात करून आज एक यशस्वी उद्योजक शेतकरी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ब्रिडर सीड्सला 30 टक्के, तर फाउंडेशन बियाण्याला 20 टक्के अतिरिक्त दर मिळतो, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. तसेच खरीपानंतर रब्बी हंगामात त्या हरभऱ्याच्या बीडीएन 798 आणि विश्वराज वाणाचे 40 एकरवर बीजोत्पादन घेतात. याप्रमाणे जिद्द आणि तंत्रज्ञानाची जोड देत जालन्याच्या मोनिका शर्मां यांनी बीजोत्पादनातून सुवर्ण भरारी घेतली आहे.

 

§  60 एकरवर प्रगत शेतीचे प्रयोग :-

जालना तालुक्यातील खोडेपुरी येथील मोनिका शर्मा यांची 60 एकर शेती आहे. एकेकाळी केवळ घरगुती उत्पादनासाठी शेती करणाऱ्या शर्मा यांनी आता महाबीजच्या सहकार्याने बीजोत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. खरीप हंगामात त्यांनी तब्बल 50 एकर क्षेत्रावर सोयाबीनच्या आंबा या वाणाचे बीजोत्पादन घेतले. योग्य नियोजन आणि परिश्रमामुळे त्यांना 350 क्विंटल बियाण्यांचे दर्जेदार उत्पन्न मिळाले आहे.

§  स्वतः चालवतात ट्रॅक्टर आणि अवजारे :-

ग्रामीण भागात आजही महिलांना शेतीतील दुय्यम कामांसाठी ओळखले जाते. मात्र, मोनिका शर्मा यांनी हा समज मोडीत काढला आहे. त्या स्वतः ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, बीबीएफ पेरणी यंत्र आणि रिपर यांसारखी सर्व प्रगत यंत्रसामग्री आणि अवजारे लिलया चालवतात. मजुरांच्या टंचाईवर मात करण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी त्यांनी यांत्रिकीकरणाचा आधार घेतला आहे.

§  रासायनिक खतांना गोठ्याची जोड :-

मोनिका शर्मा यांच्याकडे 50 देशी गाईंचा गोठा आहे. या गाईंच्या शेणखतामुळे त्यांच्या शेतीची सुपिकता वाढली असून खताचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचला आहे. शाश्वत शेतीसाठी त्या हिरवळीचे खत (सनहेम्प), कंपोस्ट आणि आंतरपिकांचा वापर करतात. पिकांवरील कीड नियंत्रणासाठी त्या आयपीएम पद्धतीचा वापर करून निमार्क, फेरोमोन सापळे आणि पक्षी थांबे यांसारख्या पर्यावरणपूरक उपाययोजनांना प्राधान्य देतात.

§  बीजोत्पादनाचे शास्त्र आणि आर्थिक गणित :-

बीजोत्पादन हे सामान्य शेतीपेक्षा कठीण असते. यात महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे कडक नियम पाळावे लागतात. मोनिका शर्मा सांगतात की, बियाण्यांचा दर्जा राखण्यासाठी अधिकाऱ्यांच्या निगराणीत टॅगिंग आणि सीलिंगचे काम केले जाते. यामुळे बियाण्याला विश्वासार्हता मिळते.

§  महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श :-

कोरडवाहू शेतीतील महिलांचे कष्ट अनेकदा दुर्लक्षित राहतात. मात्र, सुधारित वाण, कृषी विद्यापीठांचे मार्गदर्शन आणि कष्टाची तयारी असेल, तर महिला शेतीतून आर्थिक क्रांती घडवू शकतात, हे मोनिका शर्मा यांच्या यशोगाथेवरून स्पष्ट होते. आज त्या परिसरातील अनेक महिला शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.

 

शेतीत केवळ कष्ट करून चालत नाही, तर त्याला नियोजनाची आणि तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागते. महाबीज आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे मला बीजोत्पादनात यश मिळाले. महिलांनी आधुनिक अवजारे चालवायला शिकले, तर शेती अधिक फायदेशीर होऊ शकते.  - मोनिका पांडुरंग शर्मा, प्रयोगशील महिला शेतकरी, जालना

-*-*-*-*-

 


जालना जिल्ह्यातील प्राचीन हस्तलिखितांचे होणार दस्तऐवजीकरण

 

ज्ञानभारतम्’ मोहिमेचा शुभारंभ


 

जालना, दि. 13  (जिमाका) :-  भारताचा समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने ‘ज्ञानभारतम्’ (Gyan Bharatam) ही महत्त्वपूर्ण योजना हाती घेतली आहे. या अभियानांतर्गत जालना जिल्ह्यातील मंदिरे, मठ, खाजगी ट्रस्ट आणि वैयक्तिक संग्राहकांकडे असलेल्या जुन्या हस्तलिखितांचे सर्वेक्षण व डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय कार्यात जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये आणि खाजगी संग्राहकांच्या सहकार्याने सुमारे एक कोटीपेक्षा अधिक हस्तलिखितांचा संग्रह करण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे. हस्तलिखितांचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन आणि प्रसार करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि मराठी भाषा विभागाच्या मार्गदर्शनानुसार ही मोहीम जिल्ह्यात राबविली जात आहे.

जालना जिल्ह्यात या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) यांची ‘जिल्हा नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण केवळ हस्तलिखितांच्या नोंदीसाठी आहे. मूळ हस्तलिखिते मालकाकडून काढून घेतली जाणार नाहीत, तर त्यांचे केवळ शास्त्रीय पद्धतीने दस्तऐवजीकरण केले जाईल. या मोहिमेसाठी खास ‘Gyan Bharatam’ नावाचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. प्रशिक्षित सर्वेक्षकांमार्फत हस्तलिखितांची पडताळणी व दस्तऐवजीकरण केले जाणार आहे.

ज्या संस्था किंवा व्यक्तींकडे प्राचीन किंवा जुनी हस्तलिखिते उपलब्ध आहेत, त्यांनी या राष्ट्रीय कार्यात प्रशासनास सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी https://gyanbharatam.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

Thursday, 9 April 2026

मार्च अखेरचे 'ई-आर 1' विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन

 


 

जालना, दि. 9 (जिमाका) :- सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना मार्च 2026 या तिमाहीचे मनुष्यबळ विवरणपत्र (ई-आर 1) सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सेवायोजन कार्यालये (रिक्त पदांची सूचना देणे सक्तीचे) कायदा 1959 नुसार, हे विवरणपत्र दि.30 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन भरणे बंधनकारक असून यात कसूर करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.  नियोक्त्यांनी आपली माहिती www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर सादर करावी. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी दिली आहे.

केंद्र व राज्य शासनाची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती) तसेच खासगी क्षेत्रातील ज्या आस्थापनांमध्ये 25 किंवा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, अशा सर्व कारखाने आणि उद्योगांना हे विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. विवरणपत्र भरताना काही तांत्रिक अडचण आल्यास नियोक्त्यांनी कार्यालयीन वेळेत (सकाळी 10 ते संध्याकाळी 6 सुटीचे दिवस वगळून) ०२४८२-२९९०३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 162                                                                दि.9 एप्रिल, 2026

नवउद्योजकांसाठी कार्यशाळेचे आयोजन

जालना, दि. 9 (जिमाका) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून राज्यभरात सामाजिक समता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत शुक्रवार दि. 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी कार्यशाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण मार्गदर्शनासह विविध योजनांच्या लाभांचे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त राजू एडके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 30 मार्च 2026 च्या शासन निर्णयानुसार, दि.8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत संपूर्ण राज्यात सामाजिक समता सप्ताह साजरा केला जात आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्ये जनमानसात रुजवण्यासाठी आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी वित्तीय सहाय्य आणि मार्जिन मनी योजनेची सविस्तर माहिती दिली जाईल. तसेच विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या लाभांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप केले जाईल. असेही कळविले आहे.

 

-*-*-*-*-

वृत्त क्र. 163                                                              दि.9 एप्रिल, 2026

 

सामाजिक समता सप्ताह उत्साहात;

स्वाधार व ट्रॅक्टर योजनेच्या लाभार्थ्यांना पत्राचे वाटप

जालना, दि. 9 (जिमाका) :- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दि.8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचा शुभारंभ जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आला. यावेळी विशेष अधिकारी स्नेहल मोदाळे यांच्या हस्ते सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, मिनी ट्रॅक्टर योजना या योजनांमधील निवडक लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. श्रीमती मोदाळे यांनी प्रास्ताविकात शासनाच्या या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री महोदयांनी सन 2026-27 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष, संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे 150 वे वर्ष आणि महाड चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष साजरे करण्याचा संकल्प सोडला आहे. महाडचा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नसून तो मानवी हक्कांच्या पुनर्स्थापनेसाठी होता, हा डॉ. बाबासाहेबांचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. शासन निर्णयानुसार,दि.8 ते 14 एप्रिल या काळात जिल्हाभरात व्याख्याने, निबंध स्पर्धा, आरोग्य शिबिरे आणि शासकीय योजनांच्या जनजागृतीचे विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत.

या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरूपात निवडपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बदनापूर येथील शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. दिलीप गिरी यांनी केले. या प्रसंगी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतिगृहे व निवासी शाळांमधील कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. अंबोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 164                                                               दि.9 एप्रिल, 2026

 

जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण पंधरवड्याचे आयोजन

 

जालना, दि. 9 (जिमाका) :- एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रस्तरावर दि. 9 एप्रिलपासून 8 वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. बालकाचा शारीरिक विकासासोबतच मानसिक आणि बौद्धिक विकास व्हावा, यासाठी कुटुंब आणि समुदायामध्ये योग्य पद्धतींचा सराव व्हावा, हा या मोहिमेचा केंद्रबिंदू आहे. दि. 23 एप्रिल 2026 पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी आणि लाभार्थ्यांनी केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

यंदाचा पोषण पंधरवडा १). माता व बालकाचे पोषण: गरोदर माता आणि बालकांच्या आहाराबाबत मार्गदर्शन. २). मेंदू विकास (० ते ३ वर्षे): लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी पूर्व उद्दीपन. ३). खेळातून शिक्षण (३ ते ६ वर्षे): मुलांसाठी खेळ आधारित पूर्व शालेय शिक्षण. ४). स्क्रीन टाइमवर नियंत्रण: मुलांचे मोबाईल व टीव्हीचे व्यसन कमी करण्यासाठी पालकांची भूमिका. ५). सक्षम अंगणवाडी: अंगणवाडी केंद्रांच्या सक्षमीकरणासाठी लोकसहभाग वाढवणे. या विषयावर प्रामुख्याने आधारित असेल. असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 165                                                              दि.9 एप्रिल, 2026

 

अमृततर्फे व्यापक कौटुंबिक सर्वेक्षणाचे आयोजन

 

 

जालना, दि. 9 (जिमाका) :- राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी स्थापन झालेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेने आता पुढाकार घेतला आहे. ज्या जातींना अद्याप कोणत्याही स्वतंत्र शासकीय विभाग किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा 25 जातींच्या प्रगतीसाठी अमृततर्फे आता व्यापक कौटुंबिक सर्वेक्षण हाती घेण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून समाज घटकांच्या अपेक्षा आणि उपलब्ध स्थानिक संसाधने यांचा मेळ घालून नवनवीन योजनांची आखणी केली जाणार आहे.

सध्या अमृतच्या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य अशा 25 जातींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आगामी काळात होणाऱ्या सर्वेक्षणाअंती या यादीत आणखी काही जातींची भर पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. केवळ सरकारी योजना लादण्यापेक्षा, संबंधित समाजातील कुटुंबांची नेमकी संख्या किती? त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत? आणि स्थानिक पातळीवर कोणती कौशल्ये उपलब्ध आहेत? याचा सखोल अभ्यास या सर्वेक्षणातून केला जाणार आहे. असे व्यवस्थापक, अमृत कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 166                                                              दि.9 एप्रिल, 2026

 

क्रांतीचा साक्षीदार एकपात्री प्रयोगातून

उलगडणार महात्मा फुलेंचा जीवनप्रवास

 

जालना, दि. 9 (जिमाका) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने जालना शहरात एका विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाज कल्याण विभागाच्या वतीने शनिवार, दि. 11 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे क्रांतीचा साक्षीदार या एकपात्री नाटकाचे सादरीकरण होणार आहे.

राज्य शासनाच्या वतीने दि. 8 ते 14  एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताह साजरा केला जात आहे. महात्मा फुले यांचे हे 150 वे जयंती वर्ष (द्विशताब्दी वर्षाकडे वाटचाल) असून, त्यांच्या गौरवशाली जीवनप्रवासावर आधारित हे नाटक सादर केले जाणार आहे. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, तो बंड करून उठेल हा क्रांतीचा विचार या प्रयोगातून मांडला जाणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी (सामान्य) नम्रता चाटे आणि जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुकेशिनी कांबळे-पगारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, जालना यांनी या ऐतिहासिक आणि वैचारिक कार्यक्रमासाठी जालना शहरातील नागरिक, विचारवंत आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

-*-*-*-*-

 

Thursday, 2 April 2026

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी 8 एप्रिल रोजी लॉटरी जालना, दि.2 (जिमाका) :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय जालना यांच्या वतीने सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या थेट कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांची निवड आता लॉटरी पद्धतीने (चिठ्ठी टाकून) केली जाणार आहे. ही निवड प्रक्रिया बुधवार दि. 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे पार पडणार आहे. या आर्थिक वर्षासाठी जालना जिल्ह्याला एकूण 24 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. या योजनेसाठी महामंडळाकडे एकूण 166 उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते. अर्जांच्या छाननीनंतर त्यापैकी 119 अर्जदार पात्र ठरले असून, 47 अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा लाभार्थी निवड समिती यांच्या अध्यक्षतेखाली ही लॉटरी प्रक्रिया राबविली जाईल. निवड प्रक्रियेत पूर्णतः पारदर्शकता राहावी यासाठी ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. महामंडळाच्या वतीने सर्व पात्र अर्जदारांना या निवड प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रक्रियेद्वारे पात्र 119 उमेदवारांमधून चिठ्ठी टाकून अंतिम 24 लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. असे जिल्हा व्यवस्थापक, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

 

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या

थेट कर्ज योजनेसाठी 8 एप्रिल रोजी लॉटरी

 

जालना, दि.2 (जिमाका) :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय जालना यांच्या वतीने सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या थेट कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांची निवड आता लॉटरी पद्धतीने (चिठ्ठी टाकून) केली जाणार आहे. ही निवड प्रक्रिया बुधवार दि. 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे पार पडणार आहे.

या आर्थिक वर्षासाठी जालना जिल्ह्याला एकूण 24 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. या योजनेसाठी महामंडळाकडे एकूण 166 उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते. अर्जांच्या छाननीनंतर त्यापैकी 119 अर्जदार पात्र ठरले असून, 47 अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा लाभार्थी निवड समिती यांच्या अध्यक्षतेखाली ही लॉटरी प्रक्रिया राबविली जाईल. निवड प्रक्रियेत पूर्णतः पारदर्शकता राहावी यासाठी ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. महामंडळाच्या वतीने सर्व पात्र अर्जदारांना या निवड प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रक्रियेद्वारे पात्र 119 उमेदवारांमधून चिठ्ठी टाकून अंतिम 24 लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. असे जिल्हा व्यवस्थापक, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Friday, 27 March 2026

रोजगार मेळाव्यात 110 तरुणांना मिळाली नोकरी; धूत ट्रान्समिशनकडून 27 जणांना जागीच नियुक्तीपत्रे जालना, दि. 27 (जिमाका) :- जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देत, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि हुतात्मा जनार्दनमामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांनी 110 उमेदवारांची निवड केली असून, त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळाली आहे. या मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरले ते छत्रपती संभाजीनगर येथील धूत ट्रान्समिशन प्रा. लि. हे औद्योगिक गृह. या कंपनीने 27 पात्र उमेदवारांना निवडीनंतर तात्काळ नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्या उत्साहात भर घातली. शुक्रवार दि.27 मार्च रोजी शासकीय आयटीआय जालना येथे हा मेळावा पार पडला. सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी शासकीय आयटीआयच्या प्राचार्या श्रीमती तृप्ती भोपे आणि उपप्राचार्या श्रीमती रजनी शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात इयत्ता पाचवी ते दहावी, बारावी आणि आयटीआय (सर्व ट्रेड्स) उत्तीर्ण असलेल्या शेकडो उमेदवारांनी हजेरी लावली होती. मेळाव्यात एकूण 9 नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये असिस्टंट मॅनेजर, ब्रांच मॅनेजर, कॅशियर, टेक्निशियन, ऑपरेटर, फील्ड एक्झिक्युटिव्ह, हेल्पर आणि ए.सी.सी. मशीन ऑपरेटर अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण 110 उमेदवारांना या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल परिहार यांनी केले, तर आभार प्रदर्शन एस. जी. चव्हाण यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आयटीआयचे गटनिदेशक एस. एस. कापसे, ए. एस. धाबे, बी. डी. वाणी यांच्यासह कौशल्य विकास विभागातील भुजंग रिठे, अमोल बोरकर, आत्माराम दळवी, प्रदीप डोळे, योगेश बहुरे, नितीन लोकडे, कैलास काळे, रवींद्र पाड्मुख, विशाल जगरवाल, दीपक पालवे आणि गणेश सुपारकर यांनी विशेष परिश्रम घेतले. असेही कळविले आहे. -*-*-*-*-

 

रोजगार मेळाव्यात 110 तरुणांना मिळाली नोकरी;

धूत ट्रान्समिशनकडून 27 जणांना जागीच नियुक्तीपत्रे

 

जालना, दि. 27 (जिमाका) :- जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देत, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि हुतात्मा जनार्दनमामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांनी 110 उमेदवारांची निवड केली असून, त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळाली आहे. या मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरले ते छत्रपती संभाजीनगर येथील धूत ट्रान्समिशन प्रा. लि. हे औद्योगिक गृह. या कंपनीने 27 पात्र उमेदवारांना निवडीनंतर तात्काळ नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्या उत्साहात भर घातली.

शुक्रवार दि.27 मार्च रोजी शासकीय आयटीआय जालना येथे हा मेळावा पार पडला. सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी शासकीय आयटीआयच्या प्राचार्या श्रीमती तृप्ती भोपे आणि उपप्राचार्या श्रीमती रजनी शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

या मेळाव्यात इयत्ता पाचवी ते दहावी, बारावी आणि आयटीआय (सर्व ट्रेड्स) उत्तीर्ण असलेल्या शेकडो उमेदवारांनी हजेरी लावली होती. मेळाव्यात एकूण 9 नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये असिस्टंट मॅनेजर, ब्रांच मॅनेजर, कॅशियर, टेक्निशियन, ऑपरेटर, फील्ड एक्झिक्युटिव्ह, हेल्पर आणि ए.सी.सी. मशीन ऑपरेटर अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण 110 उमेदवारांना या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल परिहार यांनी केले, तर आभार प्रदर्शन एस. जी. चव्हाण यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आयटीआयचे गटनिदेशक एस. एस. कापसे, ए. एस. धाबे, बी. डी. वाणी यांच्यासह कौशल्य विकास विभागातील भुजंग रिठे, अमोल बोरकर, आत्माराम दळवी, प्रदीप डोळे, योगेश बहुरे, नितीन लोकडे, कैलास काळे, रवींद्र पाड्मुख, विशाल जगरवाल, दीपक पालवे आणि गणेश सुपारकर यांनी विशेष परिश्रम घेतले. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

शनिवारी जिल्ह्यातील चार मंडळात समाधान शिबिराचे आयोजन

 


 

जालना, दि.27 (जिमाका) :- जिल्ह्यातील नागरिकांच्या महसुली तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी आणि विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान (टप्पा क्र. 1) राबविण्यात येत आहे. मार्च ते मे 2026 या कालावधीत तालुक्यातील विविध मंडळामध्ये या विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून याद्वारे प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारात पोहोचवण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत प्रलंबित नोंदी अद्ययावत करणे, डिजिटल सेवा पोर्टलवरील प्रकरणांचा निपटारा करणे आणि ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ अंतर्गत तातडीने दाखले व सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महसुली अडचणींमुळे अडकलेली सर्वसामान्यांची कामे या शिबिरांच्या माध्यमातून मार्गी लागणार असल्याने ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.

कार्यक्रमानुसार, शनिवार दि. 28 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या मंडळामध्ये ही शिबिरे पार पडणार आहेत. यामध्ये जालना तालुक्यातील विरेगाव मंडळातील साळेगव्हाण महादेव मंदिर, बदनापूर तालुक्यातील सेलगाव मंडळात जि.प. शाळा सेलगाव, अंबड तालुक्यातील वडीगोद्री मंडळातील श्री. गुरुदेव विद्यामंदिर वडीगोद्री आणि भोकरदन तालुक्यातील हसनाबाद मंडळातील मारोती मंदिर हसनाबाद या ठिकाणांचा समावेश आहे. नागरिकांनी आपल्या कामांशी संबंधित आवश्यक कागदपत्रासह या शिबिरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी केले आहे.

 -*-*-*-*-

वृत्त क्र. 138                                                                   दि. 27 मार्च, 2026

 

जालना जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत; विक्रीवरील मर्यादा रद्द

-         जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर

 

जालना,दि.27(जिमाका) :- जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत जिल्हाधिकारी कार्यालय, जालना (पुरवठा विभाग) यांनी इंधन विक्रीवरील पूर्वीचे निर्बंध रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी 27 मार्च 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, सोशल मिडियावर पसरलेल्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत होती. त्यामुळे मागणी व पुरवठा यामध्ये काही काळ समस्या निर्माण झाली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन 25 मार्च, 2026 रोजी पेट्रोल व डिझेल विक्रीवर काही मर्यादा घालण्यात आल्या होत्या. मात्र, सद्यस्थितीत जिल्ह्यातील BPCL, IOCL, HPCL तसेच इतर कंपन्यांकडून पुरेसा इंधन साठा उपलब्ध झाल्याने आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. त्यामुळे इंधन वितरणावर निर्बंध ठेवण्याची गरज उरलेली नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे 25 मार्च रोजी जारी करण्यात आलेला पेट्रोल-डिझेल विक्रीवरील मर्यादेचा आदेश तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक तेवढेच इंधन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, या आदेशाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पोलिस विभाग, तहसीलदार, तेल कंपन्यांचे अधिकारी तसेच पेट्रोल पंप चालकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

****

वृत्त क्र. 139                                                                   दि. 27 मार्च, 2026

 

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

 

       जालना, दि. 27 (जिमाका) :- जिल्ह्यात दि.31 मार्च रोजी भगवान महावीर जयंती, 2 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव, 3 एप्रिल रोजी गुड फ्रायडे तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी आणि 5  एप्रिल रोजी इस्टर संडे या सण, उत्सव आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि.1 जानेवारी 2026 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी  शशिकांत हदगल यांनी जारी केले आहेत.   

           संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश 6 एप्रिल 2026 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना तसेच उपविभागातील पोलिस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 140                                                                   दि. 27 मार्च, 2026

 

‘अमृत पेठ-2026’ उद्योजक मेळाव्याचे आयोजन

 

जालना, दि. 27 (जिमाका) :- स्थानिक कारागिरांच्या कौशल्याला दाद देण्यासाठी आणि स्वदेशी उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृतकडून जालन्यात ‘अमृत पेठ 2026’ या भव्य उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 11 आणि 12 एप्रिल 2026 रोजी महेश भवन, गुरु बच्चन चौक, मंठा चौफुली, जालना येथे थेट उत्पादकांकडून दर्जेदार वस्तू खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

स्वदेशी वस्तूंच्या वापराला चालना देणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेने हे पाऊल उचलले आहे. या मेळाव्यात स्थानिक उद्योजक, महिला बचत गट तसेच नवउद्योजकांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांचे स्टॉल थाटले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने घरगुती उत्पादने, आकर्षक हस्तकला वस्तू, खमंग खाद्यपदार्थ, तयार कपडे आणि दैनंदिन वापराच्या वैविध्यपूर्ण वस्तूंचा समावेश असेल. स्वदेशी बाजारपेठ या संकल्पनेवर आधारित हा मेळावा सर्वांसाठी खुला असून, जालनाकरांनी आपल्या कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह या उपक्रमाला भेट द्यावी. स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देऊन स्वदेशीचा संकल्प अधिक दृढ करावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी ७३९१०६५४७४ किंवा ९४२१९४४७५२ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे जिल्हा व्यवस्थापक, अमृत कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

 

Wednesday, 25 March 2026

पीडित कुटुंबांना मिळाला शासकीय सेवेचा आधार जिल्हाधिकारी आशिमा‍ मित्तल यांच्या हस्ते 8 वारसांना नियुक्तीपत्रे प्रदान

 


 

जालना, दि.25 (जिमाका) :-  अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) दाखल झालेल्या गंभीर प्रकरणांतील दिवंगत व्यक्तींच्या वारसांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार जालना जिल्ह्यातील अशा 8 पात्र वारसांची शैक्षणिक अर्हतेनुसार वर्ग-4 पदावर निवड करण्यात आली आहे. बुधवार दि.25 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात या लाभार्थ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे संघर्षानंतर या कुटुंबांना हक्काचा आधार मिळाला आहे.

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या शिफारशीनुसार, सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, शासकीय वसतिगृहे आणि निवासी शाळांमधील रिक्त पदावर या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शारदा मांदळे (पहारेकरी), संगिता रंजवे (शिपाई), रमा लाटे (पहारेकरी), साईनाथ कसारे (शिपाई), साईनाथ जाधव (सफाईगार), विशाल खरात (शिपाई), दिपक जाधव (शिपाई) आणि पंकज पाटोळे (शिपाई) या आठ जणांचा समावेश आहे. आपल्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती गमाविल्याचे दुःख बाजूला सारून शासकीय सेवेच्या माध्यमातून सन्मानाने जगण्याची नवी उमेद या वारसांच्या चेहऱ्यावर यावेळी दिसून आली. तसेच सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून घेतलेला हा निर्णय पीडित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या हस्ते हे नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी नवनियुक्त उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व प्रशासकीय कामात सचोटीने योगदान देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी विशेष अधिकारी स्नेहल मोदाळे, समाजकल्याण निरीक्षक अनिल सुनगत यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

-*-*-*-*-

वृत्त क्र. 131                                                                  दि. 25 मार्च, 2026

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या

 थेट कर्ज योजनेसाठी 30 मार्च रोजी लॉटरीने निवड

 

जालना, दि.25 (जिमाका) :-  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्जदारांमधून जालना जिल्हा कार्यालयामार्फत लाभार्थ्यांची अंतिम निवड आता लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे.  ही निवड प्रक्रिया निवासी उपजिल्हाधिकारी तथा लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष शशिकांत हदगल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.   हा कार्यक्रम दि. 30 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजता जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात संपन्न होणार आहे.

महामंडळाच्या जालना जिल्हा कार्यालयाला मुख्यालयाकडून एकूण 40 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. या योजनेसाठी स्थानिक प्रसारमाध्यमांतून प्रसिद्धी दिल्यानंतर जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्राप्त झालेल्या एकूण 162 अर्जांची छाननी केल्यानंतर, त्यापैकी 144 अर्ज पात्र ठरले असून 18 अर्ज तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरविण्यात आले आहेत. पात्र ठरलेल्या या 144 उमेदवारांमधून केवळ 40 लाभार्थ्यांची निवड पारदर्शकपणे लॉटरी पद्धतीने केली जाईल. निवडीमध्ये पूर्ण पारदर्शकता राहावी, यासाठी ही जाहीर सोडत काढण्यात येणार आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे  अर्जदारांच्या उपस्थितीत ही पारदर्शक निवड प्रक्रिया पार पडणार आहे. तरी निवड प्रक्रियेवेळी पात्र अर्जदारांनी वेळेवर उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर.एन.पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

 

वृत्त क्र. 132                                                                दि. 25 मार्च, 2026

 

 

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती बैठक संपन्न

 

            जालना, दि.25 (जिमाका) : जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक आज अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या अध्यक्षेत संपन्न झाली.

यावेळी बैठकीस जिल्हा रुग्णालयाचे डॉ. पी. एम. कुलकर्णी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संजय ताकवाले, कृषी अधीकारी सचिन पांचाळ, समाज कल्याण विभागाचे एल.बी. बारगिरे सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासनचे जीवन जाधव, नायब तहसिलदार शैलेश राजमाने, पोलीस निरिक्षक पंकज जाधव, सपोनि सचिन इंगेवाड यांची उपस्थिती होती.

जिल्हास्तरीय बैठकीत अमंली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या माध्यमातून विविध विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश देत अपर जिल्हाधिकारी श्री. मिसाळ म्हणाले की, अवैध पद्धतीने गावठी दारू व अमली पदार्थांची निर्मिती व विक्री रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच महसूल विभागाने पोलीस कारवाई दरम्यान आवश्यक ती मदत करावी, असेही सांगण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाला ग्रामीण भागातील वैद्यकीय दुकाने व दवाखान्यांवर नियमित तपासणी करून औषधांचा गैरवापर रोखण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषतः ‘एच वन’ (H1) गटातील औषधांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित दुकाने व डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याबाबतही सूचना अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी दिल्या. शिक्षण विभागाने शाळा व महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थांविरोधात जनजागृती मोहीम राबवावी, विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी, असे सांगण्यात आले. यासोबतच क्रीडा, आरोग्य व पोलीस विभागांनी संयुक्तपणे समुपदेशन व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. जिल्ह्यातील नागरिकांनीही संशयास्पद हालचालींची माहिती प्रशासनाला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

 

-*-*-*-*-

वृत्त क्र. 133                                                                 दि. 25 मार्च, 2026

 

जालना येथे 27 मार्च रोजी

रोजगार मेळाव्याचे आयोजन

जालना, दि.25 (जिमाका) :-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना आणि हुतात्मा जनार्दनमामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था , जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवार, दि. 27 मार्च 2026 रोजी हुतात्मा जनार्दनमामा नागापूरकर शासकीय, जालना येथे सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भव्य ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

रोजगार मेळाव्याद्वारे विविध क्षेत्रांतील अंदाजे 200 पेक्षा अधिक रिक्त पदांवर भरती केली जाणार असून, यासाठी पाचवी ते दहावी उत्तीर्ण, बारावी, पदवीधर आणि आय.टी.आय.च्या सर्व ट्रेड्समधील पात्र उमेदवारांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मेळाव्यात प्रामुख्याने फिल्ड असिस्टंट मॅनेजर, असिस्टंट ब्रांच मॅनेजर, कॅशियर, टेक्निशियन, ऑपरेटर, फिल्ड एक्झिक्युटिव्ह, हेल्पर, अप्रेन्टिस ट्रेनी आणि ए.सी.सी. मशीन ऑपरेटर यांसारख्या विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

रोजगार मेळाव्यात एकूण 9 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून पात्र उमेदवारांच्या चाचण्या व मुलाखती घेणार आहेत. यामध्ये जालना येथील खंडेलवाल ज्वेलर्स (15 पदे) व भारत फायनान्शियल इन्क्लुजन लि. (20 पदे), तसेच अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (20 पदे) यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमधील बजाज ऑटो लि. (50 पदे), संजीव ऑटो लि. वाळूज (15 पदे), एंड्युरन्स टेक्नॉलॉजी लि. वाळूज (5 पदे) आणि धूत ट्रान्समिशन प्रा. लि. (30 पदे) या कंपन्या मोठ्या प्रमाणात पदभरती करणार आहेत. यासोबतच बजाज ऑटो लि. चाकण, पुणे (30 पदे) आणि एथर एनर्जी लि. बेंगलोर (15 पदे) या कंपन्यांचे प्रतिनिधीही भरती प्रक्रियेसाठी उपस्थित राहतील.

इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतींमध्ये आपला रिझ्युमे (बायोडाटा), मूळ शैक्षणिक कागदपत्रे, आधार कार्ड आणि सेवायोजन नोंदणीच्या छायाप्रतींसह सकाळी 9 वाजता मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे. ज्या उमेदवारांनी अद्याप सेवायोजन नोंदणी केलेली नाही, त्यांनी महास्वयंमच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.rojgar.mahaswayam.gov.in) किंवा केंद्र शासनाच्या (www.ncs.gov.in) पोर्टलवर नोंदणी करून जॉब फेअर पर्यायामध्ये जालना जिल्हा निवडावा. तेथे (स्पेशल जॉब फेअर- 6 (2025-26) जालना ) या लिंकवर क्लिक करून पात्रतेनुसार पदांसाठी अप्लाय करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जासाठी किंवा इतर कोणत्याही तांत्रिक अडचणीसाठी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२४८२-२९९०३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 134                                                                  दि. 25 मार्च, 2026

 

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी;

नाशिक येथे 10 दिवसांचे मोफत पूर्व प्रशिक्षण

 

जालना, दि.25 (जिमाका) :-  भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलात अधिकारी पदावर भरती होऊन देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी महाराष्ट्र शासनाने प्रशिक्षणाचे द्वार खुले केले आहे. नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे दि.4 मे ते 13 मे 2026 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 65 चे आयोजन करण्यात आले आहे.  तरी यासाठी जालना जिल्ह्यातील पात्र उमेदवारांच्या मुलाखती दि.24 एप्रिल 2026 रोजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना 10 दिवसांच्या या कोर्समध्ये तज्ज्ञांमार्फत सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड  परीक्षेची सखोल पूर्वतयारी करून घेतली जाईल. विशेष म्हणजे प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास आणि भोजनाची सोय शासनातर्फे करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी दि.24 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. उमेदवारांनी येताना सैनिक कल्याण विभाग, पुणे  यांच्या संकेतस्थळावरून एसएसबी-65 कोर्सचे प्रवेशपत्र आणि परिशिष्टांची प्रिंट पूर्ण भरून सोबत आणणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांच्या ०२५३-२४५१०३२ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ९१५६०७३३०६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 135                                                                  दि. 25 मार्च, 2026

 

जिल्ह्यात डिजिटल जनगणनेचा बिगुल;

हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई

 

जालना, दि.25 (जिमाका) :-  जिल्ह्यात आगामी ‘जनगणना 2027’ च्या पूर्वतयारीला वेग आला असून पहिल्या टप्प्यातील घर सूचीकरण आणि गृहनिर्माण गणनेचे काम लवकरच सुरू होणार आहे.  जनगणना हे राष्ट्रीय महत्त्वाचे काम आहे. यात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. तरी कामात कसूर करणाऱ्यांवर जनगणना अधिनियम 1948 व 1990 मधील तरतुदींनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली आहे.

दि.24 मार्च 2026 रोजी पार पडलेल्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत जनगणनेच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपाची असल्याने त्यात पारदर्शकता आणि अचूकतेवर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यातील क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवन येथे आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण 6 ते 8 एप्रिल आणि 9 ते 11 एप्रिल 2026 या दोन टप्प्यांत पार पडणार आहे. सर्व नियुक्त कर्मचारी, पर्यवेक्षक आणि प्रगणक यांची नोंदणी C.M.M.S. पोर्टलवर करणे बंधनकारक आहे. एकदा नोंदणी झाल्यानंतर जनगणनेचे काम पूर्ण होईपर्यंत त्यात कोणताही बदल करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.  कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि पॅन कार्ड क्रमांक अत्यंत अचूक असणे आवश्यक आहे. संपूर्ण प्रणाली ओटीपी आधारित असल्याने माहितीतील छोटीशी चूकही प्रक्रियेत अडथळा ठरू शकते.

-*-*-*-*-