Thursday, 20 August 2026

 जलसंधारण दिन विशेष


जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया


- संजय राठोड

मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र शासन



पाणी म्हणजे शेतीचा श्वास आणि विकासाचा आधार आहे. बदलते हवामान आणि घटती भूजल

पातळी यामुळे जलसंधारणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करून

तो जमिनीत मुरवणे, ही काळाची गरज आहे. जलसंधारणातून मातीला नवजीवन, शेतीला आधार आणि

भावी पिढ्यांना सुरक्षित भविष्य देण्याची ताकद आहे.

महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३०७.५८ लाख हेक्टर असून, त्यापैकी १७४.७३ लाख हेक्टर

क्षेत्र शेतीखाली आहे. राज्यातील सुमारे ८२ टक्के शेती पावसावर अवलंबून असल्याने पावसाच्या पाण्याच्या

प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. राज्यातील २४१ लाख हेक्टर क्षेत्र पाणलोट

विकासासाठी पात्र असून, त्यापैकी १८२.४७ लाख हेक्टर क्षेत्रावर मृद व जलसंधारणाची विविध कामे पूर्ण

झाली आहेत. उर्वरित क्षेत्रावरही नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू आहेत.

महाराष्ट्र शासनाने जलसंधारणाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून विविध प्रभावी योजना राबविल्या

आहेत आणि राबवत आहे. राज्याला जलसुरक्षिततेच्या दिशेने सक्षमपणे पुढे नेण्यासाठी मृद व जलसंधारण

विभाग सातत्याने कार्यरत असून जलस्रोतांचे संवर्धन, भूजल पुनर्भरण, विकेंद्रित जलसाठ्यांची निर्मिती

आणि शाश्वत जलव्यवस्थापनाला प्राधान्य दिले जात आहे.


जलयुक्त शिवारातून गावांच्या जलसमृद्धीकडे


जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील अनेक गावांमध्ये जलसाठे वाढले, विहिरींच्या

पाणीपातळीत सुधारणा झाली आणि संरक्षित सिंचनाला चालना मिळाली. ज्या शेतकऱ्यांना पूर्वी वर्षातून

एकच पीक घेता येत होते, अशा अनेक भागांत दुबार पिकांच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

जलसंधारणामुळे निर्माण होणारे संरक्षित सिंचन केवळ शेतीपुरते मर्यादित राहत नाही, तर ग्रामीण

बाजारपेठ, रोजगार, दुग्धव्यवसाय आणि लघुउद्योगांनाही चालना देते.

जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यशानंतर जलयुक्त शिवार अभियान २.०

अंतर्गत राज्यातील ५,८५८ गावांमध्ये सुमारे १.४३ लाखांहून अधिक कामे प्रस्तावित झाली आहेत.

त्यापैकी १.२४ लाखांपेक्षा अधिक कामे पूर्ण झाली आहेत. जुलै २०२६ अखेर या अभियानावर २,३००

कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आला आहे.


गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार-पाण्यासोबत मातीलाही नवजीवन

‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही योजना पर्यावरण आणि शेती यांचा सुंदर समन्वय

साधणारी आहे. धरणातील गाळ काढल्यामुळे पाणीसाठवण क्षमता वाढते, तर तोच सुपीक गाळ शेतात

टाकल्यामुळे जमिनीची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता सुधारण्यास मदत होते.

२०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीत राज्यातील ३,३०५ जलाशयांमधून ९८०.५० लक्ष

घनमीटर गाळ काढण्यात आला असून, तो सुमारे १ लाख ९३ हजार एकर क्षेत्रावर पसरविण्यात आला

आहे. यासाठी सुमारे ३४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, ८१,११४ स.घ.मी. पाणीसाठा

पुनर्स्थापित झाला आहे. म्हणजेच जलसंधारण हे शेतीला केवळ पाणी देत नाही, तर जमिनीलाही नवजीवन

देते.


भूजल पुनर्भरण-भविष्याच्या जलसुरक्षेची गुरुकिल्ली


भूजल पुनर्भरण हा जलसंधारणाचा अत्यंत महत्वाचा नैसर्गिक फायदा आहे. गेल्या काही दशकांत

भूजलाचा मोठ्या प्रमाणावर उपसा झाल्यामुळे अनेक भागांत विहिरी कोरड्या पडणे, बोअरवेलची खोली

वाढणे आणि उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी होणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. याचा

शेतीसोबतच संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतो.

पावसाचे पाणी योग्य पद्धतीने अडवून जमिनीत मुरविले, तर भूजल पातळी सुधारण्यास मदत

होते. ही प्रक्रिया केवळ शेतीसाठी नव्हे, तर पिण्याच्या पाण्याच्या दीर्घकालीन उपलब्धतेसाठीही अत्यंत

महत्त्वाची आहे. भविष्यातील गंभीर पाणीटंचाईचे संकट टाळायचे असेल, तर भूजल संवर्धन आणि

पुनर्भरणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल.


जलसंधारण म्हणजे पर्यावरणाचेही संवर्धन


जलसंधारणाचा पर्यावरणावरही अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. एखाद्या भागात पाणी टिकून

राहिले, तर तेथील जैवविविधतेला आधार मिळतो. वृक्षसंवर्धनाला चालना मिळते, जमिनीतील ओलावा

टिकतो आणि नैसर्गिक परिसंस्था मजबूत होण्यास मदत होते. अनेक ठिकाणी जलसंधारणाच्या कामांनंतर

स्थानिक जैवविविधता आणि जलचरांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याची उदाहरणे दिसून येतात.

त्यामुळे जलसंधारण ही केवळ विकासाची योजना नसून निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक दृढ

करण्याची प्रक्रिया आहे.


हवामान बदलाच्या आव्हानाला जलसंधारणाचे उत्तर


आज हवामान बदल हे जगासमोरील सर्वात गंभीर आव्हानांपैकी एक आहे. पावसाचे स्वरूप

बदलत आहे. काही दिवसांत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घ काळ पावसाचा खंड असे चित्र अनेक भागांत

दिसून येते. अशा परिस्थितीत केवळ मोठी धरणे किंवा पारंपरिक सिंचन व्यवस्था पुरेशी ठरणार नाही.

गाव पातळीवर पाणी अडवणे, पाणलोट विकास करणे, नैसर्गिक जलमार्ग जिवंत ठेवणे, पावसाचे

पाणी जमिनीत मुरवणे आणि स्थानिक जलस्रोत मजबूत करणे हा शाश्वत मार्ग आहे. हवामान बदल आणि

पर्जन्यमानातील अनिश्चिततेचा विचार करून मृद व जलसंधारण विभागाने जलयुक्त शिवार अभियान २.०,

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि लघु सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती दिली आहे. आवश्यक

दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यावरही भर दिला जात आहे.


गुणवत्तापूर्ण कामे आणि कालबद्ध अंमलबजावणी


या सर्व उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ

शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाची महत्वपूर्ण भूमिका आहे. विभागाच्या नव्या

प्रशासकीय आकृतिबंधाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पांच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळाली आहे.

मंजूर कामे मूळ आराखड्यानुसार आणि निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला

आहे. गुणवत्तापूर्ण कामांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या असून, मालगुजारी

तलावांच्या पुनरुज्जीवनासारख्या महत्त्वाच्या उपक्रमांनाही प्राधान्य दिले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र

फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करून जलसंधारण अधिक परिणामकारक

करण्यासाठी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.


प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून ५.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर कामे

केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास

घटक २.० अंतर्गत राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये १४० प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून

सुमारे ५.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर जलसंधारण, भूजल पुनर्भरण, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि

शेतकऱ्यांच्या उपजीविकेला चालना देणारी विविध कामे सुरू आहेत. या योजनेचे एकूण प्रकल्पमूल्य

१,२५१.११ कोटी रुपये असून, जुलै २०२६ अखेर सुमारे १,००३ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात

आला आहे.


मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन, सिमेंट बंधारे, पाणलोट विकास, नाला खोलीकरण, भूजल

पुनर्भरण आणि लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या जलसंवर्धन उपक्रमांची प्रभावी सांगड घालत

महाराष्ट्र जलसुरक्षिततेच्या दिशेने भक्कम वाटचाल करत आहे. नाला खोलीकरणाबरोबरच बांबू

लागवडीसारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांवरही भर देण्यात आला आहे. विदर्भातील मालगुजारी तलावांची

कामे वेळेत पूर्ण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हा दृष्टिकोन केवळ पाणी

साठविण्यापुरता मर्यादित नसून जलस्रोतांचे दीर्घकालीन संवर्धन सुनिश्चित करणारा आहे.


जलसंधारण दिनातून राज्यव्यापी लोकचळवळ


महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्राला दूरदृष्टी आणि व्यापक दिशा देणारे माजी मुख्यमंत्री दिवंगत

सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यात १५ ते २१ ऑगस्ट

२०२६ दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत

‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे.

या अभियानाचा महत्वाचा भाग म्हणून आज २१ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्व ३६

जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन २०२६ — वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात आली आहे. “माती वाचवा ,

पाणी जपा , सुरक्षित भविष्य घडवा” हा या अभियानाचा मुख्य संदेश आहे. सर्व जिल्ह्यांत ३ कि.मी. ‘वॉक

फॉर वॉटर’ आणि सामूहिक मृद व जलसंधारण शपथ आयोजित करण्यात आली आहे. नागरिक, युवक,

विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांना या उपक्रमातून

जलसंधारणाच्या लोकचळवळीशी जोडण्याचा प्रयत्न आहे.

युवकांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देत त्यांना या लोकचळवळीशी डिजिटल माध्यमातून

जोडण्यासाठी ‘रील चॅलेंज’ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. माती संवर्धन, पाणी बचत, पावसाच्या

पाण्याचे संकलन, पाणलोट विकास आणि जलसंधारणाच्या नाविन्यपूर्ण कल्पना समाजापर्यंत

पोहोचविण्यासाठी युवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.


प्रत्येक थेंब जपूया, महाराष्ट्र जलसमृद्ध करूया


जलसंधारण ही केवळ शासनाची योजना नाही, तर शासन आणि समाजाच्या सामूहिक

सहभागातून यशस्वी होणारी लोकचळवळ आहे. शासन योजना आखू शकते, निधी उपलब्ध करून देऊ

शकते, जलसंधारणाची कामे उभी करू शकते; पण त्या जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचा जबाबदारीने

वापर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे.

शासनाचे दूरदृष्टीचे धोरण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रभावी नेतृत्व, उपमुख्यमंत्री एकनाथ

शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे सहकार्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि

विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर जलसमृद्ध, दुष्काळमुक्त आणि शाश्वत

महाराष्ट्र घडविण्याचा आपला संकल्प अधिक दृढ होत आहे.

जलसंधारण दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव ठरू नये. तो प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन

जीवनातील संकल्प बनला पाहिजे. घरातील पाणी असो, शेतातील पाणी असो किंवा गावातील जलस्रोत-

प्रत्येक थेंब जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

चला, जलसंधारण दिनानिमित्त आपण सर्वजण संकल्प करूया—

पाणी अडवूया… पाणी जिरवूया…

माती वाचवूया… पाणी जपूया…

आणि जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवूया!

0000

 

*२१ ऑगस्ट रोजी आयोजित वॉकेथॉनसाठी प्रशासनाची व्यापक तयारी;  मोठ्या संख्येने नागरिकांच्या सहभागाची अपेक्षा*

 


जालना,दि.20(जिमाका) : जिल्ह्यात २१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य वॉकेथॉनसाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी आतापर्यंत 4 हजाराहून अधिक नागरिकांनी नोंदणी केली असून, प्रत्यक्ष कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

जिल्हाधिकारी, जालना यांच्या मार्गदर्शन व निर्देशानुसार सहभागी नागरिकांच्या सोयी-सुविधा, सुरक्षितता आणि कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन यासाठी विविध व्यवस्था करण्यात येत आहेत.

वॉकेथॉनच्या ठिकाणी सहभागींसाठी नोंदणी व चेक-इन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कार्यक्रम परिसरात आकर्षक प्रवेश कमान, आवश्यक ठिकाणी माहिती फलक, स्टँडीज, तसेच सहभागींसाठी विशेष सेल्फी स्टँड उभारण्यात येणार आहेत. वॉकेथॉनमध्ये जनजागृतीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध संदेश असलेले प्लॅकार्ड्स देखील सहभागींच्या हाती असतील.

कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी विशेष झुंबा उपक्रमासाठी स्वतंत्र स्टेज व आवश्यक ध्वनीव्यवस्था करण्यात येत आहे. सहभागी नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे आणि केळी यांसारख्या अल्पोपहाराची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.

मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याने आरोग्य व सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान वाहतूक व कायदा-सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी पोलीस बंदोबस्त व आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या निर्देशानुसार विविध विभाग आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून वॉकेथॉनचे नियोजन करण्यात येत असून, हा उपक्रम नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून जनजागृती, आरोग्य आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा एक मोठा लोकसहभागाचा उपक्रम ठरणार आहे.

जिल्हा प्रशासनाने जालना जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होऊन या वॉकेथॉनला यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

 

****

युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय राजदूत आयुष्मान खुराना यांनी केले मुलांच्या सुरक्षित बालपणाचे आवाहन

 

ऊसतोड हंगामी स्थलांतराचा परिणाम झालेल्या मुलांसाठीच्या  कुटुंब आणि समुदायआधारित काळजी व संरक्षण या युनिसेफ कार्यक्रमाला भेट

 

जालना,दि.20(जिमाका) : युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय राजदूत आणि आयुष्मान खुराना प्रसिद्ध अभिनेते यांनी (दि. 19) रोजी जालना येथे भेट देऊन, ऊसतोड हंगामी स्थलांतराचा परिणाम झालेल्या मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या कुटुंब आणि समुदायआधारित काळजी व संरक्षण या युनिसेफ कार्यक्रमाला भेट देऊन मुले आणि उपस्थितांशी संवाद साधला.

खुराना यांच्यासोबत  युनिसेफ इंडियाच्या पथकात उप प्रतिनिधी (कार्यक्रम) यास्पर मोलर यांचा समावेश होता. या मोहिमेला राज्य सरकार आणि स्थानिक स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य आहे.

अनेक उपेक्षित कुटुंबांसाठी, आर्थिक अडचणींमुळे हंगामी स्थलांतर ही वास्तविकता आहे. यामुळे मुलांसाठी बालमजुरी, बालविवाह, शिक्षणात खंड, कौटुंबिक दुर्लक्ष आणि हिंसाचाराचा धोका वाढू शकतो. पालकांच्या अनुपस्थितीत काही वेळा विस्तारित कुटुंबासह किंवा आजी-आजोबांसोबत मागे राहणारी मुले शाळेत जातात किंवा त्यांना आरोग्य सेवाही मिळतात. परंतु, त्यांना अनेकदा भावनिक पाठिंबा मिळत नाही, घरातून दुर्लक्ष होण्याची शक्यता वाढते आणि घरगुती जबाबदाऱ्या अंगावर पडतात.

या समस्यांचे निराकरण करणाऱ्या आणि हिंसाचार, अत्याचार, शोषण कौटुंबिक दुर्लक्ष रोखण्यासाठी तसेच बाल संरक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी युनिसेफ भारत सरकारसोबत काम करते. जालन्यात, जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने कुटुंब आणि समुदायआधारित काळजी व संरक्षण (किनशिप अँड कम्युनिटी केअर) कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक रहिवासी आणि सरकार यांनी एकत्र काम केल्यामुळे स्थलांतरित पालकांच्या मुलांसाठी सुरक्षित वातावरण, शिक्षणात खंड न पडणे या गोष्टी शक्य झाल्या आहेत. तसेच आरोग्यसेवा, पोषण मानसिक-सामाजिक आधार यांसारख्या सेवाही मुलांसाठी उपलब्ध झाल्या असून बालमजुरी आणि बालविवाहाचा धोकाही कमी होण्यास मदत झाली आहे.

"हंगामी, आर्थिक अडचणींमुळे होणारे स्थलांतर हा स्वखुशीने निवडलेला पर्याय नसून अनेक कुटुंबांसाठी ते कठोर वास्तव आहे," असे मत आयुष्मान खुराना यांनी मुले आणि स्थानिक सदस्यांची भेट घेतल्यानंतर व्यक्त केले. "कोणत्याही मुलाला त्याच्या आवाक्यात नसलेल्या परिस्थितीमुळे आपले बालपण गमवावे लागू नये. जालन्यात, मी स्थानिक रहिवाशांना एकत्र येऊन स्थलांतरामुळे प्रभावित झालेल्या मुलांना संरक्षण देताना आणि त्यांना कुटुंबाशी जोडून घेऊन काळजी घेताना पाहिले. हा कार्यक्रम केवळ सुरक्षित घर पुरवत नाही तर नातेसंबंधही जपतो, मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो आणि मुलांना उज्ज्वल भविष्याची आशा देते."

खुराना यांनी शंकर आसाराम या तरुण समुदाय नेत्याची भेट घेतली. शंकर यांनी युवा स्वयंसेवक म्हणून केलेल्या कामामुळे त्यांना स्थानिकांचा विश्वास संपादन करता आला. त्यांच्या कामामुळेच आज ते एका गावाचे सरपंच म्हणून निवडून आले आहेत. खुराना यांनी बारावीत शिकणारी विद्यार्थिनी आणि बालमित्र असलेल्या प्रतिक्षा हिचीही भेट घेतली. प्रतिक्षाने स्थलांतराचा किशोरवयीन मुलींवर होणारा परिणाम प्रत्यक्ष पाहिला आहे.

"बालमित्र हे मुलांसाठी आणि स्थानिकांसाठी विश्वासार्ह आणि उत्तम आदर्श आहेत. मुलांचे हक्क, सुरक्षितता आणि कल्याण तसेच मुलांच्या शिक्षणात खंड न पडण्यासाठी, बालमजुरी आणि बालविवाह रोखण्यासाठी ते मदत करतात. त्यामुळे प्रत्येक मुलाला शिकण्याची आणि यशस्वी होण्याची संधी मिळते. भारतात मुलांच्या संरक्षणासाठी बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) सारखे मजबूत कायदे आहेत. या वर्षी या कायद्याला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे संरक्षणात्मक उपाय हंगामी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांसह प्रत्येक मूल आणि इतर कुटुंबापर्यंत प्रत्यक्षात पोहोचतील याची खात्री करणे," असे आयुष्मान खुराना म्हणाले.

ग्रामपंचायती आणि आघाडीच्या सेवा पुरवठादारांना एकत्र आणून, हा कार्यक्रम मुलांसाठी एक सामाजिक सुरक्षा तयार करतो. त्या माध्यमातून मुलांना शिक्षण, आरोग्यसेवा, पोषण आणि मानसिक-सामाजिक आधार दिला जातो. गावपातळीवर हा कार्यक्रम मुलांना कसा आधार देतो हे समजून घेण्यासाठी खुराना यांनी किशोरवयीन मुली, मुले आणि  काही कुटुंबांची भेट घेतली.

किशोरवयीन मुलींशी झालेल्या संवादाबद्दल बोलताना खुराना म्हणाले की, "मी १८ वर्षांच्या शिल्पाला भेटलो. तिला कुटुंबासोबत स्थलांतराचा अनुभव आहे. पण आज तिने शालेय शिक्षण पूर्ण करून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. तिचे शिक्षणच तिला हंगामी स्थलांतराचे पिढ्यानपिढ्या चालणारे चक्र मोडण्यास मदत करू शकेल अशी आशा आहे. शिक्षणासाठी योग्य, निरोगी आणि सुरक्षित वातावरणात दिल्यास मुलींची स्वप्ने नक्की पूर्ण होऊ शकतात."

पालकांच्या स्थलांतरानंतर आजोबा आपल्या दोन नातवंडांची काळजी घेत असलेल्या एका कुटुंबाचीही खुराना यांनी भेट घेतली. बालमित्र आणि स्थानिकांच्या मदतीने ही मुले शाळेत जातात. त्यामुळे आरोग्याशी संबंधित पोषण लसीकरण सेवाही त्यांना मिळतात.

आपल्या भेटीबद्दल सांगताना खुराना म्हणाले की, "प्रत्येक मुलाला सुरक्षित, प्रेमळ आणि पोषक कौटुंबिक वातावरणात वाढण्याचा हक्क आहे. सरकार मुलांच्या संरक्षणासाठी कायदे आणि योजना तयार करते. त्याचवेळी युनिसेफ, महाराष्ट्र सरकार, जिल्हा प्रशासन आणि गावातील रहिवासी एकत्र येऊन प्रत्येक मूल सुरक्षित राहील यासाठी काळजी घेताना पाहून मला त्यांचा अभिमान वाटतो."

"सर्वाधिक असुरक्षित मुलांना सुरक्षित आणि पोषक वातावरण पुरवण्यात जालना जिल्हा प्रशासनाला साथ देताना युनिसेफला आनंद होत आहे," असे युनिसेफ इंडियाचे यास्पर मोलर म्हणाले. "मुलांवरील हिंसाचार रोखला जाऊ शकतो. बाल न्याय (काळजी आणि संरक्षण) कायदा २०१५ ला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. अशावेळी मुलांच्या आयुष्यात असलेले धोके वेळीच ओळखणे आणि कुटुंबांना आवश्यक सेवा देणे गरजेचे आहे. तसेच मुलांना सामाजिक संरक्षणाशी जोडण्यासाठी व्यवस्था अधिक बळकट करणेही महत्त्वाचे आहे. या कामासाठी सहकार्य देणाऱ्या आणि प्रत्येक मुलाच्या सुरक्षितता काळजी या हक्कांसाठी पुढाकार घेणाऱ्या आयुष्मान खुराना यांचेही युनिसेफ मनःपूर्वक कौतुक करते."

यावेळी अभिनेते आयुष्यमान खुराना आणि युनिसेफ इंडियाच्या यास्पर मोलर यांनी जालना जिल्हाधिकाऱी आशिमा मित्तल यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जालना जिल्ह्यात युनिसेफच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘बालमित्र’ उपक्रमाची माहिती दिली. तसेच या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्थलांतरित कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवणे असल्याचे सांगितले. ऊसतोडणी किंवा मजुरीसाठी पालक स्थलांतरित झाल्यानंतर काही मुले गावात आजी-आजोबा किंवा नातेवाईकांकडे राहतात. त्यावेळेस ‘बालमित्र’ हे युवा स्वयंसेवक अशा मुलांना शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि मानसिक आधार देत असल्याची माहिती दिली.

 

****