Friday, 18 September 2026

जालना : लोकसंवादाच्या माध्यमातून नागरीकांना शासकीय योजनांची माहिती


 

जालना,दि.18(जिमाका) : राज्य शासनामार्फत 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या अंतर्गतच महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत शासकीय योजना आणि उपक्रमांची माहिती पोहोचविणे हा या ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाचा उद्देश आहे.

 

गणेशोत्सवाचे निमित्ताने आज दि. 18 सप्टेंबर रोजी जालना तालूक्यातील वडारवाडीचा राजा जय बजरंग गणेश मित्र मंडळ येथे लोकसंवाद-2026 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्य, कृषी आणि महिला बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांनी देण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी डी. एस. बोराडे यांनी यावेळी आरोग्य विभागातील योजनांची माहिती दिली. तर महिला बाल विकास विभागाचे अंमलबजावणी सहाय्यक अधिकारी बी.बी. राठोड, यांनी दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विशाल शंकर पवार यांच्यासह या कार्यक्रमास नागरिकांची उपस्थिती होती.

 

****

रोहिलागड, जालना येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

 

जालना,दि.18(जिमाका) :  भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केंद्रीय संचार ब्यूरो, जिल्हा प्रशासन, जालना व ग्रामपंचायत रोहिलागड, ता. अंबड, जि. जालना यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 17 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत रोहिलागड प्रांगण, तालुका- अंबड, जिल्हा-जालना येथे करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमात मंचावर जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास संस्थाचे प्रकल्प संचालक, सुनीलकुमार पठारे, अंबड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी, ज्योती कवडदेवी, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक, वसंत संसारे, केंद्रीय संचार ब्यूरोचे प्रबंधक, संतोष देशमुख, सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार, शंकर मोरे, विस्तार अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासक, ए. ए. चव्हाण, ग्रामविकास अधिकारी, एस. डी. चव्हाण, जांबुवंत माध्यमिक विद्यालायाचे मुख्याध्यापक, संजय नलावडे, शिक्षक, दिपक सोनवणे, जिल्हा परिषद केंद्रीय शाळेच्या मुख्याध्यापिका, सविता राजरवार, शिक्षक, नामदेव गंगावणे व कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन्ही शाळांचे शिक्षक व कर्मचारी, ग्रामपंचायतीचे माजी अधिकारी व पदादिकारी, कर्मचारी, प्रतिठित नागरिक, ग्रामस्थ व दोन्ही शाळांचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.

यावेळी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मार्गदर्शन, प्रभात फेरी, ध्वजारोहण, चित्रकला, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, इको फ्रेंडली गणपती मूर्ती बनवणे स्पर्धा, बक्षिस वितरण, पथनाट्य (सांस्कृतिक कार्यक्रम) आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सुनीलकुमार पठारे व वसंत संसारे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव गंगावणे यांनी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष देशमुख यांनी व आभार प्रदर्शन प्रदीप पवार यांनी केले. कार्यक्रमात केंद्र शासनाचे पंजीकृत, आभा कला मंच, छत्रपती संभाजीनगर यांच्या पथनाट्य - सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद केंद्रीय शाळा व जांबुवंत माध्यमिक विद्यालय येथून विद्यार्थ्यांद्वारा तिरंगा झेंडा व जनजागृतीपर पाट्या घेन प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभात फेरीत हातातील पाट्यांद्वारे विद्यार्थ्यांनी स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण आदी संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्रित भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा घेतली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या निमित्त आयोजित जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत आयोजित चित्रकला स्पर्धेत अक्षरा टकले, अलविरा शेख, साक्षी पाटील, निबंध स्पर्धेत आदित्य कदम, सौरभ चंदनशिव, वकृत्व स्पर्धेत शीतल वैद्य, जोया तांबोली, साक्षी पाटील, इको फ्रेंडली गणपती मूर्ति बनवणे स्पर्धेत वेदांत पाटील, साईं तेलोरे व रांगोली स्पर्धेत ज्ञानेश्वरी टकले, अमृता टकले आणि जांबुवंत माध्यमिक विद्यालयात आयोजित चित्रकला स्पर्धेत कार्तिक बमनाथ, आर्यन काकरवाल, स्वरुपा पाटील, निदा शेख, सोनल काकरवाल व दिक्षा मगरे यांना पारितोषिक देऊन गौरवन्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगरचे प्रदीप पवार, प्रिती पवार, मालु वाडेकर, शंकर मोरे, शरद सादिगले, ग्रामपंचायतीचे  माजी अधिकारी व पदाधिकारी, कर्मचारी  जिल्हा परिषद केंद्रीय शाळा व जांबुवंत माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

****

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी जालन्यात विशेम मोहिम

 

जालना,दि.18(जिमाका) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणांमधील त्रुटींची पूर्तता करून प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

सन 2026-27 मध्ये इयत्ता 11 वी, 12 वी विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी यापूर्वी अर्ज केले आहेत. तसेच ज्या अर्जदारांच्या प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रे किंवा त्रुटींची पूर्तता झालेली नाही आणि प्रकरणे समितीकडे प्रलंबित आहेत, अशा अर्जदारांना या विशेष मोहिमेतून प्रकरणे निकाली काढण्याची संधी देण्यात आली आहे.

या कालावधीत कार्यालयात त्रुटी पूर्ततेसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. अर्जदारांनी दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात उपस्थित राहून आपल्या प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग (जात प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, 2000 मधील कलम 8 नुसार जातदावा सिद्ध करण्याची जबाबदारी अर्जदारावर आहे. त्यामुळे अर्जदारांनी आपल्या प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

त्रुटींची पूर्तता न केल्यास संबंधित अर्ज निकाली काढण्यात येऊ शकतो. तसेच महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग (जात प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, 2012 मधील नियम 17(2) व (3) नुसार जात वैधता प्रमाणपत्राची गरज नसल्याचे गृहीत धरून अर्ज निकाली काढण्यात येऊ शकतो. त्यानंतर कोणतेही म्हणणे विचारात घेतले जाणार नाही, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांनी केले आहे.

 

****

*जालना येथे पीएम विश्वकर्मा लाभार्थी मेळावा*

*पारंपरिक कारागिरांनी उद्योग विस्तारासाठी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा : अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश मिसाळ*



जालना,दि.18(जिमाका) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जालना जिल्ह्यातील पीएम विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळाव्याचे आयोजन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर, जिल्हा उद्योग केंद्राचे उपआयुक्त योगेश सारणीकर, एमएसएमईच्या सहायक संचालिका श्रीमती सुनिता, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी तथा पीएम विश्वकर्मा योजनेचे सदस्य सचिव रुपेश आचारी, ज्येष्ठ पर्यवेक्षक विष्णू कायंदे तसेच मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.

मेळाव्याच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रुपेश आचारी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना पीएम विश्वकर्मा योजनेची उद्दिष्टे, लाभार्थ्यांची पात्रता, योजनेअंतर्गत मिळणारे प्रमाणपत्र, टूलकिट तसेच उद्योग सुरू करण्यासाठी किंवा उद्योगवाढीसाठी बँकांमार्फत उपलब्ध होणाऱ्या कर्ज सुविधांची माहिती दिली.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेतील लाभार्थी उद्योजकांना टूलकिट तसेच कर्ज मंजुरी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात श्री. मिसाळ यांनी पारंपरिक कारागिरांच्या उद्योजकीय प्रवासाचे कौतुक केले. कारागिरांनी उद्योगाचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा तसेच आपल्या उत्पादनाचे प्रभावी ब्रँडिंग करून बाजारपेठेत स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार यांनी पीएम विश्वकर्मा उद्योजकांनी आपला सिबिल/क्रेडिट स्कोअर चांगला राखल्यास बँकांकडून कर्जपुरवठा सुलभ होण्यास मदत होऊ शकते, असे सांगितले.

मेळाव्यात पीएम विश्वकर्मा योजनेच्या काही लाभार्थी उद्योजकांनी आपली यशोगाथा व मनोगत व्यक्त केले. पारंपरिक कारागिरांसाठी योजना उपयुक्त असून अधिकाधिक उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.


****


Thursday, 17 September 2026

मराठवाडा मुक्तीसंग्रामात जालना जिल्ह्याचे योगदान महत्त्वाचे - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त हुतात्मा स्मारकास अभिवादन; जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहण

 






जालना,दि.17(जिमाका) :  मराठवाड्याच्या मुक्तीसाठी झालेल्या ऐतिहासिक संग्रामात जालना जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. या लढ्यातील हुतात्मे, स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण आजही जालना जिल्ह्याच्या इतिहासात अभिमानाने केले जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जालना शहरातील टाऊन हॉल‍ येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेश देताना त्या बोलत होत्या. यावेळी  आमदार अर्जुन खोतकर, आमदार हिकमत उढाण, माजी आमदार राजेश टोपे, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवारीया, महानगर पालिका आयुक्त अंजली शर्मा, पोलिस अधिक्षक तेगबीर सिंह संधु, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, अपर पोलीस अधिक्षक विक्रम साळी, उपविभागीय अधिकारी रामदास दौंड यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल पुढे म्हणाल्या की, मराठवाडा मुक्तीसंग्रामात जालना जिल्ह्याचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. परतूर येथे झालेल्या महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनाला या लढ्याच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. कोलते पिंपळगावकरांनी 22 जून 1948 रोजी रझाकारांविरुद्ध सशस्त्र लढा दिला. जिल्ह्यातील विविध ठिकाणी जंगल सत्याग्रह ही झाले.

नागरिकांना शासनाच्या विविध सेवा, योजना, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती घरपोच उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या ‘जालना मित्र’ पोर्टलच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात २ हजार ४६२ नागरिकांना घरपोच प्रमाणपत्रे वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

प्रारंभी मान्यवरांनी टाऊन हॉल परिसरात लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  यानंतर हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तर पोलिस जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून व पोलिस बँड पथकाने शोकधून वाजवून हुतात्म्यांना मानवंदना दिली.

यावेळी स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी, नागरिक यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-*-

जिल्हाधिकारी कार्यालयात आशिमा मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहण

 



जालना(जिमाका),दि.17: मराठवाडा मुक्त‍िसंग्राम दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी सर्वश्रीमती मनिषा दांडगे, सुकेशनी पगारे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-

जिल्हा परिषदेत मानवी रांगोळीद्वारे ‘सेवा संकल्प अभियान’ ची सुरुवात शुभारंभ

 




 

जालना(जिमाका),दि.17 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील 25 वर्षांच्या कारकिर्दीनिमित्त तसेच सामान्य नागरिकांपर्यंत विविध शासकीय सेवा आणि लोककल्याणकारी योजनांचा लाभ जलदगतीने पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राज्यभर 'सेवा संकल्प अभियान' राबवण्याचा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ या देशव्यापी जिल्हास्तरीय अभियानाची सुरुवात आज येथील जिल्हा परिषदेत मानवी साखळी व रांगोळी उपक्रमाच्या माध्यमातून उत्साहात करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारीया, परिविक्षाधीन अधिकारी आर. रंगामंजू, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, मुख्य लेखा वित्त अधिकारी राधाकिसन राऊत यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राष्ट्रीय प्रतिके आणि विकसित भारताची संकल्पना या विषयावर आधारीत मानवी रांगोळीचा उपक्रम राबविला.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातुन 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत जालना जिल्ह्यात जिल्हा व प्रत्येक तालुकास्तरावर 'सेवा सेतू शिबिरे' आयोजित करण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देणे, कार्यालयांमधील प्रलंबित कामांचा गतीने निपटारा करणे, 'नाविन्यपूर्ण संकल्पना' मांडण्यासाठी इनोव्हेशन चॅलेंज, 'सेवा माझे योगदान', स्वच्छता मोहीम आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

यावेळी कार्यक्रमास कार्यकारी अभियंता जंजाळ, शिक्षणाधिकारी संगीता भागवत, उपशिक्षणाधिकारी संजय कायंदे, गटविकास अधिकारी ऋषिकेश टेकाळे, सहायक गटविकास अधिकारी गजानन पाखरे, संपर्क अधिकारी भगवान तायड यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-