Tuesday, 28 April 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन उत्साहात साजरा · जिल्हाधिकारी आाशिमा मित्तल यांचा राज्यस्तरीय सन्मान

 






जालना,दि.28(जिमाका) : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. नागरिकांना शासकीय सेवा वेळेत आणि पारदर्शकपणे मिळाव्यात यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित ‘सेवा हक्क दिन’ कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी श्रीमती देशपांडे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड, तहसिलदार श्रीमती तायडे, तहसिदार श्री. अनिल नव्हाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ म्हणाले की, "सेवा हक्क कायद्याचा मुख्य उद्देश प्रशासनाला लोकाभिमुख करणे आहे. नागरिकांनी जागरूक होऊन आपला हक्क मागावा. सेवा मिळण्यास विलंब झाल्यास अपील करण्याची तरतूद देखील कायद्यात आहे."

प्रास्ताविकात उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे म्हणाल्या की, सेवा हक्क दिनानिमित्त, प्रशासनाने नागरिकांना अर्ज करण्यासाठी आणि सेवा ट्रॅक करण्यासाठी 'आपले सरकार' पोर्टल व मोबाईल ॲप वापरण्याचे आवाहन केले. या डिजिटल माध्यमामुळे पारदर्शकता वाढली असून, प्रशासकीय कामे अधिक गतिमान झाली आहेत. 'आपले सरकार पोर्टल' वर 500 हून अधिक सेवाद्वारे ऑनलाइन उपलब्ध आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचत असून शासकीय कामकाजातील कार्यक्षमता वाढली आहे.

यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत अधिनियमाचे उद्दिष्ट्ये, डिजिटल सेवा आणि ऑनलाइन प्रक्रियेविषयी प्रात्यक्षिकाद्वारे नागरिकांना सुलभ सेवा कशा मिळू शकतात याचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील सर्व उपस्थित विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 'सेवा हक्क दिना'निमित्त शपथ घेतली. यावेळी वेळेत सेवा देणाबाबत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱी आणि निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवून सत्कारही करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमास विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

 

जिल्हाधिकारी आाशिमा मित्तल यांचा राज्यस्तरीय सन्मान

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या सोहळ्यात राज्यस्तरीय विशेष सन्मान करण्यात आला आहे.

जालना जिल्हा जिल्हाधिकारी म्हणून आशिमा मित्तल यांनी ‘घरपोच शासकीय सेवा’ हा उपक्रम राबवून नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि परिणामकारक सेवा मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार जाण्याची गरज कमी झाली असून, सेवा वितरणात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढली आहे. राज्यभरातील इतर जिल्ह्यांसाठी हा उपक्रम आदर्श ठरणारा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

****

कामगारांची उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्याचे सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन

 


जालना,दि.28(जिमाका) : राज्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर कामगारांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने सर्व आस्थापना मालकांना आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे आवाहन केले आहे. कामगार व मजूर विविध क्षेत्रांत काम करत असताना उष्णतेच्या लाटेचा त्यांच्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांनुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे.

श्रम व रोजगार मंत्रालय तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेत, राज्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर कामगारांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व उद्योग, कारखाने, दुकाने, बांधकाम स्थळे, हॉटेल, व्यापारी आस्थापना, मॉल, शॉपिंग सेंटर्स आणि इतर संस्थांनी विशेष दक्षता घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या राज्यात उष्णतेची लाट तीव्र होत असून, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी खालील उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत :

·  कामगारांना स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी.

·  कामाच्या ठिकाणी सावलीची किंवा विश्रांतीची जागा उपलब्ध करून द्यावी.

·  दुपारी 12 ते 4 या वेळेत उघड्यावर काम टाळावे; आवश्यक असल्यास कामाच्या वेळांत बदल करावा.

·  उष्माघात व उष्णतेच्या परिणामांविषयी जनजागृती करावी.

·  प्राथमिक उपचार व आपत्कालीन सुविधा उपलब्ध ठेवाव्यात.

·  या कालावधीत जड शारीरिक श्रम टाळण्याचे निर्देश द्यावेत.

·  बांधकाम व इतर श्रमिक कामांमध्ये आवश्यक त्या सुविधा, जसे की आईस पॅक व थंडावा देणारी साधने उपलब्ध करावीत.

·  कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्य विभागाशी समन्वय साधावा.

·  उष्णतेच्या लाटेचे धोके व प्रतिबंधात्मक उपायांविषयी मार्गदर्शन करावे.

·  कामाच्या ठिकाणी सूचना फलक, पोस्टर्स व आपत्कालीन संपर्क क्रमांक प्रदर्शित करावेत.

या उपाययोजनांची अंमलबजावणी करून कामगारांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही सर्व आस्थापनांची जबाबदारी आहे. सर्व संबंधितांनी या सूचनांचे काटेकोर पालन करून कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी अ. मा. जाधव यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

शेतकऱ्यांना चारा बियाणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


जालना,दि.28(जिमाका) : सन 2026-2027 या वर्षामध्ये संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी  चारा उत्पादन कार्यक्रम अंतर्गत  चारा बियाणे वाटप करण्यात येणार आहे. ज्या लाभधारकांकडे सिंचनाची सोय आहे, व ज्यांच्याकडे पशुधन आहेत अशा लाभधारकांना 100 टक्के अनुदानावर चारा बियाणे वितरीत करण्यात येणार आहे. संभाव्य एल-निनो या हवामान घटकांचा प्रतिकुल परीणाम होण्याची शक्यता असलयाने चारा टंचाई टाळण्यासाठी चारा बियाणांसाठी इच्छूकांनी अर्ज करावेत. तसेच संभाव्य चारा टंचाई निर्माण होवु नये, व चारा छावण्याची वेळ पडू नये याकरीता आतापासुनच चारा निर्मीती व त्याच्या साठवणुकीबाबतचे अचुक नियोजन करणे आवश्यक आहे.

ज्या लाभार्थ्याकडे भारत पशुधन प्रणाली किंवा केंद्र सरकारने वेळोवेळी निर्देशीत  केलेल्या प्रणालीवर नोंद असलेली स्वत: ची  किमान 3 ते 4 जनावरे आहेत, अशा लाभधारकांना प्राधान्य देण्यात येईल. एका आर्थीक वर्षात एका लाभधारकांस एकदाच लाभ अनुज्ञेय राहणार आहे. तरी इच्छूक शेतकऱ्यांनी दि. 05 मे, 2026 पर्यत आपले अर्ज संबधीत आपल्या गावातील पशुवैद्यकिय संस्थेकडे सादर करावीत, असे आवाहन पशुसंवर्धन विभाग, जिप, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

 

जालना जिल्हा प्रशासनामार्फत ‘रायझिंग जालना’ सोहळ्याचे आयोजन

  जालना,दि.28(जिमाका): ‘महाराष्ट्र दिन’ 1 मे रोजी जालना जिल्हा स्थापनेला 45 वर्ष पुर्ण होत आहे. या अनुषंगाने जालना जिल्हा प्रशासनामार्फत ‘रायझिंग जालना’ हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. ‘रायझिंग जालना’ सोहळ्याचे आयोजन जालना शहरातील अग्रसेन भवन येथे करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते 1 मे रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.

‘रायझिंग जालना’ सोहळ्यामध्ये जालना जिल्ह्याच्या मागील 45 वर्षांच्या वाटचाली अनुषंगाने आयोजित प्रदर्शनी मध्ये जालना जिल्ह्याच्या विशेष बाबींवर भर देण्यात येणार आहे. तसेच विविध विभागांचे उल्लेखनीय काम स्टॉलच्या माध्यमातून दाखवण्यात येणार असुन, यात विविध बचत गटांच्या स्टॉलचा देखील समावेश राहणार आहे. या सोहळ्यात जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

 

-*-*-*-*-*-*-

 

 

Monday, 27 April 2026

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न




जालना,दि.27(जिमाका) : ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. यावेळी बैठकीस वैधमापनचे आर.डी. दराडे, महावितरणचे समाधान म्हस्के, एस.बी. मठपती, बीएसएनएलचे पी.एस. इंगळे, अन्न व औषध विभागाचे अश्विनी तांबे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नारायण पवार, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे राजकुमार मुंडे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी ङ. एस. दिवटे

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री. मिसाळ म्हणाले की, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, तसेच ग्राहकांच्या तक्रारी त्वरित सोडविण्याचे आहे. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमार्फत नागरिकांना दैनंदिन व्यवहारात येणाऱ्या अडचणीबाबत उपाय योजना करणे आवश्यक आहे. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेने ग्रामीण भागात विविध माध्यमातून ग्राहक जनजागृती करावी. ग्राहकांना काही अडचणी असल्यास त्याबाबत जालना जिल्ह्याचे संकेतस्थळ jalna.nic.in यावर ग्राहकांच्या तक्रारीसाठी पोर्टल उपलब्ध करुन दिलेले असून, नागरिकांनी त्यांच्या समस्या या पोर्टलच्या माध्यमातून सादर करावे. 

यावेळी अशासकीय सदस्यांनी बैठकीमध्ये विविध विषयाच्या तक्रारी मांडल्या यामध्ये जिल्ह्यातील काही भागात अनधिकृत वैद्यकीय व्यावसायीक (बोगस डॉक्टर) असल्याची तक्रारी आहेत. याकरीता जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील औषध दूकाने आणि  बोगस डॉक्टरांचा शोध घेवून कार्यवाही करावी. तसेच अन्न औषध प्रशासनाने भेसळयुक्त खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी. ग्रामीण भागातील आठवडी बाजारात विक्रेते दगडाचे माप वापरतात, अशा विक्रेत्यांची तपासणी करुन वैधमापन विभागाने कारवाई करावी. तसेच वेळोवेळी टॅक्स भरुन ही जालना मार्केट कमिटी परिसरातील स्वच्छता होत नाही. मार्केट यार्ड  महावितरणने स्मार्ट मिटर संबंधी प्राप्त तक्रारीचे निवारण करुन, नागरिकांना स्मार्ट मिटर बद्दल सविस्तर माहिती द्यावी. तसेच ग्राहकांनी महावितरण संबंधधी तक्रारी 1912 आणि 18002123435 यावर नोंदवावी. आजच्या बैठकीत अशासकीय सदस्यांनी मांडलेल्या तक्रारींची दखल घेवून, याबाबत योग्य कार्यवाही करुन, अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी श्री. मिसाळ यांनी यावेळी दिल्या. 

बैठकीच्या सुरुवातीस सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. दिवटे यांनी प्रास्ताविकात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे उद्दीष्ट सांगुन मागील बैठकीबाबत झालेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच jalna.nic.in या संकेतस्थळावर ग्राहकांच्या समस्यांसाठी पोर्टल उपलब्ध आहे. ग्राहकांच्या हिताशी संबंधित तक्रारी असल्यास त्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन केले.

Friday, 24 April 2026

सेवली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात; 1200 शेतकऱ्यांची उपस्थिती

 


 

जालना,दि.24(जिमाका) :- जालना तालुक्यातील मौजे सेवली येथे दिनांक 23 एप्रिल, 2026 रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरात कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली तसेच नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर त्वरित तोडगा काढण्यात आला. या समाधान शिबिरास आमदार बबनराव लोणीकर, उपविभागीय अधिकारी जालना रामदास दौंड, तहसीलदार श्रीमती छाया पवार, तालुका कृषी अधिकारी व्ही.जे. राठोड, मंडळ कृषी अधिकारी प्रियांका क्षीरसागर, भरत नागरे, उप कृषी अधिकारी देशमुख यांच्यासह कृषी विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिबिरात कृषी विभागाच्या वतीने विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये पीएम किसान योजना अंतर्गत त्रुटी असलेल्या लाभार्थ्यांच्या नोंदी दुरुस्त करून त्यांना लाभ मिळवून देण्यात आला. तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY), कृषी यांत्रिकीकरण योजना, माती नमुना तपासणी, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान यांसारख्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. यावेळी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सोयाबीन, करडई, मोहरी, उडीद, भुईमूग आदी पिकांच्या माहितीपत्रिकांचे वितरण करून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. शिबिरात सेवली महसूल मंडळातील उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी फळपिके व भाजीपाला पिकांचे नमुने प्रदर्शित केले. टोमॅटो, भेंडी, मिरची, हळद, फ्लॉवर, दोडका, वांगे यांसह ड्रॅगन फ्रूट, टरबूज आणि चिया सीड्स यांसारख्या पिकांचे एकूण 25 नमुने स्टॉलवर मांडण्यात आले होते. या स्टॉलला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांनी पिकांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा 2) अंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात पूर्वसंमती प्रमाणपत्रांचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरास सुमारे 1200 शेतकरी उपस्थित होते. परिसरातील सर्व गावांचे सरपंच, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवला. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन करून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

-*-*-*-*-

‘लेक लाडकी’ योजना अंतर्गत जिल्ह्यातील 5312 मुलींना लाभ

 


 

जालना,दि.24(जिमाका) :- जिल्ह्यातील बालिकांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषदेतील जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असलेल्या ‘लेक लाडकी’ या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 5 हजार 312 मुलींना या योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती जिपच्या महिला बाल विकास अधिकारी श्रीमती कोमल कोरे यांनी दिली.

‘लेक लाडकी’ या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, स्त्री-भ्रूणहत्या रोखणे, बाल विवाह थांबविणे, मुलांच्या शिक्षणास चालना देणे हा आहे. तसेच या योजने अंतर्गत पात्र कुटुंबातील मुलींना टप्प्याटप्प्याने आर्थिक सहाय्य दिले जाते. मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शिक्षणाच्या विविध टप्प्यांपर्यंत ही मदत उपलब्ध करून दिली जाते. या योजने अंतर्गत मूलींना जन्मानंतर 5 हजार रुपये तर इयत्ता पहिली 6 हजार रुपये, इयत्ता 7 वी गेल्यावर 7 हजार रुपये, अकरावी 8 हजार रुपये तसेच लाभार्थी मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये याप्रमाणे एकुण रुपये 1,0100/- लाभ देण्यात येतो. महिला व बाल विकास विभाग जि.प. जालनामार्फत राबविण्यात येतात. या योजनेमुळे मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे व मुलींच्या शिक्षणास हातभार लागण्यास मदत झाली आहे ‘लेक लाडकी’ योजना ही केवळ आर्थिक मदत नसून समाजातील मुलींबाबतचा दृष्टिकोन बदलण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. या योजनेमुळे मुलगी खऱ्या अर्थाने कुटूंबामध्ये लाडकी झाल्याचे चित्र दिसुन येत आहे.

-*-*-*-*-