Wednesday, 22 July 2026

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्यातील मावळ व खेड परिसरात ‘शुभ आरंभ’ उपक्रमातून उल्लेखनीय परिवर्तन

 


 

मुंबई, दि. 22 : राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची (CSR) प्रभावी साथ लाभत आहे. शासन आणि उद्योग क्षेत्राच्या भागीदारीतून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साध्य होत आहे. अशा उपक्रमांमुळे ‘विकसित महाराष्ट्र 2047 ’ या राज्याच्या ध्येयाला बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांना पूरक ठरणारे उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्वाचे उपक्रम ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवत आहेत. आरोग्य, पोषण, जलसुरक्षा, पर्यावरण संवर्धन, क्रीडा आणि शालेय पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण काम करणारे उपक्रम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

मोंडेलेज इंडियाच्या ‘शुभ आरंभ’ या प्रमुख सामाजिक उपक्रमांतर्गत गेल्या 13 वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील मावळ आणि खेड तालुक्यातील ६० गावांमध्ये स्थानिक गरजांनुसार आरोग्य, पोषण, शिक्षण, जलसंधारण, पर्यावरण संवर्धन, क्रीडा आणि समुदाय विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमुळे हजारो कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आला असून, शासनाच्या विविध योजनांनाही प्रभावी पूरक बळ मिळाले आहे.

 

आरोग्य सुविधांचे बळकटीकरण; लाखो नागरिकांना लाभ

 

आरोग्य क्षेत्रात आयुष्मान भारत अभियानाशी सुसंगत पद्धतीने 50 हेल्थ अँड वेलनेस सेंटरचे आधुनिकीकरण व सक्षमीकरण करण्यात आले असून, त्याचा सुमारे 3.2 लाख नागरिकांना थेट लाभ झाला आहे. अॅनिमिया मुक्त भारत अभियानाअंतर्गत महिलांमध्ये आणि किशोरवयीन मुलींमध्ये रक्तक्षय ओळखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या माध्यमातून सुमारे 5 हजार उच्च जोखमीच्या गर्भवती महिलांची ओळख करून त्यांना विशेष उपचारासाठी संदर्भित करण्यात आले, तर एक हजारांहून अधिक पाच वर्षांखालील बालकांना प्रगत उपचारासाठी पाठविण्यात आले.

 

याशिवाय, 226 आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन नवजात बालकांची घरपोच आरोग्य तपासणी, उच्च जोखमीच्या रुग्णांची ओळख आणि प्राथमिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यात आली. आरोग्य जनजागृतीसाठी विविध विशेष आरोग्य शिबिरे तसेच जागतिक आरोग्य, क्षयरोग, मातृत्व आणि योग दिन साजरा करण्यात आला.

 

ग्रामीण क्रीडा विकासाला नवी दिशा

 

'खेलो इंडिया' अभियानाशी सुसंगत 'शुभ आरंभ स्पोर्ट्स फॉर एक्सलन्स' या उपक्रमातून ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविण्याचे काम करण्यात आले आहे. फुटबॉल आणि कबड्डीसारख्या खेळांमध्ये विद्यार्थ्यांना नियमित प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक, जीवनकौशल्य प्रशिक्षक आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

गेल्या दशकात सुमारे 9 हजार विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रशिक्षणाचा लाभ मिळाला असून, त्यामध्ये मुलींचा सहभाग जवळपास 50 टक्के आहे. परिसरात 10 क्रीडांगणे विकसित करण्यात आली आहेत. शालेय स्तरापासून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे कार्य सुरू आहे.

 

शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि हरित ऊर्जा उपक्रम

ग्रामीण भागातील शाळांमध्ये सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी व्यापक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. 27 आरओ पाणी शुद्धीकरण यंत्रणा, 12 स्वच्छतागृहे अनेक शाळांमध्ये संरक्षक भिंती, पेव्हिंग ब्लॉक आणि अन्य सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी 60 किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वीज खर्चात दरवर्षी मोठी बचत होत आहे. तसेच विविध वाड्यांमध्ये सौर पथदिवे बसविण्यात आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेतही वाढ झाली आहे.

जलसंधारणातून शेतीला दिलासा

जलसंधारण क्षेत्रात सहा जलसाठा संरचनांची निर्मिती व दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे 2,000 लाख लिटर अतिरिक्त पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. याचा लाभ 300 एकरांहून अधिक शेती आणि 500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना झाला आहे.

याशिवाय, पुढील दोन वर्षांत 20 हून अधिक नवीन जलसंधारण प्रकल्प उभारून सुमारे 2,500 लाख लिटर भूजल पुनर्भरण क्षमता निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शेततळी, बंधारे, बोअरवेल रिचार्ज आणि पर्जन्यजल संधारणासारख्या उपाययोजनांचा समावेश आहे.

पोषण शिक्षणातून निरोगी पिढी घडविण्याचा प्रयत्न

 

शालेय विद्यार्थ्यांमध्ये सकस आहार आणि आरोग्यदायी जीवनशैलीची सवय निर्माण करण्यासाठी पुणे, सिंधुदुर्ग आणि मुंबई जिल्ह्यातील 235 शाळांमध्ये पोषण शिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला आहे. या माध्यमातून सुमारे 60 हजार विद्यार्थ्यांपर्यंत सुरक्षित आणि सकस आहाराचा संदेश पोहोचविण्यात आला.

470 शिक्षकांना 'हेल्थ अँड वेलनेस अॅम्बेसेडर' म्हणून प्रशिक्षित करण्यात आले असून, सर्व शाळांमध्ये 'सेहत क्लब' स्थापन करण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि पोषणविषयक जनजागृतीसाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे.

पुढील दोन वर्षांसाठी व्यापक कृती आराखडा

या उपक्रमाचा पुढील टप्पा अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 

आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे, हेल्थ अँड वेलनेस सेंटरची गुणवत्ता वाढविणे, विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन, ग्रामीण क्रीडा विकासासाठी प्रगत प्रशिक्षण, तसेच जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणाच्या नव्या प्रकल्पांची अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

शासनाच्या विविध योजनांशी प्रभावी समन्वय साधत ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य, शिक्षण, जलसुरक्षा आणि जीवनमानात शाश्वत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

-*-*-*-*-*-*-

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीअंतर्गत बाल रुग्णांच्या कर्करोग निदानासाठी प्रथमच आर्थिक सहाय्य · त्रिपक्षीय करारातून राज्यातील 200 बालरुग्णांना मिळणार लाभ

 


 

 

    मुंबई, दि. 22 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत बालरुग्णांच्या कर्करोग निदानासाठी प्रथमच स्वतंत्र आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. महागड्या निदान चाचण्यांमुळे उपचार प्रक्रियेत होणारा विलंब टाळून कर्करोगाचे वेळेत निदान व्हावे, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे. या विशेष उपक्रमांतर्गत राज्यातील 200 आर्थिकदृष्ट्या दुर्बल कर्करोगग्रस्त बालरुग्णांना निदानासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय चाचण्यांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

 

    या लाभाअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील पात्र बालरुग्णांना कर्करोगाचे निदान निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक तसेच पुढील खर्चिक वैद्यकीय चाचण्यांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. या सहाय्यामुळे आर्थिक अडचणींमुळे निदान प्रक्रियेत होणारा विलंब टाळून वेळेत निदान आणि उपचाराचे प्रभावी नियोजन करणे शक्य होणार आहे.

 

       पहिल्या दोन महिन्यांतच 59 बालरुग्णांना 50 लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले आहे. या सर्व बालरुग्णांचे कर्करोग निदान टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे करण्यात आले. बालरुग्णांच्या कर्करोग निदानासाठी प्रथमच सुरू करण्यात आलेला हा उपक्रम आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी महत्त्वाचा आधार ठरत आहे. वेळेत निदान झाल्यामुळे उपचाराला होणारा विलंब कमी होऊन बालरुग्णांना योग्य वेळी उपचार सुरू करण्यास मदत होत आहे.

 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत बालरुग्णांच्या कर्करोग निदानासाठी प्रथमच स्वतंत्र आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा लाभ राज्यातील 200 आर्थिकदृष्ट्या दुर्बल कर्करोगग्रस्त बालरुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या 200 लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत 59 बालरुग्णांना निदानासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. गरजू रूग्णांनी अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 8001232211  वर संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

भोकरदन येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर' उत्साहात; हजारो नागरिकांच्या विविध प्रशासकीय प्रश्नांचा जागीच निपटारा

 









 

जालना, दि. 22 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघासाठी आज (दि. 22) आयोजित करण्यात आलेले 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान'  समृद्धी लॉन्स, सिल्लोड रोड, भोकरदन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, महसूल व इतर शासकीय विभागांशी संबंधित शेकडो अर्ज व तक्रारींचा जागीच निपटारा करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासनाच्या विविध सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत एकाच ठिकाणी पोहोचाव्यात, प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान व्हावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, उपविभागीय अधिकारी तथा मुख्य नोडल अधिकारी सुकेशिनी कांबळे-पगारे, तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे (भोकरदन), तहसीलदार अविनाश लोंढे (जाफ्राबाद) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार संतोष पाटील दानवे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ, दाखले व प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी हे महसूल समाधान शिबीर अत्यंत उपयुक्त ठरले आहे. अशा उपक्रमांमुळे नागरिकांचा वेळ व खर्च वाचत असून प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होत आहे."

जिल्हाधिकारी अशिमा मित्तल आणि उपविभागीय अधिकारी सुकेशिनी कांबळे-पगारे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. विविध विभागांमधील उत्तम समन्वयामुळे नागरिकांना तातडीने सेवा उपलब्ध करून देणे शक्य झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शिबिरात महसूल विभाग, भूमी अभिलेख, कृषी, पंचायत राज, आरोग्य, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, बँक, सामाजिक न्याय, पशुसंवर्धन आदी विभागांचे स्वतंत्र सेवा कक्ष उभारण्यात आले होते. प्रत्येक विभागामार्फत नागरिकांच्या विविध समस्यांवर तत्काळ कार्यवाही करून आवश्यक सेवा आणि लाभ उपलब्ध करून देण्यात आले.

महसूल व भूमी अभिलेख विभागामार्फत 'जिवंत ७/१२' मोहीम, ई-फेरफार, वारस नोंदी, कौटुंबिक वाटणीपत्र नोंदी तसेच प्रलंबित फेरफार प्रकरणांचा जागीच निपटारा करण्यात आला. पात्र निवासी अतिक्रमणांचे नियमितीकरण, गावठाण स्वामित्व सनद वाटप, महिलांचे नाव ७/१२ उताऱ्यावर भोगवटादार म्हणून समाविष्ट करण्याची कार्यवाही तसेच महिला शेतकरी दाखल्यांचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते अभियानांतर्गत प्रलंबित शेतरस्त्यांबाबतही आवश्यक मंजुरीपत्रे देण्यात आली.

अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत नवीन डिजिटल शिधापत्रिकांचे वितरण, शिधापत्रिकांमधील दुरुस्ती अर्जांचा निपटारा करण्यात आला. तसेच उत्पन्न, रहिवासी व इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे, नवीन मतदार नोंदणीसह विविध नागरिक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.

आरोग्य विभागाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी, आयुष्मान भारत कार्ड नोंदणी व वितरण करण्यात आले. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले. 'जलतारा' उपक्रम, वृक्षारोपण जनजागृती तसेच महिला बचत गटांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शनही देण्यात आले.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालय भोकरदन व जाफ्राबाद, पंचायत समिती तसेच विविध शासकीय विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरात हजारो नागरिकांनी सहभाग घेत विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला आणि समाधान व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अभिवादन

 



            जालना,दि.22 (जिमाका) : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, मनिषा देशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी नायब तहसिलदार तुषार निकम, सतीश तायडे, निलम लुनावत, संतोषी सुर्यवंशी, संध्या सुखदेवे महसुल सहाय्यक दिपाली राऊत (वानखडे), शिल्पा मगरे, रुपा येंगुपटला, संपदा कुलकर्णी,  ए.बी. राठोड, जे.एस. बारवकर, अतुल केदार, रविंद्र मगरे, रवि हेलगट, संतोष खरात, विठ्ठल बोरकर, सविता भोकरे, रीना नगरकर, सुनिल काळुंके व इतर तसेच प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

-*-*-*-*-*-

जालना येथे “जागेवर निवड संधी” प्लेसमेंट ड्राईव्हचे 24 जुलै रोजी आयोजन

 


जालना, दि.22 (जिमाका) : नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी आणि मार्गदर्शन उपलब्ध करण्याच्या उद्देशाने रोजगार स्वयंरोजगारसहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. यानुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांचे मार्फत शुक्रवार, दि. २४ जुलै, २०२६ रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय दुसरा मजला,जालना येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन सकाळी 11 ते 2 दरम्यान करण्यात आले आहे.

            याकरिता गरवारे हायटेक प्रा. लि. छत्रपती संभाजी नगर यांचे दहावी, बारावी, पदवीधर उत्तीर्ण युवक-युवती करिता अप्रेंटिसचे 10 पदे, तसेच अजित सीड्स प्रा. लि. छत्रपती संभाजी नगरचे दहावी, बारावी, पदवीधर उत्तीर्ण युवक-युवती उत्तीर्ण करिता अप्रेंटिसचे 10 पदे, त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद नागरी सह पतसंस्था मर्या,जालना यांची कोणतीही पदवी उत्तीर्ण तसेच एम.बी.ए. मार्केटिंग पदवीधर यांची मार्केटिंग एक्झिक्युटिव्हसाठी 15 पदे अशी एकूण 35 रिक्त पदे प्राप्त झाली आहेत. यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने मध्ये देखील प्रशिक्षणासाठी काही पदे भरण्यात येणार आहेत. याकरीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणाऱ्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध होणार आहे .जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहितीसाठी विभागाच्या www.cmykpy.mahaswayam.gov.in त्याच प्रमाणे केंद्र शासनाच्या www.ncs.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होमपेज वरील नोकरी साधक (Job Seekar) लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्डच्याआधारे लॉगिन करावे. त्यानंतर जागेवर निवड संधी (2025-26) प्लेसमेंट ड्राईव्ह 3 या बटनावर क्लिक करून जालना जिल्हाची निवड करावी. उद्योजक / नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी अर्ज करावा. मुलाखतीसाठी बायोडाटा किमान दोन प्रती सोबत ठेवून शुक्रवार, दि. 24 जुलै, 2026 रोजी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय दुसरा मजला, जालना येथे उपस्थित रहावे असे आवाहन सहायक आयुक्त, ककौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, गणेश चिमणकर यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

प्रशासकीय इमारतीमध्ये नगर भुमापन कार्यालय कार्यरत

 


        जालना, दि.22 (जिमाका) :जालना शहरातील नगर भुमापन विषयक सेवा अधिक सुलभ व जलद उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जालना यांच्या अधिपत्याखाली नवीन नगर भूमापन कार्यालय, जालना येथे सुरु करण्यात आलेले आहे. हे कार्यालय  प्रशासकीय इमारत, तळ मजला, जालना येथे कार्यरत झाले आह. दि. 15 जुन, 2026 पासुन नागरिकांसाठी सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या कार्यालयामार्फत नगर भुमापन, मालमत्ता नोंदी, वारस हक्क नोंदी, नकाशे, मोजणी व इतर संबंधीत कामकाज करण्यात येणार आहेत. नागरिकांनी आपल्या नगर भूमापन विषयक कार्यासाठी प्रशासकीय इमारत, तळ मजला, जालना येथे सुरु झालेल्या नवीन नगर भूमापन जालना कार्यालयाशी संपर्क साधावा. मुळ गाव व शहरातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन नगर भूमापन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी

 


 

     जालना दि. 22 (जिमाका) :-    जिल्ह्यात दि. 25 जुलै, 2026 रोजी देवशयनी आषाढी एकादशी, दि. 29 जुलै,2026 रोजी गुरुपौर्णिमा, दि. 1 ऑगस्ट,2026 रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयेंती इत्यादी जयंती, सण, उत्सव साजरे होणार आहेत. तसेच राज्यातून विविध ठिकाणावरुन यात्रेसाठी पायी दिंड्या जालना जिल्ह्यातुन मार्गक्रमण करत आहेत. सण, उत्सव, जयंती यांनिमित्त जिल्ह्यात शहरात मिरवणुका व विविध कार्यक्रम आयोजित होतात. त्यासाठी मोठृया प्रमाणावर नागरिक एकत्र येत असतात.

तसेच सध्या महाराष्ट्रात व देशभरता आरक्षण उपवर्गीकरणाला तिव्र विरोध होत आहे. तसेच सध्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण  व धनगर आरक्षण मिळावे या अनुषंगाने जालना जिल्ह्यात विविध आंदोलनात्मक कार्यक्रम सुरु आहेत. तसेच सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द विविध कारणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहे. तसेच  शेतक-यांचे विविध मागणीसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे संपुर्ण जिल्ह्यासाठी दि. 23 जुलै, 2026   रोजीच्या 6.00 वाजेपासुन ते  दि. 5 ऑगस्ट,2026 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत कलम 37 (1) व  (3)  अन्वये प्रतिबंधात्मक आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी शशीकांत हदगल  यांनी जारी केले आहे.

 

        पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही  आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.

 

तर पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये  पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.   

 

हा आदेश कामावरील कोणताही ‍ अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही.  तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.   हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि. 23 जुलै, 2026   रोजीच्या 6.00 वाजेपासुन ते  दि. 5 ऑगस्ट,2026 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-*-*-