Wednesday, 10 June 2026

जिल्ह्यात निर्यातवाढीसाठी दहा कलमी कृती आराखड्याच्या अंमलबजावणीवर भर जिल्हा निर्यात प्रचालन परिषदेच्या बैठकीत विविध विषयांचा आढावा

 


 

जालना,दि.10(जिमाका): जिल्ह्यातील निर्यात व उत्पादन क्षेत्राला चालना देऊन रोजगारनिर्मितीला गती देणे तसेच निर्यात वाढीसाठी जिल्ह्याला उत्तरदायी बनविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या ‘जिल्हा हे निर्यात केंद्र’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत जिल्हा निर्यात प्रचालन परिषदेची बैठक मंगळवार (दि.९ जून) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील निर्यात वाढीसाठी विविध शासकीय विभाग, औद्योगिक संघटना, निर्यात परिषदा, निर्यात सल्लागार तसेच उद्योजक यांच्यात समन्वय साधून अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा निर्यात प्रचालन परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्ह्याच्या निर्यातवाढीसाठी तयार करण्यात आलेल्या दहा कलमी कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक योगेश सारणीकर, एनएचएलएमएलचे व्यवस्थापक विकास मलिक, एमआयडीसीच्या क्षेत्र व्यवस्थापक श्रीमती सुषमा नगरदेवळेकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक इंद्रजीत साळवे, लघु उद्योग भारतीचे सचिव राजेश अग्रवाल, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक मंगेश केदार, इंडस्ट्रीज इंटरप्रिन्यूअर्स असोसिएशनचे सचिव अर्जुन गेही, एमएसएमई-डीएफओचे सहाय्यक संचालक राहुल कुमार मिश्रा यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी जिल्हास्तरीय निर्यात धोरण आराखडा तयार करणे, वार्षिक दुहेरी अंकी निर्यातवाढ साध्य करण्यासाठी विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, संभाव्य निर्यातक्षम उत्पादनांची ओळख, प्रतिष्ठित व्यवस्थापन, डिझाईन, संशोधन व विकास संस्थांशी संस्थात्मक संबंध प्रस्थापित करणे, एमएसएमई उद्योजकांना जागतिक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची माहिती देण्यासाठी कार्यशाळा व प्रदर्शनांचे आयोजन आदी विषयांवर चर्चा झाली.

तसेच निर्यातदारांना प्रोत्साहन व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 16 व 17 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘रिव्हर्स बायर-सेलर मिट’ संदर्भात माहिती देण्यात आली. गुणवत्तानियंत्रण व प्रमाणनासाठी प्रयोगशाळा स्थापन करणे, निर्यात प्रोत्साहन परिषद (ईपीसी) व प्रादेशिक डीजीएफटी कार्यालयाशी सक्रिय समन्वय ठेवणे, मासिक डीईपीसी बैठका नियमित घेणे, जिल्हा विशिष्ट उत्पादनांसाठी गुणवत्ता व सुरक्षा मानके निश्चित करणे तसेच मूल्यवर्धन आणि तंत्रज्ञानाच्या वापरासाठी उद्योजकांची क्षमता विकसित करणे या बाबींवरही सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीत ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ODOP) उपक्रमांतर्गत सात कलमी कृती आराखड्याचाही आढावा घेण्यात आला. यामध्ये ‘एक जिल्हा एक उत्पादन’ सुविधा केंद्राची स्थापना, सत्यापित विक्रेते व निर्यातदारांची यादी तयार करणे, जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची निवड व शिफारस करणे, जिल्हा निर्यात योजनेची तयारी व अंमलबजावणीचे निरीक्षण, ‘भगिनी जिल्हा’ संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी, उद्योजकांचे प्रशिक्षण तसेच सर्व क्षेत्रातील घटकांचा सक्रिय सहभाग वाढविणे यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

जिल्ह्यातील निर्यातवाढीसाठी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, औद्योगिक संघटना व संबंधित विभागांनी सातत्याने समन्वय ठेवून कार्य करावे आणि निर्यातवृद्धीसाठी प्रभावी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी केले. त्यांनी निर्यातक्षम उद्योगांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट केले.

*****

स्वाधार योजनेच्या लाभासाठी प्रथम वसतिगृह प्रवेश अर्ज आवश्यक

 


जालना,दि.10(जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चालू 2026-27 शैक्षणिक वर्षापासून स्वाधार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम https://hmasnew.mahait.org  या संकेतस्थळावर शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गुणवत्तेनुसार अथवा जागेअभावी ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, अशा विद्यार्थ्यांनाच स्वाधार योजनेसाठी पात्र मानण्यात येणार आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्जच केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी प्रथम वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जालना यांच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृहाची सुविधा उपलब्ध नाही, तेथे या नियमामध्ये काही प्रमाणात शिथिलता असली तरी भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. मागील वार्षिक परीक्षेत किमान 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी स्वाधार योजनेसाठी पात्र आहेत.

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत :शालेय अभ्यासक्रमासाठी 30 जून 2026 पर्यंत

इयत्ता 11 वी, 12 वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 15 जुलै 2026 पर्यंत निर्धारित मुदतीमध्ये संबंधित विद्यार्थ्यांचे प्रस्ताव https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर होणे आवश्यक आहे. असे आवाहन श्रीमती डॉ. अनिता राठोड, सहायक आयुक्त, समाज कल्याण जालना यांनी केले आहे.

 

*****

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) तर्फे जालना येथे मोफत वेब डिझाईन प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन

 


जालना,दि.10(जिमाका): महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र, जालना पुरस्कृत सर्वसाधारण प्रवर्गातील युवक-युवतींकरिता सन 2026-27 अंतर्गत मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जालना येथे करण्यात आले आहे. लाभार्थीनी उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे वळून स्वतःचा स्वंयरोजगार निर्माण करावा हा कार्यक्रम आयोजनाचा मुख्य उद्देश असल्याने  वेब डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रमावर- 1 महिना कालावधीच्या या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये करिअर वेब टेक्नोलॉजी, वेब डिझायनर व वेब डेव्हल्प, मार्क लँग्वेज, मार्क अप, बेसिक स्ट्रक्चर, वेब साईड तयार करणे, इत्यादीचे प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तसेच उद्योजकता विकास प्रशिक्षण, या मध्ये उद्योजकिय गुण संपदा, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकासासाठी सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण, बाजारपेठ, पाहणीतंत्र व तंत्र विपणन व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, कर्ज योजना व कर्ज प्रकरणे व्यवस्थापन व विक्री कौशल्य लघु उद्योग विषयक कायदे, शासकीय धोरणे, अकाउंटस, लघु उद्योजकाचे व्यवस्थापन, बँकेचे व्यवहार इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. सदरील कार्यक्रम हा संपुर्णतः मोफत असुन यासाठी लाभार्थी किमान 7 वी पास, वयोमर्यादा 18 ते 45वर्ष पात्रता धारक इच्छुक लाभार्थीना प्रवेश व अधिक माहितीसाठी सुरेखा मोरे मो. 9699334648 कार्यक्रम आयोजक यांच्याशी किंवा  प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, विनोद तुपे जालना द्वारा-मराठा पार्क बिल्डिंग, विशाल कॉर्नर, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) चौफुली, जालना. फोन.नं.02482-220592 येथे दि.11 जुन, 2026 पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन महाव्यवस्थापक, जिऊके, जालना योगेश सारणीकर, व विभागीय अधिकारी सुदाम थोटे, यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

 

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), तर्फे बदनापूर येथे मोफत ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन

 


 

जालना,दि.10(जिमाका): महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र, जालना पुरस्कृत सर्वसाधारण प्रवर्गातील युवक-युवतींकरिता सन 2026-27 अंतर्गत मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन बदनापुर येथे करण्यात आले आहे. लाभार्थीनी उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे वळून स्वतःचा स्वंयरोजगार निर्माण करावा हा कार्यक्रम आयोजनाचा मुख्य उद्देश असल्याने  ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमावर-मोत्यापासून चावीचे किचन, कुंदन पासून नेकलस तयार करणे, कुंदन पासून देवदास नेकलेस तयार करणे, तन्मनी मोत्याचा सेट तयार करणे मोत्याच्या बांगडया, बिंदी, कानातले, तन्मनी मोत्याचा सेट तयार करणे विविध डिझाईनचे मंगळसूत्र तयार करणे कुंदन, मोती पासून राख्या ब्रेसलेट कुंदन, मोत्यापासून लटकन तयार करणे इत्यादीचे प्रात्याक्षिकद्वारे सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तसेच उद्योजकता विकास प्रशिक्षण, या मध्ये उद्योजकिय गुण संपदा, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकासासाठी सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण, बाजारपेठ, पाहणीतंत्र व तंत्र विपणन व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, कर्ज योजना व कर्ज प्रकरणे व्यवस्थापन व विक्री कौशल्य लघु उद्योग विषयक कायदे, शासकीय धोरणे, अकाउंटस, लघु उद्योजकाचे व्यवस्थापन, बँकेचे व्यवहार इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. सदरील कार्यक्रम हा संपुर्णतः मोफत असुन यासाठी लाभार्थी किमान 7 वी पास, वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष पात्रता धारक इच्छुक लाभार्थ्यांना प्रवेश व अधिक माहितीसाठी श्री. शिलवंत दिलीप मो. 8087283065 कार्यक्रम आयोजक यांच्याशी किंवा श्री. विनोद तुपे प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, जालना द्वारा-मराठा पार्क बिल्डिंग, विशाल कॉर्नर, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) चौफुली, जालना. फोन.नं.02482-220592 येथे दि.12 जुन, 2026 पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन महाव्यवस्थापक, जिऊके, योगेश सारणीकर, व विभागीय अधिकारी सुदाम थोटे,  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

-*-*-*-*-*-

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) तर्फे जाफ्राबाद येथे मोफत गारमेंट मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन

 


 

जालना,दि.10(जिमाका): महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र, जालना पुरस्कृत सर्वसाधारण प्रवर्गातील युवक-युवतींकरिता सन 2026-27 अंतर्गत मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जाफ्राबाद येथे करण्यात आले आहे. लाभार्थीनी उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे वळून स्वतःचा स्वंयरोजगार निर्माण करावा हा कार्यक्रम आयोजनाचा मुख्य उद्देश असल्याने सर्व प्रकारचे गारमेंट तयार करणे प्रशिक्षण कार्यक्रमावर - 1 महिना कालावधीच्या या प्रशिक्षणा कार्यक्रमामध्ये ड्रेस डिझायनिंग, बॉर्डर वर्क, ब्लाऊजचे विविध प्रकार, त्यावर डिझायनिंग, चुडीदार, फ्रॉक, फ्लेअर्ड फ्रॉक, बेबी फ्रॉक, साधा फ्रॉक, स्कर्ट इ. इत्यादीचे प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तसेच उद्योजकता विकास प्रशिक्षण, या मध्ये उद्योजकिय गुण संपदा, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकासासाठी सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण, बाजारपेठ, पाहणीतंत्र व तंत्र विपणन व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, कर्ज योजना व कर्ज प्रकरणे व्यवस्थापन व विक्री कौशल्य लघु उद्योग विषयक कायदे, शासकीय धोरणे, अकाउंटस, लघु उद्योजकाचे व्यवस्थापन, बँकेचे व्यवहार इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. सदरील कार्यक्रम हा संपुर्णतः मोफत असुन यासाठी लाभार्थी किमान 7 वी पास, वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष पात्रता धारक इच्छुक लाभार्थीना प्रवेश व अधिक माहितीसाठी वैभव मोकळे मो. 9689317953 कार्यक्रम आयोजक यांच्याशी किंवा श्री. विनोद तुपे प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, जालना द्वारा-मराठा पार्क बिल्डिंग, विशाल कॉर्नर, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) चौफुली, जालना. फोन.नं.02482-220592 येथे दि. 12 जुन, 2026 पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन महाव्यवस्थापक, जिऊके, योगेश सारणीकर, व विभागीय अधिकारी सुदाम थोटे,  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

****

महाराष्ट्र गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 14 जून रोजी; जालन्यातील 17 परीक्षा केंद्रांच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 


 

जालना,दि.10(जिमाका): महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) आयोजित करण्यात येणारी महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 रविवार, दि. 14 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत जालना शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे. परीक्षेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जालना शहरातील 17 उपकेंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. यामध्ये मत्सोदरी शिक्षण संस्था कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज, बद्रीनारायण बारवाले कॉलेज, अंकुशराव टोपे महाविद्यालय, राष्ट्रमाता इंदिरा गांधी आर्टस् अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, श्री एम. एस. जैन इंग्लिश स्कूल, राष्ट्रीय हिंदी विद्यालय, सेंट मेरी हायस्कूल (पार्ट ए व पार्ट बी), श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालय, जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूल, आर. जी. बगडिया आर्टस्, एस. बी. लखोटिया कॉमर्स अँड आर. बेन्झॉजी सायन्स कॉलेज, रेयान इंटरनॅशनल स्कूल तसेच श्री एम. एस. जैन विद्यालय (मराठी माध्यम) आदी केंद्रांचा समावेश आहे.

परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्रांच्या परिसरात गर्दी, गोंधळ अथवा अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित केंद्रांच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश दि. 14 जून 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहेत.

या कालावधीत परीक्षा केंद्रांच्या परिसरात अनावश्यक गर्दी करणे, ध्वनिक्षेपकांचा वापर, मोर्चे, सभा किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हालचालींवर निर्बंध राहतील. परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन, पोलीस विभाग आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.

जिल्हा प्रशासनाने उमेदवार, पालक आणि नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून परीक्षा केंद्रांच्या परिसरात नियमांचे पालन करून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

खरीप हंगाम 2025 पीकस्पर्धेचे जिल्हास्तरीय निकाल जाहीर आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव; एकूण 1 लाख 3 हजार रुपयांची बक्षिसे

 


 

जालना,दि.10(जिमाका): खरीप हंगाम 2025 अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पीकस्पर्धेचे जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व मका या पिकांच्या उत्पादकतेची आकडेवारी तपासून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात आली.

पीकस्पर्धेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांनी अवलंबिलेल्या आधुनिक शेती पद्धती, सुधारित तंत्रज्ञान आणि उत्पादनवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे हा आहे. तसेच विजेत्या शेतकऱ्यांनी वापरलेल्या पीक व्यवस्थापन पद्धती, उत्पादन खर्च नियंत्रण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबतची माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून कृषी क्षेत्रात उत्पादनक्षमतेत वाढ घडवून आणण्यावर भर देण्यात येत आहे. यावेळी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय विजेते शेतकरी वगळून उर्वरित पात्र स्पर्धकांमधून तालुकास्तरीय विजेत्यांची निवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पीकनिहाय जिल्हास्तरीय विजेते

सोयाबीन पीक

सोयाबीन गटात जालना तालुक्यातील दरेगाव येथील श्रीमती रूख्मिणी नवनाथ गोडसे यांनी हेक्टरी 40.05 क्विंटल उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येथील बळीराम रामनाथ काळे यांनी 40 क्विंटल उत्पादनासह द्वितीय क्रमांक मिळवून 7 हजार रुपये, तर जालना तालुक्यातील वंजार उमरद येथील विशाल रामकिसन जायभाय यांनी 37.37 क्विंटल उत्पादनासह तृतीय क्रमांक मिळवून 5 हजार रुपयांचे बक्षीस मिळविले.

तूर पीक

तूर पिकात बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येथील बळीराम रामनाथ काळे यांनी हेक्टरी 30 क्विंटल उत्पादन घेत प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांना 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

मूग पीक

मंठा तालुक्यातील उमरखेडा येथील गोपाल किसनराव जाधव यांनी हेक्टरी 10.25 क्विंटल उत्पादनासह प्रथम क्रमांक मिळवून 10 हजार रुपयांचे बक्षीस पटकावले.

उडीद  पीक

उडीद पिकामध्ये मंठा तालुक्यातील तळणी येथील अरुण अपाराव सरकटे यांनी 22.50 क्विंटल उत्पादनासह प्रथम क्रमांक मिळविला असुन, त्यांना 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. केहाळ वडगाव येथील मधुकर पांडुरंग राठोड यांनी 21.90 क्विंटल उत्पादनासह द्वितीय क्रमांक त्यांना 7 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे, तर तळणी येथील सौ. मनिषा डिगांबर सरकटे यांनी 20 क्विंटल उत्पादनासह तृतीय क्रमांक मिळविला असुन त्यांना 5 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

भुईमूग पीक

जाफ्राबाद तालुक्यातील डोणगाव येथील कौसाबाई दादाराव अंभोरे यांनी हेक्टरी 26.32 क्विंटल उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक पटकावला असुन त्यांना 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. टेंभुर्णी येथील रवि साहेबराव खरात यांनी 20.47 क्विंटल उत्पादनासह द्वितीय क्रमांक मिळविला असुन त्यांना 7 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

मका पीक

मका पिकामध्ये बदनापूर तालुक्यातील कुसळी येथील बंडू तुकाराम वैद्य यांनी हेक्टरी 83.25 क्विंटल इतके उल्लेखनीय उत्पादन घेत प्रथम क्रमांक मिळविला असुन, त्यांना 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. भातखेडा येथील सुरेश काकाजी गाडेकर यांनी 72.30 क्विंटल उत्पादनासह द्वितीय क्रमांक मिळविला असुन, त्यांना 7 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तर दाभाडी येथील पुरुषोत्तम राजेंद्र जैवाळ यांनी 71.20 क्विंटल उत्पादनासह तृतीय क्रमांक पटकावला असुन, त्यांना 5 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय पीकस्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना एकूण 1 लाख 3 हजार रुपयांची बक्षिसे वितरित करण्यात येणार असून, त्यांच्या यशस्वी शेती पद्धती जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.

 

-*-*-*-*-*-*-