जालना,दि.17(जिमाका):
जालना जलकवच अभियान - 2026 व आकांक्षित
तालुका कार्यक्रम अंतर्गत आज पंचायत समिती सभागृह, बदनापूर येथे रेशीम शेती विषयक
कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. जलसुरक्षा, पीक विविधीकरण व शेतकरी उत्पन्नवाढ या
उद्दिष्टांना केंद्रस्थानी ठेवून सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
एल-निनोच्या संभाव्य परिणामांच्या
पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत
असलेल्या जालना जलकवच अभियान अंतर्गत कमी पाण्यावर आधारित, शाश्वत व उत्पन्नवाढीस
पूरक अशा पर्यायी शेती व्यवसायांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम
राबविण्यात आला.
कार्यशाळेस तालुक्यातील शेतकरी, शेतकरी
गट, महिला बचत गट सदस्य, उमेद अभियानातील महिला, कृषी सखी, युवक-युवती तसेच विविध
विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून
उपस्थित असलेले रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांनी रेशीम शेतीचे आर्थिक
महत्त्व, तुती लागवड, रेशीम किडे संगोपन, शासकीय अनुदान योजना, बाजारपेठ उपलब्धता
तसेच रोजगार निर्मितीच्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. अंकुश
गाडगे, केंद्रीय रेशीम बोर्ड यांनी रेशीम शेतीतील तांत्रिक बाबी, उत्पादन
व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध विविध योजनांची
माहिती उपस्थितांना दिली.
ज्योती एन. राठोड गट विकास अधिकारी
पंचायत समिती बदनापूर यांनी, जलकवच अभियान अंतर्गत येणारे सप्त कार्यक्रम विषयी
माहिती दिली व शाश्वत उत्पादन देणारी
रेशीम शेतीचा अवलंब करण्याचा आज महिलांनी निर्णय घ्यावा व आपले आपले उत्पादन
वाढवावे असे अवाहन केले
रेशीम शेती ही कमी पाण्यात अधिक उत्पादन
देणारी, ग्रामीण भागात रोजगार निर्मितीस चालना देणारी तसेच महिलांसाठीही उपयुक्त
अशी व्यवसायाभिमुख शेती पद्धती असल्याने जलसुरक्षा, पीक विविधीकरण व शेतकरी
उत्पन्नवाढ या जालना जलकवच अभियानाच्या उद्दिष्टांना पूरक ठरणार असल्याचे यावेळी
नमूद करण्यात आले.
सदर कार्यक्रम, बदनापूर गटविकास अधिकारी
ज्योती एन. राठोड, यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाला. कार्यक्रमास
बदनापुर तालुक्याचे रेशीम अधिकारी,डॉ.गोविंद गीते हे उपस्थीत होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी
पंचायत समिती बदनापूर, उमेद अभियान, कृषी विभाग व रेशीम विभाग यांनी समन्वयाने
कार्य केले.
“कमी पाण्यात अधिक उत्पादन - रेशीम
शेतीकडे वाटचाल” या संदेशाद्वारे शेतकऱ्यांना जलसाक्षरता व पर्यायी शेती व्यवसायाबाबत
जागरूक करण्याचा प्रयत्न या कार्यशाळेतून करण्यात आला.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment