Friday, 1 May 2026

दिव्यांग पुनर्वसन केंद्राद्वारे दिव्यांगांना सुविधा मिळण्यास मदत होणार–पालकमंत्री पंकजा मुंडे • जालना येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन

 




जालना दि.1 (जिमाका): जालना जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ, मार्गदर्शन आणि पुनर्वसनासाठीची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी याकरीता दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले असुन, या केंद्राद्वारे जिल्ह्यातील दिव्यांगाना विविध सुविधा मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी केले.

जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, महापौर वंदना मगरे, मनपा आयुक्त अंजली शर्मा, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती मुंडे पुढे म्हणाल्या की, दिव्यांग पुनर्वसन केंद्रांमुळे दिव्यांग व्यक्तींना अनेक महत्त्वाच्या सुविधा मिळण्यास मोठी मदत होणर आहे. अशा केंद्रांचा मुख्य उद्देश म्हणजे दिव्यांगांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे आहे. या केंद्रामुळे जिल्ह्यातील दिव्यांगांना मोठा आधार मिळणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून त्यांना योग्य मार्गदर्शन, कागदपत्रांची पूर्तता, वैद्यकीय मदत आणि पुनर्वसनाच्या सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. जालना येथील हे केंद्र महाराष्ट्रात अग्रस्थानी पोहोचावे यासाठी शासनस्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी कार्यक्रमास नागरिक, दिव्यांग बांधव, दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी, विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.


पालकमंत्री यांच्या हस्ते मोतीबाग चौपाटी सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण

 




जालना दि.1 (जिमाका): राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते जालना शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या नवीन चौपाटीचे सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले. याठिकाणी नागरिकांसाठी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल्स आणि बैठकीची उत्तम सुविधा  उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

यावेळी महापौर श्रीमती वंदना मगरे, खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, उपमहापौर राजेश राऊत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

Thursday, 30 April 2026

विकासाच्या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर - पालकमंत्री पंकजा मुंडे · महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात संपन्न

 










जालना दि.1 (जिमाका): महाराष्ट्राने स्थापने पासूनच सर्वच क्षेत्रामध्ये विकासाच्या प्रक्रियेत मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्यामुळेच आपले महाराष्ट्र राज्य देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी केले.

महाराष्ट्र दिनाच्या 67 वा स्थापना दिनानिमित्त जालना येथील पोलीस मुख्यालय मैदानावर श्रीमती मुंडे यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी महापौर श्रीमती वंदना मगरे, खासदार डॉ. कल्याण काळे,  आमदार अर्जुन खोतकर, उपमहापौर राजेश राऊत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, राज्य शासन विविध कल्‍याणकारी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत असून, विकासाच्या प्रक्रियेत राज्य शासन शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिशी सदैव उभे आहे. तसेच सर्वच क्षेत्रात विकासाचा दृष्टीकोन ठेवत, राज्य शासनाची वाटचाल सुरु आहे.

जगातील सर्वात मोठी भारताची 2027 ची जनगणना ही देशाची 16 वी जनगणना पहिल्यांदाच 'डिजिटल’ पध्दतीने राबविण्यात येत आहे. ही जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार आहे. ही जनगणना अधिक सुलभ, अचूक आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने नागरिकांना स्वगणना (Self Enumeration) करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या प्रक्रियेमुळे नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली सर्व नागरिकांनी आपली स्वतःची अचूक माहिती स्वतः नोंदविण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले.  

तसेच भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेचा उल्लेख करत पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी नागरिकांना आपल्या मतदार यादीतील माहिती तपासून घेण्याचे आवाहन केले. तसेच ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘साधना सप्ताह 2026’मध्ये राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळवून नवा मानदंड आखल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या ‘माझी वसुंधरा 6.0’ मोहिमेचा आढावा देत पालकमंत्री यांनी 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत जिल्ह्यातील 28 हजारांहून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी झाल्याचे सांगितले. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’ अंतर्गत ग्रामीण नागरिकांना रोजगार बळकट करून महाराष्ट्राचा ‘आर्थिक कणा’ बनविण्याचा ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळी-मेंढी पालनासाठी तांत्रिक व आर्थिक मदत देऊन ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न वाढवण्याचा हा उपक्रम असल्याचे पालकमंत्री यांनी नमूद केले.

विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे जालना जिल्हा देखील अग्रेसर राहिला आहे. जालना जिल्ह्यासाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत प्राप्त निधी विविध विकास कामांसाठी शंभर टक्के खर्च झाल्याने पालकमंत्री यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. जालना ड्रायपोर्ट, जालना-नांदेड समृध्दी महामार्ग आणि जालना–जळगाव रेल्वे मार्ग यासारख्या पायाभूत प्रकल्पांचे काम चांगल्या गतीने सुरू असून, त्यामुळे जिल्हय़ातील उद्योग व अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबविण्यात येत असुन, या अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात 47 शिबीरे आयोजन करुन, सुमारे 44 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात आले. तसेच जलसंपदा विभागाच्यावतीने 15 ते 30 एप्रिल या कालावधीत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा-2026’ ही मोहिम जिल्ह्यात यशस्वीरित्या पार पडली. तसेच कृषी विभागामार्फत महा-डिबीट या पोर्टलद्वारे जिल्ह्यातील 18 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना  82 कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत 153 लाभार्थ्यांना सुमारे 10 कोटी रुपयांचे कर्ज तसेच 4 कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजने अंतर्गत 2025-26 मध्ये अपघातात मृत्यू झालेल्या, तसेच अपंगत्व आलेल्या एकुण 127 शेतकऱ्यांच्या वारसदारांना 2.53 कोटी रुपये सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे. राज्याच्या उद्योग विभागातंर्गत राबविण्यात येणाऱ्या महत्वकांक्षी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ योजने अंतर्गत जिल्ह्यात यावर्षी 243 नविन उद्योग उभे राहिल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

जिल्ह्यात एलपीजी गॅस आणि पेट्रोलचा मुबलक साठा उपलब्ध असून, नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. पाणी टंचाईकरिता आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असुन, सर्वसामान्य नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास होणार नाही, याबाबत प्रशासनास सूचना देण्यात आल्याचे सांगितले.

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम अंतर्गत जालना जिल्हा प्रशासनाने ‘घरपोच शासकीय सेवा’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयास राज्यस्तरीय कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ‘जालना मित्र’ या डिजिटल अ‍ॅपद्वारे नागरिकांना घरबसल्या योजनांची माहिती आणि विविध सेवांचा लाभ मिळत असल्याचे सांगितले.

तसेच सद्या राज्यभर तापमानात वाढ झाली असुन, उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचे सांगितले. नागरिकांनी जास्त वेळ बाहेर राहणे, योग्यरीतीने पाणी आणि अन्न घेणे, थंड वस्त्रे वापरणे यासारख्या सावधानता बाळगण्याचे आवाहन पालकमंत्री यांनी केले.

प्रारंभी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी परेड निरीक्षण केले. त्यानंतर विविध पथकांनी संचलन केले. पोलीस शहर व ग्रामीण यंत्रणेचे पथक, वाहतूक नियंत्रण विभाग, गृह रक्षक दल, शीघ्र प्रतिसाद दल यांच्यासह अग्निशमन दल, श्वान पथक, आपत्ती व्यवस्थापन वाहन, 108 रूग्णवाहिका आदी वाहनांचा संचलनात उत्स्फूर्त सहभाग होता. पोलीस वाद्यवृंद पथकाच्या स्फूर्तीदायक महाराष्ट्र गीताच्या वादनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.

यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच पोलीस विभागाला वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास यावेळी स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार व नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहण

 


जालना,दि.1(जिमाका): महाराष्ट्र दिनाच्या 67 वा स्थापना दिनानिमित्त जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी मनिषा देशपांडे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, श्रीमती पगारे, जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****

खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठक; पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करावे-पालकमंत्री पंकजा मुंडे

 




        जालना,दि.30(जिमाका) : खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असुन, पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्जाचे वितरण करुन उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी दिले

जिल्हाधिकारी कार्यालीयातील नियोजन भवन येथे खरीप हंगाम पूर्व नियोजन 2026-27 बैठक पालकमंत्री श्रीमती मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार सर्वश्री बबनराव लोणीकर, अर्जुनराव खोतकर, संतोष दानवे, हिकमत उढाण, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांची उपस्थिती होती.

            पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, काही दिवसात मान्सून सक्रिय होणार असून खरीप हंगामाचे कामे सुरु होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खते, बियाणे यांची मुबलक उपलब्धता ठेवून शेतकऱ्यांसाठी अतिशय सूक्ष्म नियोजन करावे. तसेच बोगस बियाणे विक्री होणार नाही यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे. खरीप हंगाम 2026-27 मध्ये जिल्ह्याला 1 लाख 6 हजार  शेतकऱ्यांना 1303 कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र आजअखेर फक्त 49 कोटी रुपयांचेच पीक कर्ज वितरित झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज केलेल्या कर्ज प्रकरणांना त्वरीत मंजुरी देऊन निधी वितरित करावा. कोणताही पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व बँकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश यावेळी दिले.

शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकावर अवलंबून न राहता फळबाग लागवड, भाजीपाला,बिजउत्पादन अशा पिकांना प्राधान्य द्यावे. विशेषत: कमी पाण्यामध्ये येणाऱ्या पिकांना प्राधान्य शेतकऱ्यांनी द्यावे. यासाठी कृषि विभागाने शेतकऱ्यामध्ये जनजागृती करावी. तसेच शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी व ॲग्रीस्टकची नोंदणी करणे बंधनकारक असून शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.

जिल्ह्यात 6 लाख 47 हजार 307 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्याचे नियोजन असून त्यापैकी 33 टक्के क्षेत्रावर सोयाबीनचे पीक घेतले जाणार आहे. सोयाबीनसाठी 1 लाख 62 हजार 162 क्विंटल बियाण्याची आवश्यकता असुन खुल्या बाजारात जवळपास 60 हजार क्विंटल बियाणे महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ व इतर खाजगी कंपन्या यांच्याकडून उपलब्ध होईल. तसेच उर्वरित 1 लाख क्विंटल बियाणे शेतकरी  घरचे बियाणे वापरत असल्याने बियाण्याची उपलब्धता समाधानकारक आहे. तसेच कापूस हे प्रथम क्रमांकाचे मुख्य पीक असून 45 टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड होणार आहे. त्यासाठी 11 लाख 2 हजार बियाणे पाकिटांची आवश्यकता असून दरवर्षी प्रमाणे चालू हंगामासाठी 13 लाख पेक्षा जास्त कापूस बियाणे पाकिटे उपलब्ध होणार आहेत.  तूर, मुग, उडीद, मका, ज्वारी आदी पिकांची लागवड  1 लाख 43 हजार 231 हेक्टर क्षेत्रावर होणार असून त्यासाठीही बियाण्याचा पुरेसा साठा असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी दिली.

खरीप हंगामासाठी 2 लाख 2 हजार मेट्रिक टन खताचा वापर होतो. खरीप हंगामासाठी 2 लाख 43 हजार 500 मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर झाले आहे. सध्या 1 लाख 24 हजार 932 मेट्रिक टन खत साठा जिल्ह्यात उपलब्ध असून, टंचाई भासणार नसल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी जमीन आरोग्य पत्रिकेचा वापर करून संतुलित खत मात्रा वापरावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

खरीप हंगाम यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्ह्यात जिल्हा भरारी पथक, जिल्हा तक्रार निवारण कक्ष तसेच तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात व पंचायत समिती स्तरावर प्रत्येकी एक तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. याशिवाय, अतिवृष्टी, गारपीट, वादळ यामुळे जिल्ह्यात 4 लाख 64 हजार 357 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, 6 लाख 26 हजार 926 शेतकऱ्यांना एकूण 437 कोटी 39 लाख रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यात आली

यावेळी बैठकीत पालकमंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते पिक स्पर्धा योजनामध्ये विविध पिकाच्या उत्पादनात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-*-*-

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षेत पाणी टंचाई आढावा बैठक संपन्न

 

 

जालना,दि.30(जिमाका) : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती, उपलब्ध साठे तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालीयातील नियोजन भवन येथे बैठकीत यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार सर्वश्री बबनराव लोणीकर, अर्जुनराव खोतकर, संतोष दानवे, हिकमत उढाण, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा यांची उपस्थिती होती.

यावेळी बैठकीत जिल्ह्यातील विविध भागांतील पाणीपुरवठा योजनांची स्थितीचा आढावा घेण्यात आला. टंचाईग्रस्त गावांमध्ये तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच विहिरी, बोअरवेल आणि जलस्रोतांचे पुनर्भरण करण्यासाठी उपाययोजना राबवण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच प्रशासनाला नागरिकांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्याचे सांगुन पाणी वापरात काटकसरी बाळगण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. ज्या गावात पाण्याची समस्या निर्माण झाल्यास तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी दिल्या.यावेळी बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

नागरिकांना एकत्रित आयुष्यमान भारत, जनआरोग्य योजनेतून आरोग्य संरक्षण-पालकमंत्री पंकजा मुंडे

 

 

जालना,दि.30(जिमाका) : राज्यातील सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून आरोग्य संरक्षण देण्यात येत आहे. या योजनेतून राज्यातील नागरिकांना उत्तम व मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध होत असून, वैद्यकीय खर्च शून्यावर येण्यासाठी मदत झाली आहे. पात्र व गरजू रूग्ण उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी आज दिले.

जिल्हास्तरीय जनआरोग्य संरक्षण कार्यकारिणीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार सर्वश्री बबनराव लोणीकर, अर्जुनराव खोतकर, संतोष दानवे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भुसारे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना संपूर्णपणे कागदविरहित आणि संगणक प्रणालीद्वारे राबवली जाते. ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबांना लागू आहे. आता सर्व ग्रामीण आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे या योजनेंतर्गत समाविष्ट केली जात आहेत, ज्यामुळे गरीबांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनांचा जिल्ह्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ होऊन, त्यांना आरोग्य संरक्षण मिळावे, यासाठी आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी निर्देश दिले.

पात्र व गरजू रूग्णांना उपचार मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने काम करणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समिती अधिक सक्रिय ठेवावी. रुग्णालयांनी लाभार्थ्यांशी संवेदनशीलतेने वागावे आणि उपचार प्रक्रियेत पारदर्शकता राखावी. योजनांचा व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी ग्रामस्तरापर्यंत जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश देताना, प्रत्येक पात्र नागरिकाला योजनेचा लाभ मिळवून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून यासाठी तालुका स्तरावर वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्याबाबत तसेच आयुष्मान कार्ड काढण्याची मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी या एकत्रित योजनेची जिल्ह्यात केलेल्या अंमलबजावणीचा सादरीकरणाद्वारे आढावा सादर केला.

नागरिकांनी ग्रामपंचायत, रेशन दुकानदार, आशा सेविका, योजनेतील अंगीकृत रुग्णलयातील आरोग्य मित्र यांच्या संपर्क साधुन आपले आयुष्मान कार्ड काढून घ्यावे असे आवाहन पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी या एकत्रित योजनेची जिल्ह्यात केलेल्या अंमलबजावणीचा सादरीकरणाद्वारे आढावा सादर केला.

-*-*-*-*-*-