Wednesday, 15 April 2026

शासकीय शांतीकुंज महिला राज्यगृहाचा लाभ घेण्याचे आवाहन

 


 

जालना, दि. 15 (जिमाका) :-  कौटुंबिक समस्या, सामाजिक परिस्थिती किंवा अन्य कारणांमुळे निराधार, निराश्रित आणि नैतिकदृष्ट्या आपदग्रस्त ठरलेल्या महिलांसाठी जालन्यातील शासकीय शांतीकुंज महिला राज्यगृह आशेचा किरण ठरत आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत या राज्यगृहाचे कामकाज चालवले जात असून, गरजू महिलांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

समाजातील अशा गरजू महिलांनी या शासकीय सुविधेचा लाभ घ्यावा. तसेच, नागरिकांना आपल्या परिसरात अशा प्रकारच्या गरजू किंवा संकटग्रस्त महिला आढळून आल्यास, त्यांना या योजनेची माहिती देऊन केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करावी. अधिक माहितीसाठी शासकीय शांतीकुंज महिला राज्यगृह, जालना हॉस्पिटलच्या बाजूला, अंबड चौफुली, जालना येथे संपर्क साधावा. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 173                                                                   दि.15एप्रिल, 2026

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

 

जालना, दि. 15 (जिमाका) :-  भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यभरात भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके आणि सर्व सहभागींना प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांसाठी आपले आयुष्य समर्पित केले. विशेषतः महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. याच विचारांचा प्रसार करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य हा विषय या स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आला आहे. स्पर्धक https://forms.gle/RcFPhcUgY8X4P2NT8 या लिंकवर किंवा दिलेल्या क्यू आर कोडद्वारे नोंदणी करू शकतात.अधिक माहितीसाठी ९१५२२३०१९३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 174                                                                  दि.15एप्रिल, 2026

सामाजिक समता सप्ताहाचा समारोप

 

जालना, दि. 15 (जिमाका) :-  भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक समता कार्यक्रमाचा मंगळवार दि. 14 एप्रिल 2026 रोजी जालना येथे उत्साहात समारोप झाला. या निमित्ताने आयोजित भीमगीते आणि पोवाड्यांच्या कार्यक्रमाने उपस्थित जनसमुदायाला मंत्रमुग्ध केले.

14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित खास सांस्कृतिक कार्यक्रमात शाहीर आप्पासाहेब उगले आणि पार्टी यांनी आपल्या खड्या आवाजात भीमगीते आणि पोवाडे सादर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी केला होता, हा विचार शाहीरांनी आपल्या सादरीकरणातून प्रभावीपणे मांडला. बाबासाहेबांच्या जीवनातील विविध पैलू आणि त्यांनी आधुनिक भारताच्या विकासासाठी रचलेला पाया यांचा गौरव या गाण्यातून करण्यात आला.

या कार्यक्रमाला विशेष अधिकारी स्नेहल मोदाळे, नगरसेविका सुलोचना गोरडे, प्रा. गोरडे, ज्येष्ठ नागरिक श्री. बुलबुले, श्री. वाघमारे  यांच्यासह कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 175                                                                 दि.15एप्रिल, 2026

 

राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 

जालना, दि. 15 (जिमाका) :-  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार, जालना जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवार, दि. 9 मे 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या प्रलंबित वादांत तडजोड करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती वर्षा मोहिते यांनी केले आहे.

            दिवाणी व फौजदारी: सर्व दिवाणी आणि तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे., कौटुंबिक वाद: कौटुंबिक न्यायालयातील वैवाहिक व इतर वाद,  अपघात व वीज देयके: मोटार अपघात नुकसान भरपाई आणि वीज वितरण कंपनीशी संबंधित प्रकरणे,  बँक व थकीत देयके: बँकांची येणेबाकी आणि दाखलपूर्व  प्रकरणे.  इतर न्यायालये: औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय आणि ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रलंबित प्रकरणे आदि प्रकरणे लोकअदालतीत मिटवता येतील. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

उच्चशिक्षित तरुणी कुक्कुटपालनातून बनली यशस्वी उद्योजिका…

 


 

  • जालन्याच्या अंकिता मोरे यांचा झेंडा; 10 महिन्यात 26 लाखांची उलाढाल
  •  

नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःचा उद्योग उभा करून इतरांना रोजगार देण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहतात, मात्र ते प्रत्यक्षात उतरवणारे कमीच असतात. जालना जिल्ह्यातील गोलापांगरी येथील अंकिता मोरे पाटील या उच्चशिक्षित तरुणीने हे स्वप्न केवळ सत्यात उतरवले नाही, तर कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून यशाचे 'सोनं' करून दाखवलं आहे. बी.एस्सी. ॲग्रीकल्चरनंतर आता एल.एल.बी.चे शिक्षण घेणाऱ्या अंकिता मोरे यांनी काही वर्षापासून कुक्कुटपालनाचा यशस्वी फॉर्म्युला राबवत आज 5 हजार गावरान कोंबड्यांचे साम्राज्य उभे केले आहे. केवळ 10 महिन्यात 26 लाखांचे उत्पन्न मिळवून त्यांनी शेतीपूरक व्यवसायातील नवी वाट दाखवून दिली आहे.

 

कोविडच्या संकटात शोधली संधी :-

सन 2020 मध्ये जेव्हा संपूर्ण जग लॉकडाऊनमुळे ठप्प होते, तेव्हा अंकिता यांनी या संकटाचे संधीत रूपांतर करण्याचे ठरवले. घरातूनच काहीतरी वेगळे करण्याची इच्छा आणि घरच्यांच्या भक्कम पाठबळामुळे त्यांनी कुक्कुटपालनात पाऊल ठेवले. जिजामाता कृषी भूषण प्राप्त सौ. छायाताई मोरे यांचा आदर्श समोर ठेवत, अंकिता यांनी 35 एकर वडिलोपार्जित शेतीला आधुनिक जोडधंद्याची जोड दिली.

 

रिकाम्या गोठ्यातून व्यवसायाची भरारी :-

सुरवातीला त्यांच्याकडे गाईंचा गोठा रिकामा होता. अंकिता यांनी याच गोठ्याचे रूपांतर पोल्ट्री शेडमध्ये केले. पक्षी वाढल्यानंतर त्यांनी द्राक्षाच्या बागेतील अँगलचा वापर करून कमी खर्चात दुसरे शेड उभारले. खर्च कमी आणि नफा जास्त हे सूत्र त्यांनी पहिल्या दिवसापासून अंमलात आणले.

 

स्वतःच झाल्या डॉक्टर आणि मॅन्युफॅक्चरर :-

अंकिता यांनी केवळ 500 पक्ष्यांपासून सुरुवात केली. पहिले लसीकरण 14 व्या दिवशी तर दुसरे लसीकरण 21 व्या दिवशी करावे लागते. कृषी पदवीधर असल्याने त्यांनी लसीकरणासाठी बाहेरील डॉक्टरांवर अवलंबून न राहता स्वतःच ब्रूडिंग आणि लसीकरण केले. बाहेरचे खाद्य महाग पडत असल्याने त्यांनी स्वतःचा फीड फॉर्म्युला तयार केला. मक्याचा भरडा, डीओसी आणि 50 टक्के हिरवा चारा (शेवगा, दुधी भोपळा, लसूण घास) यांचा वापर करून त्यांनी खाद्याचा खर्च निम्म्यावर आणला. मुक्त संचार पध्दतीचा अवलंब करीत कोंबड्यांना शेतात मोकळे सोडले जाते, ज्यामुळे त्या नैसर्गिक कीड-अळ्या खातात आणि सुदृढ राहतात. रात्री या कोंबड्या शेवग्याच्या झाडावरच मुक्कामाला असतात.

 

27 हजार शेतकऱ्यांना मोफत धडा :-

अंकिता यांनी केवळ स्वतःची प्रगती केली नाही, तर एकात्मिक मुक्त-श्रेणी पोल्ट्री मॉडेल विकसित केले. गेल्या 3-4 महिन्यांत त्यांनी 27 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. आयसीएआर, कृषी विज्ञान केंद्र खरपुडी आणि बीएआयएफ सारख्या संस्थांच्या मदतीने त्या महिला शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण देत आहेत.   

 

यशाचा आर्थिक ताळेबंद (10 महिने) :-

तपशिल

रक्कम/प्रमाण

एकूण गुंतवणूक/खर्च

10 लाख रुपये

एकूण उत्पन्न

26 लाख रुपये

पक्ष्यांची संख्या

5000 गावरान कोंबड्या

अंडी दर (स्थानिक)

15 ते 19 रुपये

निर्यात दर (अंडी)

50 ते 80 रुपये

पक्षी विक्री दर

700 रुपये (प्रती किलो/नग)

 

"शेतीला जोडधंदा हवाच, पण तो करताना योग्य नियोजन आणि अभ्यासाची जोड दिली तर तो नक्कीच फायदेशीर ठरतो. मी स्वतः खाद्य बनवल्यामुळे माझा खर्च 50 टक्क्यांनी कमी झाला आणि नफा वाढला. तुमच्याकडे मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर शून्यातूनही विश्व निर्माण करता येते. शेतीपूरक व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा ठरू शकतो, हेच मला सिद्ध करायचे होते."

— अंकिता मोरे, युवा उद्योजिका, गोलापांगरी

 

-*-*-*-*-

 

Monday, 13 April 2026

बीजोत्पादनातून महिला सक्षमीकरणाचा ‘जालना पॅटर्न’


 

शेती हा कष्टाचा व्यवसाय, त्यातही कोरडवाहू शेती म्हणजे नशिबाचा खेळ. पण याच कोरडवाहू मातीत जर जिद्द आणि आधुनिक तंत्रज्ञानाची पेरणी केली, तर समृद्धीचे पीक घेता येते, हे जालन्यातील प्रयोगशील महिला शेतकरी मोनिका पांडुरंग शर्मा यांनी सिद्ध करून दाखवले आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी बीजोत्पादनाचे शास्त्रशुद्ध तंत्र आत्मसात करून आज एक यशस्वी उद्योजक शेतकरी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ब्रिडर सीड्सला 30 टक्के, तर फाउंडेशन बियाण्याला 20 टक्के अतिरिक्त दर मिळतो, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. तसेच खरीपानंतर रब्बी हंगामात त्या हरभऱ्याच्या बीडीएन 798 आणि विश्वराज वाणाचे 40 एकरवर बीजोत्पादन घेतात. याप्रमाणे जिद्द आणि तंत्रज्ञानाची जोड देत जालन्याच्या मोनिका शर्मां यांनी बीजोत्पादनातून सुवर्ण भरारी घेतली आहे.

 

§  60 एकरवर प्रगत शेतीचे प्रयोग :-

जालना तालुक्यातील खोडेपुरी येथील मोनिका शर्मा यांची 60 एकर शेती आहे. एकेकाळी केवळ घरगुती उत्पादनासाठी शेती करणाऱ्या शर्मा यांनी आता महाबीजच्या सहकार्याने बीजोत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. खरीप हंगामात त्यांनी तब्बल 50 एकर क्षेत्रावर सोयाबीनच्या आंबा या वाणाचे बीजोत्पादन घेतले. योग्य नियोजन आणि परिश्रमामुळे त्यांना 350 क्विंटल बियाण्यांचे दर्जेदार उत्पन्न मिळाले आहे.

§  स्वतः चालवतात ट्रॅक्टर आणि अवजारे :-

ग्रामीण भागात आजही महिलांना शेतीतील दुय्यम कामांसाठी ओळखले जाते. मात्र, मोनिका शर्मा यांनी हा समज मोडीत काढला आहे. त्या स्वतः ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, बीबीएफ पेरणी यंत्र आणि रिपर यांसारखी सर्व प्रगत यंत्रसामग्री आणि अवजारे लिलया चालवतात. मजुरांच्या टंचाईवर मात करण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी त्यांनी यांत्रिकीकरणाचा आधार घेतला आहे.

§  रासायनिक खतांना गोठ्याची जोड :-

मोनिका शर्मा यांच्याकडे 50 देशी गाईंचा गोठा आहे. या गाईंच्या शेणखतामुळे त्यांच्या शेतीची सुपिकता वाढली असून खताचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचला आहे. शाश्वत शेतीसाठी त्या हिरवळीचे खत (सनहेम्प), कंपोस्ट आणि आंतरपिकांचा वापर करतात. पिकांवरील कीड नियंत्रणासाठी त्या आयपीएम पद्धतीचा वापर करून निमार्क, फेरोमोन सापळे आणि पक्षी थांबे यांसारख्या पर्यावरणपूरक उपाययोजनांना प्राधान्य देतात.

§  बीजोत्पादनाचे शास्त्र आणि आर्थिक गणित :-

बीजोत्पादन हे सामान्य शेतीपेक्षा कठीण असते. यात महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे कडक नियम पाळावे लागतात. मोनिका शर्मा सांगतात की, बियाण्यांचा दर्जा राखण्यासाठी अधिकाऱ्यांच्या निगराणीत टॅगिंग आणि सीलिंगचे काम केले जाते. यामुळे बियाण्याला विश्वासार्हता मिळते.

§  महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श :-

कोरडवाहू शेतीतील महिलांचे कष्ट अनेकदा दुर्लक्षित राहतात. मात्र, सुधारित वाण, कृषी विद्यापीठांचे मार्गदर्शन आणि कष्टाची तयारी असेल, तर महिला शेतीतून आर्थिक क्रांती घडवू शकतात, हे मोनिका शर्मा यांच्या यशोगाथेवरून स्पष्ट होते. आज त्या परिसरातील अनेक महिला शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.

 

शेतीत केवळ कष्ट करून चालत नाही, तर त्याला नियोजनाची आणि तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागते. महाबीज आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे मला बीजोत्पादनात यश मिळाले. महिलांनी आधुनिक अवजारे चालवायला शिकले, तर शेती अधिक फायदेशीर होऊ शकते.  - मोनिका पांडुरंग शर्मा, प्रयोगशील महिला शेतकरी, जालना

-*-*-*-*-

 


जालना जिल्ह्यातील प्राचीन हस्तलिखितांचे होणार दस्तऐवजीकरण

 

ज्ञानभारतम्’ मोहिमेचा शुभारंभ


 

जालना, दि. 13  (जिमाका) :-  भारताचा समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने ‘ज्ञानभारतम्’ (Gyan Bharatam) ही महत्त्वपूर्ण योजना हाती घेतली आहे. या अभियानांतर्गत जालना जिल्ह्यातील मंदिरे, मठ, खाजगी ट्रस्ट आणि वैयक्तिक संग्राहकांकडे असलेल्या जुन्या हस्तलिखितांचे सर्वेक्षण व डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय कार्यात जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये आणि खाजगी संग्राहकांच्या सहकार्याने सुमारे एक कोटीपेक्षा अधिक हस्तलिखितांचा संग्रह करण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे. हस्तलिखितांचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन आणि प्रसार करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि मराठी भाषा विभागाच्या मार्गदर्शनानुसार ही मोहीम जिल्ह्यात राबविली जात आहे.

जालना जिल्ह्यात या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) यांची ‘जिल्हा नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण केवळ हस्तलिखितांच्या नोंदीसाठी आहे. मूळ हस्तलिखिते मालकाकडून काढून घेतली जाणार नाहीत, तर त्यांचे केवळ शास्त्रीय पद्धतीने दस्तऐवजीकरण केले जाईल. या मोहिमेसाठी खास ‘Gyan Bharatam’ नावाचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. प्रशिक्षित सर्वेक्षकांमार्फत हस्तलिखितांची पडताळणी व दस्तऐवजीकरण केले जाणार आहे.

ज्या संस्था किंवा व्यक्तींकडे प्राचीन किंवा जुनी हस्तलिखिते उपलब्ध आहेत, त्यांनी या राष्ट्रीय कार्यात प्रशासनास सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी https://gyanbharatam.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

Thursday, 9 April 2026

मार्च अखेरचे 'ई-आर 1' विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन

 


 

जालना, दि. 9 (जिमाका) :- सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना मार्च 2026 या तिमाहीचे मनुष्यबळ विवरणपत्र (ई-आर 1) सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सेवायोजन कार्यालये (रिक्त पदांची सूचना देणे सक्तीचे) कायदा 1959 नुसार, हे विवरणपत्र दि.30 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन भरणे बंधनकारक असून यात कसूर करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.  नियोक्त्यांनी आपली माहिती www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर सादर करावी. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी दिली आहे.

केंद्र व राज्य शासनाची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती) तसेच खासगी क्षेत्रातील ज्या आस्थापनांमध्ये 25 किंवा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, अशा सर्व कारखाने आणि उद्योगांना हे विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. विवरणपत्र भरताना काही तांत्रिक अडचण आल्यास नियोक्त्यांनी कार्यालयीन वेळेत (सकाळी 10 ते संध्याकाळी 6 सुटीचे दिवस वगळून) ०२४८२-२९९०३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 162                                                                दि.9 एप्रिल, 2026

नवउद्योजकांसाठी कार्यशाळेचे आयोजन

जालना, दि. 9 (जिमाका) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून राज्यभरात सामाजिक समता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत शुक्रवार दि. 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी कार्यशाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण मार्गदर्शनासह विविध योजनांच्या लाभांचे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त राजू एडके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 30 मार्च 2026 च्या शासन निर्णयानुसार, दि.8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत संपूर्ण राज्यात सामाजिक समता सप्ताह साजरा केला जात आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्ये जनमानसात रुजवण्यासाठी आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी वित्तीय सहाय्य आणि मार्जिन मनी योजनेची सविस्तर माहिती दिली जाईल. तसेच विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या लाभांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप केले जाईल. असेही कळविले आहे.

 

-*-*-*-*-

वृत्त क्र. 163                                                              दि.9 एप्रिल, 2026

 

सामाजिक समता सप्ताह उत्साहात;

स्वाधार व ट्रॅक्टर योजनेच्या लाभार्थ्यांना पत्राचे वाटप

जालना, दि. 9 (जिमाका) :- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दि.8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचा शुभारंभ जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आला. यावेळी विशेष अधिकारी स्नेहल मोदाळे यांच्या हस्ते सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, मिनी ट्रॅक्टर योजना या योजनांमधील निवडक लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. श्रीमती मोदाळे यांनी प्रास्ताविकात शासनाच्या या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री महोदयांनी सन 2026-27 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष, संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे 150 वे वर्ष आणि महाड चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष साजरे करण्याचा संकल्प सोडला आहे. महाडचा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नसून तो मानवी हक्कांच्या पुनर्स्थापनेसाठी होता, हा डॉ. बाबासाहेबांचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. शासन निर्णयानुसार,दि.8 ते 14 एप्रिल या काळात जिल्हाभरात व्याख्याने, निबंध स्पर्धा, आरोग्य शिबिरे आणि शासकीय योजनांच्या जनजागृतीचे विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत.

या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरूपात निवडपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बदनापूर येथील शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. दिलीप गिरी यांनी केले. या प्रसंगी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतिगृहे व निवासी शाळांमधील कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. अंबोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 164                                                               दि.9 एप्रिल, 2026

 

जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण पंधरवड्याचे आयोजन

 

जालना, दि. 9 (जिमाका) :- एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रस्तरावर दि. 9 एप्रिलपासून 8 वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. बालकाचा शारीरिक विकासासोबतच मानसिक आणि बौद्धिक विकास व्हावा, यासाठी कुटुंब आणि समुदायामध्ये योग्य पद्धतींचा सराव व्हावा, हा या मोहिमेचा केंद्रबिंदू आहे. दि. 23 एप्रिल 2026 पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी आणि लाभार्थ्यांनी केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

यंदाचा पोषण पंधरवडा १). माता व बालकाचे पोषण: गरोदर माता आणि बालकांच्या आहाराबाबत मार्गदर्शन. २). मेंदू विकास (० ते ३ वर्षे): लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी पूर्व उद्दीपन. ३). खेळातून शिक्षण (३ ते ६ वर्षे): मुलांसाठी खेळ आधारित पूर्व शालेय शिक्षण. ४). स्क्रीन टाइमवर नियंत्रण: मुलांचे मोबाईल व टीव्हीचे व्यसन कमी करण्यासाठी पालकांची भूमिका. ५). सक्षम अंगणवाडी: अंगणवाडी केंद्रांच्या सक्षमीकरणासाठी लोकसहभाग वाढवणे. या विषयावर प्रामुख्याने आधारित असेल. असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 165                                                              दि.9 एप्रिल, 2026

 

अमृततर्फे व्यापक कौटुंबिक सर्वेक्षणाचे आयोजन

 

 

जालना, दि. 9 (जिमाका) :- राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी स्थापन झालेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेने आता पुढाकार घेतला आहे. ज्या जातींना अद्याप कोणत्याही स्वतंत्र शासकीय विभाग किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा 25 जातींच्या प्रगतीसाठी अमृततर्फे आता व्यापक कौटुंबिक सर्वेक्षण हाती घेण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून समाज घटकांच्या अपेक्षा आणि उपलब्ध स्थानिक संसाधने यांचा मेळ घालून नवनवीन योजनांची आखणी केली जाणार आहे.

सध्या अमृतच्या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य अशा 25 जातींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आगामी काळात होणाऱ्या सर्वेक्षणाअंती या यादीत आणखी काही जातींची भर पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. केवळ सरकारी योजना लादण्यापेक्षा, संबंधित समाजातील कुटुंबांची नेमकी संख्या किती? त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत? आणि स्थानिक पातळीवर कोणती कौशल्ये उपलब्ध आहेत? याचा सखोल अभ्यास या सर्वेक्षणातून केला जाणार आहे. असे व्यवस्थापक, अमृत कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 166                                                              दि.9 एप्रिल, 2026

 

क्रांतीचा साक्षीदार एकपात्री प्रयोगातून

उलगडणार महात्मा फुलेंचा जीवनप्रवास

 

जालना, दि. 9 (जिमाका) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने जालना शहरात एका विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाज कल्याण विभागाच्या वतीने शनिवार, दि. 11 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे क्रांतीचा साक्षीदार या एकपात्री नाटकाचे सादरीकरण होणार आहे.

राज्य शासनाच्या वतीने दि. 8 ते 14  एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताह साजरा केला जात आहे. महात्मा फुले यांचे हे 150 वे जयंती वर्ष (द्विशताब्दी वर्षाकडे वाटचाल) असून, त्यांच्या गौरवशाली जीवनप्रवासावर आधारित हे नाटक सादर केले जाणार आहे. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, तो बंड करून उठेल हा क्रांतीचा विचार या प्रयोगातून मांडला जाणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी (सामान्य) नम्रता चाटे आणि जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुकेशिनी कांबळे-पगारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, जालना यांनी या ऐतिहासिक आणि वैचारिक कार्यक्रमासाठी जालना शहरातील नागरिक, विचारवंत आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

-*-*-*-*-

 

Thursday, 2 April 2026

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी 8 एप्रिल रोजी लॉटरी जालना, दि.2 (जिमाका) :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय जालना यांच्या वतीने सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या थेट कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांची निवड आता लॉटरी पद्धतीने (चिठ्ठी टाकून) केली जाणार आहे. ही निवड प्रक्रिया बुधवार दि. 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे पार पडणार आहे. या आर्थिक वर्षासाठी जालना जिल्ह्याला एकूण 24 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. या योजनेसाठी महामंडळाकडे एकूण 166 उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते. अर्जांच्या छाननीनंतर त्यापैकी 119 अर्जदार पात्र ठरले असून, 47 अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा लाभार्थी निवड समिती यांच्या अध्यक्षतेखाली ही लॉटरी प्रक्रिया राबविली जाईल. निवड प्रक्रियेत पूर्णतः पारदर्शकता राहावी यासाठी ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. महामंडळाच्या वतीने सर्व पात्र अर्जदारांना या निवड प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रक्रियेद्वारे पात्र 119 उमेदवारांमधून चिठ्ठी टाकून अंतिम 24 लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. असे जिल्हा व्यवस्थापक, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

 

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या

थेट कर्ज योजनेसाठी 8 एप्रिल रोजी लॉटरी

 

जालना, दि.2 (जिमाका) :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय जालना यांच्या वतीने सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या थेट कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांची निवड आता लॉटरी पद्धतीने (चिठ्ठी टाकून) केली जाणार आहे. ही निवड प्रक्रिया बुधवार दि. 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे पार पडणार आहे.

या आर्थिक वर्षासाठी जालना जिल्ह्याला एकूण 24 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. या योजनेसाठी महामंडळाकडे एकूण 166 उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते. अर्जांच्या छाननीनंतर त्यापैकी 119 अर्जदार पात्र ठरले असून, 47 अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा लाभार्थी निवड समिती यांच्या अध्यक्षतेखाली ही लॉटरी प्रक्रिया राबविली जाईल. निवड प्रक्रियेत पूर्णतः पारदर्शकता राहावी यासाठी ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. महामंडळाच्या वतीने सर्व पात्र अर्जदारांना या निवड प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रक्रियेद्वारे पात्र 119 उमेदवारांमधून चिठ्ठी टाकून अंतिम 24 लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. असे जिल्हा व्यवस्थापक, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Friday, 27 March 2026

रोजगार मेळाव्यात 110 तरुणांना मिळाली नोकरी; धूत ट्रान्समिशनकडून 27 जणांना जागीच नियुक्तीपत्रे जालना, दि. 27 (जिमाका) :- जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देत, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि हुतात्मा जनार्दनमामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांनी 110 उमेदवारांची निवड केली असून, त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळाली आहे. या मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरले ते छत्रपती संभाजीनगर येथील धूत ट्रान्समिशन प्रा. लि. हे औद्योगिक गृह. या कंपनीने 27 पात्र उमेदवारांना निवडीनंतर तात्काळ नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्या उत्साहात भर घातली. शुक्रवार दि.27 मार्च रोजी शासकीय आयटीआय जालना येथे हा मेळावा पार पडला. सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी शासकीय आयटीआयच्या प्राचार्या श्रीमती तृप्ती भोपे आणि उपप्राचार्या श्रीमती रजनी शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात इयत्ता पाचवी ते दहावी, बारावी आणि आयटीआय (सर्व ट्रेड्स) उत्तीर्ण असलेल्या शेकडो उमेदवारांनी हजेरी लावली होती. मेळाव्यात एकूण 9 नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये असिस्टंट मॅनेजर, ब्रांच मॅनेजर, कॅशियर, टेक्निशियन, ऑपरेटर, फील्ड एक्झिक्युटिव्ह, हेल्पर आणि ए.सी.सी. मशीन ऑपरेटर अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण 110 उमेदवारांना या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल परिहार यांनी केले, तर आभार प्रदर्शन एस. जी. चव्हाण यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आयटीआयचे गटनिदेशक एस. एस. कापसे, ए. एस. धाबे, बी. डी. वाणी यांच्यासह कौशल्य विकास विभागातील भुजंग रिठे, अमोल बोरकर, आत्माराम दळवी, प्रदीप डोळे, योगेश बहुरे, नितीन लोकडे, कैलास काळे, रवींद्र पाड्मुख, विशाल जगरवाल, दीपक पालवे आणि गणेश सुपारकर यांनी विशेष परिश्रम घेतले. असेही कळविले आहे. -*-*-*-*-

 

रोजगार मेळाव्यात 110 तरुणांना मिळाली नोकरी;

धूत ट्रान्समिशनकडून 27 जणांना जागीच नियुक्तीपत्रे

 

जालना, दि. 27 (जिमाका) :- जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देत, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि हुतात्मा जनार्दनमामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांनी 110 उमेदवारांची निवड केली असून, त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळाली आहे. या मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरले ते छत्रपती संभाजीनगर येथील धूत ट्रान्समिशन प्रा. लि. हे औद्योगिक गृह. या कंपनीने 27 पात्र उमेदवारांना निवडीनंतर तात्काळ नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्या उत्साहात भर घातली.

शुक्रवार दि.27 मार्च रोजी शासकीय आयटीआय जालना येथे हा मेळावा पार पडला. सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी शासकीय आयटीआयच्या प्राचार्या श्रीमती तृप्ती भोपे आणि उपप्राचार्या श्रीमती रजनी शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

या मेळाव्यात इयत्ता पाचवी ते दहावी, बारावी आणि आयटीआय (सर्व ट्रेड्स) उत्तीर्ण असलेल्या शेकडो उमेदवारांनी हजेरी लावली होती. मेळाव्यात एकूण 9 नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये असिस्टंट मॅनेजर, ब्रांच मॅनेजर, कॅशियर, टेक्निशियन, ऑपरेटर, फील्ड एक्झिक्युटिव्ह, हेल्पर आणि ए.सी.सी. मशीन ऑपरेटर अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण 110 उमेदवारांना या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल परिहार यांनी केले, तर आभार प्रदर्शन एस. जी. चव्हाण यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आयटीआयचे गटनिदेशक एस. एस. कापसे, ए. एस. धाबे, बी. डी. वाणी यांच्यासह कौशल्य विकास विभागातील भुजंग रिठे, अमोल बोरकर, आत्माराम दळवी, प्रदीप डोळे, योगेश बहुरे, नितीन लोकडे, कैलास काळे, रवींद्र पाड्मुख, विशाल जगरवाल, दीपक पालवे आणि गणेश सुपारकर यांनी विशेष परिश्रम घेतले. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-