जालना, दि.27 (जिमाका):- जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवार दि. 27
फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभागृहात पार पडली. सकाळी 11
वाजता आयोजित केलेल्या या बैठकीत ग्राहकांच्या विविध तक्रारी आणि त्यांच्या
हक्कांचे संरक्षण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर आणि अशासकीय सदस्य सतिश पंच यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी जिल्ह्यातील बाजारपेठांमधील वाढती
भेसळ, वजन-मापांमधील तफावत आणि सेवांमधील त्रुटींबाबत सदस्यांनी प्रशासनाचे लक्ष
वेधले. अशासकीय सदस्यांनी
केलेल्या सुचनांवर अंमलबजावणी करावी तसेच ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष
मोहिम राबविण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी मिसाळ यांनी यावेळी दिले. बैठकीला
समितीचे इतर शासकीय व अशासकीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राहकांनी
आपल्या तक्रारींसाठी पुढे यावे, असे आवाहनही याप्रसंगी करण्यात आले.
-*-*-*-*-
वृत्त
क्र.
दि. 27 फेब्रुवारी, 2026
समाज कल्याण विभागाच्या
गटई स्टॉल योजनेच्या निकषात
सुधारणा
जालना, दि.27 (जिमाका):- अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील बांधवांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी
राज्य शासनाने गटई स्टॉल योजनेच्या व्याप्तीमध्ये मोठे बदल केले असून निकषांमध्ये सुधारणा
केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 28 जानेवारी 2026 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार आता ही योजना अधिक व्यापक आणि सुटसुटीत
करण्यात आली आहे. पूर्वी ही योजना संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत
राबविली जात होती. मात्र नव्या निर्णयानुसार आता या योजनेची संपूर्ण अंमलबजावणी आयुक्त, समाजकल्याण, महाराष्ट्र
राज्य, पुणे यांच्यामार्फत केली जाणार आहे.
चर्मकार, ढोर, होलार, मोची व इतर पोटजातींमधील गरजू कामगारांना मुख्य प्रवाहात
आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 40
हजार रुपयांवरून 80 हजार रुपये करण्यात आली आहे. तर शहरी भागासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 50 हजार रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी
लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया एप्रिल 2026 नंतर सुरू होणार आहे. याबाबतची अधिकृत जाहिरात आणि प्रसिद्धी समाजकल्याण विभागामार्फत
लवकरच देण्यात येईल. महानगरपालिका, नगरपालिका, छावणी क्षेत्र आणि ग्रामपंचायत क्षेत्रातील
पात्र उमेदवारांना 100 टक्के शासकीय अनुदानावर
हे स्टॉल दिले जाणार आहेत. असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
कळविले आहे.
-*-*-*-*-
वृत्त
क्र.
दि. 27 फेब्रुवारी, 2026
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या
शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रकिया सुरु
जालना, दि.27 (जिमाका):- इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च
शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत
चालवल्या जाणाऱ्या शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या प्रवेशासाठी ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांना दि.25 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहेत.
या योजनेचा मुख्य उद्देश
ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शहरात उच्च शिक्षणासाठी निवासाची सोय उपलब्ध
करून देणे हा आहे. जालना महापालिका हद्दीपासून 10 कि.मी. अंतराच्या परिसरातील महाविद्यालयातील
प्रवेशित विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करावा तर इतर तालुक्याच्या ठिकाणावरील
विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले
आधार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम
योजना यांसारख्या पर्यायी योजनेसाठी अर्ज करावेत. असे आवाहन, सहायक लेखाधिकारी, सहायक
संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले
आहे.
-*-*-*-*-
वृत्त
क्र.
दि. 27 फेब्रुवारी, 2026
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर अभियानातंर्गत
बैठक
अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कामे करावीत
- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल
- जिल्ह्यात 7 मार्च ते 15 मे 2026
या कालावधीत
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान
जालना, दि.27 (जिमाका):- जालना जिल्ह्यात दि.7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर आयोजित
करण्यात आले आहेत. ही शिबिरे हे प्रत्येक तालुक्यातील महसूल मंडळ, नगर परिषद व नगर
पंचायतीस्तरावर घेतली जाणार आहेत. तरी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख
आणि गतिमान करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने
कामे करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी
कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर अभियान टप्पा-1
अंतर्गत व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्या बोलत
होत्या. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत
हदगल, उपजिल्हाधिकारी मनिषा देशपांडे, सहायक जिल्हाधिकारी बी.सर्वनन यांच्यासह
संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान (टप्पा-1) अंतर्गत समाधान
शिबिरांच्या पूर्वतयारीचा
आढावा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी नुकताच घेतला आहे. या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट
महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित कामे आणि नागरिकांच्या तक्रारी एकाच ठिकाणी निकाली
काढणे हे आहे.
तरी अधिकाधिक नागरिकांना शिबिराचा लाभ घेता यावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज
महाराजस्व अभियान समाधान शिबीराची जनजागृती सर्व माध्यामाद्वारे करण्यात यावी. तसेच
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीराचे सुक्ष्म नियोजन करावे,
अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
समाधान
शिबिरात भोगवटदार वर्ग-2 ते वर्ग-1 परावर्तन पुर्ण करुन सातबारा अद्ययावत देणे,
जीवंत सातबारा अंतर्गत प्रलंबित नोंदी दुरुस्त करणे, सामाजिक योजनांचे अर्ज मंजूर करुन
शिबिरात वितरण करणे, पाणंद रस्ते व सर्वांसाठी घरे प्रकरणे निकाली काढुन
आदेश/पट्टे वाटप करणे, प्रलंबित व विवादग्रस्त फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती
हेल्प डेस्क सुरु करणे, अकृषिक सुधारणाकरणेबाबत मार्गदर्शन करणे, लोकसेवा हक्क
कायद्यानुसार प्रमाणपत्र अर्ज स्विकारणे व वितरण करणे, डिजीटल सातबारा, व नवीन
महसूल तरतुदींची जनजागृती करणे, कमी जास्त पत्रके अद्ययावत करणे, एक खिडकी सुविधेद्वारे
ई-मोजणी, ॲग्रीस्टॅक, पीएम किसान व तक्रार निवारण सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार
आहेत. अशी माहिती ही यावेळी देण्यात आली. या बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी व
तहसीलदार व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे उपस्थित होते.
-*-*-*-*-


