Friday, 4 September 2026

कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी जालना जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती

 

 

जालना,दि.4(जिमाका): जिल्ह्यातील पात्र नागरिकांना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास येणाऱ्या अडचणींचे निराकरण करून ही प्रक्रिया गतिमान व पारदर्शक करण्यासाठी जालना जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंडळ उपसमितीचे अध्यक्ष यांच्या निर्देशानुसार उपजिल्हाधिकारी (निवडणूक शाखा) शिरीष यादव यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक 95454 51005 असा आहे.

नोडल अधिकारी यांच्यावर कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करून प्रक्रिया गतिमान व पारदर्शक करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्रासंदर्भातील प्राप्त तक्रारींची दररोज आढावा बैठक घेऊन संबंधित प्रकरणांवर आवश्यक कार्यवाही करणे, तसेच तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयांमध्ये आवश्यक समन्वय साधून प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी कार्यवाही करणे, अशीही जबाबदारी नोडल अधिकाऱ्यांवर आहे. याशिवाय जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्रासंदर्भातील प्रलंबित प्रकरणांचा अद्ययावत अहवाल दर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे, नागरिकांना प्रमाणपत्र मिळविण्यास अनावश्यक विलंब होणार नाही याची दक्षता घेणे आणि आवश्यकतेनुसार संबंधित कार्यालयांना निर्देश देणे, तसेच आवश्यकतेनुसार संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन प्रकरणांचा आढावा घेणे, या जबाबदाऱ्यांचाही समावेश असल्याचे जिल्हाधिकारी  यांनी आदेशान्वये कळविले आहे.  

आहे.

-*-*-*-*-*-

 

जालना जिल्ह्यात कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरांचे आयोजन जिल्ह्यातील 62 महसूल मंडळांमध्ये 10, 11, 12, 15, 16 सप्टेंबर रोजी शिबिरांचे आयोजन

 


 

जालना,दि.4(जिमाका) : कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जालना जिल्ह्यात 10 ते 17 सप्टेंबर, 2026 या कालावधीत मंडळनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये एकूण 62 शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये जालना तालुक्यात 10 शिबिर तर बदनापूर मध्ये 6, अंबड मध्ये 9, घनसावंगी मध्ये 8, परतूर मध्ये 6, मंठा मध्ये 6, भोकरदन मध्ये 11 आणि जाफराबाद मध्ये  6 असे एकूण 62 शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधील 62 महसूल मंडळांमध्ये दि.10, 11, 12, 15 व 16 सप्टेंबर 2026 रोजी या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

यामध्ये 10 सप्टेंबर, 2026 रोजी जालना तालूक्यातील देवमुर्ती आणि सांगवी तलाव या मंडळात तर बदनापुर तालूक्यातील बदनापुर, अंबड तालुक्यातील अंबड, घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव आणि राणी उंचेगाव, परतुर तालुक्यातील आष्टी, मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी, भोकरदन तालुक्यातील आन्वा, दानापुर, पिंपळगाव रेणुकाई आणि जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा येथे शिबिरे होणार आहेत. तसेच 11 सप्टेंबर, 2026 रोजी जालना तालूक्यातील नेर आणि शेवली या मंडळात तर बदनापुर तालूक्यातील बावणे पांगरी, अंबड तालुक्यातील शहागड आणि वडीगोद्री, घनसावंगी तालुक्यातील रांजणी आणि पानेवाडी, परतुर तालुक्यातील श्रीष्टी, मंठा तालुक्यातील तळणी ढोकसाळ, भोकरदन तालुक्यातील धावडा, भोकरदन आणि जाफ्राबाद तालुक्यातील कोळेगाव येथे शिबिरे होणार आहेत. 12 सप्टेंबर, 2026 रोजी जालना तालूक्यातील वाघुळ जहागीर आणि गोलापांगरी या मंडळात तर बदनापुर तालूक्यातील रोशनगाव आणि शेलगाव, अंबड तालुक्यातील ताडहदगाव आणि गोंदी, घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी आणि जांब समर्थ, परतुर तालुक्यातील वाटुर, मंठा तालुक्यातील मंठा, भोकरदन तालुक्यातील राजुर, जानेफळ दाभाडी  आणि जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे शिबिरे होणार आहेत. 15 सप्टेंबर, 2026 रोजी जालना तालूक्यातील रामनगर, विरेगाव, जालना या मंडळात तर बदनापुर तालूक्यातील चिखली, अंबड तालुक्यातील सुखापुरी, रोहिलागड, घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी, परतुर तालुक्यातील सातोना खुर्द, कोकाटे हदगाव मंठा तालुक्यातील माळतोंडी, भोकरदन तालुक्यातील हसनाबाद, आव्हाना आणि जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद येथे शिबिरे होणार आहेत. तसेच 16 सप्टेंबर, 2026 रोजी जालना तालूक्यातील पाचनवडगाव या मंडळात तर बदनापुर तालूक्यातील दाभाडी, अंबड तालुक्यातील जामखेड, धनगरपिंप्री, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी, परतुर तालुक्यातील परतुर मंठा तालुक्यातील जयपुर, भोकरदन तालुक्यातील केदारखेडा, सिपोरा बाजार आणि जाफ्राबाद तालुक्यातील कुंभारझरी, वरुड बु. या मंडळात शिबिरे होणार आहेत.

या शिबिरांमध्ये नागरिकांना कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या नोंदी शोधणे, पुराव्यांची पडताळणी करणे, अर्ज स्वीकारणे आणि पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.  

विद्यालयाचे प्राचार्य एस. जी. पदार यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

पर्यावरणपूरक गणेशमुर्तीचा जागतिक विक्रम; 5,348जणांनी साकारल्या शाडूमातीच्या गणेशमूर्ती

 






जालना,दि.4(जिमाका) : एकाच वेळी सर्वाधिक व्यक्तींनी शाडूमातीपासून गणेशमूर्ती साकारण्याचा नवा विक्रम जालना जिल्ह्याने प्रस्थापित केला. 5 हजार 348 जणांनी एकाच ठिकाणी, एकाच वेळी शाडूमातीच्या गणेशमूर्ती साकारत यापूर्वीचा विक्रम मोडीत काढला. या ऐतिहासिक कामगिरीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद व मान्यता मिळाल्याने जालन्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. यापूर्वी 28 ऑगस्ट 2022 रोजी बंगळुरू येथे 3 हजार 308 सहभागींच्या उपस्थितीत एकाच वेळी गणेशमूर्ती साकारण्याचा विक्रम नोंदविण्यात आला होता. आज येथील जेईएस महाविद्यालयात आयोजित उपक्रमात 5 हजार 348 जणांनी सहभाग घेत हा विक्रम तब्बल 2 हजार 040 सहभागींच्या फरकाने मोडला.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि शिक्षण विभाग, अद्विक क्लब तसेच दिव्य मराठी यांच्या समन्वयातून पर्यावरणपूरक उपक्रम पार पडला. हजारो विद्यार्थी आणि नागरिकांनी आज एकाच ठिकाणी एकत्र येऊन शाडूमातीपासून गणेशमूर्ती साकारल्या. या उपक्रमामागील उद्देश केवळ विश्वविक्रम प्रस्थापित करणे हा नव्हता, तर गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणसंरक्षणाचा संदेश घराघरांत पोहोचविणे हा होता. पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या साहित्याऐवजी नैसर्गिक व पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणेशमूर्तींचा स्वीकार करण्याचे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी उपस्थितांना पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, जलसंवर्धन आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश दिला. हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हा केवळ विश्वविक्रमाचा आकडा नसून, पर्यावरणपूरक भविष्य घडविण्यासाठी नव्या पिढीने घेतलेला सामूहिक संकल्प असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

उपक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा परिषद व शिक्षण विभागातील अधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, अद्विक क्लब, दिव्य मराठीची टीम, स्वयंसेवक, समन्वयक तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

-*-*-*-*-*-*-

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ इयत्ता 11 वी, 12 वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना दिलासा

 


जालना,दि.4(जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. शासकीय वसतिगृहातील इयत्ता 11 वी, इयत्ता 12 वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी 30 ऑक्टोबर, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

स्वाधार योजनेच्या लाभासाठी वसतिगृह प्रवेशाचा अर्ज आवश्यक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. स्वाधार योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी विहित मुदतीत अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी याची गांभीर्याने नोंद घेऊन 30 ऑक्टोबर, 2026 पूर्वी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील इयत्ता 11 वी, 12 वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-

जालना जिल्ह्यातील पाच शिक्षकांची जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड

 


 

जालना,दि.4(जिमाका) : शिक्षक क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदान करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जालना जिल्ह्यातील पाच शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवारीया यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत जिल्हा निवड समितीने प्राप्त 30 शिक्षकांच्या प्रस्तावांची छाननी करून सन 2026 च्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पाच शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या शासन परिपत्रक दिनांक 12 डिसेंबर 2000 अन्वये शिक्षक क्षेत्रात उत्कृष्ट, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्यानुसार यंदाच्या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील पात्र शिक्षकांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावांमधून जिल्हा निवड समितीने विविध निकषांच्या आधारे पाच शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.

जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांमध्ये श्री. कैलास मधुकर चौथे, प्राथमिक शिक्षक, जि. प. प्राथमिक शाळा, देवगाव म.कें., गेवराई बाजार, ता. बदनापूर, श्री. सचिन रामदास खिल्लारे, सहशिक्षक, जि. प. प्राथमिक शाळा, लालवाडी तांडा, ता. अंबड, श्री. विजय बाबाराव कांगणे, प्राथमिक पदवीधर शिक्षक, जि. प. उच्च प्राथमिक शाळा, दुधा, ता. मंठा, श्री. पेन्टू विठ्ठल मैसनवाड, सहशिक्षक, जि. प. प्राथमिक शाळा, दहिफळ भो., पूर्व, ता. परतूर तसेच डॉ. दत्तात्रय मनोहर सपकाळ, माध्यमिक शिक्षक, जि. प. प्रशाला, धावडा, ता. भोकरदन, यांचा समावेश आहे.

शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी केलेले प्रयत्न, शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले उपक्रम, नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग तसेच समाजाभिमुख आणि उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेऊन शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली जाते. जिल्ह्यातील शिक्षकांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव व्हावा, या उद्देशाने हा पुरस्कार महत्त्वपूर्ण मानला जातो.

 

-*-*-*-*-*-*-

Thursday, 3 September 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात आज 'कर्मचारी समाधान शिबिराचे' आयोजन

 

जालना,दि.3(जिमाका): शासन सेवेतील कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवाविषयक अडचणी तातडीने आणि कार्यक्षमतेने सोडवण्यासाठी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण विभागात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी 'कर्मचारी समाधान शिबीर' आयोजित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सप्टेंबर महिन्यातील जिल्हास्तरीय शिबिराचे आज शुक्रवार, दि. 4 सप्टेंबर, 2026 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय, जालना येथील नियोजन भवनात सकाळी 11 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

            तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर विभागीय स्तरावर  विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच जिल्हास्तरावरील अडचणी जिल्हाधिकारी कार्यालयातील तर तालुका स्तरावरील अडचणी या तहसिल कार्यालयातील आणि विभागीय पातळीवरील अडचणी या विभागीय आयुक्त कार्यालयातील शिबीरात स्विकारण्यात येणार आहे. अर्जदार अधिकारी / कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी यांना शिबीरास उपस्थित राहून कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

अनेकदा कर्मचाऱ्यांना वेतन, पदोन्नती, रजा,  निवृत्तीवेतन किंवा सेवापुस्तिका अद्यावत करणे यांसारख्या वैयक्तिक कामांसाठी प्रशासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागतात. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवर या शिबिरांचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत. जर पहिल्या शुक्रवारी सुट्टी असेल, तर त्यापुर्वीच्या कामकाजाच्या दिवशी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.  कार्यालयामध्ये कर्मचारी यांची सेवाविषयक प्रलंबित प्रकरणांची यादी अद्यावत करून तीचा त्या त्या शिबिरात समावेश करण्यात येणार आहे.

या मोहिमेमुळे कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण होऊन प्रशासकीय कामात गती येईल. सर्व संबंधित विभाग प्रमुखांना या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले असून, कामात दिरंगाई करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.  

 

****

 

 

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण ‘दिशा’ समिती बैठकीचे 9 सप्टेंबर रोजी आयोजन


खासदार डॉ. कल्याण काळे घेणार जिल्ह्यातील विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा

 

जालना,दि.03(जिमाका) : जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक बुधवार, दि. 9 सप्टेंबर, 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. कल्याण काळे राहणार आहेत.

यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विकासकामांना गती देणे, योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे तसेच विविध विभागांमध्ये समन्वय वाढविण्याच्या दृष्टीने बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.

बैठकीत ग्रामविकास, कृषी, पंचायत राज मंत्रालय, आवास व शहरी कार्य मंत्रालय, जलसंधारण, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, महिला व बाल विकास, आरोग्य, पेयजल व स्वच्छता, शिक्षण, कौशल्य विकास व उद्योजकता, रस्ते व  वाहतुक, सामाजिक न्याय, दिव्यांग, दुरसंचार, मत्सयव्यवसाय, कामगार व रोजगार आदी विविध विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. संबंधित विभागांकडून योजनांची प्रगती, निधीचा वापर, पूर्ण झालेली व प्रलंबित कामे तसेच अंमलबजावणीतील अडचणी याबाबत माहिती घेतली जाणार आहे.

तसेच जिल्ह्यातील विविध विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना, प्रलंबित प्रश्नांचे निराकरण आणि विकासकामांना गती देण्यासाठी बैठकीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संबंधित विभागांचे अधिकारी, समितीचे सदस्य तसेच लोकप्रतिनिधी बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

 

 

****