Wednesday, 19 August 2026

सशस्त्र दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; नाशिक येथे मोफत पूर्व प्रशिक्षण

 

 

जालना,दि.19(जिमाका) : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोफत पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी हे प्रशिक्षण नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात आयोजित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी आयोजित करण्यात येणारे हे प्रशिक्षण २१ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी २० सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक रोड, नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षणासोबत निवास व भोजनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जालना जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारी पदाची संधी मिळविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत मुलाखतीसाठी हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या संकेतस्थळावरून SSB परीक्षेसाठी असलेले कॉल लेटर डाउनलोड करून त्याची प्रिंट सोबत आणावी. संबंधित कागदपत्रांची पूर्तता करूनच मुलाखतीस उपस्थित राहणे आवश्यक आहे.

SSB वर्गामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवाराकडे खालीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे—

·       CDSE-UPSC किंवा NDA-UPSC परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी आणि त्यासाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डच्या मुलाखतीस पात्र ठरलेले असावे.

·       NCC Special Entry साठी SSB मुलाखतीचे कॉल लेटर असावे.

·       Technical Graduate Course साठी SSB मुलाखतीचे कॉल लेटर असावे.

·       University Entry Scheme साठी SSB कॉल लेटर असावे किंवा SSBसाठी शिफारस केलेल्या यादीत उमेदवाराचे नाव असावे.

या पात्रतेपैकी कोणतीही एक अट पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना संबंधित प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.  प्रशिक्षणासंदर्भातील अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथील प्रभारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. कार्यालयीन वेळेत training.pctcnashik@gmail.com या ई-मेलवर तसेच दूरध्वनी क्र. 0253-2457902 किंवा 9156073306 या क्रमांकांवर संपर्क साधवा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना (अतिरिक्त कार्यभार) यांनी केले आहे.

 

****

 

जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती बैठकीचे आयोजन

 


 

जालना,दि.19(जिमाका) : जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक गुरुवार दि. 20ऑगस्ट,2026 रोजी सायं. 5.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. असे जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

****

जालना महापालिकेच्या सेवा प्रवेश व सेवा वर्गीकरण नियमांना शासनाची मंजुरी

 


 

993 पदांच्या आकृतिबंधानुसार नियुक्ती व सेवांचे नियमन होणार

 

जालना,दि.19(जिमाका) : जालना शहर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती तसेच सेवांचे नियमन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘जालना शहर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२६’ या नियमांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. नगर विकास विभागाने बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.

९९३ पदांचा आकृतिबंध मंजूर

महानगरपालिका नव्याने स्थापन झाल्यानंतर शासनाने ११ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये एकूण ९९३ पदांचा आकृतिबंध मंजूर केला आहे. राज्यातील महानगरपालिकांचे वर्गीकरण आणि त्यानुसार महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या पदांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आकृतिबंधाच्या आधारे जालना महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम, २०२६ तयार करण्यात आले.

जालना शहर महानगरपालिकेने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ४५७ (३) अन्वये शासन मान्यतेसाठी सादर केलेल्या नियमांना शासनाने मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर महानगरपालिका अधिनियमातील कलम ४५४, ४५५, ४५६, ४५७ (३) व ४६५ अन्वये या नियमांना मान्यता देण्यात आली आहे. शासन निर्णयात परिशिष्ट १ ते ४ सह ‘जालना शहर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२६’ यांना मान्यता देण्यात आल्याचे शासन निर्णयात नमुद करण्यात आले आहे.

 

 

****

जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्टला ‘महा-वॉकॅथॉन’

 


 

‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलसंधारण जनजागृतीसाठी विशेष आयोजन; *नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन*

 

 

जालना,दि.19(जिमाका) : जलसंधारणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच पाणी बचत, पावसाचे पाणी अडविणे व जमिनीत जिरविणे आणि जलस्रोतांचे संवर्धन याबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त ‘महा-वॉकॅथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे.पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा! हा या उपक्रमाचा मुख्य संदेश असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यभर विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर आयोजित करण्यात आली आहे. पाण्याचे महत्त्व, जलसंधारणाची गरज आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

*२१ ऑगस्ट रोजी वॉकॅथॉनचे आयोजन *

दि. २१ ऑगस्ट, २०२६ रोजी सकाळी ७ वाजता या वॉकॅथॉनला जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात होणार असुन, घाटी - अंबड चौफुली मार्गे पोलीस मैदान परिसरात या उपक्रमाची सांगता होणार आहे. या मार्गावर सहभागी नागरिकांकडून जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. वॉकॅथॉनमध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, विविध विभागांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, विद्यार्थी, युवक, महिला तसेच पर्यावरण व जलसंधारण क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*‘वॉक फॉर वॉटर’मधून जनजागृती*

Save Soil, Save Water, Secure Tomorrowअर्थात ‘माती वाचवा, पाणी वाचवा आणि उद्याचे भविष्य सुरक्षित करा’ असा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे. वाढती लोकसंख्या, बदलते हवामान, अनियमित पर्जन्यमान आणि पाण्याचा वाढता वापर या पार्श्वभूमीवर जलसंधारणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे केवळ शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता नागरिकांनीही जलसंधारणाच्या कामात सक्रिय सहभाग घेण्याची गरज या उपक्रमातून अधोरेखित केली जाणार आहे.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेनुसार पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता त्याचा स्थानिक पातळीवर साठवण व पुनर्भरणासाठी उपयोग करणे, जलस्रोत स्वच्छ ठेवणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि जलसंधारणाच्या कामांना लोकचळवळीचे स्वरूप देणे, हा या अभियानाचा उद्देश आहे.

*नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*

जलसंधारण हा केवळ शासनाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी निगडित प्रश्न आहे. त्यामुळे ‘महा-वॉकॅथॉन’मध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश घराघरांत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून या ‘महा-वॉकॅथॉन’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मृद व जलसंधारण विभागाने  केले आहे.

 

 

****

Tuesday, 18 August 2026

विशेष लेख जलसंधारणातून घडवूया बारमाही हिरवा महाराष्ट्र

 



           पाऊस पडतो तेव्हा आपण आनंदतो; पण तोच पाऊस वाहून जातो तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आकाशातून पडणारा प्रत्येक थेंब जमिनीवर थांबविणे, तो जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, हीच आजच्या महाराष्ट्राची सर्वात मोठी गरज आहे. म्हणूनच यंदा २१ ऑगस्ट रोजी साजरा होणारा जलसंधारण दिन हा केवळ शासकीय कार्यक्रम न राहता लोकसहभागाची नवी सुरुवात ठरली पाहिजे.

            शासनाने माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी, म्हणजेच २१ ऑगस्टला दरवर्षी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयामागे जलसंधारण क्षेत्रातील सुधाकरराव नाईक यांच्या योगदानाचे स्मरण आणि जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक करण्याचा उद्देश आहे. या दिवशी जलपूजन, विविध जलसंधारण कामांचे भूमिपूजन व लोकार्पण, श्रमदान, जनजागृती, उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव आदी उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याच पार्श्वभूमीवर राज्यात जलसंधारण दिनाच्या निमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

            स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात शासकीय कार्यालयांमध्ये मृद व जलसंधारणाची शपथ घेऊन या लोकचळवळीची सुरुवात करण्यात आली. २१ ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’, रील्स स्पर्धा, जलपूजन, श्रमदान आणि जनजागृतीचे उपक्रम नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी आयोजित केले जात आहेत.

जलसंधारण म्हणजे काय

पावसाचे पाणी शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात जमिनीवर अडविणे, त्याचा वेग कमी करणे, जमिनीत मुरविणे, भूजलाचे पुनर्भरण करणे, जलस्रोतांची साठवण क्षमता वाढविणे आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, याला व्यापक अर्थाने जलसंधारण म्हणता येईल. जलसंधारण म्हणजे केवळ बंधारा बांधणे नव्हे. पाण्याचा प्रत्येक थेंब जिथे पडतो, तिथेच त्याचा अधिकाधिक उपयोग करणे, ही त्यामागची मूलभूत संकल्पना आहे.

      महाराष्ट्रासाठी ही बाब अधिक महत्त्वाची आहे. राज्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे ५२ टक्के क्षेत्र अवर्षणप्रवण आहे. पावसाचे भौगोलिक आणि कालिक वितरण असमान आहे. काही भागात अतिवृष्टी होते, तर काही भागात पावसाची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे ‘पाणी आहे, पण योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी नाही’ हीच मोठी समस्या आहे. जलसंधारणातून या विसंगतीवर मात करता येते.

महाराष्ट्राच्या जलसंधारणाची मुळे

महाराष्ट्रात जलसंधारणाची परंपरा नवी नाही. गावागावातील तलाव, बंधारे, पाझर तलाव, विहिरी आणि पारंपरिक जलव्यवस्थापन ही ग्रामीण जीवनाची पूर्वापार साधने आहेत. ही परंपरा थेट छत्रपती शिवरायांचा काळापर्यंत जाते. गड किल्ल्यावर पावसाचे पाणी साठवण्याची मोठी परंपरा आहे. यावर महाराष्ट्राने शिवकालीन पाणी साठवण योजनाही सुरु केली आहे. आधुनिक शासकीय पातळीवर मात्र जलसंधारणाला स्वतंत्र संस्थात्मक दिशा मिळाली ती स्वतंत्र जलसंधारण विभागाच्या स्थापनेमुळे.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनीही 1972 च्या दुष्काळानंतर जलसंधारण माध्यमातून ‘जलक्रांन्ती’ घडवून आणली होती. त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबवून पाणलोट क्षेत्र वाढवले मोठ्या धरणांपेक्षा बॅरेजेसला महत्व दिले

 

 

जलयुक्त शिवारातून नव्या पर्वाला सुरुवात

जलसंधारणाला मोठ्या प्रमाणावर लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या दृष्टीने २०१४ नंतरचा काळ महत्त्वाचा ठरतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ५ डिसेंबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले. या योजनेतून पुढे हजारो हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली. लक्षावधी टीएमसी पाणी साठा निर्माण झाला. हजारो गावे पाणीदार झाली. त्यांचा शाश्वत विकास झाला.

         आज जलयुक्त शिवार २.०च्या माध्यमातूनही जलसंधारण, जलसाक्षरता, लोकसहभाग आणि उपलब्ध भूजलाच्या शाश्वत वापरावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनीही स्पष्टपणे सांगितले आहे की, महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणातून परिवर्तन घडविणे आवश्यक आहे.

योजनांची ताकद, लोकसहभागाची साथ

महाराष्ट्राने जलसंधारणासाठी अनेक मार्ग स्वीकारले आहेत. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेला २०१६ मध्ये सुरुवात करून शेतकऱ्यांना स्वतःची संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्याची संधी देण्यात आली.

     ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही संकल्पना तर जलसंधारण आणि शेती यांची सांगड घालणारी आहे. धरणातील गाळ काढल्यामुळे जलाशयाची साठवण क्षमता वाढते आणि तोच गाळ शेतात टाकल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. २०२४ मध्ये ही योजना कायमस्वरूपी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  याशिवाय विहीर पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नाला खोलीकरण व रुंदीकरण, सिमेंट बंधारे, गॅबियन बंधारे, वनराई बंधारे, सलग समतल चर, शेततळी, जलस्रोतांमधील गाळ काढणे, बांधावर वृक्ष व बांबू लागवड अशा असंख्य उपाययोजना राज्यात राबविल्या जात आहेत.

देशातील प्रेरणादायी उपक्रम

          राजस्थानच्या अलवरमध्ये पारंपरिक ‘जोहड’ या पावसाच्या पाण्याच्या साठवण संरचनांचे पुनरुज्जीवन करून गावकऱ्यांनी जलव्यवस्थापनाचे प्रभावी मॉडेल उभे केले. जलतज्ज्ञ आणि ‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील लोकसहभागातून कोरड्या प्रदेशात जलस्रोत पुनरुज्जीवित झाले आणि अरवरीसारख्या नद्यांना पुन्हा प्रवाह मिळाला.

महाराष्ट्रात राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार ही दोन उदाहरणे तितकीच प्रेरणादायी आहेत. राळेगणसिद्धीत नाला बांध, गली प्लगिंग, समतल चर, पाझर तलाव आणि लोकसहभागातून दुष्काळी गावाचा कायापालट झाला. हिवरे बाजारने पाण्याचे बजेट, पिकांचे नियोजन, ठिबक सिंचन, भूजल पुनर्भरण आणि जलसंधारण यांची सांगड घालत जलसुरक्षेचे आदर्श मॉडेल निर्माण केले.

नागरिकांनी काय करायचे

          शासन आपले काम करीत आहे; परंतु जलसंधारणाची खरी यशोगाथा नागरिकांच्या सहभागाशिवाय पूर्ण होणार नाही. या पावसाळ्यात प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या छतावरील पाणी साठविण्याची किंवा जमिनीत मुरविण्याची व्यवस्था करावी. गावांनी पाण्याचा ताळेबंद तयार करावा. शेतकऱ्यांनी शेततळी, बांधबंदिस्ती, विहीर पुनर्भरण, ठिबक-सिंचन आणि पिकांच्या पाण्याच्या गरजेनुसार नियोजन करावे. गावातील नाले, तलाव, बंधारे आणि पारंपरिक जलस्रोत यांची स्वच्छता व देखभाल करावी. शक्य तेथे श्रमदान करावे. पाणी वाया जाणार नाही, याची प्रत्येक कुटुंबाने काळजी घ्यावी.आणि पावसाळा सुरु आहे. वृक्ष लागवडीत कुटूंबाने दरवर्षी एक या प्रमाणे वृक्ष लागवड करावी.

             जलसंधारण हा केवळ मृद व जलसंधारण विभागाचा विषय नाही; तो कृषीचा, ग्रामविकासाचा, पर्यावरणाचा, अर्थव्यवस्थेचा आणि भविष्यातील पिढ्यांचा विषय आहे. कारण पाणी वाचले तर शेती वाचेल, शेती वाचली तर गावाची अर्थव्यवस्था वाचेल आणि गाव समृद्ध झाले तर महाराष्ट्र समृद्ध होईल.

म्हणून २१ ऑगस्टचा जलसंधारण दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस न राहता प्रत्येकाच्या मनात एक संकल्प निर्माण करणारा दिवस ठरू दे. चला !जलसंधारणातून ‘बारमाही हिरवा महाराष्ट्र!’

  घडवूया!

प्रवीण टाके

उपसंचालक (माहिती)

विभागीय माहिती कार्यालय

छत्रपती संभाजीनगर

मो.क्र.9702858777

-*-*-*-*-*-

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतून तीन कुटुंबांना सहा लाखांची मदत

 



 

जालना,दि.18(जिमाका) : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) अंतर्गत विमाधारकांच्या निधनानंतर त्यांच्या नामनिर्देशित व्यक्तींना विमा दाव्याची रक्कम वितरित करण्यात आली. बँक ऑफ इंडिया, राजूर शाखा, ता. भोकरदन यांच्या वतीने तीन लाभार्थी कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये असे एकूण सहा लाख रुपयांच्या विमा दाव्यांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते संबंधित नामनिर्देशित व्यक्ती चांदरी एक्को येथील श्रीमती जनाबाई ज्ञानेश्वर बेडके, ताडेगाव येथील श्री. राजू गोपाने तसेच खामखेडा येथील श्री. नारायण दामोदर यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या विमा दाव्याचे धनादेश वितरीत करण्यात आले.

यावेळी अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मंगेश केदार, बँक ऑफ इंडियाचे राजूर शाखा व्यवस्थापक शाम अंभोरे, नोडल व्यवस्थापक अनिल ठोंबरे, प्रशासन अधिकारी बाबासाहेब औताडे आणि अधिकारी योगेश चोरमारे उपस्थित होते.

जालना जिल्ह्यात सामाजिक सुरक्षा योजनांना प्रतिसाद

जालना जिल्ह्यात केंद्र शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जिल्ह्यात ८.७३ लाख खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये सुमारे ४०३ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यात ३.१० लाख नागरिकांची नोंदणी झाली असून, आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक विमा दावे निकाली काढण्यात आले आहेत. या दाव्यांपोटी नामनिर्देशित व्यक्तींना एकूण १०.१२ कोटी रुपयांची विमा रक्कम वितरित करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेलाही जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असून, या योजनेअंतर्गत ६.४४ लाख नागरिकांची नोंदणी झाली आहे. आतापर्यंत ९५ दावे निकाली काढण्यात आले असून, त्यापोटी एकूण १.८९ कोटी रुपयांची विमा रक्कम वितरित करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत १८ ते ५० वर्षे वयोगटातील पात्र नागरिकांना वार्षिक ४३० रुपयांच्या हप्त्यात दोन लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण मिळते. तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत १८ ते ७० वर्षे वयोगटातील नागरिकांना केवळ २० रुपये वार्षिक हप्त्यात अपघाती विमा संरक्षण उपलब्ध आहे. या दोन्ही योजनांसाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही.

ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांपर्यंत सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी बँकांकडून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. विमा योजनांमुळे कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या निधनानंतर निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटात संबंधित कुटुंबाला आधार मिळत आहे.

यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जालना जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तसेच इतर सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये सहभागी होऊन आपल्या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण सुनिश्चित करावे, असे आवाहन केले.

-*-*-*-*-*-*-*-

जिल्हा परिषद उपकर योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


 

जालना,दि.18(जिमाका) : कृषी विभाग जिल्हा परिषद मार्फत जिल्हा परिषद उपकर योजना सन  2026-27 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर पुरविण्यासाठी महत्तम अनुदान मर्यादेच्या अधिन राहून खालीलप्रमाणे कृषी औजरासाठी तालुकास्तरावर प्राप्त होणाऱ्या अर्जातील शेतकऱ्यांची जिल्हास्तरावर संगणकीय लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येणार आहे.

जिल्हा परीषद उपकर योजना सन 2026-27 मधील औजरांवर खालीलप्रमाणे अनुदान देय आहे.

ट्रॅक्टर (20 P.T.O.H.P व त्यापुढील)- किंमतीच्या 40 टक्के जास्तीत जास्त रु.1 लाख 25 हजार  च्या मर्यादेत (यापैकी जी कमी असेल ती), ट्रॅक्टरचलीत रोटाव्हेटर किंमतीच्या 40 टक्के जास्तीत जास्त रु. 36 हजार 800 च्या मर्यादेत (यापैकी जी कमी असेल ती), मानवचलीत टोकन यंत्र किंमतीच्या 50 टक्के जास्तीत जास्त रु. 8 हजार च्या मर्यादेत स्ट्रॉ चॉपर/श्रेडर/मल्चर माऊंटेड किंमतीच्या 40 टक्के जास्तीत जास्त रु. 58 हजार  च्या मर्यादेत (यापैकी जी कमी असेल ती)

 

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : लाभार्थीजवळ स्वतःच्या नावे जमिनीचा 7/12, 8 अ उतारा,आधार कार्ड, बँक पासबुक तसेच ट्रॅक्टरचलीत औजारांसाठी अर्जदाराचे स्वतःच्या नावे असलेले ट्रॅक्टर RC  Book आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील शेतक-यांनी योजनेचा लाभ घेणे करीता संबंधीत पंचायत समिती स्तरावर दि. 19 ऑगस्ट 2026 ते दि. 11 नोव्हेंबर 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावेत. या योजनेसाठी जास्तीत जास्त शेतक-यांनी अर्ज करून सहभाग नोंदवावा असे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारिया, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी शिरिष बनसोडे, आणि कृषी विकास अधिकारी पी. बी. बनसावडे यांनी आवाहन प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-