Tuesday, 28 July 2026

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन

 


जालना, दि. 28 (जिमाका) :  जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे शुक्रवार, दि. 31 जुलै,  2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला समितीवर नियुक्त शासकीय सदस्य, अशासकीय सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावे. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे ग्राहक हितासंबंधीत तक्रार असल्यास सदर बैठकीच्या दिवशी उपस्थित राहून आपला लेखी स्वरुपाचा अर्ज सादर करावा.

नागरिकांना ग्राहक या संबंधाने काही अडचणी असल्यास त्याबाबत जालना जिल्ह्याचे संकेतस्थळ jalna.nic.in यावर ग्राहकांच्या तक्रारीसाठी पोर्टल उपलब्ध करुन दिलेले असून, नागरिकांनी त्यांच्या समस्या या पोर्टलच्या माध्यमातून सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी तथा जालना संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव शशीकांत हदगल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

जागतिक कावीळ दिनानिमित्त जालना शहरात जनजागृती रॅली

 



जालना,दि.28(जिमाका) : जागतिक कावीळ दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय, जालना आणि सनराईज शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी जालना शहरात कावीळ आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र एस. पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.

"चला तर कावीळ मुक्त करूया" या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीद्वारे नागरिकांना कावीळ आजाराची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, वेळेवर निदान आणि उपचार याबाबत माहिती देण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते..

यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कावीळ आजार नियंत्रणासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने 2030 पर्यंत कावीळ निर्मूलनाचे उद्दिष्ट निश्चित केले असून, ते साध्य करण्यासाठी जनजागृती, लसीकरण आणि लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान जिल्हा रुग्णालयातील सुमारे 100 वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कावीळ प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. या उपक्रमात सनराईज रेस्टॉरंटचे संचालक  मोहन इंगळे, डॉ. प्रदीप कुलकर्णी, डॉ. प्रकाश पाटोदेकर, डॉ. प्रशांत बांदल, डॉ. रवींद्र बेदरकर, डी. एच. बोर्डे, नितीश जाधव, संदीप लुखे, संतोष इंगळे, विद्या म्हस्के, चंद्रकांत मुंढे, विजय पवार, कांबळे, अमोल पेरकर, सोनाजी भुतेकर, दीपक जाधव तसेच जिल्हा परिचर्या प्रशिक्षण केंद्र, जालना येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना


 

Monday, 27 July 2026

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 


जालना दि.27 (जिमाका) : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दि. 27 जुलै रोजी यलो  (Yellow) अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा  (ताशी 30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने) येण्याची शक्यता वर्तवली आहे. दि. 28 ते 31 जुलै रोजी यलो  (Yellow) अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा  (ताशी 40-50  कि.मी.प्र.ता. वेगाने) येण्याची शक्यता वर्तवली आहे.

 

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

            मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे,मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अर्थातरी लटकणा-या / लोंबणा-या तारांपासून दूर रहावे.वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी,जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधाण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

रायगड येथे निवासी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या पोलीस पाटील व कोतवालांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आपदा मित्र किट व प्रमाणपत्रांचे वितरण

 



रायगड येथे निवासी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या पोलीस पाटील व कोतवालांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आपदा मित्र किट व प्रमाणपत्रांचे वितरण

 

जालना,दि.27(जिमाका) : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना यांच्या वतीने रायगड येथे आयोजित 12 दिवसांचे निवासी 'आपदा मित्र' प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून आलेल्या 68 पोलीस पाटील व कोतवालांना आज जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आशिमा मित्तल यांच्या हस्ते आपदा मित्र किट तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना सांगितले की, गावपातळीवर सक्षम व प्रशिक्षित स्वयंसेवकांची फळी निर्माण करून आपत्ती व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. आपत्तीच्या प्रसंगी गावपातळीवर सर्वप्रथम मदतीसाठी धावून जाणारे पोलीस पाटील व कोतवाल हे प्रशासनाचे महत्त्वाचे दुवे असून, रायगड येथे प्राप्त केलेले आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण, शोध व बचाव कार्य, प्रथमोपचार, पूर, वीज पडणे, अग्नी दुर्घटना, सर्पदंश तसेच आपत्कालीन परिस्थितीतील समन्वयाचे कौशल्य प्रत्यक्ष कार्यात वापरून गावातील नागरिकांचे जीवित व वित्तहानी कमी करण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.

रायगड येथे आयोजित निवासी प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींना तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या काळातील तात्काळ प्रतिसाद, शोध व बचाव कार्य, प्रथमोपचार, दोरीच्या साहाय्याने बचाव तंत्र, जलबचाव, अग्निसुरक्षा, समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध आपत्तीजन्य परिस्थितींचा प्रत्यक्ष सराव देण्यात आला.

प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या 68 पोलीस पाटील व कोतवालांना गावपातळीवर प्रभावी आपत्कालीन प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक साहित्य असलेले आपदा मित्र किट तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी जालना शहर महानगरपालिकेच्या महापौर वंदनाताई मगरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दीपक काजळकर, सतीश उढाण, ज्ञानेश्वर राऊत, छत्रसिंग कायते, राहुल बिजुले तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेले पोलीस पाटील व कोतवाल उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-*-