Thursday, 25 June 2026

जादूटोणा व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी -अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ विज्ञान युगातही अंधश्रद्धेचा विळखा जनतेला फसवल्यास सात वर्षापर्यंत शिक्षा

 



 

जालना, दि.25(जिमाका): महाराष्ट्र नरबळी आणि  इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करणारा व त्यांचे समूळ उच्चाटन करणारा अधिनियम, 2013 (अंधश्रद्धा निर्मलन कायदा) यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी केले आहे.

 जादूटोणा विरोधी कायदा राज्यस्तरीय समितीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या अध्यक्षेत संपन्न झाली.

यावेळी बैठकीत महाराष्ट्र नरबळी आणि  इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करणारा व त्यांचे समूळ उच्चाटन करणारा अधिनियम, 2013 (अंधश्रद्धा निर्मलन कायदा) यांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, अंधश्रद्धा व जादूटोणा यांच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूक, शोषण आणि अमानुष कृत्यांना आळा घालणे तसेच कायद्याबाबत जनजागृती वाढविणे यावर भर देण्यात आला. या कायद्यानुसार नरबळी देणे, भूतबाधा किंवा जादूटोणा काढण्याच्या नावाखाली व्यक्तींना शारीरिक किंवा मानसिक त्रास देणे, चमत्काराचे खोटे दावे करून आर्थिक फसवणूक करणे, अघोरी प्रथा राबविणे महिलांवर जादूटोणा केल्याचा आरोप करून छळ करणे आदी कृत्ये दंडनीय गुन्हे असून कायद्यामध्ये 3 महिने ते 7 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये संबंधित व्यक्तींविरुद्ध फौजदारी कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

तरी सर्व जनतेने अंधश्रद्धा आणि जादूटोणा अशा फसव्या बाबीपासून दूर राहण्याचे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अनिता राठोड  यांनी केले आहे.

महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत     त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम-2013  दि. 30 डिसेंबर, 2013 रोजी जारी केलेला आहे.

सदर कायद्याची परिणामकारक व योग्य अंमलबजावणी करण्यासाठी. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावरील जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती गठीत करण्यात आलेली आहे.

हा कायदा कोणत्याही धर्माच्या श्रद्धा, पूजा, प्रार्थना, व्रत-उपवास किंवा धार्मिक विधींवर बंदी घालत नाही. फक्त त्या धार्मिक किंवा सामाजिक प्रथांमुळे जर फसवणूक, शोषण किंवा अमानुष वर्तन होत असेल तर त्यावर कारवाई केली जाते.

तक्रार कुठे करावी?  जवळचे पोलीस ठाणे, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय संबंधित शासकीय यंत्रणा सबब आपल्या आजु-बाजूस काही अनिष्ट, अघोरी, अमानुष प्रथा व जादुटोणा अशा घटना घडत असतील त्यांनी नजिकच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment