Tuesday, 17 March 2026

24 मार्चला जालना येथे उद्योजक मेळाव्याचे आयोजन · नवउद्योजकांना मिळणार मार्गदर्शन

 


 

जालना,दि.17 (जिमाका) : जिल्ह्यातील सूक्ष्म व अतिसूक्ष्म उद्योजकांच्या व्यवसाय विस्ताराला चालना देण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि ‘दे आसरा’ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उद्योजक मेळावा व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम  मंगळवार दि.24 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे पार पडणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त,  जिल्हा कौशल्य विकास केंद्र, जालना यांनी केले आहे.

स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणाऱ्या सूक्ष्म उद्योजकांना अनेकदा आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग आणि वित्तीय व्यवस्थापनात अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर, उद्योजकांना योग्य दिशा मिळावी आणि त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. या सत्रात दे आसरा फाउंडेशनचे तज्ज्ञ आणि जिल्ह्यातील यशस्वी उद्योजक मार्गदर्शन करणार असून, नेटवर्किंग वाढवण्यासाठीही ही मोठी संधी ठरणार आहे. या मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी https://forms.gle/DtPKMVVk2E3GmKBc7 या लिंकवर आपली नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 118                                                                    दि. 17 मार्च, 2026

 

सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्यक्ष निवडीची सुवर्णसंधी

 

जालना,दि.17 (जिमाका) : जालना जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि.18 मार्च 2026 रोजी विशेष प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे जागेवरच नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.उमेदवारांनी  सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत  जिल्हा कौशल्य विकास केंद्र, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे उपस्थित रहावे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील कौशल्य विकास केंद्रात सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत ही प्रक्रिया पार पडणार आहे. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये रिद्धी सिद्धी सर्विसेस, जालना या संस्थेकडून एकूण 20 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये बारावी उत्तीर्ण उमेदवारांची टेलीकॉलर 10 पदे, सेल्स अधिकारी 10 पदेभरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला येण्यापूर्वी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. वेबसाइट: www.rojgar.mahaswayam.gov.in किंवा www.ncs.gov.in वर भेट द्यावी. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी आपल्या बायोडाटाच्या किमान दोन प्रती सोबत ठेवणे अनिवार्य आहे. जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या रोजगाराच्या पर्वणीचा लाभ घ्यावा. खासगी क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमध्ये करिअर करण्याची ही उत्तम संधी आहे, असे सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 119                                                                    दि. 17 मार्च, 2026

 

जालना पाटबंधारे विभागाचा कडक इशारा;

पाणीपट्टी न भरल्यास पाणी व वीज पुरवठा खंडित करणार

 

जालना,दि.17 (जिमाका) : सर्व थकीत बिगर सिंचन योजनाधारकांना कळविण्यात येते की जालना पाटबंधारे विभाग जालना पाटबंधारे विभाग जालना अंतर्गत पाटबंधारे प्रकल्पातुन बिगर सिंचन योजनेस पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनार्थ पाणी पुरवठा करण्यात येतो. वापरलेल्या पाण्याच्या प्रयोजनार्थ विभागाची 1264.39 लक्ष रुपये बिगर सिंचन पाणीपट्टी थकीत आहे. थकीत पाणीपट्टी भरणा सर्व योजना धारकांनी  आपल्या योजनेची थकीत बिगर सिंचन पाणीपट्टी 7 दिवसाच्या आत जालना पाटबंधारे विभाग जालना यांच्या नावे धनादेशाव्दारे भरणा करण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 भाग 6, कलम 49 (ज) अन्वये संबंधीत योजनेचा पाणी पुरवठ्यासह विद्युत पुरवठा खंडीत करण्याची कार्यवाही करण्यात येईल. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जालना पाटबंधारे विभाग, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 120                                                                    दि. 17 मार्च, 2026

 

ॲथलेटिक्स आणि कुस्तीचे निपुणता केंद्र सज्ज;

प्रतिभावान खेळाडूंनी 20 मार्चपर्यंत अर्ज करावेत

 

जालना,दि.17 (जिमाका) : राज्यातील क्रीडा संस्कृतीला व्यावसायिक व जागतिक दर्जाची जोड देण्यासाठी राज्य शासनाने ‘मिशन लक्ष्यवेध’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत लातूर विभागाला ॲथलेटिक्स आणि कुस्ती या दोन खेळांच्या निवासी विभागीय क्रीडा निपुणता केंद्राची मान्यता मिळाली असून, प्रतिभावान खेळाडूंना आता हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. या केंद्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांनी दि.20 मार्च 2026 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लातूर येथे सुरू होणाऱ्या या निवासी केंद्रात ॲथलेटिक्स आणि कुस्ती या दोन्ही खेळांच्या प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना निवास, भोजन, पूरक आहार, अद्ययावत प्रशिक्षण साहित्य आणि देशी-विदेशी प्रशिक्षणाची सुविधा शासनामार्फत मोफत पुरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, खेळाडूंच्या सरावासाठी स्पोर्ट्स सायन्स सेंटर आणि करिअर मार्गदर्शनासारख्या आधुनिक सोयीही उपलब्ध करून दिल्या जातील.

अर्जासोबत अर्जदारांनी जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, मागील 2 वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, बोनाफाईड सर्टिफिकेट, पालकांचे संमती पत्र आणि वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, लातूर विभाग, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, औसा रोड, लातूर येथे प्रत्यक्ष सादर करावेत. किंवा dyd.syslatur@rediffmail.com या ई-मेलवरही ऑनलाईन अर्ज पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. अर्जाची शेवटची तारीख 20 मार्च 2026 अशी आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 121                                                                    दि. 17 मार्च, 2026

 

जालना जिल्हा लोकअदालतीत 713 प्रकरणे निकाली;

14 कोटी 33 लाखाहून अधिक तडजोड शुल्क वसूल

·         दोन विखुरलेले संसार पुन्हा बहरले


      जालना,दि.17 (जिमाका) : उच्च न्यायालय, मुंबई व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यात शनिवार, दि.14 मार्च 2026 रोजी 'राष्ट्रीय लोकअदालती'चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीमध्ये एकूण 713 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून, तब्बल 14 कोटी 33 लाख 77 हजार 450 रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.

         लोकअदालतीचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा एम. मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हा न्यायाधीश-03 के.व्ही. मोरे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-01 जी.आर. ढेपे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नितेश बंडगर, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष परमेश्वर गडगीळे, जिल्हा सरकारी अभियोक्ता बाबासाहेब इंगळे व इतर न्यायालयीन अधिकारी उपस्थित होते.

जालना जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये एकूण 31856 प्रकरणे लोकअदालतीसाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात, भूसंपादन, एन.आय. ॲक्ट कलम 138 आणि दावा दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश होता. या लोकअदालतीचे विशेष यश म्हणजे कौटुंबिक वादातील दोन प्रकरणे सामोपचाराने सुटली. परिणामी, दोन विभक्त राहणाऱ्या महिला पुन्हा आपल्या पतीच्या घरी नांदायला गेल्या असून दोन विखुरलेले संसार पुन्हा सुखाने बहरले आहेत.  प्रलंबित प्रकरणे 6300 प्रकरणांपैकी  510 प्रकरणे निकाली निघाली. अशा  प्रकारे  एकूण 713 प्रकरणे तडजोडीने यशस्वीरित्या मिटवण्यात आली. दाखलपूर्व प्रकरणी 25,556 प्रकरणांपैकी 203 प्रकरणे निकाली निघाली. ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी, बँक अधिकारी, पोलीस प्रशासन, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. असे सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 122                                                                    दि. 17 मार्च, 2026

 

जालना जिल्ह्यात 19 मार्च रोजी 'यलो अलर्ट';

नागरिकांना सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

      जालना,दि.17 (जिमाका) : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या अंदाजानुसार जालना जिल्ह्यात येत्या काही दिवसांत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेणे गरजेचे आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी हवामान विभागाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष देऊन स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यात 17 व 18 मार्च रोजी जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 19 मार्च रोजी जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला असून, विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  त्यामुळे विजांचा कडकडाट आणि वादळी वारे सुरू असताना घराबाहेर पडणे टाळावे. झाडे, विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर आणि उंच बांधकामांपासून दूर राहावे.  मेघगर्जना होत असताना मोकळ्या मैदानात किंवा झाडाखाली उभे न राहता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. वीज कडकडत असताना घरातील विद्युत उपकरणांचा वापर शक्यतो टाळावा.  शेतकऱ्यांनी कापणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावीत. पाळीव प्राण्यांना सुरक्षित गोठ्यात बांधावे. वाहनचालकांनी पावसाच्या वेळी वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवावा आणि सुरक्षित ठिकाणी वाहन उभे करावे. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

 

 

Monday, 16 March 2026

जनगणना 2027 विषयक तीन दिवसीय प्रशिक्षणास आजपासून सुरुवात

 


जालना,दि.16(जिमाका) : आगामी जनगणना 2027 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक पूर्वतयारीच्या अनुषंगाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल सभागृहात तीन दिवसीय प्रशिक्षणास अपर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या हस्ते आज सुरुवात झाली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, तहसिलदार छाया पवार यांच्यासह जनगणना संचालनालयाचे सहाय्यक संचालक अजय ठाकुर आणि विशाल दिवेकर हे मुख्य प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी रमेश मिसाळ मार्गदर्शन करतांना म्हणाले की, जनगणना कार्य संचालनालय, महाराष्ट्र यांच्या वतीने जनगणना-2027 संदर्भातील कार्यवाही सुरू झाली असून, ही जनगणना दोन टप्प्या मध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि घरांची गणना करण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील चार्ज अधिकारी, अतिरिक्त चार्ज अधिकारी तसेच जनगणनेशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यातील घरांची यादी तयार करणे, लोकसंख्या गणना आदी विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व प्रशिक्षणार्थीनी या तीन दिवसीय जनगणना प्रशिक्षणाच्या माध्यमातून डिजिटल जनगणनेबाबत असेलेल्या आपल्या समस्या तसेच प्रश्नांचे निराकरण करुन घ्यावे, असे सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षण आयोजनामागील उद्देश आणि महत्त्व स्पष्ट करत पहिल्यांदाच डिजीटल जनगणना होत असल्याचे सांगितले. तसेच जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि घरांची गणना माहिती संकलित केली जाणार असून, दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करण्यात येणार आहे. जनगणनेचे हे काम अत्यंत महत्त्वाचे असुन, या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्वांनी काम करावे. या तीन दिवसीय प्रशिक्षणात जनगणना संचालनालयाचे सहाय्यक संचालक अजय ठाकुर आणि विशाल दिवेकर हे प्रशिक्षणार्थीना जनगणना प्रक्रियेतील घरांची यादी माहिती संकलनाची पद्धत तसेच डिजिटल माध्यमातून माहितीची नोंदणी, तसेच जनगणना-2027 च्या अनुषंगाने 1 मे, 2026 ते 15 मे, 2026 या कालावधीत स्व-गणना (Self Enumeration) आणि 16 मे, 2026 ते 14 जून, 2026 दरम्यान घरोघरी जाऊन भेट देणे आदी मुद्यांबाबत सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देवून सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच जनगणना कार्यातील विविध बाबी, माहिती संकलनाची प्रक्रिया तसेच क्षेत्रीय पातळीवरील अंमलबजावणीबाबत देखील सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नगरपालिका व नगरपंचायतचे मुख्याधिकारी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. प्रशिक्षण शिबिराच्या प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत सुरु करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जनगणना कक्षाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

-*-*-*-*-

 

     वृत्त क्र. 115                                                                      दि. 16 मार्च, 2026

 

क्रीडा ई- प्रमाण खेळाडूच्या पाच टक्के आरक्षणासाठी

 प्रणालीवर नोंदणी करून घरबसल्या प्रमाणपत्र मिळवा

 

          जालना दि. 13 (जिमाका) :-   महाराष्ट्र राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये 5% आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ पारदर्शक आणि जलद गतीने मिळावा यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालयाने क्रीडा प्रमाण ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्यावत प्रणाली कार्यान्वित केली आहे. प्रणालीचे वैशिष्ट्य आणि महत्व *ब्लॉकचेन तंत्रज्ञान: ही प्रणाली ब्लॉगचेन (Blockchain) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असल्याने या मध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप किंवा फेरफार करणे शक्य नाही ज्यामुळे बोगस प्रमाणपत्रांना पूर्णपणे आळा बसेल. *त्वरित पडताळणी: खेळाडूंनी माहिती भरल्यानंतर आणि मूळ डेटांशी ती जुळल्यास अवघ्या 24 तासाच्या आत डिजिटल पडताळणी अहवाल होतो. *क्यू आर कोड सुरक्षा: प्रत्येक प्रमाणपत्रावर एक अद्वितीय किंवा कोड असेल जो स्कॅन करून संबंधित नियुक्त प्राधिकरण (उदा. MPSC पोलीस भरती) प्रमाणपत्राची सत्यता त्वरित पाठवू शकते . आगामी पदभरतीसाठी क्रीडा एक प्रमाणपत्र बंधनकारक महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तसेच सर्व शासकीय पद भरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंना आता या क्रीडा ही प्रमाणपत्राची प्रत जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे या प्रमाणपत्राशिवाय खेळाडूंनी संवर्गातून अर्ज विचार केला जाणार नाही याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी. ज्या खेळाडूंनी यापूर्वी विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून प्रमाणपत्राची पडताळणी केली आहे त्यांनी यापुढे शासकीय व शासकीय भरतीसाठी अर्ज सादर करायचा असल्यास या प्रणाली द्वारे प्रमाणपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे. प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची पद्धत या प्रणाली अंतर्गत 5% खेळाडू आरक्षणाचे संघटनेमार्फत प्राप्त अभिलेख क्रीडा इ प्रमाण पोर्टलवर यशस्वीरित्या अपलोड करण्यात येत आहे या अभिलेखाद्वारे खेळाडू आपले पाच टक्के खेळाडू प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊ शकतात यासाठी आवश्यक असणारा तपशील पुढील प्रमाणे.

खेळाडूंना पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य ज्या खेळाडूंनी अधिकृत स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवले आहे अशा सर्व खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ला https://sport.maharashtra.gov.in/भेट द्यावी. केतस्थळावर सर्वात खाली आमच्या सेवा (our services) मध्ये 5% Reserve या टॅब मध्ये जाऊन आपली एक वेळ नोंदणी पूर्ण करावी या नोंदणी करता वैयक्तिक माहिती व क्रीडा प्रमाण पोर्टलवर अर्ज या सर्व बाबीसाठी खालील माहिती खेळाडूंनी तयार ठेवावी. 1. नोंदणीसाठी खेळाडूंनी आपल्या आधार संलग्न मोबाईल क्रमांक आणि आय कार्डचा वापर करणे आवश्यक आहे. 2. स्वतःचा योग्य व दैनिक वापर ई-मेल आयडी 3. आधार कार्ड पीडीएफ 4. क्रीडा स्पर्धे त प्राप्त प्राविण्य प्रमाणपत्र ज्या खेळाचे अभिलेख प्रणालीवर उपलब्ध आहे त्यांनी तात्काळ या प्रणालीचा लाभ घेऊन आपले डिजिटल प्रमाणपत्र घरबसल्या प्राप्त करून घ्यावे. स्पर्धेत अभिलेख उपलब्ध नसल्यास Grievances द्वारे अर्ज करावा ज्या खेळाडूंनी माहिती अभिलेख खात किंवा प्रमाणपत्र तांत्रिक कारणास्तव प्रणालीवर दिसत नसतील ,तर support@kridapramaan.org या ईमेलवर आपली तक्रार आपल्याकडे असलेल्या क्रीडा प्रमाणपत्रासह नोंदवा. खेळाडूंनी आपले निवेदन सादर करताना खालील बाबी ची पूर्तता करावी.

* आपण सहभागी झालेल्या स्पर्धेचे अचूक नाव व वर्ष नमूद करावे. * आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मूळ क्रीडा प्रमाणपत्रा ची स्कॅन केलेली प्रत निवेदनासोबत जोडावी असे अर्ज प्राप्त झाल्यानंतर विभाग स्तरावरच्या त्या माहितीची शहानिशा करून सदर अभिलेख पोर्टलवर अद्यावत करण्याची कारवाई केली जाईल. अधिक माहितीसाठी आणि मार्गदर्शनात सूचनांसाठी खेळाडूंनी या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच अन्य खेळाच्या अभिलेख प्रणालीवर उपलब्ध करून दिल्यानंतर त्याबाबत माहिती त्वरित याद्वारे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. महत्वाची सूचना:-कबड्डी फेन्सिंग ट्रायलॉन 2025 ची स्पर्धा जुडो 2024 ची स्पर्धा कोराश 2024 25 व 2017 18 या स्पर्धेचे अभिलेख ऑनलाईन उपलब्ध आहेत त्याच खेळाडूंना प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत इतर पात्र खेळांच्या खेळाडूंनी नोंदणी करावी इतर अभिलेख देखील अपलोड करण्याची कारवाई सुरू आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Friday, 13 March 2026

16 मार्चला महिला लोकशाही दिनाचे आयोजन

 


 

          जालना दि. 13 (जिमाका) :-  महिला व बाल विकास विभागाने, समस्या व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळण्यासाठी त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या हेतूने  जिल्हा तसेच तालुकास्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही दिन पाळण्यात येतो. तालुकास्तरावर प्रत्येक तहसिल कार्यालयात महिन्याचे चौथ्या सोमवार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या तिस-या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन  करण्यासाठी दि. 16 मार्च 2026 रोजी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.  या महिला लोकशाही दिनात तक्रार दाख करु इच्छिणाऱ्या महिलांनी आपली तक्रार दोन प्रतित  महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जालना येथे दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

            अर्ज स्वीकृतीचे निकष पुढीलप्रमाणे तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे, तक्रार निवेदन दोन प्रतित सादर करावे, सदरील प्रकरण न्याय प्रविष्ठ नसावे, अर्ज विहित नमुन्यात व आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा, सेवा व आस्थापना विषयक बाबी विचारात घेतल्या जाणार नाहीत. निवडणुक आचार संहिता काळात त्या त्या स्तरावर, विधीमंडळ अधिवेशन काळात राज्यस्तर महिला लोकशाही दिन पाळण्यात येत नाही.

        महिलांनी प्रथम संबंधीत तहसिलदार यांच्याकडे महिला लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी दोन प्रतीत तक्रार दाखल करावी. तालुका  महिला  लोकशाही दिनात एका महिन्यांचे आत कार्यवाही न झाल्यास संबंधीत महिला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करु शकतील. तालुकास्तरावरील लोकशाही दिनांत अर्जदार महिलेस अंतिम उत्तर  शक्य तितक्या लकर जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत देण्याचे बंधन संबंधित अध्यक्ष तथा तहसिलदार व सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची राहील. महिलांनी तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी तालुकास्तरावर तहसिल कार्यालय व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करुन या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 114                                                                       दि. 13 मार्च, 2026

 

15 हजारांचे अर्थसहायासाठी दिव्यांग सहाय्यक

 पोर्टलवर ऑनलाइन अर्जांचे आवाहन

 

            जालना दि. 13 (जिमाका) :-  दिव्यांग हक्क अधिनियम 2016 आणि दिव्यांग धोरण 2018 मधील उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी राज्य शासनाने पाऊल उचलले आहे. 28 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार, प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी लागणारी साधनसामग्री (टूल किट) खरेदी करण्यासाठी 15 हजार रुपयांपर्यंतचे वित्तीय सहाय्य देण्यात येणार आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी या योजनेसाठी दिव्यांग सहायक पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी केले आहे.

            सध्याच्या काळात नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. शासकीय किंवा शासनमान्य प्रशिक्षण संस्थांमधून, तसेच कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या दिव्यांग प्रशिक्षणार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. आपल्या कौशल्यानुसार स्थानिक पातळीवर लघुउद्योग किंवा सेवा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी उपकरणे खरेदी करण्यास यामुळे मदत होणार आहे. या योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिव्यांग सहाय्यक या पोर्टलवर आपले अर्ज सादर करावेत. ऑफलाइन पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.  प्राप्त अर्जांची छाननी जिल्हा कार्यालयामार्फत केली जाईल आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती पात्र लाभार्थ्यांची निवड करेल. असेही  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 114                                                                       दि. 13 मार्च, 2026

 

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

· मार्च ते मे 2026 दरम्यान विविध मंडळांत शिबिरे

· नागरिकांच्या महसुली तक्रारींचे तातडीने निराकरण

 

जालना, दि.13 (जिमाका) :- राज्य शासनाच्या आदेशानुसार जालना तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. 1 राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या महसुली संबंधित अडचणी व तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासह विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. या शिबिरांमध्ये महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत नोंदी अद्ययावत करणे, डिजिटल सेवा पोर्टलवरील प्रकरणांचा निपटारा तसेच सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी अंतर्गत सेवा देण्यात येणार आहेत. मार्च ते मे 2026 या कालावधीत तालुक्यातील विविध मंडळांमध्ये ही शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमानुसार 14 मार्च रोजी जालना तालुक्यातील सावंगी तलाव मंडळात निरखेडा रामेश्वर मंदीर येथे, बदनापूर तालुक्यात रोशेगाव मंडळात शिवाजी विद्यालय रोशेगाव येथे, अंबड तालुक्यातील धनगरपिंप्री मंडळात मंगल कार्यालय धनगरपिंप्री येथे, घनसावंगी तालुक्यात राणीउंचेगाव मंडळात शारदा मंगल कार्यालय राणी उंचेगाव येथे, परतूर तालुक्यात श्रीष्टी मंडळात जि.प.शाळा श्रीष्टी येथे, मंठा तालुक्यात तळणी मंडळात जि.प.शाळा तळणी येथे, भोकरदन तालुक्यात जानेफळ दाभाडी मंडळात महादेव मंदीर जानेफळ दाभाडी येथे, आणि जाफ्राबाद तालुक्यातील कोळेगाव मंडळात जि.प.शाळा भारत बु. येथे हे शिबिर सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

 

Thursday, 12 March 2026

65 वर्षांवरील रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळात नोंदणीचे आवाहन

 


जालना,दि.12 (जिमाका) : राज्य शासनाच्या वतीने 65 वर्षांवरील रिक्षा व मीटर टॅक्सी परवानाधारक चालकांसाठी धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली असून, पात्र चालकांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांनी https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर जावून ऑनलाइन नोंदणी करावी. ही नोंदणी मोबाईलद्वारे घरबसल्या किंवा कोणत्याही सायबर कॅफेमधून करता येणार आहे. अर्ज भरताना काही अडचण आल्यास उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मदत कक्षाशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

या योजनसाठी चालक हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा. तसेच त्याच्याकडे किमान पाच वर्षांपूर्वीचा परवाना असणे आवश्यक आहे. रिक्षा किंवा मीटर टॅक्सी चालवत असताना त्याच्याकडे कोणतेही चारचाकी वाहन नसावे, अशी अटही ठेवण्यात आली आहे.

या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून रिक्षा व मीटर टॅक्सी परवानाधारक चालकांना सामाजिक सुरक्षा व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. 65 वर्षांवरील सभासद चालकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत सन्मान निधी दिला जाणार असून, चालकांसाठी विमा व आरोग्य योजनाही राबविण्यात येणार आहेत.

तसेच चालकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार असून, कर्तव्यावर असताना चालकास दुखापत झाल्यास कल्याणकारी मंडळामार्फत आर्थिक सहाय्यही करण्यात येणार आहे. पात्र चालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

तृतीयपंथीयांच्या हक्क व कल्याण योजनांबाबत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

 



जालना,दि.12(जिमाका) : तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व त्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी जालना येथे विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित या कार्यशाळेत तृतीयपंथीय नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा मिळवता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यात तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत जिल्हास्तरावर तृतीयपंथीयांच्या समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील तृतीयपंथीय नागरिकांना शासनाच्या योजना व सुविधा समजावून सांगण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे आयोजित या कार्यशाळेस अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या अध्यक्षेत व तृतीयपंथीयांचे गुरु तथा संस्थापक अध्यक्ष मोहम्मद शफीक बक्श (कालम गुरु नानी) यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी तसेच समाजकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कार्यशाळेत तृतीयपंथीय नागरिकांना शिक्षण, आरोग्य, रोजगार, कौशल्य विकास, सामाजिक सुरक्षा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबत माहिती देण्यात आली. यासोबतच आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, शासकीय कागदपत्रे, आरोग्य सेवा तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेत     जिल्हा शल्य चिकीत्सक, जालना, व जिल्हा आरोग्य्‍ अधिकारी, जिल्हा परीषद जालना आणि  जिल्हा क्षयरोग अधिकारी, जालना यांच्या मार्फत  आरोग्य्‍ तपासणी तसेच क्षयरोग तपासाणी शिबिरांचे आयोजन करुन आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले, सहायक आयुक्त,रोजगार व कौशल्य विकास कार्यालयामार्फत आर्थिक उन्न्तिषकरीता रोजगारबाबत मार्गदर्शन करण्यात आले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जालना यांच्या मार्फत कायदेविषक सल्ला मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत  रेशन कार्ड देणे व अन्नधान्य पुरवठा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी (निवडणुक) जालना यांच्याकडुन निवडणुक ओळखपत्र देणेबाबात. महसुल विभागामार्फत  घरकुल बांधकामाकरीता  व सश्मानभुमी (दफनभुमी) करीता जमीन उपलब्ध करुन देणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद तसेच इतर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी तृतीयपंथीयांसाठी उपलब्ध असलेल्या योजना व सुविधांची माहिती दिली. यावेळी उपस्थित तृतीयपंथीय नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि सूचनाही यावेळी जाणून घेण्यात आल्या.

या कार्यशाळेस जालना जिल्हातील तृतीयपंथीय नागरीकांना मार्गदर्शन करणेकरीता अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, तृतीयपंथीयांचे गुरु तथा संस्थापक अध्यक्ष मोहम्मद शफीक बक्श् (काजल गुरु नानी), प्रविण पाखरे,  साक्षी उगले, जिल्हा कौशल्य अधिकारी भुंजग रेठे, क्षयरोग अधिकारी डॉ.गोपाल कुडलीकर, वैद्यकिय अधिकारी डॉ. नागरे, वैद्यकिय अधिकारी डॉ. नागदरवाड, वैद्यकिय अधिकारी डॉ. रमेश काकड, तसेच दामीनी पथक फिरदोस पठाण , माया ठोके, ज्योती राठोड, राजू निहाल नायब तहसिलदार, गीता चव्हाण आरोग्य परीवेक्षक राजु पवार क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी ,वैद्यकिय टीम, बिस्मीला सय्यद सहारा सामाजिक विकास संस्था उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्तावीक गणेश अंबोरे यांनी केले तर डॉ. दिलीप गिरी यांनी सुत्रसंचालन केले.

-*-*-*-*-*-

Wednesday, 11 March 2026

दोन दिवसीय जालना ग्रंथोत्सव उत्साहात लोकसेवेचे ध्येय आणि मूलभूत संकल्पनांचे ज्ञान यशासाठी आवश्यक - उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे

 


* जालना ग्रंथोत्सव-2025 : ‘मी धर्मवीर’ नाटिकेने शिवकालीन इतिहास जिवंत…

 

जालना, दि.11 (जिमाका) :-  स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात निस्वार्थी वृत्ती आणि कार्यक्षमता हेच यशाचे खरे गमक आहे. केवळ शासकीय नोकरी मिळविण्याच्या उद्देशाने नाही, तर गावाचा विकास आणि जनतेची सेवा करण्यासाठी अधिकारी होण्याचे ध्येय बाळगावे. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना केवळ पुस्तकी वाचन न करता विषयांच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्यावर भर देणे आवश्यक आहे. जोपर्यंत विषयातील संकल्पना स्पष्ट होत नाही, तोपर्यंत केवळ पाठांतराचा उपयोग होत नाही. पाया भक्कम असेल तर यश हमखास मिळते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेतील अभ्यासाची सुरुवात नेहमी मूलभूत संकल्पनेपासून करा. तरी स्पर्धा परीक्षेत लोकसेवेचे ध्यये आणि मूलभूत संकल्पनांचे ज्ञान यश प्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी केले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ‘जालना ग्रंथोत्सव-2025’ आयोजित करण्यात आला आहे. बुधवार दि. 11 मार्च रोजी या ग्रंथोत्सवात ‘स्पर्धा परीक्षा काळाची गरज’ या विषयावर आयोजित परिसंवादात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र तौर होते. तर डॉ. संजीवनी तडेगावकर, डॉ. प्रभाकर शेळके, प्रा.राजेंद्र भोसले, उपशिक्षणाधिकारी संजय कायंदे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी चंद्रशेखर ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

समाजासाठी आणि देशासाठी काम करण्याची ओढ ज्याच्या मनात आहे, तोच एक उत्तम अधिकारी बनू शकतो. एक अधिकारी म्हणून आपण घेतलेल्या निर्णयाचा समाजावर काय दूरगामी परिणाम होईल, याचे भान असणे अत्यंत आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेचे क्षेत्र आव्हानात्मक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक राहून तयारी करावी, मात्र त्याच वेळी आपल्याकडे ‘प्लॅन बी’ सुद्धा तयार असावा. यश मिळाले नाही तरी निराश न होता, पर्यायी मार्गाचा विचार करून जिद्दीने पुढे जावे. प्रशासनात येताना तुमची वृत्ती ही केवळ नोकरीची नसून ती सेवा करण्याची असावी. एक अधिकारी म्हणून आपण घेतलेल्या निर्णयाचा समाजावर काय दूरगामी परिणाम होईल, याचे भान असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनात येताना तुमची वृत्ती ही केवळ नोकरीची नसून ती सेवा करण्याची असावी. स्पर्धा परीक्षेत सर्व विषयांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. केवळ पुस्तकी कीडा न होता, चालू घडामोडींचे सखोल ज्ञान आत्मसात करावे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. सुत्रसंचालन डॉ. प्रभाकर शेळके यांनी केले तर आभार सतीश जाधव यांनी मानले. यावेळी ग्रंथप्रेमी, ग्रंथालयाचे संचालक, ग्रंथपाल, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मी धर्मवीर नाटिकेने शिवकालीन इतिहास जिवंत

ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात दुपारी 1.30 वाजता ‘मी धर्मवीर’ या नाटिकेचे ओजस्वी सादरीकरण करण्यात आले. ऐतिहासिक काळात झालेला अन्याय आणि जुलूम याविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेला लढा यात प्रभावीपणे मांडण्यात आला. रायरेश्वर मंदिरातील स्वराज्याची शपथ आणि आग्रा भेटीतील थरार पाहून उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. या नाटिकेने संपूर्ण सभागृहात चैतन्य निर्माण केले होते.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 108                                                                      दि. 11 मार्च, 2026

14 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 

जालना, दि.11 (जिमाका) :-  न्यायालयातील प्रलंबित वादांमधून सुटका करून घेण्यासाठी आणि वेळ, पैसा व मानसिक ताण वाचवण्यासाठी जालना जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची संधी चालून आली आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी जालना जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपापसातील वाद सामोपचाराने मिटवून वेळ, पैसा आणि मानसिक ताण वाचवावा. या लोकअदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांनी केले आहे.

लोकअदालतीमध्ये प्रामुख्याने मोटार अपघात विमा दावे आणि कौटुंबिक वाद, बँकांची वसुली प्रकरणे, वीज वितरण कंपनीशी संबंधित वाद, सर्व प्रकारचे दिवाणी दावे आणि तडजोडपात्र फौजदारी गुन्हे, औद्योगिक, कामगार, सहकार न्यायालय आणि ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रलंबित प्रकरणे आदि प्रकारची प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. तरी संबंधितांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 109                                                                       दि. 11 मार्च, 2026

अमृतचा वॉशिंग्टन विद्यापीठाशी मदतीचा हात

जालना, दि.11 (जिमाका) :- महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तरुणांना आता केवळ राज्यातच नव्हे, तर जागतिक स्तरावर आपली उद्योजकता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. राज्य शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्यात नुकताच धोरणात्मक भागीदारीचा करार झाला आहे. या भागीदारीमुळे स्थानिक नवउद्योजकांना आता थेट अमेरिकेतून तांत्रिक आणि आर्थिक बळ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अमृत संस्थेच्या माध्यमातून राज्यातील गुणवंत तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. या प्रयत्नांना आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधनाची आणि मार्गदर्शनाची जोड मिळणार आहे. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे फाऊंडेशन आणि त्यांच्या स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटरने यासंदर्भात पुढाकार घेतला आहे. या करारामुळे जागतिक दर्जाच्या संशोधनाला चालना मिळणार असून, महाराष्ट्रातील ग्रामीण व निमशहरी भागातील स्टार्टअप्सना जागतिक बाजारपेठेची दारे उघडली जाणार आहेत.

वॉशिंग्टन विज्ञान-तंत्रज्ञान विद्यापीठाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या भागीदारीची घोषणा केली आहे. या महत्त्वपूर्ण करारावेळी विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरच्या कार्यकारी संचालिका प्रिया कोठारी आणि अन्य वरिष्ठ पदाधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी ऑनलाइन स्वरूपात उपस्थिती लावून या करारावर शिक्कामोर्तब केले आहे. असे अमृतचे जिल्हा व्यवस्थापक नितिन खेकाळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 110                                                                       दि. 11 मार्च, 2026

 

 

 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण प्लेसमेंट ड्राईव्ह;

13 मार्चला 22 जागांसाठी थेट मुलाखती

 

          जालना, दि.11 (जिमाका) :- जालना जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे शुक्रवार, दि. 13 मार्च 2026 रोजी विशेष प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत होणाऱ्या या मोहिमेत नामांकित संस्थांमध्ये रिक्त असलेल्या 22 पदांसाठी पात्र उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना येथे घेतल्या जाणार आहेत.

              या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये प्रामुख्याने रेणुका देवी नागरी सहकारी बँक आणि गणपती नेत्रालय या सारख्या नामांकित संस्था सहभागी होत आहेत. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, नियुक्ती होणाऱ्या उमेदवारांना संबंधित कंपनीकडून मिळणाऱ्या वेतनाव्यतिरिक्त शासन निर्णयानुसार त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार रुपयांपर्यंतचे मासिक विद्यावेतन देखील दिले जाणार आहे.  इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला येण्यापूर्वी राज्य शासनाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in किंवा केंद्र शासनाच्या www.ncs.gov.in या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्डवरील 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्लेसमेंट ड्राईव्ह' या टॅबवर क्लिक करून जालना जिल्ह्याची निवड करावी आणि संबंधित पदांची माहिती घ्यावी.असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 111                                                                       दि. 11 मार्च, 2026

 

जैवविविधतेत पक्षी-प्राणी यांचे महत्त्व मोलाचे

असून त्यांच्या संरक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत

                                                                                        - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 

              जालना, दि.11 (जिमाका) :- जैवविविधतेचे संतुलन राखण्यात पक्षी व वन्यप्राण्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून पर्यावरण संवर्धनासाठी त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पक्ष्यांचे अधिवास जपणे, झाडे लावणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.

              महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभाग, वन प्रशिक्षण संस्था जालना तसेच महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जालना येथील वन प्रशिक्षण संस्था तथा जिल्हा प्रशासकीय संकुलात प्रथमच विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना पी. एम. मिन्नू, विभागीय वन अधिकारी सुरेश वडदे, सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अजित पुकळे, वन प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक अजय जाधव, महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र राज्य कार्यकारिणी सदस्य तथा निसर्ग कट्टा संस्थेचे संस्थापक अमोल सावंत, पक्षीमित्र संघटनेचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर गिराम, मयूर साबळे आणि सुभाष पारे यांची उपस्थिती होती.

                        कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजन व पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली व स्व.श्री मारुती चितमपल्ली यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी व्हिडिओ संदेशद्वारे या कार्यक्रमास शुभेच्छापर संदेश देऊन पर्यावरण संरक्षण हे आपले संविधानिक जबाबदारी असल्याचे सांगितले.

              जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, पर्यावरणातील संतुलन राखण्यासाठी पक्षी व प्राणी अत्यंत आवश्यक घटक आहेत. अनेक पक्षी कीड नियंत्रण, परागीभवन तसेच बियांचे प्रसारण करण्याचे महत्त्वाचे काम करतात. त्यामुळे शेती, जंगल आणि पर्यावरण या तिन्ही घटकांसाठी त्यांचे अस्तित्व आवश्यक आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचे अधिवास कमी होत असून त्यांच्या संरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने संवेदनशील होण्याची गरज आहे.विद्यार्थ्यांनी पक्षीनिरीक्षणाची आवड जोपासून पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजात पोहोचवावा. पक्ष्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची संमेलने महत्त्वाची ठरतात. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम व पर्यावरणाबद्दलची जबाबदारी वाढविण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

              या पक्षीमित्र संमेलनाचे प्रस्ताविक विभागीय वन अधिकारी सुरेश वडोदे यांनी करून विद्यार्थी पक्षी मित्र संमेलनाचा उद्देश सांगितला व सामाजिक वनीकरण विभागाकडून राष्ट्रीय हरित सेना व पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्हाभरात घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमा बाबत माहिती दिली. तर महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र राज्य कार्यकारिणी सदस्य तथा निसर्ग कट्टा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल सावंत यांनी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे कार्याबाबत सांगून माझे पक्षी अभयारण्य या विषयावर स्लाइड शोद्वारे सादरीकरण केले. महाराष्ट्रात शालेय पक्षी मित्र संमेलन हा उपक्रम अमोल सावंत यांच्या संकल्पनेत सुरू करण्यात आला आहे . जालना येथील प्रसिद्ध पक्षी निरीक्षक तथा महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर गिराम यांच्या जालना जिल्ह्यातील पक्षी वैभव या विषयावर आधारित छायाचित्राचे प्रदर्शन दाखवून जालना जिल्ह्याचे पक्षी वैभव यावर स्लाईड शो सादर केला. सर्व विद्यार्थ्यांसाठी पक्षी चित्रकला स्पर्धा घेऊन , पक्षासाठी कृत्रिम घरटे निर्मिती कार्यशाळा, प्रश्नमंजुषा, व्याख्याने इ.उपक्रम घेण्यात आले आहे. या विद्यार्थी पक्षी संमेलनाचा उद्देश असा आहे की जालना जिल्ह्यात जास्तीत जास्त विद्यार्थी पालक शिक्षक यांना पक्षी निरिक्षण आणि पक्षाबाबतीत जास्तीत जास्त माहिती होणे आणि त्या बाबतीत जनजागृती करणे हा आहे. कार्यक्रमाच्या शेवटी चित्रकला स्पर्धा, प्रश्न मंजुषा व इतर स्पर्धा मध्ये प्रथम, द्वितीय , तृतीय क्रमांक प्राप्त व सहभागी झालेल्या विद्यार्थांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

              चित्रकला स्पर्धेचे मूल्यांकन कलाशिक्षक परिमल पेडगावकर व अमोल मोरे यांनी केले. पक्षी संमेलनात सहभाग नोंदवलेल्या सर्व शाळांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन निवेदक मनिषा पाटील यांनी केले.यामध्ये जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून इको क्लबच्या निवडक दोन शाळांचे प्रत्येकी 15 ते 20 विद्यार्थी व प्रत्येक शाळेतून दोन शिक्षक सहभागी झाले होते. जिल्हा मास्टर ट्रेनर मधुकर गायकवाड, जालना राष्ट्रीय हरीत सेना तथा महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संघटनेचे मयूर साबळे , जीवनराव पारे विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र पक्षी मित्र आजीवन सभासद सुभाष पारे तसेच समस्त विभागातील वनअधिकारी, वनपाल, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 112                                                                       दि. 11 मार्च, 2026

 

 ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

·         मार्च ते मे 2026 दरम्यान विविध मंडळांत शिबिरे

·         नागरिकांच्या महसुली तक्रारींचे तातडीने निराकरण

 

                      जालना,दि.11(जिमाका) :- राज्य शासनाच्या आदेशानुसार जालना तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. 1 राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या महसुली संबंधित अडचणी व तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासह विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. या शिबिरांमध्ये महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत नोंदी अद्ययावत करणे, डिजिटल सेवा पोर्टलवरील प्रकरणांचा निपटारा तसेच सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी अंतर्गत सेवा देण्यात येणार आहेत. मार्च ते मे 2026 या कालावधीत तालुक्यातील विविध मंडळांमध्ये ही शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

         कार्यक्रमानुसार 14 मार्च रोजी जालना तालुक्यातील सावंगी तलाव मंडळात निरखेडा रामेश्वर मंदीर येथे, बदनापूर तालुक्यात रोशेगाव मंडळात शिवाजी विद्यालय रोशेगाव येथे, अंबड तालुक्यातील धनगरपिंप्री मंडळात मंगल कार्यालय धनगरपिंप्री येथे,  घनसावंगी तालुक्यात राणीउंचेगाव मंडळात शारदा मंगल कार्यालय राणी उंचेगाव येथे, परतूर तालुक्यात श्रीष्टी मंडळात जि.प.शाळा श्रीष्टी येथे, मंठा तालुक्यात तळणी मंडळात जि.प.शाळा तळणी येथे, भोकरदन तालुक्यात जानेफळ दाभाडी मंडळात महादेव मंदीर जानेफळ दाभाडी येथे, आणि जाफ्राबाद तालुक्यातील कोळेगाव मंडळात जि.प.शाळा भारत बु. येथे हे शिबिर सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 113                                                                       दि. 11 मार्च, 2026

 

ग्रामीण भागातील महिलांनी छोट्या उद्योगांच्या माध्यमातून आत्मनिर्भर व्हावे

-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 

जालना,दि.11(जिमाका) :-  ग्रामीण भागातील महिलांनी स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून छोटे-छोटे उद्योग उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जालना शहरातील डॉ. फ्रेझर बॉईज हायस्कूल येथे दि. 7 मार्च ते 11 मार्च 2026 या कालावधीत ग्राम विकास विभाग व पंचायत राज विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद जालना उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण स्वयंसहायता समूहांच्या महिलांनी तयार केलेल्या दर्जेदार व पारंपरिक उत्पादनांची भव्य प्रदर्शनी व विक्री शिबिर 'जानकी महोत्सव' आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीला भेट देऊन पाहणी करताना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना पी. एम. मिन्नू, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सुनिल कुमार पठारे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीमती स्मिता पवार, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद जालना श्रीमती सविता शालघर, उप जिल्हाधिकारी सामान्य प्रशासन श्रीमती नम्रता चाटे, उप जिल्हाधिकारी पुनर्वसन श्रीमती सुकेशिनी कांबळे-पगारे, उप जिल्हाधिकारी रोहयो श्रीमती मनिषा दांडगे, उप जिल्हाधिकारी भूसंपादन श्रीमती मनिषा देशपांडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास विभाग श्रीमती कोमल कोरे, तहसीलदार श्रीमती छाया पवार, गटविकास अधिकारी बदनापूर श्रीमती ज्योती राठोड, गटविकास अधिकारी अंबड श्रीमती ज्योती कवडदेवी, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती संगिता भागवत, जिल्हा अभियान व्यवस्थापक शैलेश चौधरी यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिलांकडे अनेक कौशल्ये व पारंपरिक ज्ञान आहे. या कौशल्यांचा उपयोग करून विविध लघुउद्योग उभारता येतात. स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळू शकते. महिलांनी घरगुती व्यवसाय, हस्तकला, अन्नप्रक्रिया, शिवणकाम, तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधनांवर आधारित उद्योग सुरू करून स्वतःचा व कुटुंबाचा आर्थिक विकास साधावा. सोबतच महिला सक्षमीकरणासाठी महिलांनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक आहे. डिजिटल माध्यमांचा वापर करून उत्पादनांची विक्री वाढवता येते. तसेच बाजारपेठेची माहिती घेऊन उत्पादनांची गुणवत्ता टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. नवीन उद्योगांविषयी माहिती घेऊन ते उभारण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.या प्रदर्शनीत ग्रामीण स्वयंसहायता समूहांच्या महिलांनी तयार केलेले विविध खाद्यपदार्थ, मसाले, पापड, लोणची, हस्तकला वस्तू, सजावटीच्या वस्तू, कपड्यांवरील भरतकाम आदी पारंपरिक व दर्जेदार उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. नागरिकांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध वस्तूंची खरेदी केली. या वेळी संबंधित विभागाचे अधिकारी, स्वयंसहायता समूहांच्या महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली असून त्यांच्या आर्थिक सबलीकरणाला चालना मिळणार आहे.

-*-*-*-*-